लेखांक ४४ : जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा , भेडाघाट आणि ग्वारीची सिद्धन बाई

पायाखालची माऊशार माती जाऊन खडकाळ भूमी सुरू झाली . चित्र विचित्र आकाराचे धारदार खडक , स्तरित खडक ,ते खचून तिरके झालेले , यातील चुनखडक धुतला जाऊन फक्त धातुयुक्त भाग शिल्लक राहिलेला , पांढरट दगड , संगमरवरी दगड ,काळे दगड , पिवळे दगड ,लालबुंद दगड ,मोठाले अभ्रकाचे खडक ,मोठाले चकचकीत धातूयुक्त गोटे ,सारेच अद्भुत दृश्य ! 
इतके सारे वैविध्यपूर्ण खडक एकाच ठिकाणी मी आजवर कधीच पाहिले नव्हते ! मध्ये लम्हेटा नावाच्या गावामध्ये प्रभू रामचंद्राने स्थापन केलेले दुहेरी शिवलिंग होते . इंद्रेश्वर आणि कुंभेश्वर असे त्याचे नाव . शेजारी पिपलेश्वराचे मंदिर देखील आहे . हे जोड शिवलिंगाचे मंदिर अतिशय सुंदर आहे . छोटेसेच परंतु आखीव रेखीव बांधलेले असून सुंदर असा घाट तिथे तयार केलेला आहे
श्रीरामांनी स्थापन केलेले इंद्रेश्वर कुंभेश्वर जोड शिवलिंग मंदिर
जोड शिवलिंग
मंदिरा भोवतालचा छोटासा बगीचा आणि छोटेखानी घाट

मंदिरातील अन्य देवता
पौराणिक पिपलेश्वर महादेव मंदिर
 पिप्पलेश्वर महादेव
 शनीकुंड लम्हेटा घट
मध्ये लागणारे आश्रम .
जाबाली ऋषी यांची तपोभूमी .यावरूनच या शहराला जबलपूर नाव पडले आहे .
 . त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो .मध्ये एक शनि कुंड आहे त्याचे देखील दर्शन घेतले . हळूहळू नर्मदा मैया एकदम शांत होत गेली . इतकी शांत झाली की जणू काही प्रश्न पडावा की ही वाहते आहे की स्थिरावली आहे ! परंतु फार थोड्या जणांना माहिती होते की ही घनघोर वादळापूर्वीची शांतता आहे ! इथून लवकरच नर्मदा मैया अतिशय वेगाने खोल अशा दरीमध्ये झेप घेणार होती ! हा संपूर्ण प्रदेश जंगलाचा आहे . वाटेमध्ये मला कोल्हे वगैरे दिसले . मी काठाकाठा ने चालत होतो . अचानक मला खूप मोठा गडगडाटी आवाज ऐकू येऊ लागला ! आसमंतामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग उडत आहेत असा भास झाला ! आणि त्या अद्भुत नजाऱ्याचे अखेर दर्शन घडलेच ! हाच तो जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा ! इथून पुढे संगमरवराचे पहाड चालू होतात . इथला संगमरवर अतिशय मृदू असल्यामुळे नर्मदेच्या प्रवाहाने त्याचे दोन प्रवाह मध्ये विभाजन केलेले आहे . आणि त्याला अक्षरशः करवती ने चिरावा तसा उभा चिरत खाली नेलेला आहे ! नर्मदेच्या अनेक रूपांमधील अतिशय सुंदर असे हे रूप आहे ! या भागाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये बघण्या सारखे आहे . जबलपूर शहर जवळ असल्यामुळे येथे पर्यटकांचा नेहमीच राबता असतो . इथे दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्यासाठी एक उडण खटोला म्हणजे झुलता पाळणा तयार करण्यात आलेला असून ते पर्यटकांचे खास आकर्षण आहे .
हाच तो जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा . याच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या काठावरून मी चालत आहे .
पावसाळ्यामध्ये हा दुथडी भरून वाहतो
इथे पर्यटक समोरच्या म्हणजे उत्तर तटावर  . दक्षिण तटावर फारसे कोणी दिसत नाही .
धुवाधार धबधब्यानंतर नर्मदेचे दोन धारांमध्ये विभाजन होते . पुढे पुढे या दरीची खोली वाढत जाते . इथला जलप्रवाह अतिशय भयावह आहे .
हा धबधबा सुरू होण्याच्या अगदी ५० फूट अलीकडे काठावरती दोन माणसे स्नान करत आहेत असे मला दिसले . मी तिथे जाईपर्यंत ते बाहेर आले . हे स्थानिक मच्छीमार होते . मी देखील तिथे स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली . परंतु दोघांनी मला तिथे स्नान न करण्याचा सल्ला दिला . परंतु ते दृश्य इतके अद्भुत होते ! इथूनच नर्मदा खाली खोल दरीत झेपावत होती आणि त्याच्या अगदी जवळ हे दोघे स्नान करत होते ! तिथे उभे राहून ते दृश्य फार अद्भुत दिसत होते ! नर्मदेचा गतिमान प्रवाह बघता बघता अदृश्य होत होता आणि मोठा पांढरा मेघ आकाशामध्ये उठत होता ! त्या दोघांनी मला एका अटीवर पाण्यात उतरण्याची परवानगी दिली . ते म्हणाले बाबाजी तुम्ही एक इंच सुद्धा पुढे जाणार नाही असे वचन देत असाल तर एक जागा तुम्हाला दाखवतो . आणि त्यांनी दगडांमधील एक फट मला दाखवली जिथे पाण्याचा प्रवाह उलटा फिरत असल्यामुळे उभे राहायला जागा तयार झाली होती . तिथे गळ्या एवढ्या पाण्यामध्ये मी उभा राहिलो . हृदयाचा थरकाप उडवणारे एकंदरीत दृश्य दिसत होते ! मी गंमत म्हणून वेगाने वाहणाऱ्या प्रवाहामध्ये हात घालायचा प्रयत्न केला . परंतु केवळ माझे बोट त्या प्रवाहामध्ये शिरताच संपूर्ण हातच अति वेगाने खेचला गेला ! तो मी चटकन बाहेर काढला नसता तर कदाचित संपूर्ण शरीर आत मध्ये ओढले गेले असते ! मग मात्र मला त्यांनी एक इंच देखील पुढे जाणार नाही असे का वदवून घेतले ते लक्षात आले . ते दोघे कुठे गेले लक्षात आले नाही . परंतु त्यांना तिथे स्नान करताना मी पाहिले नसते तर माझी तिथे उभे राहण्याची हिंमत देखील झाली नसती हे मी १००% खात्रीने सांगतो !
मी स्नान केले ती जागा लाल बाणाने दाखवली आहे .कृपया कोणीही इथे स्नान करण्याचे जीवघेणे दुःसाहस करू नये अशी विनम्र विनंती आहे .
मी तिथून ताबडतोब बाहेर आलो आणि अंग पुसून तिथेच दगडावर बसून पूजन करून घेतले ! ही जागा फारच भयानक परंतु तितकीच अद्भुतरम्य होती ! जोवर मागून पाण्याचा मोठा प्रवाह येत नाही तोपर्यंत मी सुरक्षित होतो ! परंतु असा एखादा प्रवाह आलाच तर मला कोणीही वाचवू शकले नसते इतक्या भयानक जागी मी बसलो होतो . परंतु अशाच काही प्रसंगामुळे आद्य शंकराचार्य नर्मदेला भीतीहारी वर्मदे का म्हणतात ते लक्षात येते ! तिचे कितीही भयानक रूप असू दे . तुम्हाला भीतीच वाटत नाही ! समर्थ रामदास स्वामी म्हणतात , " व्याघ्रसिंह भयानक ।पाहून भयचकीत लोक । परंतु तयांची पिली निशंक । तयांपुढे खेळती ॥ " तसे काहीसे आपले नर्मदेच्या बाबतीत होऊन जाते ! ती आपली आईच असल्यामुळे तिच्या कुठल्याही रूपाची भीती वाटतच नाही ! समोर आसमंत व्यापून टाकणारा तुषारांचा मेघ सुखद गारवा निर्माण करत होता ! हे दृश्य हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कायमचे कैद करून ठेवलेले आहे ! इथून थोडेसे पुढे आलो आणि मग एक सिमेंटचे बांधकाम लागले . खडकांमधील कठीण मार्ग सोडून एका लोखंडी पाईप वरून उडी मारून वरती चढलो . इथे चणे फुटाणे विकणारा एक मुलगा उभा होता . मी ज्या मार्गाने आलो तिथून येण्याचा मार्गच नाही . त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता ! त्याने तिथे उभे करून माझे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढले . नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने ते पाठवून दिले .


धुंवाधार धबधब्यापाशी प्रस्तुत लेखक . मागे दिसणारा भेडाघाट .
मुलाने काढलेली अजून काही चित्रे
मुलाने फोटो काढल्यावर तो बार मी पुन्हा ओलांडला आणि नर्मदेच्या काठाकाठाने चालू लागलो . वरील फोटो पाहिल्यावर मी कुठून चाललो तुमच्या लक्षात येईल . चालत चालत मी जवळपास निम्म्याहून अधिक खाली उतरलो . पुढे भयंकर दरी दिसू लागली . इथून पुढे जायला देखील मार्ग नव्हता आणि मागे यायला देखील खूप धोकादायक मार्ग होता . एक क्षणभर विचार आला की नर्मदेच्या गतिमान प्रवाहामध्ये उडी मारून द्यावी आणि पोहत पुढे जावे ! तसेही इथे बंदर कुदनी नावाची एक जागा आहे जिथून मुले पाण्यामध्ये उड्या मारतात . परंतु परिक्रमेमध्ये हे सर्व करण्यास मज्जाव असल्यामुळे निराश होऊन पुन्हा मागे फिरलो .आणि काठानेच चालू लागलो .
इथे वृंदावन गोपाला नावाचे एक अठरा एकरामध्ये पसरलेले रिसॉर्ट आहे . त्याची हद्द कधी सुरू झाली आणि त्या हॉटेलमध्ये मी कधी शिरलो माझे मलाच कळले नाही . मला अचानक कुंपण ओलांडून आत येताना पाहून मालक चक्रावला . त्याने मला सांगितले की आज पर्यंत या मार्गाने कोणीही गेलेले त्याने पाहिलेले नाही . याचाच साधा अर्थ असा होता की आजपर्यंत कोणालाही न झालेले नर्मदा मातेचे दर्शन मला तिथे झाले ! त्याने सन्मानपूर्वक रिसॉर्ट मध्ये नेऊन मला उत्तम पैकी चहा पाजला . खूप दिवसांनी कमी गोड आणि अतिशय दर्जेदार चहा प्यायला मिळाला ! नाहीतर शक्यतो खेड्यामध्ये चहा फार गोड करण्याची पद्धत भारतात सर्वत्र आढळते . उडन खटोला हॉटेलच्या शेजारूनच जात होता ते बघायला फार मजा येत होती . मी जेव्हा मालकाला सांगितले की हा उडन खटोला जिथे संपतो त्या भागावरून मी आलो तेव्हा त्याला डोक्याला हातच मारला ! कारण ती जागा खरोखर खूप भयानक आहे . आता इथून पुढे जाण्यासाठी डांबरी मार्ग होता परंतु मी डांबरी मार्गाने जाण्यास स्पष्ट नकार दिला . मालकाने मला बोलावले नसते तर मी काठाकाठाने पुढे गेलो असतो याची त्याला जाणीव करून दिली आणि त्याला देखील काय वाटले कोणास ठाऊक ! त्यांनी मला हॉटेलचे मागचे दार उघडून दिले .सोबत एक माणूस पाठविला आणि पुढचा मार्ग किनाऱ्याने कसा आहे ते दाखवून देण्यास त्या स्थानिक माणसाला सांगितले . इथून पुढे काठाने भयानक जंगल माजलेला मार्ग होता . मार्ग नव्हताच मुळी . अतिशय उंच सखल संगमरवरी डोंगर . त्यावर माजलेली झाडी . आणि उजवीकडे चुकून जरी तोल गेला तर १०० ते ३०० फूट खोल दरी ! इथे नर्मदेहर असा पुकारा केल्यावर समोरून प्रतिध्वनी यायचा ! त्याचा पुरेपूर आनंद घेत मी पुढे निघालो ! या मार्गाने आजवर कोणीही गेलेले नाही .कारण मध्ये संपूर्ण रिसॉर्ट असल्यामुळे ते तुम्हाला पुढे जाऊच देत नाहीत !त्यामुळे जाताना मला कुठेही पायवाट मिळाली नाही .तर हातातील काठीने वाटेतील झाडे तोडत रस्ता तयार करत मी पुढे निघालो . मार्ग अत्यंत कंटकाकीर्ण होता . परंतु अतिशय सुंदर असे नर्मदेचे दर्शन सतत होत असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देखील जात नव्हते ! मध्ये एक पंचमुखी हनुमान मंदिर लागले . त्या मंदिरात मध्ये देखील मागच्या भिंतीवरून उडी मारून आत गेलो . आत बसलेला साधू बावचळला . आता तो मला काहीतरी बोलणार हे लक्षात आल्यामुळे पटकन दर्शन घेऊन मी पुन्हा भिंतीवरून उडी मारून मागचा मार्ग पकडला . साधारण शंभर फूट खोल असलेली दरी हळूहळू तीनशे फुटापर्यंत गेली . वाटेमध्ये काही खाजगी प्रॉपर्टी होत्या व त्याची कुंपणे थोडासा त्रास देत होती . परंतु तिथे चरायला येणाऱ्या गुरांची कृपा अशी की त्यांच्यामुळे छोट्या छोट्या पायवाटा तयार झाल्या होत्या . त्यांचा अवलंब करत वरून चालत राहिलो . हा आतापर्यंतच्या परिक्रमेला अत्यंत अविस्मरणीय असा टप्पा होता . नर्मदा मातेचे इतके विहंगम आणि सुंदर दर्शन फार क्वचित ठिकाणी होते ! तिच्या पाण्याचा तो निळा शार रंग ! पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकांच्या मध्ये अतिशय उठून दिसतो . एखाद्या सुंदर सावळ्या केरळी स्त्रीने पांढरी शुभ्र पट्टसाडी नेसावी असे ते दृश्य आहे .  या भागामध्ये पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की तुम्हाला बऱ्याच खोलीपर्यंत संगमरवरी खडक दिसत राहतो . परंतु तितकेच खोल देखील असल्यामुळे कुठेही तुम्हाला तळ दिसत नाही . या संपूर्ण भागामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे . इथे पर्यटकांना नावे मधून देखील फिरविले जाते . हा संपूर्ण टापू निर्मनुष्य आहे . आणि एका निश्चित बंधनामध्ये नर्मदा नदी वाहत असल्यामुळे तिला प्रचंड गती आहे . याच भागामध्ये एक अद्भुत दृश्य बघायला मिळाले . बरेचदा अनेक साधू असा दावा करतात की त्यांनी नर्मदेमध्ये दूध धारा पाहिली . मला देखील एक क्षणभर दुधाची धारा दिसू लागली आणि डोळ्यावर विश्वासच बसेना ! नंतर माझ्या लक्षात आले की आजूबाजूच्या चुनखडकांमधून वाहताना नर्मदेमध्ये त्या रसायनांच्या योगाने पांढरा फेस तयार होतो . आणि गतिमान प्रवाहामुळे तो मधोमध गोळा होतो आणि वाहू लागतो . दुरून आणि विशेषतः वरून पाहताना हा प्रवाह दुधाचा आहे असा भास कोणालाही होतो . हीच ती दूध धारा . पुढे अशी दूध जरा नर्मदेमध्ये अजून काही ठिकाणी दिसली . परंतु भेडाघाट मध्ये नर्मदेचे पाणी अतिशय शुद्ध असल्यामुळे इथली धारा खरोखरच दुधासारखी स्वच्छ होती . या भागातील नर्मदेची काही रुपे आपल्या दर्शनाकरिता खाली देत आहे . मध्ये असून एक सुंदर 'व्ह्यू पॉईंट ' सरकारने निर्माण केलेला आहे . तिथून देखील नर्मदेचे अतिशय सुंदर विहंगम दृश्य दिसते . ( विहग म्हणजे पक्षी . विहंगम दृश्य म्हणजे शुद्ध मराठी मध्ये बर्ड्स आय व्ह्यू !) इथे काही पर्यटकांनी माझे फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .
 एका पर्यटकाने काढलेला प्रस्तुत लेखकाचा फोटो . 
मागे दिसणारे भेडाघाटचे अद्भुत सौंदर्य . इथे जी झाडी मी दाखवतो आहे तिथून मी चालत आलो .उजव्या बाजूने नर्मदा येते
 डाव्या बाजूला नर्मदा वाहते . संगमरवरी पहाडाचा शुद्ध पांढरा रंग उठून दिसतो . समोर प्रस्तुत लेखक .
भेडाघाटचे पांढरेशुभ्र पहाड , खाली वाहणारी हिरवीगार नर्मदा माई आणि त्याचे दर्शन घेणारा प्रस्तुत लेखक .
धुवाधार धबधबा .पलीकडे पर्यटकांची गर्दी
धुवाधार धबधबा इथे तयार होणारा धुवा अर्थात धुके
भेडाघाटचे सुंदर दर्शन घडविणारा उडन खटोला अर्थात उडता पाळणा
सायंकाळी होणारे धुवाधारचे विहंगम दर्शन
भेडाघाटचे अभेद्य संगमरवरी पहाड आणि त्यांना चिरत जाणारी नर्मदा
बंदर कुदनी : इथून मुले नर्मदेमध्ये उड्या मारून पैसे कमवतात
भेडाघाट मध्ये मैया कधी काळात वाहते तर कधी अशी शांत वाहते .वरून नर्मदा जल शांत दिसले तरी त्याला प्रचंड वेग असतो .खोली अधिक असल्यामुळे पाणी शांत जाणवते इतकेच .
भेडाघाटचे अजून एक रूप . पाण्याची कमी अधिक होणारी पातळी दगडांवर दिसते .
हे पहाड कुणीतरी जाणीवपूर्वक फोडून नर्मदेला मार्ग करून दिला आहे असे वाटावयास वाव आहे , इतके हे मार्ग आखीव रेखीव आहेत
इथल्या संगमरवरांमध्ये देखील बरेच प्रकार आढळतात .

चित्रपटातील गाण्यांच्या चित्रीकरणासाठी याहून सुंदर ठिकाण कोणते मिळणार ? अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या भागात झालेले आहे . अशोका , मोहनजोदडो ,जिस देश मे गंगा बहती है ,बॉबी ते अगदी काल-परवा आलेला डंकी चित्रपट यातील काही महत्त्वाचे चित्रीकरण या भागात झालेले आहे .
२०१३ मध्ये आलेल्या महाभारत मालिकेतील सुरुवातीची काही दृश्ये इथेच चित्रीत झाली होती .
डंकी चित्रपटातील दृश्य
मोहनजोदडो चित्रपटातील एक दृश्य
अशोका चित्रपटातील एक दृश्य .
असो .चित्रपट हा काही माझा प्रांत नाही .परंतु ओघाने विषय निघाला म्हणून जाणकारां करिता माहिती देऊन ठेवली असे .
काठाने असलेले जंगल पहा .त्यातून चालण्याची पायवाट निघते . परंतु वयस्कर परिक्रमावासीना डांबरी रस्त्याने चालण्याचा सल्ला स्वानुभवाधारे प्रस्तुत लेखक देत आहेत .

इथले पाणी इतके स्वच्छ आहे की बुडलेले पहाड देखील दिसतात .
पहाडांचे विविध आकार आणि प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात .
पहाडा मध्ये काही ठिकाणी गुफा निर्माण झालेल्या असून इथे नक्की कधी काळी कोणी साधना केलेली असणार हे लक्षात येते . तसेच इकडून नर्मदा जलाला स्पर्श करता येईल इतके खाली उतरण्यास काही ठिकाणी जागा आहे . तिथे आवर्जून उतरून पाण्याच्या गतीचा अनुभव घ्यावा ! 

जंगलातून चालताना झाडीतून नर्मदा अशी दर्शन देत राहते . पुढे असलेले कठीण मार्ग तिच्या या रूपाकडे पाहताच सोपे वाटू लागतात !
एकाच वळणाची विविध वेळी दिसणारी विविध रूपे
मध्ये काही ठिकाणी अशी शांत सरोवरे देखील आहेत . शिवाय केवळ महापुरामध्ये वाहणाऱ्या काही शाखा देखील आहेत ज्या एरवी कोरड्या असतात परंतु महापुरामध्ये दुथडी भरून वाहातात .
पर्यटकांसाठी अशा नावा येथे मिळतात . नावेच्या आकारावरून पात्राच्या खोलीचा अंदाज घ्यावा !
एका फ्रेम मध्ये नर्मदेचे हे सुंदर रूपडे पकडता येणे केवळ अशक्यच आहे .
अशी ही सुंदर नर्मदा माता जंगलाच्या वाटेने चालता चालता कधी आपल्याला ग्वारी गावामध्ये आणून सोडते हे आपल्याला कळत देखील नाही ! उत्तर तटावरील ग्वारी घाट संपल्यावर दोनच दिवसांमध्ये ग्वारी नावाचे हे गाव दक्षिण तटावर लागते .
ग्वारी गावामध्ये नर्मदेच्या काठी एक सुंदर घाट लागला . या घाटावर एक हनुमान जी चे मंदिर होते आणि एक आश्रम होता . 
भेडाघाट संपल्यावर लागणारा नर्मदे काठचा सुंदर घाट . लाल रंगांमध्ये दाखविलेला सिद्धनबाई अथवा शामाबाई यांचा आश्रम आहे .
आश्रमासमोरील छोटे खानी हनुमान मंदिर .

या आश्रमामध्ये भागवत कथा सुरू होती . त्यामुळे मी आश्रमामध्ये गेलो आणि भागवत कथा श्रवण करीत बसलो . हा आश्रम सिद्धन बाई नावाच्या एका महिला संताचा होता . सिद्धन बाई एका खाटेवर आसन लावून बसल्या होत्या आणि अडकित्त्याने सुपारी कातरत बसल्या होत्या . यांचा हेअर कट पुरुषांसारखा होता . शरीरष्टी दणकट , अगदी एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखी होती . आणि कमरेला त्यांनी पैलवानासारखी लुंगी गुंडाळली होती . वरती देखील त्यांनी पुरुषी कोपरी / बंडी घातली होती . पांढरेशुभ्र केस , रापलेला चेहरा , यांचा एकंदरीत सर्व अवतार एखाद्या पुरुषासारखा होता . वय ७० - ७५ दरम्यान असावे . केवळ त्या बोलायला लागल्या की स्त्री आहे एवढे कळायचे . परंतु बोलताना देखील , मै करता हु । मै जाता हू । मै खाता हु ।अशा पुरुष वाचक वाक्यरचना करायच्या ! देवाची लीला अगम्य आहे हेच खरे ! यांच्या आश्रमामध्ये काही तरुण युवती ,साधिका , सेवेकरी होत्या . आत मध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला गोशाळा होती ज्याच्यामध्ये पंधरा-वीस उत्तम उत्तम गाई होत्या . गेल्या गेल्या बाईंना नमस्कार करून मी संपूर्ण भागवत कथा श्रवण केली .हे बाईंनी पाहिले होते . श्रवणाला आश्रमातील युवती आणि मी इतकेच लोक होतो . दुपारी चारच्या सुमाराला बाईंनी मला भोजन प्रसाद घेणार का असे विचारले . मी होकार दिल्यावर मला भोजन देण्यात आले . त्यानंतर बाईंनी मला कोपऱ्यातील एका खोलीकडे हात करून तिथे आसन लावायची सूचना केली . भागवत कथा करणारा मनुष्य तरुण होता . त्याने भागवत कथा झाल्यावर माझ्या खोलीमध्ये येऊन खूप वेळ गप्पा मारल्या . त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे . कारण शक्यतो सिद्धन बाई कुठल्याही परिक्रमा वासीला आश्रमामध्ये येऊ देत नाहीत ! आणि मुक्काम भोजन प्रसाद वगैरे तर फारच लांबच्या गोष्टी आहेत ! त्या स्वभावाने खूप कडक होत्या आणि काही चुकले तर तोंडावर अपमान करायच्या . हे सर्व मला भागवत काराने सांगितले खरे परंतु मला मात्र तसा काही अनुभव आला नाही . बाईंनी मला खूपच प्रेम दिले . मुळात ती स्त्री आहे असे मला वाटतच नव्हते . एखादा वस्ताद पहिलवान बसला आहे असे डोक्यात ठेवून मी तिच्याशी वागत होतो .बोलत होतो . तिला बहुतेक ते आवडले असावे . आश्रमामध्ये तरुण महिला साधिका असल्यामुळे बाई इथे सडाफटिंग परिक्रमा वासींना राहू देत नसाव्यात असा अंदाज मी बांधला . मी बाईंच्या चरणाशी बसलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या . मी काठाकाठाने आलो आहे हे कळल्यावर त्यांना खूप कौतुक वाटले . रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो ! रात्री बाईंचा एक चुणचुणीत ,हुशार डॉक्टर / वैद्य शिष्य तिथे आला . त्याचे नाव रेवाप्रसाद सेन असे होते .याला झाडपाल्याचे खूपच चांगले ज्ञान होते . आम्ही तिघे आणि आश्रमातील काही साधिका असे शेकोटी करून अंगणात बसलो . बाईंचा आज चांगला मूड असावा असे दिसत होते . बाईंनी १९७३ साली तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती . हिला सर्व गाव बाई म्हणत असे त्यामुळे मी देखील बाई असा उल्लेख करत आहे . प्रत्यक्षामध्ये तिच्याशी बोलताना आम्ही बाईचा भाई करून तिला भाई म्हणत होतो ! ती खरोखरच एखाद्या गँगस्टर सारखी हिम्मतवान , कर्तृत्ववान आणि तुफान स्त्री होती . तिच्यापुढे बोलताना दहा वेळा विचार करून बोलावे लागे . इतकी तिची दहशत होती . आश्रमामध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणी तर सतत तिच्यापुढे डोक्यावर पदर घेऊन वावरायच्या ! तिच्या परिक्रमेमधील आठवणी ती सांगत राहिली . तीन वर्षाच्या अशा तीन परिक्रमा तिने आयुष्यामध्ये केल्या होत्या ! तो काळ असा होता जेव्हा परिक्रमावासींची सेवा फारशी कुठे होत नसे . आणि एखादी महिला परिक्रमा करते आहे अशी उदाहरणे तर फारच दुर्मिळ असायची . मला अनुभव सांगताना सिद्धनबाई अथवा श्यामाबाई अक्षरशः तिथे पोहोचली होती ! तिची भाषा ,प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी आणि एकंदर अविर्भाव हे सर्वच मला खूप भावले . आता हिचे वय सत्तरीच्या पुढे होते परंतु अजूनही अंगात भरपूर ताकद होती हे दिसत होते . एका परिक्रमेमध्ये भिल्लांनी तिला कसे लुटले याचा किस्सा तिने सांगितला . यांची मजेदार भाषा बाई कशी शिकली हे देखील तिने सांगितले . नर्मदा मैयाने तिला कधी कधी कुठे कुठे आणि कसे दर्शन दिले हे सांगताना मात्र तिच्यातली हळवी स्त्री जागी व्हायची आणि डोळ्यातून अश्रू धारा झरायच्या ! शूलपाणीच्या झाडीमध्ये भिल्लांनी जेव्हा तिला लुटले तेव्हा तिने एक गंमत केली होती . त्याकाळी भिल्ल पुरुष , स्त्रिया सर्व सदासर्वकाळ विवस्त्रच असायचे . आजही बऱ्यापैकी विवस्त्र अवस्थेतच भिल्ल लोक असतात . त्यामुळे हिला देखील त्यांनी परिक्रमेमध्ये संपूर्ण विवस्र केले . जवळचे सर्व सामान ,वस्त्रे सर्व लुटून घेतले . बाईने हुशारी करून डोक्याला एक रुमाल बांधला होता . आणि त्याच्यामध्ये दहा रुपयाची एक नोट खोचून ठेवली होती . ती म्हणाली उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून एवढा रुमाल तरी माझ्या डोक्यावर राहू दे . आणि झाडाची पाने कमरेला आणि छातीला गुंडाळून बाई चालायला लागली . इतक्यात एक मामा म्हणजे भिल्ल पळत आला आणि तिला म्हणाला थांब ! जागेवर उभी रहा ! हातात विषारी बाण ताणलेला धनुष्य असल्यामुळे जागेवर उभे राहावेच लागते . मामा तिला म्हणाला की तुझ्याकडे दहा रुपये आहे ते मला का नाही सांगितले ? आता मात्र बाईची बोबडी वळली ! तिने गप गुमान दहा रुपये काढून त्याच्या पुढे टाकले .आणि विचारले की तुला कसे काय कळले ,माझ्याकडे दहा रुपये आहेत ते ? कारण तुम्ही सर्व लुटले तर पुढे थोडेफार पैसे गाठीला असावेत म्हणून मीच युक्ती करून पैसे जटे मध्ये खोचून टाकले होते . ते फक्त मलाच माहिती होते . मामा म्हणाला तुला आणि माझ्या बहिणीला म्हणजे नर्मदेला ,दोघींना माहिती होते . आणि तू मला सांगितले नाहीस तरी मैय्या मला सर्व सांगत असते . तेव्हा बाईची खात्री पटली की या मामा लोकांना खरोखर नर्मदा बहीण म्हणून मदत करत असते . हे आदिवासी नर्मदेला आपली बहिण मानतात त्यामुळे परिक्रमावासी त्यांना मामा असे म्हणतात . नर्मदा माता त्यांना सर्व गोष्टी सांगत असते याचा अनुभव अनेक परिक्रमावस्यांनी घेतलेला आहे . मुळात नर्मदा मातेचा आधार वाटण्याऐवजी शामा बाईला त्या दहा रुपयांच्या नोटेचा आधार वाटत होता . तुमची ही आलंबना किंवा तुमचे हे परावलंबित्व संपविण्यासाठी नर्मदा मातेने मामा लोकांची नियुक्ती केलेली आहे . ते स्वतः निस्पृह असल्यामुळे त्यांना नर्मदा सर्वकाही कानात येऊन सांगते आणि मग तितकेच ते लुटतात .बरोबर तुमच्या आवडीचा पदार्थ ते मागून घेतात . असे एकापेक्षा एक खुमासदार किस्से बाई रात्री बारा वाजेपर्यंत सांगत राहिली ! ही बाई इतरांशी इतकी फटकून वागत असेल यावर माझा सांगूनही विश्वास बसू शकणार नाही इतके तिचे वागणे सुरेख होते . या सर्वांचे श्रेय मी मोहन साधूला देतो . त्याने मला आश्रमामध्ये गेल्यावर कसे वागावे , कसे बोलावे ,याचे जे प्रशिक्षण दिले होते त्याचीच ही फळे असावीत ! रात्री झोपायला जाताना रेवाप्रसाद सेन आवर्जून मला भेटायला आला . आणि पहाटे लवकर तुम्हाला भेटायला येतो असे सांगून निघून गेला . भल्या पहाटे उठून मी नर्मदा स्नान करून आलो . समोर प्रसिद्ध असा सरस्वती घाट आहे . आता निघायची तयारी करत होतो इतक्यात खरोखरच डॉ. सेन आला . त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे ! कारण बाई काल स्वतःविषयी जितके बोलल्या तितके त्या कधीच बोलत नाहीत ! स्वतःबद्दल ब्र देखील त्या काढत नाहीत . अगदी फोटो सुद्धा कोणाला घेऊ देत नाहीत . काल मी अगदी निरागसपणे आणि मनापासून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता देता त्यांनी त्यांच्या तीनही परिक्रमांचा पट अलगदपणे उलगडून सर्वांच्या समोर ठेवला . रेवा प्रसाद म्हणतो आहे त्यात तथ्य आहे हे मला आत्ता जाणवते आहे . कारण या लेखामध्ये टाकण्याकरता मी बाईंचा फोटो शोधतो आहे .तर त्यांच्याविषयी एक अवाक्षर देखील आंतरजालावर उपलब्ध नाही !फोटो तर फार लांबची गोष्ट ! तीन-तीन परिक्रमा करून स्वतः विषयी एक शब्द देखील माहिती कुठे मिळू नये याची काळजी घेणाऱ्या आणि तसे आयुष्य प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी निस्पृहता असणाऱ्या सिद्धन  बाईंसारख्या सिद्ध साध्वी कुठे आणि एकच परिक्रमा पूर्ण झाल्यावर (लोकाग्रहास्तव म्हणून तरी का होईना ) लागलीच ब्लॉग लिहायला घेणारा माझ्यासारखा नतद्रष्ट ,महामूर्ख कुठे ! नर्मदे काठी सारेच अगम्य आहे ! नर्मदे हर !



लेखांक चव्वेचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक



टिप्पण्या

  1. लेखक म्हणून आपले शब्दांकन संयमित, सुंदर व नेमके असे आहे. ओघवते व उत्कंठा वाढवित पुढे पुढे जाताना वाचकांना ही सश्रद्ध बनवून परिक्रमेचा लाभ होतो असे मला निश्चित जाणवते. सोपी सुटसूटीत वाक्ये, योग्यठिकाणी नेमके फोटो व तंत्रज्ञानाचा वापर यांचा वापर करीत, मांडलेल्या निरिक्षणांसह थोडक्यात केलेले अनुभव कथन, मुळीच कंटाळवाणे न होता वाचकाला खिळवूनच ठेवते. त्यातून एक जिप्सी भटक्या कलंदर पण जपलेला तसेच धाडसी आणि श्रद्धावान विविधांगी वाचन तसेच अनुभवी असा परिक्रमावासी बाबाजी भेटत राहतो. नर्मदा मैय्याच्या कृपापात्री अशा आपल्या भाग्याचा हेवा वाटतो हे मात्र खरे. जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर।।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर