लेखांक ११३ : नवेठ्याचा सदानंद अवधूत आश्रम आणि शतवर्षीय भूरीभाई

नर्मदे हर सज्जन हो !
(सर्व वाचकांची सर्वप्रथम मनापासून क्षमा मागतो . परंतु पावसाळा सुरू होत असल्यामुळे आणि वृक्षारोपणासाठी हाच काळ सुयोग्य असल्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीने भाबरी या गावात आणि शूल पाणी झाडीच्या परिसरात ७०० देशी रोपे आणि १०० किलो बियांपासून बनविलेल्या दहा हजार बीज गोळ्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी काही काळ प्रत्यक्ष जाऊन राहावे लागले . या गावात मोबाईलची रेंज सोडा वीज देखील पोहोचलेली नाही . त्यामुळे लिखाण करता आले नाही त्याबद्दल मनापासून क्षमा मागतो . आपण आता आपली परिक्रमा पुन्हा एकदा सुरू करूयात ! नर्मदे हर ! )

कोलीयाद गाव सोडले आणि मैया च्या काठाने चालू लागलो . इथे एरंडी नावाची नदी आणि भादरी नावाची एक नदी जिला भुखी खाडी असं सुद्धा म्हणतात या दोन मुख्य जलदेवता आडव्या येतात .
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे . आपण इतके दिवस नर्मदा मातेच्या दक्षिण ताटावरून चालत होतो . तेव्हा मैयाचे पाणी आपल्या मागून आपल्यापुढे वाहात होते . किंवा नर्मदा मातेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजव्या हाताकडून आपल्या डाव्या हाताकडे तिचा प्रवाह होता . आता मात्र आपण उत्तर तटावर आलेलो आहोत . इथे तिचे पाणी आपल्यासमोरून आपल्या मागे जाताना दिसते . किंवा तिच्याकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताला तिचे पाणी वाहते . नकाशा भक्तांना सुद्धा मैया चा बदललेला प्रवाह आपण लक्षात घेणे आवश्यक आहे ! तसेच आपली चालण्याची उलटी झालेली गती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे . 
वरील नकाशामध्ये भगव्या रंगांमध्ये मैया चा प्रवाह कुठल्या दिशेला वाहतो आहे ते दाखवले आहे आणि निळ्या रंगाने आपण कुठल्या दिशेला जात आहोत ते दाखवले आहे . 
हाच नकाशा उभा जरी लावला तरी देखील याचा प्रवाह भगव्या रंगाच्या बाणाच्या दिशेला जात आहे आणि आपण मात्र निळ्या रंगाच्या बाणाच्या दिशेने जात आहोत हे पक्के डोक्यात ठेवावे म्हणजे दिशांच्या बाबतीत गडबड गोंधळ उडणार नाही .
मैया च्या काठाने असलेला गाळ आपल्या लक्षात येईल . 
इथे मैया च्या काठाने जरी आपण चालत असतो तरी मैयाच्या ज्याला पर्यंत जाता येत नसे . कारण मध्ये प्रचंड चिखल असायचा . कधी कधी हा चिखल पाच फूट तर कधी कधी १०० ते २०० मीटर असायचा . म्हणजे मैयाचे पाणी आपल्यापासून २०० मीटर लांब असायचे ! इथे नर्मदा जलाची चव ओहोटीमध्ये ८० टक्के गोड आणि २० टक्के खारट लागायची . भरतीच्या काळात हेच गणित उलटे व्हायचे ! मी प्रथमच एखाद्या नदीचा समुद्रसंगम इतक्या जवळून अनुभवत असल्यामुळे मला हे खूप मजेशीर वाटले ! अखेरीस काठाने चालता येणे अशक्य होऊ लागल्यावर आणि पुढे अतिशय कठीण अशी भुखी खाडी आडवी येणार आहे हे कळल्यामुळे किनारा सोडावा लागला . तुकाराम बुवा सुरवसे आधीच पुढे निघून गेले होते . मी वेगळी कलादरा भैसाली अशी गावे रानावनातून तुडवत कसा बसा भरूच महामार्ग गाठला . आज माझे पोट अतिशय गडबडलेले होते . गेले काही दिवस महिन्याचे स्वच्छ जल प्यायला मिळाले नव्हते . ज्या आश्रमात जाऊ तिथे आर ओ पाणी प्यायला मिळायचे .  आपण पाण्याला जीवन म्हणतो .परंतु रिव्हर्स ऑसमॉसिस नावाची प्रक्रिया करून या पाण्यातील सर्व जीवन संपवले जाते त्यामुळे हे मूर्तिमंत मृत पाणी असते ! आणि असे पाणी पिल्यामुळे पोट न बिघडले तरच नवल ! आहे की नाही गंमत ! लोकांचे पोट साधे पाणी पिल्यावर बिघडते ! परंतु परिक्रमावासींचे पोट आर ओ पाणी पिल्यामुळे बिघडायचे ! हाच अनुभव सोबतच्या अनेकांनी घेतला होता म्हणून सांगतो आहे ! आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले क्षार आणि सूक्ष्म मूलद्रव्ये नदी आणि ओढ़े नाले यांच्या पाण्यातून आपल्याला मिळत असतात . आकडी हनुमान मंदिरासमोर एल अँड टी कंपनीचा जो आर ओ पाण्याचा प्रकल्प होता तो देखील एक छोटा समुद्र बांधल्यासारखाच जणूकाही होता . २१ मीटर खोल पाण्याची ती भव्य दिव्य टाकी होती .आणि त्यातून जलशुद्धीकरण करून ते पाणी विकले जायचे . आश्रमाला त्यांच्यातर्फे मोफत पाणी दिले जायचे . परंतु या पाण्यामुळे पोटाची सर्व गडबड उडाली . 
सुवा नावाच्या गावामध्ये शिंगणाथ महादेवाचे भव्य मंदिर होते .इथे काही काळ थांबलो आणि बालभोग घेतला .वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मिळाला .
शिंगनाथ महादेव सदाव्रत आश्रम सुवा .
 सुवा तालुका घागरा जिल्हा भरूच 
उत्तर तट गुजरात 
दुपारी बालभोग
(घोड्यावरून पडून झालेला अस्थिभंग आणि तो भरून यायच्या आत सतत हातात धरलेला दंड यामुळे एरव्ही बरे किंवा सुवाच्य असलेल्या माझ्या अक्षराची किती वाट लागली आहे ते आपल्याला इथे लक्षात येईल ! )
शिंगनाथ महादेवाच्या मंदिराचा परिसर फारच भव्य होता . इथे पक्षांना खायला घातले जायचे . पोपट मोठ्या प्रमाणात दिसायचे .
मंदिराचा कळस लक्षात राहील असा मोठा होता
मंदिर स्वच्छ पवित्र व सुंदर होते
श्री शिंगनाथ महादेव सुवा
श्री शिंगनाथ महादेव सुवा येथील शिवपिंडी
इथे शेजारीच एक अतिशय भव्य आणि सुंदर अशी गोशाळा होती . 
गुजरात मधील गीर साहिवाल वगैरे जनावरे फार प्रेमळ असतात
अगदी निर्धोकपणे लहान मुलांना आपण त्यांच्यासोबत सोडू शकतो ! सुवा गावातील मंदिराच्या या गो शाळेतील काही चित्रे आपण पाहतो आहे . 
इथून पुढे काठाने चालत रहियाद , कोलीयाद , वेगणी अशी गावे पार करत कलादरा गावात आलो .
वेगणी गावामध्ये वैजनाथाचे सुंदर मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले .
श्री वैजनाथ मंदिर वेगणी
श्री वैजनाथ महादेव वेगणी
कलादरा नावाच्या या गावामध्ये माझी आवडती कला दाखवत चांगला चार तास झोपलो . पोट बिघडते आहे असे वाटल्याबरोबर मी त्यामध्ये वरून अधिकचा भार भरणे बंद करून टाकायचो .त्यामुळे आज जेवणाचा प्रश्न नव्हताच.
एकंदरीत या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले असल्यामुळे परिसराचे पावित्र्य हरवल्यासारखे वाटत असे . कलादरा गावामध्ये कपालेश्वर महादेवाचे मंदिर आहे . 
श्री कपालेश्वर महादेव कलादरा
कलादरा गावामध्ये शॉफ्ट शिपयार्ड नावाची कंपनी असून इथून मध्यम ते मोठ्या आकाराची जहाजे जलावतरण करतात .ती कंपनीमध्ये आडवी आल्यामुळे किनारा सोडावा लागला . 
 शॉफ्ट शिपयार्ड कंपनीचे मुख्य द्वार
अशा पद्धतीच्या रुळावरून नका जलावतरीत केल्या जातात . ही प्रचंड मोठी कंपनी आहे .
त्याचबरोबर या भागामध्ये छोट्या व मध्यम आकाराच्या अनेक नौका आपल्याला दिसतात . ही नर्मदा मैया असली तरी देखील समुद्र असल्याप्रमाणेच तिचा वापर लोक करतात .कारण पात्रच तेवढे भव्य आहे . 
समुद्रासारखे भासणारे नर्मदा मातेचे पात्र
या भागामध्ये किनाऱ्याने चालताना असा प्रचंड गाळ तुडवावा लागला . वरचा पृष्ठभाग बऱ्यापैकी वाळलेला असायचा . परंतु पात्राच्या जवळ जाईल तसे चिखलात पाय रुतायचे . इथे एक गवताची काडी सुद्धा कुठे उगवलेली दिसत नाही . 
भरती ओहोटीमुळे तयार झालेल्या अशा प्रकारच्या गाळातून कित्येक किलोमीटर चाललो . चप्पल हातात घेऊन चालल्यामुळे पायाला खूप गारवा मिळायचा . हा एक अतिशय सुखद अनुभव होता .
मध्ये एक ओढा आडवा आला . इथे इतक्या छोट्या नौका होत्या की विचारू नका ! प्रत्येक नौकेने आजवर मारलेल्या माशांची संख्या मोजली तर किती मोठ्या प्रमाणात जीव हत्या झाली असेल याची कल्पनाच करवत नाही !
यातील प्रत्येक नौकेवर अनेक कुटुंबांचे जीवन अवलंबून होते . प्रत्येक नौकेला नाव व सरकारी नोंदणी क्रमांक देण्याची पद्धत इथे आहे . कलादरा गाव संपले की भूखी खाडी आडवी यायची . त्यापूर्वी नर्मदा सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक मोठे मिठागार तिथे होते . समुद्राला भरती आली की त्याचे पाणी साठवून त्यापासून मीठ काढण्याची प्रक्रिया येथे केली जायची . मिठाचे भले मोठे ढीग लागलेले लांबून दिसत होते . अक्षरशः ट्रॅक्टरने मीठ गोळा केले जायचे . या संपूर्ण भागात खूप मिठागरे आहेत . फक्त हे नर्मदा मातेच्या नावाने काढलेले असल्यामुळे लक्षात राहिले . 
नर्मदा मातेच्या पात्रातून मिठाचे संकलन करताना ट्रॅक्टर
मिठाचे हे ढीग इतके प्रचंड होते की खूप दूरवरून दिसायचे
याही भागातील घरे अतिशय सुंदर होती ! छोटेसे घर असले तरी लाकडावर प्रचंड कलाकुसर केलेली असायची .
यानंतर आधी थोडेसे जंगल आणि मग उत्तम शेती पार करत चालत राहिलो . इथले लोक रस्ता खूप चांगला सांगतात . मला काहीही करून भरूच दहेज हा गुजरात राज्याचा राज्य महामार्ग क्रमांक सहा गाठायचा होता . इथे वन्य जीवन बरे होते . भरपूर अंतर तोडल्यावर अचानक शांततेचा भंग करणारा हा अजस्त्र महामार्ग आडवा आला ! मालवाहतूक तर इतकी चालू होती की विचारू नका ! इथे फक्त मालवाहतूक करणारे मालट्रक ,विविध कंपन्यांच्या मालकांच्या आलिशान गाड्या , कर्मचाऱ्यांच्या दुचाकी आणि कर्मचाऱ्यांची ने आण करणाऱ्या अक्षरशः शेकडो बसेस यांची अखंड ये जा सुरू होती .  भूखी खाडी आडवी आली . तिच्यावर एक पूल बांधलेला होता . खाडी पाहिल्यावर लक्षात आले की हिला भूखी का म्हणतात ! प्रचंड चिखलगाळ असलेली ही खाडी तिच्या उदरात शिरणाऱ्या प्रत्येक जीवाला खाऊन टाकायची ! इतका गाळ पार करता येणे अशक्य होते ! बरे झाले मी भूखी खाडी उतरून पार करण्याचा निर्णय घेतला नाही ! म्हणजे तसा मानस मी व्यक्त केला होता परंतु वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने मला तसे न करण्याचा सल्ला दिला होता .  ही खाडी किती भयानक आहे हे खालील चित्र पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही .
भरूच दहेज राज्य महामार्गावरून दिसणारी भूखी खाडी किंवा भादरी नदी
 खाडी अतिशय विस्तीर्ण आहे आणि ८० टक्के चिखलाने भरलेली असते .
या भादरी नदीच्या अगम्य पात्रामुळे सुमारे २० - २२ किलोमीटरचा फेरा पडला . भविष्यामध्ये सरकारने परिक्रमावासींसाठी प्रत्येक नदी ओढे नाले यांच्यावर चांगल्या दर्जाचे पादचारी पुल बांधले तर फार मोठे काम होणार आहे . आणि परिक्रमावासींचे चालण्याचे अंतर वाचून मुख्य म्हणजे नर्मदा मैया पासून त्यांना दूर जावे लागणार नाही . महामार्गावर तिवारी हा मौनी बाबा भेटला . यालाच चित्रकूट वाले बाबा असं सुद्धा म्हणायचे . हा अतिशय सज्जन सात्विक आणि सरळ माणूस होता . निष्कपट आणि निष्पाप होता . सतत चेहऱ्यावर हास्य असायचे . मनामध्ये गप्पा मारणारा तो हाच ! याच्यासोबत महामार्गावरून सुमारे १२ किलोमीटर आंतर चाललो . महामार्गाचा दर्जा अतिशय उत्तम होता . मी भारतामध्ये बऱ्यापैकी सर्व राज्य फिरलेलो आहे . एक महाराष्ट्र वगळता सर्वच राज्यांमध्ये खूप चांगले रस्ते आहेत . महाराष्ट्र मधलेच महामार्ग इतके भंगार का आहेत याचा खरे म्हणजे आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे . प्रचंड प्रमाणात टोल वसूल करूनही महामार्ग मात्र अतिशय टुकार दर्जाचे बांधण्याची स्पर्धा महाराष्ट्रातील कंत्राटदारांमध्ये लागलेली असते . रस्ते बनविण्याची कंत्राट घेणारे माझे काही मित्र आहेत . त्यांनी असे सांगितले की जितके पैसे महामार्गासाठी सरकारकडून दिले जातात त्यातील बहुतांश पैसा स्थानिक लोकप्रतिनिधींना  द्यावाच लागतो . त्यामुळे उरल्या सुरल्या रकमेत जमेल त्या दर्जाचे कार्य करावे लागते . मग कधी रस्त्याची रुंदी कमी करून माल वाचविला जातो तर कधी रस्त्याची जाडी कमी करून माल वाचविला जातो तर कधी मालाचा दर्जा निकृष्ट वापरून पैसा वाचविला जातो . नुकताच म्हणजे जून २०२४ मध्ये मी शुलपाणीच्या झाडीमध्ये जाऊन दिनेश फोदला पावरा याला वृक्षारोपणासाठी मदत करीत असताना तिथे रस्त्याचे काम सुरू होते हे आपल्याला सांगितलेच . इथे मी निघताना रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते . आणि काही भाग तयार झाला होता . पहिल्याच पावसामध्ये यातील बहुतांश रस्ता संपूर्ण वाहून गेला ! आता बोला ! 
शुलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी या गावामध्ये जून २०२४ रोजी सुरू असलेले रस्त्याचे काम
रस्त्याचे काम कसे काय सुरू आहे हे उत्कंठेने पहात बसलेला दिनेश फोदला पावरा आणि ग्रामस्थ
दुसऱ्याच दिवशी पावसामुळे रस्त्यावर वाहून आलेली माती आणि मातीमध्ये वाहून गेलेला रस्ता .
याच ठिकाणी केलेला एक व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चैनल वर टाकला आहे पहा . तिथे मी असे म्हटले होते की पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाऊ शकतो आणि तसेच झाले आहे . परंतु हे एकाच दिवसात होईल असे वाटले नव्हते . किती दुर्दैव आहे .
तिवारी बाबा मौनामध्ये असला तरी त्याला हवे ते सर्व तो सांगू शकायचा . त्याची देहबोली खूपच बोलकी होती ! त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि हसू असे दोन भाव कायम दिसायचे ! त्यामुळे तो लहान बाळासारखा दिसायचा ! तो अजूनही परिक्रमेमध्येच आहे . नुकत्याच एका व्हिडिओमध्ये मला तो दिसला . याला हॉटेलमध्ये चहा प्यायला आवडायचे . मध्ये एक-दोन चहा वाल्यांनी बोलावल्यावर लगेच गेला ! आपण एका वाहत्या महामार्गावर आहोत हे तो विसरून जायचा ! शहरात फारसे राहिलेले नसतात त्या लोकांना रस्त्याचे गंभीर्य कळत नाही हे खरे आहे . आपण शहरी लोक मात्र अति चिकित्सा करत रस्ता ओलांडतो .आणि ते एकादृष्टीने योग्यही आहे . हा महामार्ग कंटाळवाणा होत होता . कारण मैयाचे दर्शन होत नव्हते . अखेरीस बरेच अंतर चालल्यावर नवेठा नामक गाव आले .इथे महामार्गावरच उजव्या हाताला श्री सदानंद अवधूत आश्रम नावाचा घरगुती आश्रम होता . म्हणजे खरे तर घरच ते . परंतु परिक्रमावासींची सेवा करत असल्यामुळे धन्य असा गृहस्थाश्रम तो ठरला होता . सुंदर जुन्या पद्धतीचे कौलारू बांधकाम होते . वरती श्री सदानंद अवधूत आश्रम अशी गुजराती भाषेतील पाटी लाकडाच्या पट्टीला ठोकण्यात आली होती व ती खूप छान दिसत होती .बाहेर थोडासा वरंडा होता व त्यात झोपाळा बांधला होता . घर व परिसर अतिशय स्वच्छ होता . इथे मागच्या बाजूला परिक्रमावासींसाठी एक बंगले वजा खोली बांधून त्यावर गच्ची केलेली होती . सध्या या वास्तूचे नूतनीकरण झाले आहे असे गुगल नकाशा वरील चित्रे पाहिल्यावर दिसते . 
हा आश्रम संत श्री मांगीराम शर्मा आपल्या पत्नीसह चालवत होते त्यांना एक मुलगा व दोन नाती होत्या त्यातील हंसिका शर्मा नावाची छोटुकली भलतीच शिष्ट होती ! आश्रमामध्ये मी गेल्याबरोबर त्याचे मागच्या बाजूला असलेल्या बंगले वजा खोलीकडे जाण्याचा इशारा मला केला . इथे केरळी संन्यासी आणि मी नागा आहे सांगणारा नागा बाबा हे आधीच येऊन बसले होते . नागा बाबा ,केरळी संन्यासी आणि धुळेकर या तिघांचे भलतेच फाटलेले दिसत होते . दक्षिण तटावर बहुतांश काळ हे तिघे एकत्र चालत होते .परिक्रमेमध्ये मी ही गंमत फार पाहिली ! गटाने जे परिक्रमा करतात त्यांच्यामध्ये बरेचदा फार मोठ्या प्रमाणात भांडणे होतात ! ती लगेच मिटतात सुद्धा . परंतु भांडण होतात हे मात्र खरे आहे . मग रुसवे फुगवे अबोले धरणे हे सर्व प्रकार चालतात ! मला इतकेच वाटायचे की जर हेच सर्व करायचे आहे तर मग परिक्रमेला यायची काय गरज आहे ? हे तर आपण घरी बसून सुद्धा करू शकतो की ! केरळी साधू माझ्यावरती अजून चिडलेला होताच . नावे मध्ये बसून समुद्र पार करताना तो बस म्हणाला हे मी ऐकले नाही याचा त्याला राग आलेला होता . म्हणजे तसा तो माझ्यावर चिडत वगैरे नव्हता परंतु विचारलेल्या प्रश्नांची उडवा उडवीची उत्तरे देणे किंवा उत्तरच न देणे असे करत होता . याचा स्वभाव अतिशय शीघ्र कोपी होता . परंतु माझ्या दृष्टीने तो मनुष्य अतिशय परमपूज्य होता याचे एकमेव कारण म्हणजे केरळ या धर्माचा सर्वाधिक ऱ्हास झालेल्या राज्यातून येऊन देखील तो हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संन्यास आश्रमाचा स्वीकार केलेला एक मल्याळी मनुष्य होता ! त्यामुळे मी कधीही त्याच्याशी भांडलो नाही किंवा मर्यादा ओलांडून बोललो नाही . त्यालाही मी त्याला आदर देतो आहे हे लक्षात आल्यावर त्याचा राग शांत झाला आणि नंतर त्याची माझी खूप चांगली मैत्री झाली . केरळ मध्ये झालेली धर्महानी या विषयावर बोलताना त्याचा कंठ दाटून यायचा . कधी कधी वाटते की संन्यास घेऊन चूक केली असे त्याला वाटायचे . कारण संन्यास घेतला असला तरी केरळमध्ये संन्यासी करू शकत नाहीत हे धगधगीत वास्तव त्याने मला सांगितले . त्याला हिंदी शिकावेच लागले कारण संपूर्ण भारतात संन्याशाला फिरावे लागते . केरळमध्ये आणि काश्मीरमध्ये संन्यासी उजळ माथ्याने फिरू शकत नाहीत हे जळजळीत कटू वास्तव आहे . या आश्रमामध्ये भुरी भाई नावाचा एक सेवेकरी होता . त्याला वय विचारले तर तो अंदाज पंचे ८० असावे असे सांगायचा . मालकांना विचारले तर ते शंभर वय असेल असे सांगायचे . परंतु माझ्या अंदाजानुसार त्याचे वय ८५ ते ९० असावे . गेली पन्नास वर्षे सलग तो या घरामध्ये राहून परिक्रमावासींची सेवा करत होता !पाठीमध्ये हा पूर्णपणे वाकलेला होता . गुडघ्यामध्ये डोके घालून सर्व काम चालायचे .परंतु तरीदेखील अखंड काही ना काही काम करताना भुरी भाई दिसायचे .यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या ! यांच्याकडून अनेक परिक्रमावासीं बद्दल मी ऐकले .असा एखादा अनुभवाचा खजिना दिसला तर तो लुटल्याशिवाय पुढे जाईल तो मी कसला ! भुरी भाई चे गुडघे उघडत नव्हते . सतत एका स्थितीमध्ये बसून गुडघ्यांना तोच आकार प्राप्त झाला होता . मला परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला मणेरी नावाच्या गावामध्ये डॉक्टर प्रल्हाद पटेल यांच्या दवाखान्यात शेजारी असलेल्या नामदेव यांनी हाताला लावण्यासाठी एक औषधी तेल दिले होते ते माझ्याकडे पडून होते .मला अचानक त्या तेलाची आठवण झाली आणि मी भुरी भाई यांना पाय चांगले दाबून दिले आणि तेलाने चांगला मसाज गुडघ्याला करून दिला . त्यांना खूप बरे वाटू लागले ! आता हे तेल नित्य लावत जावे असे मी त्यांना सांगितले . त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून मला गहिवरून आले . इतकी शारीरिक झीज झालेली असताना सुद्धा स्वतःचा विचार न करता ते केवळ परिक्रमा वासींना काय हवे काय नको इतकेच ते पाहत असत . किती पुण्य त्यांनी कमावले असेल याचा हिशोब लावता येणे अवघड आहे ! शर्मा दाम्पत्य देखील त्यांची खूप काळजी घ्यायचे . ते जोपर्यंत कार्यरत आहेत तोपर्यंत त्यांना त्रास होणार नाही असा योग्य विचार त्यांनी केलेला होता . 
हाच तो नवेथा गावातील सदानंद अवधूत आश्रम
मांगीलाल शर्मा यांचे घर खूप सुंदर आहे !कमी संख्या असेल तर घराच्या दारातच परिक्रमावासी उतरतात .
ही शर्मा यांची शिष्ट नात ! परंतु अतिशय गोड होती ! साक्षात छोटी नर्मदा मैयाच !
घराच्या मागे बाणाने दाखवलेल्या वास्तूमध्ये मी आसन लावले होते आणि वरती गच्चीकडे जाणारा जो जीना आहे त्यातून गच्चीत जाऊन विश्रांती घेतली होती .
हेच ते भुरी भाई सेवेकरी ! हे असे बसलेल्या अवस्थेत चालायचे ! तशीच सर्व कामे करायचे .मांगीराम शर्मा यांच्या चिरंजीवांनी हा फोटो काढून माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
सदानंद अवधूत आश्रमाचा भुरी भाई यांनी प्रस्तुत लेखकाच्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का
इकडे प्रस्तुत लेखकाच्या पायामध्ये आपल्याला आठवे पादत्राण दिसेल जे वाटते एका दुकानदाराने मला दिले होते .ते फॅन्सी सॅंडल होते त्यामुळे त्यात फारसा दम नव्हता . परंतु काही दिवस त्याने मला साथ दिली .
मी पादत्रांच्या माहितीवर इतका भर का देतो आहे असा प्रश्न कदाचित वाचकांना पडू शकेल . परंतु बहुतांश परिक्रमावासी एक दोन किंवा फार फार तर तीन पादत्राणे वापरून परिक्रमा पूर्ण करतात . काही परिक्रमा वासी तर मला असे देखील भेटले ज्यांनी एका पादत्राणावर दोन वेळा परिक्रमा केली आहे . परंतु मला मात्र भरपूर पादत्राणे लागत होती .  कदाचित मैय्या काठावरील मार्गाची काठिण्य पातळी हे त्याचे कारण असावे .ही माहिती सुद्धा जिज्ञासू आणि तज्ञ लोकांसाठी लिखित स्वरूपात उपलब्ध रहावी इतकाच हेतू आहे. असो .
रात्री शर्मा का कोणी अतिशय सुंदर असे भोजन करून आणून दिले . त्यांनी माझी थाळी पाहिली . ती अतिशय जड होती . त्यांनी मला विचारले की एखादी कमी वजनाची थाळी त्यांनी मला दिली तर चालेल का ? मी हो म्हटल्याबरोबर त्यांनी अतिशय पातळ व माझ्या थाळीच्या आकाराची थाळी मला आणून दिली . मी माझी जड थाळी आश्रमात ठेवून दिली . अशा रीतीने ग्वारीघाट येथील झुलेलाल आश्रमापासून इथपर्यंत त्या जड थाळीने मला चांगली साथ दिली ! जड थाळीचा जड अंत:करणाने निरोप घेतला ! हलकी थाळी फारच सुंदर हलकीफुलकी होती ! परिक्रमेमध्ये पाठीवरील वजन कमी होण्याचा आनंद काय असतो हे केवळ परिक्रमा वासीचच  जाणोत ! सुंदर असे सुग्रास भोजन त्या थाळीमध्ये खाल्ल्यावर झोपण्यासाठी मी गच्चीत गेलो . कारण मी क्वचित प्रसंगी घोरायचो . त्याचा त्रास केरळी बाबाला होऊ नये अशी इच्छा होती . गच्ची मध्ये देखील शांतता नव्हती कारण सतत वाहतूक रस्त्यावरून सुरू च होती . रात्रपाळीच्या कामगारांना घरी सोडणाऱ्या आणि कामावर घेऊन जाणाऱ्या बसेसची अक्षरशः गर्दी त्या रस्त्यावर होती ! दहेज हा नवीनच विकसित होत असलेला 'इंडस्ट्रियल कॉरिडॉर ' आहे . आणि हा औद्योगिक परिसर निश्चित अर्थाने खूप वाढेल या शंकाच नाही . आकाशातील चांदण्या बघत कधी डोळा लागला कळाले नाही . पहाटे लवकर जाग आली .डोलडालची चांगली व्यवस्था येथे होती . म्हणजे तसे सर्व परिक्रमावासी शेतात वगैरे जायचे . परंतु शर्मा काकूंनी मला रात्री सांगून ठेवले होते की त्यांच्या घराच्या मागे असलेले त्यांचे खाजगी शौचालय मी वापरू शकतो .शौचालयाच्या किल्ल्यांची जागा सुद्धा त्यांनी मला दाखवून ठेवली .हे फारच मोठे उपकार झाले त्यांचे ! शक्यतो स्वच्छता प्रिय मनुष्य कोण आहे हे पाहता क्षणीच अनुभवाने या लोकांच्या लक्षात येत असावे .
किती दुर्दैव आहे पहा ना ! पिण्याचे पाण्याचा नळ शौचालय अशा ठिकाणी कुलूप लावायची पाळी आपल्या देशात येते ! अगदी रेल्वेतील टमरेलला सुद्धा साखळी लावून कुलूप लावलेले असते ! पाणपोई वरील पेल्याला सुद्धा साखळबंद कुलूप लावलेले असते ! आपल्याला अजून या सर्वातून बाहेर पडायला किती वर्ष लागतील काय माहिती ! असो .अन्य परिक्रमावासी जागृत होण्याच्या आधीच मी तिथून चहा प्रसादी घेतल्यावर शांतपणे काढता पाय घेतला .हा मुक्कामाचा दिनांक होता ७ एप्रिल २०२२ . आणि हा परिक्रमेतील माझा ९६ वा मुक्काम होता . आता लवकरच मैयाचे दर्शन मला घडणार होते ! त्यामुळे अतिशय वेगाने पावले टाकत मैयाच्या दिशेने निघालो !





लेखांक एकशे तेरा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. narmde har !!!!! kahi divas chukalya chukhalya sarakhe vatle. arthat vruxaropan ha mahtvacha vishay margi lavla ahe tumhi, tyamule kahich takrar nahi. :)

    उत्तर द्याहटवा
  2. Narmade Har!! Ma Namami Narmade!!! Husshaa!!! Finally aamchi pan Manas Parikrama suru zaliii :-) (PS-really impressed with your work you are doing for the tree plantation) Hat's off!!

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर