लेखांक ११५ : भृगु ऋषींचे तपाचरण ते बुलेट ट्रेनचे अवतरण पाहिलेले परमपवित्र भृगुक्षेत्र भरूच

त्रिगुणातीत ध्यान आश्रमातून बाहेर पडल्या पडल्या लगेचच बुलेट ट्रेन चे काम चालू आहे ते दिसले . संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प हा एका उन्नत काँक्रीट पुलावरून नेण्यात येणार आहे असे मला कामगारांनी सांगितले . या पुलांचे खांब उभे करण्याचे काम सर्वत्र सुरू होते . अतिशय गतिमान असे हे वाहन असल्यामुळे एका सरळ रेषेमध्ये सर्व पूल बांधण्यात आला होता . मुंबईवरून थेट कर्णावतीला ही बुलेट ट्रेन जाणार होती . (अहमदाबाद चा शब्दशः अर्थ अहमदशहा अब्दाली अमर राहो . असे मला काही वाटत नसल्यामुळे त्या गावाचे मूळ नाव कर्णावती हेच लिहीत आहे )
या प्रकल्पाची काही छायाचित्रे आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे . 


बुलेट ट्रेनसाठी नर्मदा मातेच्या पात्रामध्ये बांधण्यात येणारे खांब



या प्रकल्पासाठी आधुनिक दर्जाचे जपानी तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे



प्रकल्पाचे काम अहोरात्र सुरू आहे . लवकरच भारतातील पहिली बुलेट ट्रेन नर्मदा मातेच्या अंगा खांद्यावरून पुढे जाणार आहे ! 
भरूच शहर आता सुरू झाले . पूर्वीपासून अरबस्थानातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे बंदर असल्यामुळे इथे अरबी लोकांची खूप मोठी वस्ती आहे . पावला पावला तुम्हाला त्याच्याकडून जाणवतात . मोठमोठ्या मशिदी ,दर्गे आणि मदरसे जागोजागी दिसतात . काळे बुरखे घालून फिरणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते . मैयाच्या काठाने चालण्यासाठी विस्तृत रस्ता आहे . परंतु भरूच शहराच्या बाहेरील वस्त्यांचे घाणेरडे पाणी घेऊन येणारे ओढेनाले मोठ्या प्रमाणात आडवे येतात . ते पार करत करत दाट मनुष्यवस्तीमध्ये असलेल्या कामनाथ महादेवांचे दर्शन घेतले . मंदिर अतिशय सुंदर होते . व भाविकांची मोठी गर्दी तिथे होती .


श्री कामनाथ महादेव मंदिर भरूच
श्री कामनाथ महादेव
मंदिरामध्ये स्थानिकांकडून महादेवाच्या खूप सुंदर पूजा बांधल्या जातात
इथे गुजरात मध्ये देवाला सुद्धा दादा म्हणायची पद्धत आहे ! हे आहेत सिद्धिविनायक गणपती दादा ! 
मंदिरातून दिसणारा नर्मदा काठ . याच रस्त्याने चालत वर मंदिराकडे आलो . वाटेतील नाले आपल्याला दिसतील .
आश्रमामध्ये अंबामातेचे देखील मंदिर होते . नर्मदा मातेचे मंदिर होते .मारुतीचे मंदिर होते. एक मोठे पिंपळाचे झाड होते . त्याची देखील पूजा लोक करत होते . हे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे . आणि भरूच मध्ये एकूण ४८ अशी पौराणिक मंदिरे आहेत ज्यांचा नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख आहे ! त्यातील बहुतांश मंदिरांचे दर्शन घ्यावे अशी मनापासून इच्छा होती . त्यामुळे वाटेत दिसेल त्या माणसाला इथे कुठले प्रसिद्ध पौराणिक मंदिर आहे का असे विचारत विचारत पुढे निघालो होतो . या मंदिरामध्ये तुकाराम बुवा सुरवसे सुद्धा मला भेटले . तेही माझ्यासोबत मंदिरांची दर्शने करत निघाले . दुर्दैवाने या गावांमध्ये मंदिरे कमी आणि मशिदी जास्ती दिसत होत्या . मैयाच्या काठाकाठाने फुरजा मार्ग नामक रस्ता चालत थोड्या अंतरावर गेल्यावर एक छोटासा ओढ्या वरचा पूल लागला . तो ओलांडल्यावर जगन्नाथाचे मंदिर होते आणि प्रसिद्ध पुरातन किल्ले वजा दत्त मंदिर होते . जगन्नाथाच्या मूर्ती अगदी मूळ मूर्तीची आठवण करून देणाऱ्या होत्या . दत्त मंदिर म्हणजे तर किल्लाच होता ! इथली दत्ताची मूर्ती लाकडाची आहे ! आणि अतिशय सुंदर आहे . या मंदिरामध्ये गाईंचा मुक्त संचार होता . 
भरूच येथील जगन्नाथ मंदिर
श्री जगन्नाथ आणि बलराम आदी मूर्ती
 भरूच किल्ल्याची भिंत
तटबंदी युक्त दत्त मंदिर
मंदिर दरवर्षी जलमग्न होत असल्यामुळे दरवर्षी रंगवावे लागते .
अंबा माता
श्री दत्तप्रभूंची लाकडी मूर्ती
सुंदर अशा गोमातांचा मंदिरामध्ये मुक्त संचार असतो
त्या कुठेही जाऊ शकतात .अगदी देवाजवळ सुद्धा!
छोटेसेच मंदिर आहे परंतु कडे कोट किल्ल्यासारखे बांधलेले असल्यामुळे छान वाटते .याला बुरुज वगैरे आहे . आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे की इथून पुढे भरूच शहराला नर्मदा मातेपासून  अर्थात तिच्या महापुरापासून वाचवणारी एक जबरदस्त तटबंदी सुरू होते ! ती थेट शहर संपेपर्यंत आहे ! जशी ग्रेट वॉल ऑफ चायना प्रसिद्ध आहे तशी ही ग्रेट वॉल ऑफ भरूच आपल्या कोणालाच माहिती नाही ! इतकी मोठी आहे की तिच्यावर काही लोकांनी जनावरे बांधली आहेत . काही लोकांनी मंदिरे बांधली आहेत .काही लोकांनी घरे बांधली आहेत . तर काही लोकांनी चक्क संडास बांधले आहेत ! इतकी ही भिंत रुंद आणि मोठी आहे ! या भिंतीला काही ठराविक अंतरावर बुरुज आहेत . असे सुमारे १२ ते १५ बुरुज मी पाहिले . या भिंतीची लांबी किमान दोन किलोमीटर असावी . रुंदी बारा ते पंधरा फूट आहे . उंची काही ठिकाणी तर चांगली चाळीस-पन्नास फूट आहे . परंतु सरासरी ३० फूट आहेच . कामनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये येण्यापूर्वी एकाने नाष्टा खाऊ घातला होता . त्यामुळे अजून चालण्याची शक्ती शरीरामध्ये होती . परंतु एखाद्या ठिकाणी आसन लावावे आणि मग शांतपणे संपूर्ण परिसरातील सर्व देवांचे दर्शन घ्यावे असे मी ठरविले . आणि त्यानुसार चौकशी केली असता शंकराचार्य मठामध्ये परिक्रमा वाशींची चांगली सोय होते असे मला कळाले . तुकाराम बुवा सोबत होतेच . दोघेजण आश्रम शोधत गल्लीबोळातून गेलो . डाव्या हाताला आश्रम होता . आश्रमामध्ये कसली तरी पूजा चालू होती . त्यामुळे आम्ही समोर झाडाखाली आसन लावले .एक दोन साधू आणि परिक्रमा वासी तिथे आधीच आसन लावून गेलेले होते . 
डाव्या हाताला शंकराचार्य आश्रम आहे उजव्या हाताला वडाचे झाड दिसत आहे .
याच झाडाखाली माकडांपासून समान वाचवत आसन लावले . समोर दिसणारा कळस व भगवा ध्वज म्हणजे शंकराचार्य आश्रम आहे . 
 भरुचची भव्य भिंत अर्थात 'ग्रेट वॉल ऑफ भरूच '
आश्रमातून आम्हाला सांगण्यात आले की भोजनासाठी इथेच परत यावे . आज कन्या भोजनाचा प्रसाद आहे . त्यांना होकार देऊन आम्ही मंदिरांची दर्शना घेण्यासाठी बाहेर पडलो . तुकाराम महाराजांना माझ्यासारखी मच्छरदाणी घ्यायची होती . ती देखील पहावी असा एक हेतू होता . भृगु भास्करेश्वर , रेवाशंकर , भृग्वेश्वर ,कोटेश्वर ,प्रेमनाथ , सोमनाथ ,स्वामीनारायण , नर्मदा मंदिर , सुप्त शेषशायी नारायण , शनीदेव , दत्तगुरु , साईबाबा अशी खूप मंदिरे पाहिली.
आधी बाजारपेठेतून चालत गेलो . तिथे माझ्यासारखी घडीची मच्छरदाणी काही मिळाली नाही . मग वर टांगायची आणि खाली गोलाकार होणारी एक मच्छरदाणी मिळाली ती त्यांनी घेतली .  इथे बाजार पेठेतच एक दत्त मंदिर होते . दत्तप्रभूंची मूर्ती अतिशय सुंदर होती . आणि या मूर्तीला खूप सुंदर प्रकारची सजावट करण्याची पद्धत इकडे आहे असे मला सांगण्यात आले . खूपच स्वच्छ आणि छान मंदीर होते .






गावांतील दत्त मंदिर



 
सगुण पूजा किती सुंदर करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दत्त मंदिर आहे .

इथून थोडेसे पुढे गेले की स्वामीनारायण मंदिर आहे . आपण मागेच पाहिले त्याप्रमाणे स्वामीनारायण यांच्या शिष्यांच्या अनेक शाखा आता झालेल्या आहेत . त्यातील एका शाखेचे हे मंदिर आहे . मंदिर साधेच आहे परंतु सुंदर आहे . मंदिरावर एक मोठा घड्याळाचा मनोर आहे . गुजराती भाविकांची गर्दी इथे असते . संपूर्ण मंदिर परिसर पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो .
भर बाजार पेठेमध्ये असलेले भव्य स्वामीनारायण मंदिर भरूच
मंदिराचे खांब रंगरंगोटी आणि फरशी पाहण्यासारखी आहे
रंगीबेरंगी चित्रे काढलेले घुमट हे स्वामीनारायण संप्रदायाचे वैशिष्ट्य असते
भगवान श्री स्वामीनारायण
स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर पडल्यावर शेजारीच महर्षी भृगु यांचे मंदिर आहे . त्यांची सुंदर मूर्ती या मंदिरामध्ये असून त्याचबरोबर श्री ज्वालेश्वर महादेव तसेच अन्यही महादेवाच्या अनेक शिवपिंडी इथे आहेत . दशावतार भिंतीमध्ये चितारलेले आहेत . मागच्या बाजूला भव्य शनी मंदिर आहे . एकंदरीत हा परिसर अतिशय पवित्र आणि रमणीय आहे .
भरूच शहराचे भाग्यविधाते महर्षी भृगु
श्री ज्वालेश्वर महादेव
मंदिरातील अन्य शिवलिंगे
चौकोनी जलहरी
भिंतीमध्ये चितारलेले दशावतार
श्री शनिदेव भगवान
आमचा आजचा दिवस निव्वळ देवदर्शनाचाच होता .एरवी नर्मदा परिक्रमा करताना ह्यावेळी आपण एका गावातून दुसऱ्या गावात चालत जात असतो . परंतु आज मात्र भरूच मधली ४८ तीर्थक्षेत्र पाहणे हे ध्येय ठेवलेले होते . पाहणे म्हणजे त्या मंदिरात जाऊन त्या देवतेचे दर्शन घेणे ,तिथली स्पंदने अनुभवणे आणि त्या देवतेच्या कृपेला प्राप्त होणे ! काही मंदिरे भव्य दिव्य होती तर काही मंदिर अगदी छोटीशी होती . स्थानिक लोकांना या मंदिराचे फारसे काही पडलेले नाही असे वाटत होते . अर्थात महाराष्ट्रापेक्षा या भागातले लोक निश्चितपणे अधिक भाविक आहेत . कारण पुरोगामीत्वाचा वारा अजून इथल्या लोकांना लागलेला नाही . परंतु मंदिरांची अवस्था बघता कधी कधी वाईट वाटत होते . परंतु तरीदेखील आपापल्या परीने प्रत्येकाने मंदिर जागृत ठेवायचा प्रयत्न केला होता .
भरूच गावचे स्मशानभूमी जवळ नर्मदा मातेचे एक सुंदर मंदिर आहे . यातील नर्मदा मातेची मूर्ती फारच सुंदर होती . या परिसरातील मंदिरांची देखील दर्शने घेतली .तुकाराम बुवांना माझ्या इतके सखोल दर्शन घ्यायला आवडत नसे . परंतु त्यामुळे ते सोबत असल्याच्या निमित्ताने दर्शन कमी वेळ घेऊन मी बाहेर येत नव्हतो . तर मला जितका वेळ त्या त्या स्थानाला द्यायचा आहे तितका मी देतच होतो . म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे की परिक्रमा एकट्याने करावी . दुसऱ्या कोणाचे तरी दबाव तंत्र सतत तुमच्यावर काम करते आहे हे देवदर्शनासाठी योग्य चित्र नाही . एकटा जीव सदाशिव ! या म्हणी वरून आठवले ! पुण्यामध्ये माझे बहुतांश काळ वास्तव्य नवी पेठ या भागात होते . यालाच नवा सदाशिव असं सुद्धा म्हणतात . पानशेतच्या पुरामध्ये सदाशिव पेठे चा जो भाग वाहून गेला आणि पुन्हा नव्याने वसवला ती ही पेठ , म्हणून नवी पेठ किंवा नवा सदाशिव . कोणी मला कुठे राहतोस असे विचारले की माझे ठरलेले उत्तर असायचे . एकटा जीव , नवा सदाशिव ! तात्पर्य एकटे राहण्याचे महत्त्व हे लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये बिंबलेले आहे ! अगदी गर्भवासापासून सुद्धा माझ्यासोबत कोणी ना कोणी परमेश्वराने ठेवलेले असले (जुळ्या बहिणीच्या रूपाने ) तरीदेखील मी मात्र सतत एकटे राहण्यास प्राधान्य दिलेले आहे ! याचे कारणच ते आहे ! तुम्हाला जे हवे ते करता यावे यासाठी एकट्याने यात्रा करणे कधीही श्रेयस्कर असते . माझी देवदर्शनं होईपर्यंत तुकाराम बुवा बाहेर बसून राहायचे . देवदर्शन म्हणजे नुसते देवाचे दर्शन थोडीच आहे ? आत मध्ये गेल्यापासून प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण घडत असते . अगदी मंदिराची स्वच्छता किती आहे ,फरशीची अवस्था कशी आहे , भिंतीची रंगरंगोटी कशी आहे ,इथ पासून ते देवतेची मूर्ती कशी आहे ,तिची पूजा कशी केली आहे ,मूर्तीची शैली कुठली आहे ,मूर्तीचे कोरीव काम कसे केलेले आहे ,मूर्ती कशापासून बनवली आहे ,आजूबाजूला काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत , अलंकार किती आहेत , प्रकाशयोजना कशी केलेली आहे ,वस्त्रे कशी आहेत ,काही शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत का ,व्यवस्थापक पुजारी कोण आहे , त्याची अवस्था कशी आहे , भक्तमंडळी किती आहेत व कसे आहेत , त्यांचा भाव कसा आहे , मंदिरात काय काय फलक लावले आहेत , मंदिराचे व्यवस्थापन कसे आहे , मंदिराची बांधकाम शैली कशी आहे , मंदिराचे खांब कसे आहेत , मंदिराचे कळस कसे आहेत , मंदिरामध्ये अन्य काय काय सेवा सुरू आहेत , मंदिरामध्ये गोशाळा असतील तर तिथल्या गाई कुठल्या आहेत , त्यांची व्यवस्था कशी ठेवलेली आहे , मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग कसा आहे , मंदिराच्या आवारात वृक्ष लागवड केलेली आहे का , असल्यास कुठले कुठले वृक्ष लावलेले आहेत , मंदिर परिसरामध्ये अन्य कुठली मंदिरे आहेत , मंदिराचा इतिहास काय आहे , मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे , मंदिरामध्ये गुप्तद्वारे विवरे भुयारे आहेत का ,मंदिर पुरातन आहे की जीर्णोद्धार केलेले आहे ,की जीर्णोद्धार व्हावा अशा अवस्थेमध्ये आलेले आहे , मंदिरामध्ये पाण्याची काय व्यवस्था आहे , मंदिरामध्ये नैवेद्य कोण दाखवीत आहे , मंदिराची आरती कशी होते , मंदिरामध्ये वाद्ये कुठली आहेत ,मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन पारायण यासारखे काय कार्यक्रम होतात , मंदिर परिसरामध्ये कुठले पक्षी आहेत , मंदिरच परिसरामध्ये कुठले अन्य प्राणी आहेत , मंदिरातील सात्विकता कशी आहे व किती आहे , मंदिरामध्ये येणारी अन्य कुठली अनुभूती कितपत येते आहे , मंदिरामध्ये सजावटीसाठी कारंजी तलाव तीर्थ वगैरे निर्माण केलेली आहेत का , मंदिर परिसरामध्ये दुकाने कुठली आहेत , मंदिराचे अर्थकारण कसे काय चालते आहे , मंदिराचा सामाजिक उपक्रमांमध्ये किती सहभाग असतो , मंदिराकडे जाणारा 'अप्रोच रोड ' कसा बनवला आहे , मंदिरावर भविष्यात कुठलं सामाजिक किंवा नैसर्गिक संकट येणार आहे का , मंदिर पूर- प्रवण क्षेत्रात आहे का ,  अशा बऱ्याच गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण चालू असायचे .हे सर्व करून बाहेर येईपर्यंत तुकाराम महाराज वैतागून जायचे ! परंतु त्याला माझा पर्याय नव्हता . कारण मी काही रोज या सगळ्या मंदिरामध्ये येणार नव्हतो . त्यामुळे माझ्या पद्धतीने संपूर्ण स्कॅनिंग झाल्याशिवाय मी मंदिराच्या बाहेरच पडायचो नाही !
दशाश्वमेघ घाटावरील नर्मदा माताजी मंदिर
नर्मदा मातेची अतिशय सुंदर मूर्ती
हे प्रेमनाथ महादेवाचे जिर्णोद्धार केलेले नवीन मंदिर आहे . मी गेलो तेव्हा या महादेवावर कोणाचे प्रेम आहे किंवा नाही असे वाटावे अशी परिस्थिती होती !
परंतु आता खूपच सुंदर मंदिर झालेले दिसत आहे !
इथे शांतीवन स्मशानभूमी आहे . स्मशानाशी देवता म्हणून मसाण मेलडी माता प्रसिद्ध आहे . तिचेही एक छोटेसे मंदिर स्मशानात होते . नर्मदा परिक्रमेदरम्यान अनेक स्मशाने पार करावी लागतात . त्यामुळे त्याचे फारसे काही वाटत नाही . स्मशान मेलडी मातेचा google नकाशावर मिळालेला फोटो खालील प्रमाणे .
श्री मसाण मेलडी माता मंदिर
ही तांत्रिक देवता असून तिची उपासना करणारे अनेक तंत्र साधक मला परिक्रमेमध्ये भेटले .
इथून जवळच श्री कोटेश्वर महादेवांचे मंदिर होते .
इथून जवळच गणपती पंचायतन मंदिर होते
श्री अंबाजी माता मंदिर नावाचे एक भव्य शक्तिपीठ देखील भरूच मध्ये आहे .
हे एक मंदिर संकुल असून येथे अनेक देवता आहेत .
श्री अंबाजी माता ही अर्थातच इथली प्रमुख देवता आहे .
श्री मोढेश्वरी माता मंदिर
महामार्गा  नजिक असलेले श्री साईबाबा मंदिर देखील भव्य आणि सुंदर होते .
मंदिरामध्ये आबाला वृद्धांची गर्दी होती
साईबाबा मंदिरासमोर एका होजीअरी दुकानदाराने मला बोलवून आत नेले . आणि जे हवे ते उचला असे मला सांगितले. मला काहीच नको होते . एक वस्त्र अंगावर आणि एक वस्त्र डोक्यावर हा फार्मूला चांगला चालत होता . शिवाय मी लंगोट देखील स्वतःच फाडून बनवायचो आणि बनियन घालण्याचा प्रश्नच नव्हता . थंडीचे दिवसही संपले होते त्यामुळे हात मोजे पायमोजे किंवा थर्मल वेयर या कशाची मला गरज नव्हती . मी तसे सांगितल्यावर दुकानदाराचे तोंड बारीक झाले . मला काहीतरी द्यायचेच असा त्याचा संकल्प होता . त्याने एक पांढरीशुभ्र जॉकीची अंडर पॅन्ट काढली आणि मला प्रेमाने दिली . हिचे फारसे काही वजन नसल्यामुळे मी देखील ती घेतली . मैया मध्येच स्नानाला जाताना तिचा वापर करावा असे मी ठरवले . त्यामुळे अजून एक काम झाले ! आता मैया मध्ये माझ्या वापरलेल्या वस्त्राचा देखील स्पर्श होणार नाही अशी सोय मैय्यानेच लावून दिली ! स्नानाला जाण्यापूर्वी मी वस्त्र बदलून जात असे . आणि स्नान आटोपल्यावर पिळून तिला माझ्या बिछान्याच्या गुंडाळी वर अडकवून ठेवत असे .चालता चालता ती बिचारी वाळून जायची .असो .
सर्व दर्शने घेत आम्ही शंकराचार्य मठात पुन्हा आलो . तोपर्यंत कन्याभोजन आटोपले होते . परंतु प्रसादाचे आमरस पुरी चे भोजन शिल्लक होते ! खाणारे आम्ही दोघेच उरले होतो ! त्यामुळे भरपेट आमरस पुरी खाल्ली ! आधीच झालेले देवदर्शन ! आणि त्यावर आमरस पुरीचा प्रसाद ! त्यामुळे एकंदरीतच सगळा आनंद द्विगुणित झाला !  
उन्हाळा हळूहळू वाढत होता ! पायाला चटके बसतील अशी भूमि तापत होती . मी सध्या पायात घातलेले पादत्राण म्हणजे एक पातळ सॅंडल होती . हे परिक्रमातले माझे नववे पादत्राण होते . दुकानदार माझ्याकडून पैसे घेत नव्हता परंतु मी त्याला बळजबरीने १४० रुपये देऊ केले होते . परिक्रमेच्या ९३ व्या दिवशी नववी सॅंडल घेतली होती . याचा अर्थ सरासरी दहा दिवसाला एक चप्पल लागत होती . उन्हामुळे अजून एक मोठी समस्या निर्माण झाली होती . ती म्हणजे अशी की कमण्डलूतील पाणी प्रचंड तापून जायचे . इतके गरम व्हायचे की प्यायला नको वाटायचे . डोक्यावरून उष्मा आणि कमण्डलूतील पाणी सुद्धा तापलेले . अशा अवस्थेमध्ये काय करावे याचे मार्गदर्शन एका साधूने मला केले होते . हे साधू संपूर्ण भारतभ्रमण करायचे . सर्वार्थाने सर्वत्र उपयुक्त ठरेल असा कमण्डलूचा एक प्रकार त्यांनी मला सांगितला होता . अगदी रामेश्वरम च्या उन्हाळ्यापासून ते हिमालयातल्या थंडीपर्यंत चालणारा असा हा प्रकार होता . हा कमण्डलू म्हणजे सेलो किंवा मिल्टन आदि कंपन्यांचा व्हॅक्युम थर्मास फ्लास्क . एकतर हा पूर्णपणे धातूचा असतो . त्यामुळे कमंडलू या प्रकारामध्ये बसतो . दुसरी गोष्ट म्हणजे तो लटकविण्याचा असल्यामुळे हातात धरता येतो किंवा झोळी मध्ये पण टाकता येतो . तिसरी गोष्ट याला पाणी पिण्यासाठी वेगळा पेला असतो . चौथी गोष्ट याची क्षमता एक लिटर पेक्षा जास्त असते .पाचवी गोष्ट म्हणजे यात एकदा भरलेल्या पाण्याचे तापमान आहे तसेच राहते . गार पाणी गारच राहते आणि गरम पाणी गरमच राहते . भरुच हे परिक्रमा मार्गामध्ये लागणारे एक फार मोठे शहर होते . त्यामुळे इथेच हा मिळाला असता . सहज बाजारातून जाताना एका दुकानामध्ये मला तो दिसला .  गंमत म्हणजे तो घेण्यासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नव्हते . परंतु त्याच बाजारपेठेतून जाताना काही लोकांनी माझ्या हातावर दक्षिणा टेकवली होती . तो सेलो कंपनीचा एक लिटरचा थर्मास फ्लास्क होता ज्याची किंमत ११५० रुपये होती . परंतु दुकानदार म्हणाला की मी तुमच्याकडून जास्ती पैसे घेणार नाही . माझे जेवढे खरेदी आहे तेवढेच पैसे मला द्या . आणि त्याने मला ८५० रुपये मागितले . सुदैवाने माझ्याकडे बरोबर तेवढेच पैसे शिल्लक होते ! बाजारामध्ये मला चांगले पाचशे सहाशे रुपये मिळाले होते ते इथे कामाला आले ! त्या फ्लास्क सोबत एक चंदेरी आवरण असलेली पिशवी होती . तिच्यामुळे उन्हाचा परिणाम त्याच्यावर काहीच व्हायचा नाही ! दप्तराच्या एका कप्प्यामध्ये हा बसत असे ! जुना कमण्डलू मी दुकानदाराला देऊ केला . त्याने देखील मोठ्या आनंदाने तो स्वीकारला परंतु नंतर तो म्हणाला की वाटेत एखादा परिक्रमा वासी भेटला तर त्याला द्या किंवा अन्य कुठल्यातरी कामाला हा वापरा!
हा थर्मास फ्लास्क घेण्याचा माझा निर्णय हा अतिशय म्हणजे अतिशय योग्य ठरला हे पुढे माझ्या लक्षात आले ! कारण त्या एका कमण्डलूमुळे मला परिक्रमा संपेपर्यंत अखंड मैयाचे थंडगार पाणी पिता आले . शिवाय अनेक वर्ष साधू जीवनामध्ये राहिलेल्या साधूने मला हा कमण्डलू सुचवलेला असल्यामुळे तो शास्त्रानुसार योग्य देखील होता .
माझा नवीन कमंडलू
पुढे माझ्या हातून हा बरेच वेळा खाली देखील पडला . डोंगरावरून गडगडत गेला . दगडांवर आपटला धोपटला .परंतु त्याला काहीही झाले नाही . असो . 
भरूच शहराची तटबंदी ही अतिशय भक्कम आणि प्रेक्षणीय आहे . गावातील घरी देखील सुबक , कोरीव ,  रेखीव आणि टुमदार आहेत . तटबंदीचा शेवटचा भाग विदीर्ण अवस्थेमध्ये आहे .
भरूच च्या तटबंदीचा शेवटचा भाग
भरूच शहरामध्ये फिरताना एक विचित्र वातावरण जाणवत होते . नर्मदा पुराणातील सर्वाधिक तीर्थक्षेत्रे असलेल्या या शहराची आजची स्थिती मिनी पाकिस्तान अशी झालेली आहे . मी मिनी पाकिस्तान हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरत आहे . पाकिस्तान या देशाने आजपर्यंत आपल्यावरती अनेक वेळा उघडपणे हल्ला केलेला आहे . आणि त्याच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला सतत फौज फाटा तैनात करावा लागतो . अगदी तसाच फौज फाटा आज संपूर्ण भरूच मध्ये तैनात केलेला दिसत होता . कारण उद्या रामनवमी होती . रामनवमीच्या पूर्वसंध्येला भरूच शहराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते . जिकडे जावे तिकडे पोलीस दिसत होते . एवढे पोलीस भरूच शहरामध्ये असणे शक्यच नव्हते . त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की गुजरातच्या विविध भागांमधील पोलिसांना इथे गाड्या भरभरून आणले होते . भरूच रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा गुरुद्वारा आहे . त्याचेही दर्शन घ्यावे अशी इच्छा झाली म्हणून मी आत जाऊन दर्शन घेऊन आलो . 
भरूच मधील गुरुद्वारा
हा गुरुद्वारा अगदी नर्मदा मैयाच्या काठावर आहे .
तत्पूर्वी भरूच येथील प्रसिद्ध नर्मदा मैया चा पूल देखील मी ओलांडला . याच पुलावरून तिचे खूप वेळा दर्शन घेतलेले होते ! त्यामुळे ठरवून त्या पुलाखालून चाललो ! गुरुद्वारा यामध्ये जाऊन दर्शन घेण्याचा अजून एक अंतस्थ हेतू होता . सध्या विभाजनवादी प्रवृत्तींनी शीख समुदायाला भारतीय संस्कृती पासून वेगळे तोडण्याचा घाट घातलेला दिसतो . त्यामुळेच शीख हा एक वेगळा धर्म आहे असे लहानपणापासून लहान मुलांच्या मनावर बिंबवले जाते . जसे जैन , लिंगायत ,बौद्ध हे वेगळे धर्म आहेत असे आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले त्यात आता शिख धर्माची देखील भर पडली आहे . प्रत्यक्षामध्ये हे वेगळे धर्म नसून आपल्या भारतीय संस्कृतीशी अनुरूपता दर्शवणारे केवळ काही संप्रदाय आहेत . त्यांनी काही विशिष्ट आचार पद्धती स्वीकारलेली असल्यामुळे त्याला पंथ किंवा संप्रदाय असे नाव देणे संयुक्तिक आहे . परंतु वेगळा धर्म म्हणून त्याचा उल्लेख करणे अतिशय चुकीचे आहे . हे माझे मत नसून खालसा पंथाची संस्थापना करणारे गुरुगोविंदसिंह देव यांचेच हे मत आहे . त्यांचे वडील श्री तेग बहादूर सिंह यांचे सोळाशे पंचाहत्तर मध्ये मुसलमानी मुफ्तीच्या आदेशावरून शिरकाण करण्यात आले होते .त्यावेळी त्यांचे वय दहा वर्षाचे होते . या घटनेचा खोल परिणाम त्यांच्या जीवनावर झाला होता .  त्यानंतर  आपल्या वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली . हिंदू धर्माचे इस्लामिक आक्रमणापासून रक्षण करणारा एखादा सशस्त्र संप्रदाय उभा करावा असा स्पष्ट हेतू त्यांच्या या कृती मागे होता . त्यामुळेच आपल्या उग्रदंती या रचनेमध्ये ते म्हणतात
सकल जगत में खालसा पंथ गाजे
जगे धर्म हिन्दू तुरक धुंध भाजे
अर्थात हिंदू धर्माचा पंथ असलेला खालसा पंथ या जगामध्ये गाजतो आहे . हिंदूधर्म जागृत होत आहे आणि तुर्क धर्माचा अर्थात इस्लामचा नाश होत आहे . 
यांनी केवळ आपले वडीलच गमावले नाहीत तर आपल्या पोटचे गोळे असलेले चार मुलगे धर्मासाठी बलिदान होताना पाहिले . साहेब जादा अजित सिंह आणि झुंजार सिंह हे त्यांचे अनुक्रमे १७ व १३ वर्षाचे मुलगे चमकौरच्या लढाईमध्ये मुसलमानांविरुद्ध लढताना हुतात्मा झाले . साहेब जादा जोरावर सिंह आणि फतेसिंह हे त्यांचे अनुक्रमे आठ आणि पाच वर्षाचे दोन मुलगे इस्लाम धर्म स्वीकारत नाहीत म्हणून भिंतीमध्ये चिणून मारले गेले . एका चुकीने हिंदू धर्मासाठी एका सप्ताहाच्या आत चार मुलगे गमावले असल्याचे उदाहरण इतिहासामध्ये कदाचित एकमेव आहे . आणि ही चार मुले गमावल्यावर त्या तेजस्वी पित्याचे विचार खालसा पंथाची खरी ओळख आपल्याला करून देतात .
गुरु गोविंद सिंह म्हणतात
इन पुत्रान के कारने, वार दिए सुत चार
चार मुए तो क्या हुआ, जीवें कई हज़ार
माझ्या धर्म बांधवांना वाचवण्यासाठी ही चार मुले कामी आली . चौघे गेले परंतु त्यांनी हजारोंचे प्राण वाचवले . 
अशा तेजस्वी शिखपरंपरेचा मला जाज्वल्य अभिमान लहानपणापासून वाटत आलेला आहे . त्यामुळे मी वाटेतील सर्व गुरुद्वाऱ्यांचे दर्शन घेत पुढे गेलो . हिंदू समाजाने आपलेच मंदिर आहे हे समजून गुरुद्वाऱ्यामध्ये जायला सुरुवात केली पाहिजे . कारण ते आपले मंदिरच आहे ! परिक्रमावासी फारसे दर्शनाला येत नाहीत असे चौकशी अंती मला गुरुद्वाऱ्यातून कळाले . आपल्याला पंथापंथामध्ये पाडण्यात आलेली ही दरी मिटवण्याचे खूप महान कार्य सहज जाता येता करणे शक्य आहे तर ते आवर्जून करावे . शिख संप्रदायाला भडकावून त्यांना भारतापासून वेगळा खलिस्तान नावाचा प्रांत तोडून देण्याचे षडयंत्र सध्या फार जोरामध्ये शिजते आहे . त्यावर मात करावयाची असेल तर सरदारजी लोकांसमवेत आपली उठ बस वाढविणे हा एकमेव उपाय आहे . दुसरा कुठलाही उपाय इथे चालणार नाही . असो . गुरुद्वाऱ्यामध्ये राहायचे असेल तर राहता येईल असे मला सांगण्यात आले होते परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला . आता भरूच शहराचेच एक उपनगर असलेले झाडेश्वर नावाचे नगर सुरू झाले . पूर्वी ही दोन शहरे वेगळी होती . परंतु आता विस्तारामुळे एकच होऊन गेली आहेत . पुणे आणि पिंपरी चिंचवड सारखी त्याची अवस्था आहे .
तत्पूर्वी मक्तमपुर नावाचे छोटेसे नगर लागते . रेल्वे स्थानक आणि गुरुद्वारा या मक्तमपूर च्या हद्दीमध्येच येतो . इथे ओंकारेश्वर महादेवाचे मंदिर आणि महारुद्र तीर्थ आहे . 
वाटेमध्ये चालताना एका गरीब मातेने मला उसाचा रस पाजला . तिच्या मुलीला भरपूर खाऊ देऊन पुढे निघालो . मध्ये एकाने दुकानामध्ये बोलावून हॅव मोर आईस्क्रीम खायला दिले !मँगो फ्लेवरचे हे आईस्क्रीम खाताना मौज वाटली !पुढे एकाने चहा आणि नाश्ता दिला . वाटेमध्ये एक साईबाबांचे मोठे मंदिर लागते ते देखील पाहिले .
झाडेश्वर नगरामध्ये घोडेश्वर वैद्यनाथ महादेव ही तीर्थक्षेत्र असून दुधेश्वर कामनाथेश्वर तसेच राधाकृष्ण मंदिर अशी अनेक मंदिर आहेत . इथे शितळा मातेचे एक मंदिर असून स्वामीनारायण मंदिर सुद्धा आहे . परंतु बहुतांश परिक्रमावासी हे निळकंठेश्वर या तीर्थक्षेत्रावर निवास करतात त्यामुळे मी सुद्धा तिथेच गेलो . मैयाच्या अगदी काठावर असलेले हे एक भव्य दिव्य मंदिर आहे . परंतु तिथे गेल्यावर जे दृश्य पाहिले ते पाहून आश्चर्याने अचंबित झालो ! कारण जिकडे पहावे तिकडे पोलीसच पोलीस फिरताना दिसले ! भरूच शहरामध्ये बंदोबस्तासाठी जे पोलीस आणले होते त्यांची निवासाची व्यवस्था या निळकंठ आश्रमामध्ये करण्यात आलेली होती ! त्यामुळे कितीही परिक्रमावासी आले तरी त्यांची राहण्याची सोय करू शकणारा हा आश्रम शेकडो पोलिसांच्या संख्येमुळे हतबल झालेला होता ! सुमारे पाचशे पोलीस तिथे मुक्कामाला होते . सांगताना ३०० पोलीस आहेत असे सांगण्यात येत होते . परंतु साध्या नजरेने देखील किती पोलीस आहेत ते मोजता येत होते . या सर्व व्यवस्थेचा प्रचंड ताण आश्रम व्यवस्थापनावर पडलेला होता .आता पुढे जावे तर काही सोय होणे शक्य नव्हते . त्यामुळे मी शांतपणे एका झाडाच्या पाराखाली आसन लावले . स्नानाची आणि डोलडाल ची चांगली व्यवस्था आश्रमामध्ये होती . मस्तपैकी स्नान करून पूजा वगैरे आटोपून पोलिसांशी गप्पा मारत बसलो . त्यांच्याकडून गुजरात राज्यातील सामाजिक परिस्थिती समजावून घेतली . महाराष्ट्र असो वा मँचेस्टर , लातूर असो वा लंडन सर्वत्र विशिष्ट समाजाच्या लोकांमुळे एकसारखेच प्रश्न आ वासून उभे राहिलेले आहेत . राजकीय अपरिहार्यतेमुळे कोणी या विषयाला हात घालत नाही किंवा उघडपणे बोलत देखील नाही . परंतु याच्या परिणाम स्वरूप येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला हवा तो पंतप्रधान बसवण्याचे सामर्थ्य या समाजाला निश्चितपणे प्राप्त झालेले आहे . पोलिसांना या प्रकाराचा किती अतिरिक्त ताण येतो हे ते मला सांगत होते . माझ्याबरोबर गप्पा मारणारे हवालदार वगैरे होते . माझ्यावर खुश होऊन ते त्यांच्या वरिष्ठांकडे मला घेऊन गेले . आणि मग त्यांचे जे प्रमुख कमिशनर साहेब होते त्यांच्याशी देखील मी तासभर चर्चा केली . परिक्रमेच्या माध्यमातून आलेले अनुभव त्यांनी मला विचारले . मी वाटेत काय काय पाहिले ते जसे आहे  तसे त्यांना सांगितले . त्यांनी मला आत मध्ये मुक्कामाला येण्याची विनंती केली . परंतु मी ती नम्रपणे नाकारत उघड्यावरती झोपावे लागणे वगैरे हा परिक्रमेचा च एक अविभाज्य भाग असल्याचे त्यांना सांगितले . साहेबांना साधारण माझ्या आवडीच्या विषयाचा अंदाज आला आणि त्यांनी काही हुशार शिपायांना माझ्याकडे गप्पा मारायला पाठवून दिले . त्यांनी देखील मोकळ्या मनाने माझ्याकडून काही विषय समजावून घेतले . भरपूर शंका त्यांनी मला विचारल्या . आणि मी माझ्या परीने त्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे त्यांना दिली . रात्री शहरातील पोलीस परत आले आणि इथे विश्रांती घेणारे पोलीस गस्तीला गेले . जाता जाता जाणाऱ्या पोलिसांनी येणाऱ्या पोलिसांचा माझा परिचय करून दिला . त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुन्हा एकदा पारावर गप्पांचा फड रंगला . 
हेच ते भव्य दिव्य नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर
असे अनेक पार परिसरामध्ये आहेत अशाच एका पारावर मी आसन लावले होते
श्री नीलकंठेश्वर महादेव
हे मंदिर फार भव्य दिव्य असून प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे दिवसभर पर्यटकांची प्रचंड गर्दी इथे राहते .
माझी आजी नेहमी म्हणायची की "सत्य संकल्पा चा दाता ईश्वर " नेमके तेच वाक्य इथे लिहिलेले असल्यामुळे हे सर्व वाचून काढले आणि मला आवडले म्हणून सर्वांसाठी देत आहे .
रात्री बराच वेळ त्या पारावरती मच्छरदाणी मध्ये पडून राहिलो . मी पाहत होतो की अतिशय किरकोळ भासणारे ते डास मोठ्या मोठ्या पोलिसांना नको नको करून सोडत होते . या डासांचा उपद्रव फारच मोठा होता . डासांना कितीही मारले तरी त्यांची संख्या कमी होत नाही . कारण त्यांची उत्पत्ती लाखांच्या संख्येने होत असते . मारून मारून तुम्ही किती डास माराल ? यावर एकमेव उपाय आहे . अहिंसा हे तत्व बाजूला ठेवून डास हा मुळात हिंसक प्राणी आहे हे सर्वांच्या मनावर बिंबवावे लागते . सर्वप्रथम हे मान्य करावे लागते की डासाचा आपल्याला उपद्रव होणार आहे . आणि मग त्याच्या उत्पती स्थानावर घाला घालावा लागतो . त्याची मुळात पैदासच कमी कशी होईल यावर काम करावे लागते . तरच डासांसारखे उपद्रवी जीव आटोक्यामध्ये येतात . त्यांना एक एक करून टिपून तुम्ही कधीच संपवू शकत नाही . तर त्यांचे उपद्रवमूल्य मान्य करणे हा एकमेव उपाय आपल्याला तारू शकतो ! पोलिसांची हतबलता आणि असहायता पाहून मला वाईट वाटले . दिवसभर शहरामध्ये असलेल्या तणावाचा त्रास . आणि रात्री या भारंभार पैदास झालेल्या डासांचा त्रास . जीव हत्या होऊ नये म्हणून इथले साधू डासांना धूर वगैरे करून मारत नाहीत . परंतु त्यामुळेच त्यांचे उपद्रव मूल्य वाढत जाते हे आपल्या लक्षात येत नाही . झोपता झोपता एकच सूत्र नर्मदा मातेने माझ्या लक्षात आणून दिले ते म्हणजे "मूळावर घाव हाच एकमेव उपाव !" नर्मदे हर !





लेखांक एकशे पंधरा समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर!
    तुमच्या लेखांमधून खूप शिकायला मिळत आहे आणि फक्त परिक्रमा नव्हे तर सर्वांगीण विचार करण्याची आणि ते मांडण्याची तुमची पद्धत फारच सुंदर आनंद प्रशंसनीय आहे. नर्मदा मैय्याचे virtual दर्शन आणि परीक्रमा घडविण्याबद्दल खूप खूप आभारी आहे.
    मी पुण्यातच राहतो आणि तुमचे अधिक मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा आहे. आपल्याला संपर्क करावयाचा असल्यास कसा करावा ?

    उत्तर द्याहटवा
  2. "मूळावर घाव हाच एकमेव उपाव !" नर्मदे हर !

    उत्तर द्याहटवा
  3. माई च्या कृपेचा वर्षाव विविध प्रकारे व आनंद दाई कसा असतो त्याचे एक उदा हरण ,म्हणजे हे लिखाण वाचायला मिळणे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर