लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

नर्मदा मातेचे सर्वप्रथम दर्शन मी भरूच मधील पुलावरून घेतलेले आहे . इथून रेल्वे जात असताना एकदा मला अचानक खूप ऊर्जा जाणवू लागली काहीतरी खालून मुंग्या अंगात येत आहेत असा भास झाला .
 म्हणून मी चटकन बर्थ वरून उठून खाली आलो आणि पाहिले तर रेल्वे गाडी नर्मदेच्या पुलावरून चालली होती ! ते नर्मदा मातेचे आयुष्यातील पहिले दर्शन होते माझे ! त्याही वेळी नर्मदा मातेच्या काठावरील परिक्रमेचा मार्ग मला अगदी ठळकपणे दिसला होता वरून ! तिथून पुढे जेव्हा मी नर्मदा आता ओलांडली तेव्हा तेव्हा पुलावर थांबून तिचे साग्र संगीत दर्शन घेतले आहे . अगदी विमानातून सुद्धा नर्मदा मैयाचे खूप सुंदर दर्शन होते ते देखील मी अनेक वेळा केलेले आहे ! 


अमरावती जवळ पिंपळखुटा नावाचा एक आश्रम आहे .तिथे परमहंस सद्गुरु श्री शंकर महाराज नावाचे अतिशय थोर विभूतीमत्व , साक्षात संत निवास करतात . माझे एक मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर त्यांच्या दर्शनाकरिता दर गुरुवारी गेली तेरा वर्षे न चुकता वारी करत आहेत . पुणे ते आश्रम हे तब्बल ६६६ किलोमीटरचे अंतर बरेच वेळा ते स्वतः गाडी चालवत जातात व चालवत येतात .

परमपूज्य संत श्री शंकर महाराज पिंपळखुटा अमरावती

मला साधुसंतांच्या दर्शनाची आणि वाहन चालवायची तसेच प्रवासाची मोठी हौस असल्यामुळे मी बरेचदा त्यांच्यासोबत जात असे. माझ्याकडून नर्मदा परिक्रमा घडेल याचे संकेत शंकर बाबांनी अडीच वर्षांपूर्वीच दिलेले होते ! परंतु तेव्हा अज्ञानामुळे मला त्याचा अर्थ कळला नव्हता . श्री बराटे साहेब नावाचे कृषी अधिकारी महाराजांच्या दर्शनाला आलेले असताना शंकर बाबा माझ्याकडे अंगुली निर्देश करत त्यांना म्हणाले हे आमचे मार्कंडेय महामुनी आहेत . मला तेव्हा याचा अर्थ कळला नव्हता म्हणून मी बराटे साहेबांना विचारला असता ते म्हणाले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडेय ऋषींचा मोठा आश्रम आहे त्या संदर्भात बाबा काहीतरी म्हणत असतील . योगायोगाने त्याच महिन्यात साहेबांची बदली गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील झाली .

यज्ञामध्ये पूर्णाहुती देताना पू. शंकर महाराज . डावीकडे काठीवाल्याच्या वेशात प्रस्तुत लेखक . सर्वात उजवीकडे बराटे साहेब .याच दिवशी बाबांनी परिक्रमेचा संकेत लेखकाला दिला होता .

 एक प्रकारे त्यांना मिळालेला हा संकेत होता परंतु माझे त्या उत्तराने समाधान झाले नव्हते . म्हणून मी बाळासाहेब वाल्हेकर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले मार्कंडेय ऋषींनी जशी महादेवाची पिंड धरून ठेवली होती तसे तुम्ही देवाला धरून रहावे अशी बाबांची इच्छा दिसते . परंतु आता परिक्रमा करून आल्यावर लक्षात येते आहे की नर्मदा परिक्रमा ही परंपराच मुळी मार्कंडेय महामुनींनी चालू केलेली आहे . असो . तर बाळासाहेबांनी सुमारे बारा मंदिरे आजपर्यंत बांधलेली आहेत , त्यातीलच एका मंदिराचे बांधकाम अमरावती जिल्ह्यामध्ये वर्ध्या नजीक मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी सुरू होते . 

विदर्भातील एक साक्षात्कारी संत श्री लहानुजी बाबा यांचे जन्मगाव असलेले हे ठिकाण तिथे त्यांचे जन्म मंदिर बांधण्याचे काम शंकर महाराजांनी बाळासाहेबांना दिले होते . सुमारे ५५ फूट उंचीचे संपूर्ण दगडी मंदिर अगदी खालपासून वरपर्यंत बांधण्याचा अनुभव मला जवळून घेता आला .

 ही संपूर्ण प्रक्रिया मला आवडली होती त्यामुळे काहीतरी शिकायला मिळते आहे या हेतूने मी जवळपास दर आठवड्याला तिकडे जात असे . अखेरीस मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला आणि त्या सर्व मूर्ती जयपूर वरून ठरलेल्या कारागिराकडून आपण मागविल्या . सुमारे १९ छोट्या मोठ्या मूर्ती होत्या . संगमरवराच्या अतिशय नाजूक कलाकुसर असलेल्या या मूर्ती विशेष पद्धतीने आणाव्या लागतात . सर्वसामान्य ट्रान्सपोर्ट वाल्याला हे काम जमत नाही . अशा पद्धतीने या मूर्ती जयपूर वरून निघाल्या आणि अचानक रात्री आम्हाला फोन आला की मूर्ती घेऊन येणाऱ्या ट्रकला मध्य प्रदेशातील घनदाट जंगलामध्ये अपघात झालेला आहे ! 
       भोपाळ नजीकच्या जंगलातील अपघातग्रस्त गाडी 
आमचे सर्वांचे धाबे दणाणले कारण दोन दिवसांनी प्राणप्रतिष्ठा होती ! आणि या सर्व मूर्ती घडविण्याचे काम सुमारे दीड दोन वर्षे सुरू होते ! लहानोजी महाराज यांची पूर्णकृती मूर्ती , त्यांचे आई वडील व मांडीवर लहानुजी महाराज बालस्वरूपात बसले आहेत अशी मूर्ती व लहानुजी महाराजांची संन्यासी वेशातील मूर्ती अशा सर्व मूर्ती घडविण्यासाठी शेकडो चित्रे परमपूज्य शंकर महाराजांनी माझ्याकडून काढून घेतली होती . व त्यात प्रत्येक वेळी काहीतरी बदल सुचवून पुन्हा नवीन चित्र काढायला सांगितले होते . अखेरीस त्यांच्या लांबच्या नात्यातील काही माणसांना भेटून त्यांच्या चेहऱ्यांचे फोटो काढून त्यावरून लहानुजी महाराज कसे दिसत असतील याचा अंदाज बांधला गेला व त्यांचे आई-वडिलांचे चेहरे कसे दिसतील याचा देखील अंदाज बांधला गेला . व तो तंतोतंत खरा निघाला कारण त्यांच्या आई-वडिलांना प्रत्यक्ष बघितलेली एक दूरची बहीण आम्हाला सापडली जिने फोटो पाहताच हे महाराजांचे आई-बाबा आहेत असे सांगितले ! व त्यानुसार केलेल्या या मूर्ती होत्या त्यामुळे पुन्हा त्या मूर्ती करता येणे अशक्य होते !

   परमपूज्य संत लहानुजी महाराज यांचे जन्म मंदिर

 ड्रायव्हर जवळ साधा फोन होता आणि फोनची बॅटरी मरत चालली होती त्याने जाता जाता केवळ बैतूल येथील जंगलामध्ये एका पुलावर माझी गाडी लटकली आहे इतकाच निरोप दिला आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाला ! प्रत्यक्षामध्ये त्याची गाडी त्याहून बरीच पुढे भोपाळ च्या अलीकडील जंगलात बंद पडली होती ! हा सर्व वाघांचा परिसर आहे . रात्रीच्या वेळी घनदाट अरण्यामध्ये त्याचा ट्रक अपरात्री एका ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्याला धडकून पुलावरून खाली पडता पडता वाचला होता व तसाच उभा राहिला होता ! गाडीचे दिवे बंद झाले होते त्यामुळे अरुंद पुलावरून जाताना दुसरी एखादी गाडी या गाडीवर आढळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती ! आम्ही रातोरात दोन ट्रक आणि पंधरा माणसे घेऊन मूर्ती आणण्याकरता निघालो . परंतु मध्य प्रदेश सीमेवरती पोलिसांनी व वनरक्षकांनी आम्हाला अडविले आणि अडीच तीन तास हुज्जत घालून देखील त्यांनी आम्हाला अजिबात सोडण्यास नकार दिला . मध्यप्रदेश मध्ये त्याकाळी कडक लॉकडाऊन सुरू होता त्याचा हा परिणाम होता . अखेरीस चीनच्या शत्रुत्वाचा दाखला घेत मी केलेल्या मध्यस्थीला थोडेसे यश आले आणि एक गाडी व दोन माणसे सोडण्यास त्यांनी परवानगी दिली . त्यात आम्ही एक गनिमी कावा केला . दोन माणसे आणि गाडी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश सीमेमध्ये शिरली परंतु आम्ही सात आठ माणसे गुपचूप जंगलातील अंधाऱ्या पायवाटेने मध्य प्रदेशात घुसलो ! वन खात्याचे आणि पोलिसांचे लक्ष असल्यामुळे दिवा लावणे शक्य नव्हते त्यामुळे अंधारातच चाचपडत चाचपडत आम्ही चार किलोमीटर जंगल तुडविले आणि पुढे जिथे आमची गाडी थांबली होती तिथपर्यंत येऊन पोहोचलो ! हा सर्व वाघांचा परिसर होता व वेळ रात्री एक दीड ची अर्थात वाघांची फिरण्याची वेळ होती ! परंतु मूर्ती परत आणणे या एकाच ध्येयामुळे पेटलेले असल्यामुळे आम्हाला त्याचा काही फारसा धोका जाणवला नाही .  अखेरीस पहाटे साडेतीन चार वाजता आम्हाला तो ट्रक सापडला .
               ह्याच खांबाने मूर्ती वाचविल्या

 सुदैवाने आत मधील एकाही मूर्तीला बारीकसा तडा देखील गेला नव्हता ही परमेश्वराची फार मोठी लीला होती ! परंतु ट्रकचे मात्र अपरिमित नुकसान झाले होते त्यामुळे तो तिथून इंचभर देखील पुढे नेता येणे शक्य नव्हते . आम्ही ताबडतोब सर्व मूर्ती सोबत नेलेल्या  गाडीत भरून घेतल्या आणि परतीचा प्रवास सुरू केला .

        सोडविलेल्या मूर्तींसोबत प्रस्तुत लेखक

 परत येताना आता ज्याचे नाव पुन्हा नर्मदापुरम झाले आहे त्या होशंगाबाद शहरातील नर्मदा मातेवरील पूल लागला . आणि मी विनंती करून गाडी थांबविली व सर्वांना सुचविले की आपण आता नर्मदेचे दर्शन घेऊयात !

नर्मदापुरम येथील पुलावरून होणारे नर्मदा मातेचे दर्शन

 हे दर्शन घेत असताना योगायोगाने मला खालून तीन परिक्रमावासी चालत जाताना दिसले ! आयुष्यात प्रथमच मी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या कोणालातरी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो ! माझ्या सर्वांगातून शहरे निघू लागले ! आणि डोळ्यातून टचकन पाणी आले आणि मी नर्मदा मातेला मनापासून म्हणालो ! हिंदीमध्ये म्हणालो अगदी लक्षात आहे माझ्या ! सबको बुलाती है मैया !  मुझे कब बुलायेगी ? 
मला खरोखरच कल्पना नव्हती की इथून पुढच्या काही दिवसातच मैया माझी ही हाक पूर्ण करणार आहे . . .


 लेखांक दोन समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर