लेखांक ४३ : दद्दा घाटचा साधू ,घुन्सोर आणि त्रिशूलभेद घाटाचे अद्भुत सौंदर्य

दद्दा घाट सोडला आणि किनाऱ्याचा मार्ग पकडला .नर्मदेचे निळे शार पाणी अखंड साथ करीत होते . अधून मधून एखादे छोटेसे होडके फक्त दिसायचे .बाकी परिसर हळूहळू निर्मनुष्य होत गेला . मोठ्या शहराजवळ नर्मदे काठी थोडीफार गर्दी आढळते परंतु एरवी नर्मदा बऱ्यापैकी निर्मनुष्य असते .
जबलपूर शहराची हद्द संपल्यावर शेती सुरू झाली . परंतु मोठे शहर जवळ असल्यावर लोक धान्याची शेती न करता ताबडतोब उत्पन्न देणारा भाजीपाला अधिक लावतात तसेच इथे आढळले नर्मदेच्या काठाने दुतर्फा भरपूर भाजीपाला लावला होता आणि या भाजीपाल्याला पाण्याचे प्रमाण अधिक लागते त्यामुळे शेतामध्ये सतत पाणी सोडण्याचा परिणाम म्हणून सर्वत्र प्रचंड चिखल माजला होता .

नर्मदे काठी लावण्यात आलेला भाजीपाला 
शेतामध्ये माजलेला चिखल आणि उजवीकडे वाहणारी नर्मदा .
अशा प्रसंगी चुकून माकून नर्मदेच्या बाजूला तुम्ही घसरलात तर नर्मदार्पणमस्तु होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही ! अगदी नर्मदा देखील नाही !
ग्वारी घाटाच्या पुढे काही अंतर चालल्यावर तिलवाडा अथवा  तिलवारा नावाचा घाट लागतो . तिथे दोन पूल आहेत एक नवा आणि एक जुना .नव्या जोड पुलामधून मी काल ज्याच्या काठावर चाललो तो बर्गी डावा कालवा नर्मदा नदी ओलांडून उत्तर तटाला जातो . येथील मुख्य घाट समोरच्या म्हणजे उत्तर तटावर असून दक्षिण तटावर अधिकांश झाडी दिसते . या संपूर्ण परिसरामध्ये जबलपूरच्या धनिकांचे मोठमोठाले बंगले , प्रासाद , राज महाल असून त्यांच्या कुंपणामुळे काठावरून  चालणे थोडेसे जिकीरीचे होऊन जाते .
जुना पूल तिलवारा घाट . हा  पूल सध्या वाहतुकीसाठी वापरात नसून याचा सध्या सेल्फी पॉईंट झाला आहे .
नवे जोडपूल ज्यातून बर्गी डावा कालवा नर्मदेच्या उजवीकडे नेला गेला आहे
तिलवारा घाटावर देखील ग्वारी घाटासारखी नर्मदेची आरती होते . ती बघण्यासाठी पुलावर खूप गर्दी जमते
दोन्ही पूल
इथे घाना नावाच्या गावामध्ये नीम करोली बाबांच्या नावाने दद्दा घाट नावाचा घाट काँग्रेसच्या एका आमदाराने बांधलेला आहे . त्याचे प्रवेशद्वार
संजय  यादव नामक कांग्रेस आमदार आहेत त्यांनी बांधलेला नींब करौरी बाबांचा आश्रम .
लाल खुणेने दाखविलेला यादव याचा राजमहाल ज्याचे नाव दद्दा धाम असे आहे. त्या शेजारी बाबांचा आश्रम आणि वरती वाहणारी नर्मदा

आश्रमातील निमकरोरी बाबांची मूर्ती खूप सुंदर आहे
बाबांच्या पादुका चल असून रोज स्थानासाठी नर्मदेमध्ये नेल्या जातात
शेजारी हनुमंताची सुंदर मूर्ती आहे
बाबांच्या मूर्तीला रोज वेगवेगळे साज केले जातात

आश्रमातील बाबांच्या विविध भावमुद्रा ,हनुमान जी आणि मुख्य गाभारा
या आश्रमात काही कार्यकर्ते गप्पा मारत बसले होते . परिक्रमावासींची फारशी सेवा येथे केली जात नसावी असे जाणवले . दर्शनासाठी आलेल्या एका माणसाने पेढ्यांचा पुडा आणि शंभर रुपये हातात ठेवले . पेढे तिथेच वाटून टाकले आणि खाली घाटावर आलो . हा घाट खाजगी असून इथे जायला परवानगी नाही असे हे लोक सांगत असत . परंतु मी गेलो . समोर गिरजा देवीज ब्लेस्ड होम नावाचे अतिभव्य घर होते . वरून खाली उतरण्यापूर्वी मी परिसराची पाहणी करत असे . तीव्र उतार होता समोर नर्मदा नदी वाहत होती . उजव्या हाताला थोडेसे वाळवंट होते आणि डाव्या हाताला शेती सुरू होत होती . आता शेतीचा मार्ग पकडायचा आणि पुढे चालायला लागायचे असे ठरवून मी शेताकडे निघालो . इतक्यात शेतामध्ये गुडघ्यामध्ये डोके घालून बसलेला एक तरुण साधू माझ्या दिशेने धावत येतो आहे असे मला दिसले . साधू मला थांबा थांबा असे विनवत होता आणि मला मात्र पुढे जायची घाई झाली होती कारण लवकरच अंधार पडणार होता . अखेर साधू ने मला गाठलेच आणि कृपया माझ्या कुटीमध्ये चला असे म्हणू लागला . गुणसागर दास नावाचा हा तरुण साधू होता . नर्मदे काठी एक छोटीशी झोपडी बांधून साधना करत राहत होता . मी मला पुढे जाणे आवश्यक आहे असे सांगितल्यावर त्याने सांगितले की तो सकाळपासून येथे बसलेला आहे आणि मी या मार्गावरून जाणारा पहिला परिक्रमा वासी आहे . त्यामुळे मी त्याच्या कुटीमध्ये येणे अतिशय आवश्यक आहे . मला काही कळेना तेव्हा त्याने अधिक उलगडा करून सांगितले . त्याला नर्मदा मातेने असा दृष्टांत दिला होता की उद्या एक परिक्रमावासी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे आणि तुला खरा साधू बनवणार आहे . बोलत बोलत झोपडी मध्ये आम्ही गेलो . आत मध्ये एक वृद्ध माताजी संन्यासिनी जप करीत बसल्या होत्या मी त्यांच्या पाया पडलो . साधूची साधनेची जागा होती तिथे त्याने मला बसविले . त्याच्याकडे अनेक देवांचे फोटो होते त्यात रामदास स्वामींचा देखील फोटो मला दिसला परंतु त्यांच्याबद्दल त्याला काही माहिती नव्हते त्यामुळे मी त्याला समर्थ रामदास स्वामी यांची माहिती दिली . हा फोटो त्याला कुठेतरी सापडला आणि त्यातून खूप ऊर्जा जाणवली म्हणून त्याने नित्य पूजेत तो ठेवला होता . मला त्याने पुन्हा काहीतरी द्या असे मागितले . माझ्याकडे त्याला देण्यासारखे काहीच नव्हते . मी विचार करून पाहिला . माझ्याकडे काय काय आहे याची यादी मी मनातल्या मनात करू लागलो . दोन वस्त्रे , दोन ब्लॅंकेट , एक झोळी , एक काठी ,एक कमंडलु, दोन हात मोजे , दोन पाय मोजे , थर्मल अपर ,पायातले बूट , दोन लंगोट्या ,पूजेचे साहित्य ,भगवद्गीता ,स्तोत्र संग्रह , झोपण्याची  मॅट , गमछा , बॅटरी , ताटवाटी , भांडे ,सुई दोरा ... बघता बघता मी बराच संसार गोळा केला आहे असे माझ्या लक्षात आले ! तो पुन्हा म्हणाला .असे होणे शक्यच नाही . नर्मदा माता मला सांगून गेली आहे म्हणजे तुमच्याकडे नक्की काहीतरी आहे . आणि इतक्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! चिमटा ! नर्मदा मातेने मला सिद्ध घाटावर दिलेला चिमटा ही अशी एकमेव गोष्ट होती की जी गेल्या दहा दिवसांत वापरलीच नव्हती .फक्त सोबत बाळगत होतो ! मी तो पिशवीतून बाहेर काढतात त्याने पटकेने त्याच्यावर झडप घातली आणि म्हणाला , हीच ती गोष्ट ! हीच ती गोष्ट ! चिमटा घेऊन तो धावतच झोपडीच्या बाहेर गेला आणि नर्मदेच्या काठावर नाचू लागला ! आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून ओघळत होते ! क्षणभर माझ्या मनात चलबिचल झाली . हा चिमटा तर नर्मदेने मला दिला आहे मग मी तो ह्याला का द्यावा ? परंतु मी लगेच विचार करून पाहिला की मी काही साधू नाही . गृहस्थी आहे आणि गृहस्थी कधी चिमटा घेऊन फिरताना पाहिलेले नाहीत . शिवाय नर्मदा मातेने जर खरोखर याला दृष्टांत दिलेला आहे तर तो चिमटा त्याला दिल्याने त्याची मैया वरील श्रद्धा अधिक दृढ होणार होती . त्यामुळे मी तिथून निघू लागलो . त्याने थांबायची विनंती करून काळा चहा केला . आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली . त्याच्या मनातील अन्य धर्माविषयीचे काही समज गैरसमज दूर करण्यात मला यश आले . नर्मदा मातेने त्याला सांगितले होते की आज तुझा खरा साधू बनणार आहे . ते एक प्रकारे सत्यामध्ये उतरले कारण त्याच्या गुरुने दिला सर्व काही दिले होते . फक्त चिमटा दिला नव्हता . आता तो साधू जमातीमध्ये फिरताना ताठ मानेने फिरू शकणार होता . माझ्या हातावर त्यांनी दहा रुपये दक्षिणा ठेवली आणि मी त्याला नर्मदे हर केले . पुढे शेतात एका मुलीला मी माझ्याजवळ साठलेली सर्व दक्षिणा देऊन टाकली . आणि पुन्हा एकदा किनारा पकडला . नर्मदा परिक्रमा तुम्हाला हेच तर शिकवते . कुणी काही दिले तरी आनंदाने स्वीकार करा . कुणी काही मागितले तरी आनंदाने त्याग करा . तुम्ही सोबत काहीही आणलेले नाही व काहीही नेणार नाही ! तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या दानातून आनंद मिळवा ! तो चिमटा दिल्याने माझे ओझे खूप कमी झाले होते . जड पोलादाच्या त्या चिमट्याचे भौतिक वजन तर होतेच . परंतु तो सोबत बाळगताना साधू काय म्हणतील किंवा या चिमट्यामुळे आपल्याला साधूत्व स्वीकारून सर्वसंग परित्याग करून निघून तर जावे लागणार नाही ना , याचे एक मानसिक दडपण देखील होते ! ते देखील क्षणात निघून गेले !
घाना गावाच्या पुढे आल्यावर हे एक सुंदर शिवमंदिर लागते ज्याचा कळस मला खूपच आवडला . फार दूरवरून ही पिंड आपल्याला दिसते .
शेतात घातलेली अशी काटेरी कुंपणे पार करत पुढे चालत राहिलो .
मध्ये अचानक अशा नद्या आडव्या येतात त्या गुडघाभर पाण्यात किंवा कमरे भर पाण्यात उतरून पार करून टाकायचो .
अशाप्रसंगी शेतातून जाऊन शेतकऱ्यांची बोलणी खाण्यापेक्षा खालून जायचे . मार्ग थोडा कठीण असतो परंतु निश्चितपणे सापडतो
नर्मदा वळताना रस्ता बुडवून वाहते .तर विरुद्ध बाजूला भरपूर वाळू साठलेली असते .दोन्हीकडून चालणे कठीण असते . परंतु अशक्य मात्र नसते
जसजसा अंधार पडू लागला तस तशी पायांची गती वाढविली
जवळपास गाव असल्याची खूण म्हणजे असा एखादा सांडपाण्याचा नाला येऊन नर्मदेला मिळताना दिसतो .तो त्याच्यामध्ये पाय ठेवूनच पार करावा लागतो .
इथे घुन्सौर नावाचे एक गाव मला लागले . काल आपण पार केले ते घनसोर नावाचे गाव होते . एक सारख्या नावाची अनेक गावे नर्मदा खंडामध्ये सर्रास आढळतात . इथे ग्रामस्थांनी मला गावांमध्ये हनुमान मंदिरात राहण्याची विनंती केली . मला मंदिरात सोडून गावकरी निघून गेले . मंदिरामध्ये एक तेजस्वी गोरापान साधू भागवत वाचत बसला होता .त्याने तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती . मारुती मंदिराच्या आत एक छोटीशी खोली होती तिथे आसन लावले . समोर असलेल्या हातपंपावर स्नान केले . इतक्यातच मोटर सायकलवर एक तरुण मला शोधत आला . छोट्या गावामध्ये बातम्या लगेच पसरतात . गावातील मंदिरात कोणी परिक्रमा वासी आला आहे हे लक्षात आल्यावर मला घरी भोजनाचे आमंत्रण द्यायला तो आला होता . याचे नाव बिरू यादव असे होते . माझ्या एका मित्रासारखा तंतोतंत हा दिसत असे .  मला गंमत वाटली ! बोलण्याची ढब , चालण्याची ढब ,हसण्याची पद्धत , दिसण्याची पद्धत , सर्व एकसारखे ! नर्मदे काठी असे एक सारखे दिसणारे अनेक लोक मला भेटले . असो . आरती पूजा करून त्याच्या घरी गेलो . श्रीमंत कुटुंब होते . आई वडील करोनामध्ये ढगाला हात लावून खाली आले होते . दोन बहिणी होत्या . त्यांची मुले होती . मुलांना चित्रे काढून दिली . त्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर कसे ठेवता येईल या विषयावर दोघी बहिणींना सप्रयोग मार्गदर्शन केले . सुंदर असे घरगुती भोजन झाल्यावर बिरू यादव च्या आयुष्यातील काही समस्या होत्या त्या विषयावर तासभर बंद खोलीमध्ये चर्चा केली . आणि माताजींनी दिलेले फरसाण पोहे घेऊन परत आश्रमामध्ये आलो . बिरू यादव ला माझा स्वभाव आवडला आणि त्याने सांगितले की तुमची परिक्रमा जबलपूरला पूर्ण होईल तेव्हा मला फक्त एक फोन करा . मी तुमची कन्या भोजनाची सर्व व्यवस्था करणार ! दुर्दैवाने तसा काही योग पुढे आला नाही परंतु बिरू यादव हा व्यक्ती माझ्या चांगला स्मरणात राहिला . रात्री त्या आश्रमामध्ये एक गांजाडा भगत आला आणि बराच वेळ साधुशी मोठ्या आवाजात गप्पा मारत राहिला . त्यामुळे माझी झोप काही झाली नाही . पहाटे साडेतीन चार वाजता डोळा लागणार इतक्यात भजन करणारी काही मंडळी आली आणि त्यांनी संपूर्ण गावांमध्ये प्रभात फेरी सुरू केली . टाळ ढोलकी शंख झांजा अशी वाद्य घेऊन रामनामाचा गजर करीत ते रोज प्रभात फेरी काढत असत . त्यांच्या या प्रभात फेरीमुळे संपूर्ण गाव पहाटेच्या रामप्रहरी जागा होत असे . ही संकल्पना मला फार आवडली . मी थोडे अंतर त्यांच्याबरोबर चाललो देखील . पुढे अनेक गावांमध्ये मला अशा प्रभात फेऱ्या दिसल्या . ही परंपरा आपल्या महाराष्ट्रातून अस्तंगत झालेली दिसते . ती या लोकांनी जिवंत ठेवलेली आहे . मी हातपंपावर गरमागरम भूजलाने पुन्हा एकदा स्नान करून घेतले . परत मारुती मंदिरात आल्यावर या लोकांनी माझ्या हस्ते आरती करून घेतली . पूजा वगैरे आटोपून मी भल्या पहाटे पुढे निघालो . आता नर्मदेचा अतिशय सुंदर असा किनारा मला दिसू लागला ! इथून खरे तर डांबरी मार्ग होता परंतु तो टाळून मी काठावरीलच मार्ग पत्करला . आणि तो माझा निर्णय अतिशय अतिशय योग्य ठरला ! हिरवेगार गवत संपून आता विविध रंगाचे दगड दिसू लागले . चित्रविचित्र आकारांचे हे खडक पायाला टोचणारे होते आणि चालण्यासाठी अत्यंत घातक होते . त्यामुळे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाकावे लागत होते .
गवताचा प्रदेश संपून खडकाळ किनारा सुरू झाला
खडकाचा एक फायदा असा की अगदी काठाने चालता येते
या भागातील नर्मदेचे जल अत्यंत शुद्ध पवित्र आहे

किती किलोमीटर चालताना तुम्हाला एकही मनुष्य आढळत नाही

काठावरती दगडांचे विविध आकार , प्रकार , रंग बघायला मिळतात
मध्ये एक छोटेसे मंदिर लागले . अशी खूप छोटेखानी पूजास्थाने नर्मदे काठी आहेत .इथे बसून स्थानदेवतेचे दर्शन करणे व ध्यान करणे खूप आनंददायी असते .
काठावरून चालताना कधी कधी दगडांवरून उड्या मारत चालावे लागे .नर्मदेचा मुख्य प्रवाह आपल्याकडून ओलांडला जाणार नाही एवढी काळजी फक्त घ्यायची .
या भागातून चालणे हा अतिशय सुखद अनुभव होता .विविध रंगाचे रंगीबेरंगी खडक आणि शिवलिंगे येथे सापडत होती .समोर मोठे विद्युत मनोरे विजेचा प्रवाह नर्मदेच्या इकडून तिकडे घेऊन जात होते .
पुढे अचानक नर्मदेचे पात्र अरुंद झाले आणि अतिशय शांतपणे आवाज न करता दहा फूट खाली झेपावताना दिसले .हाच नर्मदे वरील जगप्रसिद्ध घुघुवा धबधबा होता हे मला नंतर समोरच्या ताटावर पोहोचल्यावर कळले . हे दृश्य फारच नयन मनोहर होते ! वरील चित्राच्या समोरील तटावरून मी चालत होतो .
पुढे इतका मोठा धबधबा तर अलीकडे पाणी इतके शांत , नितळ , निर्मळ होते ! सारेच अद्भुत !

याच परिसरातील काही दृश्य
हे ठिकाण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते . परंतु मी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते
शांतपणे वाहणारी नर्मदा आणि तिच्यामध्ये तरंगणारे असे एखादे होडके किंवा डोंगा हे दृश्य हृदयात कायमचे कोरले गेलेले आहे !
पुढे अचानक असा एक नाला आडवा आला . नंतर नर्मदा पुराण वाचताना मला कळले की हा देवनाला नावाची नदी होती !
नर्मदेचे पात्र अचानक तीन मोठ्या मोठ्या शाखांमध्ये विभागले गेले .हेच ते पुराण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्रिशूल भेद ! इथून नर्मदा अचानक उत्तरवाहिनी होऊन जाते .

त्रिशूल भेद तीर्थाच्या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केलेली आहे .
शेजारी देवनाला वाहतो आहे
त्रिशूल भेद तीर्थातील देवता
हा देवनाला अतिशय पवित्र असून याच्यामध्ये स्नान करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते . मला हे काही ठाऊक नव्हते . परंतु नाल्याच्या वरील चित्रात दिसणाऱ्या  काठाने चालताना अचानक माझा पाय सटकला आणि संपूर्ण सामानासकट मी खाली घसरू लागलो आणि देवनालमध्ये  पडणार असे लक्षात आले . मी पटकन पाठीवरची झोळी मोकळी केली ,फेकून दिली आणि देवनाल्या मध्ये उडी मारली ! मला हे अपघाती स्नान घडले खरे ! परंतु नंतर नर्मदा पुराण वाचल्यावर त्या स्नानाचे महात्म्य माझ्या लक्षात आले ! आणि आता खूप कृत कृत्य वाटते . या छोट्या छोट्या घटनांवरून असे लक्षात येते की आपण परिक्रमा करत नसतो तर नर्मदा मैया आपल्याला तिच्या पद्धतीने परिक्रमा घडवीत असते . नाहीतर हे त्रिशूल भेद तीर्थ आहे वगैरे मला काहीही माहिती नव्हते . नर्मदा पुराणा मध्ये आलेल्या या सर्व कथा पुढे एका स्वतंत्र प्रकरणांमध्ये लिहावयाचा मानस आहे . त्यामुळे ज्यांना पुराण कथा ऐकण्यामध्ये रस आहे त्यांना ते एकत्रित वाचायला मिळेल .
त्रिशूल भेद तीर्थ अतिशय पवित्र मानले जाते

इथे नर्मदा उत्तरवाहिनी होत असल्यामुळे या भागाचे विशेष महात्म्य आहे
ही सूचीपर्णी वनस्पती आपल्याला जागोजागी आढळते जिच्यामुळे थोडीफार तरी गाळ माती साचून कठीण खडकांमध्ये थोडेसे वाळवंट तयार होण्यास मदत झालेली आहे . ही परदेशी वनस्पती असून मध्य प्रदेश सरकारने हीची जाणीवपूर्वक काठावरती लागवड केलेली आहे ज्यामुळे पूर नियंत्रणास मदत होते . चालताना मात्र ही वनस्पती फार तापदायक असून हिच्या वाळलेल्या काठ्या पायामध्ये खूप बेकार घुसतात . त्यामुळे हिच्या वनातून चालताना फार जपून चालावे लागते . 

आता हळूहळू खडकांचा आकार मोठा होऊ लागला आणि एखादा मोठा पर्वत चढतो आहे की काय असे वाटू लागले . लवकरच एका जगप्रसिद्ध ठिकाणचे दर्शन नर्मदा मैया मला घडविणार होती !
आजूबाजूला डोंगर आणि हे शांत रूप पाहून कोणालाही शंका सुद्धा येणार नाही की इथून पुढचे नर्मदेचे रूप किती भयानक आणि रौद्र असू शकेल !
इथूनच पुढे नर्मदा अचानक तीनशे फूट खोल दरीमध्ये झेपावते आणि सुरू होतो जगप्रसिद्ध भेडाघाट !नर्मदे हर !



लेखांक त्रेचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर