लेखांक ३८ : गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर

गेल्या ४८ तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो . आपल्या माहिती करता मी पार केलेल्या गावांची नावे देत आहे . डिंडोरी ,सुबखर रैयत , धूरी रयत , गांगपुर माल , औराई माल ,रायपुरा माल , इमली माळ , इमली रयत , छपरी रयत , सलैया रयत ,किसलपुरी माळ , केवलारी रयत , भैंसवाही रयत , सक्का माळ , सक्का रयत , कचनारी रयत , राई रयत , हर्रा टोला , धानगांव , खम्हरिया , आण्डिया माळ , चाबी , खैरी माळ , खैरी रयत , तेडिया नाला , खाल्हे गिठौरी , मोहगांव , अण्डियादार जर , उमरदी , मोहगाव , बिन्झी , इंद्र माळ , बनियातारा , सुडगाव , डोंगरगाव , देवगांव संगम !
भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण दोन किलोमीटर वर गाव बदलते . वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते . छोटी शहरे साधारण तीन चार किलोमीटर व्यासाची असतात . मध्यम शहरे पाच ते सहा किलोमीटर व्यासाची असतात . महानगरे दहा ते बारा किलोमीटर आकाराची असतात . अर्थात ही ढोबळ रचना मी सांगतो आहे . देश काल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो . वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमातींची वस्ती अधिक होती . यातील आंडिया आणि चाबी या गावांमध्ये मात्र प्रचंड यावनी वस्ती असल्याचे मला आढळून आले . मोठमोठी प्रार्थना स्थळे त्यावर वाजणारे कर्णे आणि गावभर त्या लोकांचा ठळक वावर हे पहिल्यांदाच पाहिले . चाबी गावामध्ये रस्त्याच्या कडेलाच उजव्या हाताला एक दुर्गा मंदिर लागले . 
चाबी गावचे श्री दुर्गा मंदिर
इथे दर्शनासाठी मी थांबलो असताना मोठ्या आवाजात अजान सुरू होती .मंदिरामध्ये एक मोठा शंख आणि साऊंड सिस्टिम देखील होती . मी पुजाऱ्याला शंख मागितला . आधी त्याने शंख देण्यास नकार दिला . नंतर मी काही प्रबोधनपर बोलल्यावर प्रेरित होऊन त्याने शंख मला दिला . मला माइक आणि साऊंड सिस्टिम वर शंख कसा ऐकू येतो ते पाहायचे होते . मी खणखणीत आवाजात शंखनाद करता क्षणीच संपूर्ण चाबी गावांमध्ये त्याचा आवाज घुमू लागला . मंदिरावर लावलेले कर्णे पुरेसे मोठे होते . इथून पुढे अशा पद्धतीने माईकचा वापर करून शंखनाद करण्याची सूचना मी त्याला केली आणि पुढे निघून गेलो . सर्वांना आपल्या प्रार्थनेचा मोठ्या आवाजात गजर करण्याचा समान अधिकार आहे ! कारण सर्वच - - - समान आहेत ! या एक दोन गावांच्या परिसरामध्ये कोणीही तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाही किंवा चहापाणी विचारत नाही . भारताचे अध्यात्मिक जीवन खरे तर फार समजूतदार पद्धतीने या सर्व गोष्टींकडे पाहते . परंतु मला इतकेच सांगावेसे वाटते की पूर्वी सिंधू नदीच्या काठावर पूजा पाठ करणारे श्रद्धाळू हिंदू देखील असेच उदारमतवादी होते . आज सिंधू नदीच्या काठावरील विविध मंदिरे आणि पवित्र घाट तर सोडूनच द्या परंतु सिंधू नदीचा स देखील भारतीय लोकांना बघायला मिळत नाही हे दुर्दैवी आहे , परंतु सत्य आहे . हीच वेळ नर्मदा ,गोदावरी ,कृष्णा , कावेरी ,गंगा ,यमुना या नद्यांवर येऊ नये असे वाटत असेल तर सध्या तिथे राहणाऱ्या भोळ्या भाविक भक्तांनी आपला अभ्यास वाढविण्याची गरज आहे . कराची शहरांमध्ये सर्वात जास्त मराठी लोक पूर्वी राहायचे आणि तिथे मराठी शाळा होत्या . आज कराची मध्ये एकही मराठी माणूस नाही . केवळ धर्म बदलत नाही भाषा ,संस्कृती , पेहराव , आवडीनिवडी , प्राधान्य सर्वच बदलते .सिंधू नदीचा उगम आम्ही गमावला आणि सागर संगम देखील गमावला . आम्हाला पवित्र असलेल्या गंगेचा सागर संगम देखील आज आमच्या देशात नाही याच्यापेक्षा आमच्या श्रद्धास्थानांची दुरावस्था काय असू शकते ? ज्या महादेवाची कन्या आम्ही नर्मदेला मानतो त्या महादेवांचे निवासस्थान अर्थात श्रीक्षेत्र कैलास पर्वत आम्ही गमावून बसलेलो आहोत आणि तरी देखील वृथा वल्गना करीत आहोत की आम्हाला सर्व टिंब टिंब समान आहेत यापेक्षा मोठा हास्यास्पद दैवदुर्विलास असू शकत नाही .आमच्या गावात असे काही होत नाही असा भोळा युक्तिवाद तुम्हाला तारणारा नाही . तर व्यापक राष्ट्रहिताला मारणारा आहे . असो . तूर्तास या गावात परिक्रमावासींची अजिबात सेवा केली जात नाही इतकी नोंद कागदोपत्री पुरेशी ठरावी . किसलपुरी या गावांमध्ये बळीराम जाधव याने माझ्या मागे लागून मला दोन लिटरचा एक कमंडलू विकत घ्यायला लावला . विकत घेणे म्हणजे बाजार दराने वस्तू मिळत नाही तर ज्या दराने दुकानदार खरेदी करतो त्याच दराने परिक्रमावसीला वस्तू दिली जाते .सुमारे अडीचशे रुपये विक्री मूल्य असलेला हा कमंडलू होता . दुकानदाराने माझ्याकडून केवळ शंभर रुपये घेतले .
किसलपुरी गावात घेतलेला २ लिटरचा कमंडलू
 कमंडलू म्हणजे आपण घरी गोडं तेल ठेवण्यासाठी जो कडीचा डबा वापरतो तोच होय . भांड्यावर नावे टाकण्याचे यंत्राने मी त्या कमंडलू वर नर्मदे हर वगैरे लिहिले . याच्यामध्ये ठेवलेले पाणी बर्फासारखे गार व्हायचे . मला हातामध्ये कमंडलू घेऊन चालण्याची अजून सवय नव्हती त्यामुळे तो हाताला काचत असे . तो बाळगण्याची सवय नसल्यामुळे एक दोन ठिकाणी तो मागे देखील राहिला व पुन्हा मला कमंडलू घेण्यासाठी ४ एक किमी उलटी तंगडतोड करावी लागली . त्यामुळे ४४ किलोमीटर अंतर असूनही माझे मात्र ५० किमी च्या वर चालणे झाले .याच्यामध्ये पाणी पिण्याचे सोयीचे जावे म्हणून एक पेला ठेवला होता . चालताना तो हिंदकळून आपटायचा आणि विविध प्रकारचे आवाज करायचा . हलणारे पाणी आणि हा पेला याच्या आवाजाने माझे फार काळ मनोरंजन केले . असो .
देवगाव चा संगम ओलांडल्यावर शेतातील मार्ग लागला . विविध छोट्या-मोठ्या शेतांच्या बांधावरून चालू लागलो . मध्ये एक नवरा बायको नणंद असे परिक्रमा वासी भेटले . त्या बिचाऱ्या माणसाची मला फार मजा वाटली .
मार्ग कठीण होता व मध्ये ओढे नाले चिखल खूप होता .त्यामुळे त्याने आधी बायकोला हात दिला तर बहिण नाराज व्हायची आणि बहिणीला मदत केली की बायको राग राग करायची ! तिघेही सामान भरण्याकरता निघालेले परिक्रमावासी वाटत होते त्यामुळे तिघांकडे मरणाचे सामान होते ! ह्या माणसाने कधी बायकोचे ओझे उचलले तर बहिण चिडायची आणि बहिणीची झोळी भावाने हातात घेतली की बायकोला वाईट वाटायचे ! स्त्रियांमध्ये "क्वचित प्रसंगी "  आढळणारा आजादूजा भाव अथवा परनारीअसहिष्णूता अशा पद्धतीने या माणसाला फारच सतावत होती ! शेवटी तो वैतागून जायचा आणि दोघींना अ पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व शिव्या घालायचा ! त्यांच्या परिक्रमेमध्ये नर्मदा मातेला कुठे स्थान असेल याची पुसटशी देखील शंका कुणाला येऊ नये याची काळजी तिघेही घेत होते ! त्यांची मजा पाहून मी हळूहळू त्या सर्वांच्या पुढे निघून गेलो . कारण पुढे एक छोटेसे जंगल पार करायचे आहे असे मला कळले होते .आणि तिथल्या शांततेमध्ये मला यांचे सुविचार ऐकायची इच्छा नव्हती . झपा झप चालून शेती पार केल्यावर एक छोटीशी टेकडी लागली जी घनदाट अरण्याने वेष्टित होती . चढ खडा होता आणि दुचाकी जाणार नाही अशा पद्धतीचे टोकदार दगड गोटे सर्वत्र पसरलेले होते . तरी देखील लोकांनी गाडी येथून नेल्याच्या खुणा दिसत होत्या . टेकडी उतरल्यावर बिलगाव अथवा निधानी नावाचे गाव लागले . एका बारीक बोळातून या गावाच्या मधोमध आलो असता तिथे एक हनुमान मंदिर होते आणि त्याच्यासमोर एक छोटेसे घर होते . या घरामध्ये परिक्रमावासींची सेवा केली जाते असे मला सांगण्यात आले . खरे तर याहून श्रीमंत घरे गावामध्ये होती परंतु हे घर ज्या तरुणाचे होते त्याने नर्मदा परिक्रमा केलेली असल्यामुळे त्याला परिक्रमे मध्ये केल्या जाणाऱ्या सेवेचे महत्व माहिती होते . त्याच्या आई-वडिलांनी देखील नर्मदा परिक्रमा केलेली होती . त्याच्या आईने गरमागरम पोहे आणि चहा आणून दिला . सोबत काही शिधा हवा आहे का हे विचारायला विसरल्या नाहीत . वजन सोबत बाळगायला नको म्हणून मी नम्रपणे नकार दिला . अशा पद्धतीने हळूहळू मी कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ निघालो होतो . या परिसरातील सर्व गावांमध्ये वाघाचा वावर नित्याचा झाला होता . ज्याप्रमाणे सध्या पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये बिबट्याचा वावर लोकांच्या परिचयाचा झाला आहे तसे या भागामध्ये पट्टेरी वाघांचे झालेले आहे . वाटेमध्ये मला एके ठिकाणी वाघाने मारून टाकलेली म्हैस दिसली . त्याला हवा तेवढा मुद्देमाल खाऊन संपवून तो निघून गेला होता . उरलेल्या म्हशीवर गावातील भटकी कुत्री ताव मारत होती . या म्हशीची शिकार वाघाने कशी केली याचे किस्से गावातील लोकांनी मला सांगितले . गुराख्या समोर त्याने कळपावर हल्ला करून या म्हशीचा फडशा पाडला . गुराखी काठी घेऊन वाघाच्या अंगावर धावल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला . परंतु रस्त्याच्या कडेला पडलेली ती म्हैस त्याने रात्री पुन्हा येऊन संपवून फस्त केली .
 (संग्रहित छायाचित्र)
 त्यानंतरच्या सकाळचे दृश्य मी पाहत होतो म्हणजे शिकार ताजी ताजी होती . तरी देखील त्या मृत देहाचा वास सर्वत्र पसरू लागला होता . म्हशीच्या फासळ्या किती मोठ्या असतात हे त्या दिवशी मला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघायला मिळाले . आणि त्या कडकडा मोडून खाणाऱ्या वाघाच्या दातात शक्ती किती असेल याची फक्त कल्पना करून पहा ! मी जात असताना म्हैस खाणारी कुत्री माझ्यावर गुरगुरू लागली . त्यामुळे मी पायांना गती देत तिथून पुढे निघून गेलो . आज अनपेक्षित पणे एका ऐतिहासिक वास्तूचे मला दर्शन घडले . रामनगर नावाच्या एका गावामध्ये मी पोहोचलो . गोंड राजा अक्कराय याची ही ऐतिहासिक राजधानी होय . आज २६ जानेवारीचा दिवस होता अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिवस . आणि त्याच दिवशी एका अत्यंत प्रजा प्रिय राजाच्या नगरीमध्ये मी प्रवेश करत होतो . हा राजा त्याची महाराणी आणि संपूर्ण राजघराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी बांधलेली विविध मंदिरे आणि बांधकामे या परिसरामध्ये आजही दाखवली जातात .या राजाचा अति भव्य प्रसाद नर्मदा किनारी आजही दिमाखात उभा आहे . मोती महल असे याचे नाव आहे .
 शेकडो वर्षे झाली तरी त्याची मूळ वास्तू अजूनही सुस्थितीमध्ये आहे हे पाहून बरे वाटले . 26 जानेवारी चा दिवस असल्यामुळे राष्ट्रीय सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या प्रासादामध्ये झालेली होती .
 बहुतांश परिक्रमावासी हा महाल न बघता पुढे निघून जातात परंतु मी इतिहासाची आवड असल्यामुळे हा संपूर्ण महाल बघितला . इथे आत जाण्यासाठी तिकीट आकारले जाते परंतु परिक्रमावासी असतील तर मात्र एकही रुपया घेतला जात नाही . त्यामुळे मी आत मध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण राजमहाल फिरून पाहिला .
 प्रत्येक भिंतीवर प्रेमी युगुलांनी आपापली नावे कोरलेली होती  तसेच आत मध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेले होते तरी देखील त्यातून त्या राजमहालाची भव्यता लपत नव्हती . जाड जूड रुंद भिंती आणि त्यावर उभा असलेला हा बहुमजली राज महाल पाहून मनात विचार आला की जेव्हा इथे स्वतः राजा राहत असेल त्यावेळी इथले राजवैभव कसे दिसत असेल ! आज त्या प्रसादाचे अक्षरशः खंडहर झालेले असून रिकामटेकडी प्रेमीयुगले बसण्याचे ते एक ठिकाण ठरलेले आहे . या प्रसादामध्ये अनेक तरुण मुले मला भेटली ज्यांनी माझे फोटो काढले . कारण त्या सर्व गर्दीमध्ये मी एकटाच वेगळा उठून दिसत होतो . त्यातील ज्यांनी काढलेले फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवले त्यातील काही चित्र सोबत जोडत आहे .
किल्ल्याचे प्रवेशद्वार
हे छायाचित्र किल्ल्यातून बाहेर पडताना रायपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने काढले . त्या नादात कमंडलू तिथेच विसरला
अजून एक तिथलेच छायाचित्र
किल्ल्याच्या आत मध्ये मधोमध एक पाण्याचे कुंड होते
किल्ल्याच्या जाडजूड भिंतींमधून वर गच्ची वरती जाण्यासाठी जागा होती . किल्ल्याचे घुमट फारच सुंदर दिसत होते . आपल्या लक्षात येईल की प्रत्येक फोटो वेगळ्या वेगळ्या कॅमेर्‍याने काढला गेलेला आहे . सर्वांपेक्षा वेगळा दिसत असल्यामुळे तिथल्या सर्व पर्यटकांचे मी एक आकर्षण बनल्यासारखे झालो होतो .

बाबाजी और एक फोटो प्लीज .खडा वाला .
सोबत आजूबाजूला फिरणारी आदिवासी मुले .या सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण विवक्षित असते .
किल्ल्याच्या मागे वाहणारी नर्मदा मैया
किल्ला आणि मागे होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन
मोती महलच्या मधोमध असलेले जलकुंड
महालाच्या बांधकामाची सध्याची अवस्था
याचे घुमट खूप सुंदर आहेत
मोती महालाच्या मागूनच नर्मदा मैया एक झोकदार वळण घेऊन वाहते आहे
इथून जवळच राजाच्या राणीने बांधलेले विष्णूचे एक पुरातन मंदिर आहे . सध्या या मंदिरामध्ये मूर्ती नसल्या तरी एकेकाळी हे मंदिर किती भव्य असेल याची कल्पना लगेच येते .
राणी सुंदरी देवी स्थापित श्री विष्णु मंदिर . याचेही कळस मोती महल सारखे आहेत .
हे एक संरक्षित स्मारक आहे
या मोतीमहलच्या बाहेर आल्यावर तिथे चणे फुटाणे विकायला बसलेल्या एका बाईने मला चणे खायला दिले . इथे रायपूर मधील एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आलेले होते . त्यांनी नर्मदा परिक्रम विषयी माझी एक छोटीशी मुलाखतच घेतली जणू . परंतु त्यांना परिक्रमे विषयी बरीच माहिती त्या अर्ध्या तासात कळाली . त्यांच्या मनातील सर्व किंतु परंतु नाहीसे झाले आणि आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा त्यांना निर्माण झाली असे त्यांनी बोलून दाखविले . त्यांनी फोटो काढताना मी कमंडलू त्या मावशी जवळ ठेवला तो परत घ्यायचा विसरून गेलो आणि पुढे चालायला लागलो . पुढे घुघरी रस्ता , रामनगर इथे एक नर्मदा मंदिर लागले जिथे मी भोजन प्रसाद घेतला . मंदिरातील महंताने वहीमध्ये शिक्का दिला . त्याचा फोटो 
नर्मदा मंदिर , घुघरी रोड , रामनगर
इथून वाघांचे परिक्षेत्र फार जवळ होते . त्यामुळे अंधार होण्याची वाट न बघता उजेडातच थांबण्याचा सल्ला मला सर्वांनी दिला . त्यामुळे मी सरळ रस्त्याचा मार्ग पकडला . इथे नर्मदे काठी चालण्यासाठी चांगला मार्ग नाही असे मला सांगण्यात आले . तसेच नर्मदा एक दोन जबरदस्त वळणे घेते जिथे संपूर्ण जंगल आहे . 
मधुपुरी घाटापूर्वी नर्मदा नदीने घेतलेले निर्मनुष्य जंगली वळण
या वनक्षेत्रातून चालण्यासाठी पायवाट देखील नाही त्यामुळे रस्त्याने चालण्या शिवाय पर्याय उरत नाही . मधुपुरी या पुढच्या गावातील आश्रमामध्ये राहण्याचे मला सुचविण्यात आले होते . संध्याकाळची वेळ असल्यामुळे जंगल मार्गातून जाणे मी टाळले . कारण म्हैस खाऊन बसलेला वाघ जवळपास असण्याची शक्यता होती . तो जंगलाकडे जाण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी नर्मदे कडे आला असणार हे खूप शक्य होते . त्याला त्याच्या अधिवासामध्ये जाऊन त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती . या जवळपास निर्मनुष्य मार्गावरील वाटचाल अतिशय सुखद होती ..



लेखांक अडतीस समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर