लेखांक १६ : प्रभूजी का भंडार

भिकमपुर या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत .हे तुलनेने छोटेसे गाव आहे .मी गावामध्ये प्रवेश करणार इतक्यात दूरवरून एका शाळेतील मास्तर मला बोलवत आहेत असे मला लक्षात आले .मी शाळेमध्ये पोहोचलो .मास्तरांनी विचारले , " नर्मदे हर महाराज ! आप कहा बिराजेंगे ? छाया मे या धूप मे ? " आपली योग्यता नसली तरी देखील इथे सर्व लोक आपल्याला महाराज , बाबाजी , स्वामीजी ,पंडित जी ,दादाजी ,अशा विविध नावांनी हाक मारतात . ऐन माध्यान्ही ची वेळ झाली होती तरी देखील थंडीमुळे ऊन बरे वाटत होते .मी उन्हातच खुर्ची लावण्याचा इशारा केला . मला हे माहिती नव्हते परंतु परिक्रमावासी परिक्रमेदरम्यान खुर्ची मध्ये सुद्धा बसत नाहीत . शक्यतो जमिनीवरच बसतात .परंतु तिथे अजून चार-पाच शिक्षक होते . त्यामुळे त्यांना संकोच वाटू नये म्हणून मी त्यांचे सोबत खुर्ची मध्ये बसलो .बसणे असा साधा शब्द न वापरता बिराजना असे जड शब्द सर्रास वापरले जातात . बसल्या बसल्या शाळेतील मुलांनी बर्फासारखे थंडगार प्यायला पाणी आणून दिले व चहा आणण्यासाठी निघून गेली . तोपर्यंत शिक्षकांशी एकंदरीत शिक्षण पद्धती विषयी चर्चा करू लागलो .लॉकडाऊन मुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची भावना होती . इतक्या दुर्गम डोंगरी भागात देखील शिक्षणाची दोन वर्षे पुरेशी वाताहात झाली होती . शिक्षक हुशार होते व त्यांनी एकंदरीत त्या भागाविषयी खूप चांगली माहिती दिली . मुलांविषयी सुद्धा भरभरून बोलले . माझ्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर त्यांनी काही चुणचुणीत अशा मैदानात खेळणाऱ्या मुलांना बोलवून घेतले आणि माझ्याशी गप्पा मारायला सांगितले . मी देखील मुलांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आणि ती का करतात हे माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला . ( प्रत्यक्षात इथल्या लोकांना काय बालकांना सुद्धा याची गरज नाही !परंतु नवीन नवीन परिक्रमावासी हे सर्व करतात तसे मी देखील केले ! ) पोटात चहा आणि बिस्कीट चा एक पुडा गेल्यामुळे जरा आधार आला होता . परंतु पुढे अजून बरेच चालावे लागणार होते ,म्हणून मी मास्तरांची रजा घेतली . शिक्षकांनी सांगितले की गावामध्येच एक दुकानदार परिक्रमा वाशींची सेवा करतो . तरी तिथेच भोजन प्रसाद घ्यावा . त्यांनी माझ्यासोबत एक विद्यार्थी पाठवून दिला . तो मला मुख्य रस्त्याने घेऊन न जाता , गावातील छोट्या छोट्या गल्लीबोळातून घेऊन गेला . त्यामुळे मला या आदिवासी लोकांचे गाव जवळून पाहायला मिळाले . या मुलाचे नाव यादव होते .व पाचवीत असला तरी अतिशय हुशार आणि चुणचुणित होता . त्याला भारतीय सेनेत भरतीची प्रेरणा दिली . त्याने नुसते मला सोडायचे काम नाही केले तर दुकानदाराला देखील दोन-चार गोष्टी माझ्याबद्दल सांगून तो निघून गेला . 
आपल्या दुकानासमोर प्रभूलाल परिक्रमावासींना कंबल ( कांबळे ) देताना
हा दुकानदार प्रभू लाल म्हणून एक ब्राह्मण मनुष्य होता आणि घरची परिस्थिती बेताचीच असली तरी आपल्या भाकरीतला अर्धा तुकडा परिक्रमावासींना आवर्जून देत असे .दुकाना शेजारीच एक मंदिर होते त्या मंदिरामध्ये त्याने मला बसविले .
    प्रभू किराणा शेजारील छोटेसे शिव मंदिर
 मंदिर अतिशय अस्वच्छ झाले होते .त्यामुळे मी तिथलाच एक झाडाच्या फांद्या तोडून बनवलेला झाडू घेऊन मंदिर स्वच्छ करू लागलो . हे पाहून प्रभू तिथे स्वतः आला आणि मला पुन्हा दुकानात घेऊन गेला .दुकान आणि घर एकाच जागेत होते . मध्ये छोटासा वरांडा होता . दुकानाच्या बाहेर त्याने छान झाडे व वेली लावल्या होत्या . त्यामुळे दुकानापुढे सावली असायची .माझे गाव पुणे आहे असे ऐकल्यावर त्याने मला आपको उदय जोशी पता है क्या असे विचारले ?उदय जोशी जो सदाशिव पेठ मे रहते है ।
प्रत्यक्षामध्ये मी उदय जोशींना ओळखत नव्हतो , परंतु उदय जोशी नावाच्या सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या एका भाजप कार्यकर्त्यांनी २०१६ मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती व जिथे जिथे ते राहिले किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या सर्वांना त्यांनी अतिशय सुंदर असे प्रशस्तीपत्र बनवून पाठविले होते . ते याने अभिमानाने आपल्या दुकानात लटकवले होते .
       उदय जोशी पुणे यांनी दिलेले प्रशस्तीपत्र

त्याच्याकडून उदय जोशी यांचा क्रमांक मी लिहून घेतला .पुढे योगायोगाने पुण्यामध्ये आल्यावर श्री गोरे नामक एका परिचितांनी मला उदय जोशी यांनी लिहिलेले नर्मदा परिक्रमेचे पुस्तक देखील वाचायला दिले .छोटेसे रंगीत पुस्तक होते .त्यांनी अतिशय वेगाने आणि शक्यतो हम रस्ते वापरून परिक्रमा केली होती असे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले . अजून तरी उदय जोशी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला नाही . 
मंदिरामध्ये परिक्रमावासींना कंबल देताना प्रभुलाल
 भुखे को भोजन प्यासे को पानी दे नरमदामाई रे !

घरी बनवलेले जेवण त्याने मला दिले .आमटी आणि दोन पोळ्या होत्या . जेवण अतिशय गरम होते .एकटा परिक्रमावासी आला तर त्यासाठी वेगळा स्वयंपाक शक्यतो कोणी करत नाही .घरातीलच थोडेसे जेवायला दिले जाते ,त्यामुळे आपण देखील मर्यादित खावे असे मला वाटते .उगाच मिळाले आहे म्हणून पोटावर बांधून जेवण्यात काही अर्थ नसतो .कारण त्यामुळे कदाचित घरातील कोणीतरी उपाशी झोपण्याची शक्यता असते . आग्रह मात्र खूप केला जातो .सुरुवातीलाच भरपूर वाढलेले असते . अन्न वाया घालवणे हा प्रकार तर संपूर्ण नर्मदा खंडामध्ये मी जवळपास नाहीच पाहिला .अन्नाचा प्रत्येक कण परब्रह्म समजून संपविला जातो . जेवण झाल्यावर मी पुन्हा एकदा दुकानाचे निरीक्षण करू लागलो .सहा फूट x आठ फूट अशा मापामध्ये जगातील प्रत्येक पदार्थ बसविला होता .दीपक किराणा स्टोअर असे त्याचे नाव होते .प्रभूलाल सद्गुरू कृपा परिक्रमा वासी सेवा असे उपक्रमाचे नाव असल्यामुळे या दुकानाला सगळे प्रभु किराना म्हणायचे .
सद्गुरु कृपा 
परिक्रमावासी सेवा 
प्रभू किराणा एवम जनरल स्टोअर्स
भीकमपूर तह. निवास जिला मण्डला 
मोबाईल नं . ९४२५८५३०२४
त्याने माझ्या वहीमध्ये मारलेला शिक्का थंडीमुळे पानं ओलसर राहून फिस्कटला होता . गुगल नकाशावर मला त्यांचा अजून एक शिक्का सापडला .

नावाप्रमाणे दुकानात सर्व काही होते . तो मला म्हणाला तुम्हाला अजून काय देऊ सांगा .एकंदरीत त्याची परिस्थिती बेताची आहे हे माझ्या लक्षात आले होते .त्यामुळे मीच त्याच्याकडून एक विजेरी विकत घेतली .दोन सेल सुद्धा विकत घेतले .सोबत साठलेल्या पैशाचे करायचे काय हा प्रश्न नेहमीच असायचा .जसजसे चालणे वाढू लागले तसतसे एक रुपयाचे नाणे सुद्धा जड वाटू लागायचे . सकाळपासून इथपर्यंत मी सुमारे १६ किलोमीटर चाललो होतो .पुढचे पाच-सहा किलोमीटर चालताना पाय जड झाले .मी त्यामुळे हळूहळू चालत होतो इतक्यात मागून तीन चार युवक झपाझप चालत माझ्या पुढे गेले .यांच्यामध्ये एक तरुण साधू होता .वासुदेव दास असे त्याचे नाव होते आणि तो अयोध्येचा होता . राजा दशरथाच्या महालापाशी त्याचा आश्रम होता . त्याने मला माझ्या परिक्रमे विषयी माहिती विचारली . पुढचा रस्ता कसा माहिती करून घेतोस असे विचारल्यावर मी सांगितले की जशी मैय्या नेईल तसे जातो आहे . माझ्याकडे कुठलेही इंटरनेट , मोबाईल , नकाशा किंवा पुस्तक नाही हे पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याच्या जवळचे एक पुस्तक लगेच मला दिले .हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमा वासींसाठी अक्षरशः कामधेनू आहे . आत्मकृष्ण नावाच्या एका संन्यासी महाराजांनी स्वतः अनेक वेळा पायी परिक्रमा केल्यानंतर लिहिलेले हे पुस्तक असून याच्या इतकी अचूक माहिती अन्य कुठल्याच पुस्तकांमध्ये सापडत नाही . 
मुळात पुस्तक म्हणजे याच्यात बाकी काही लिहिलेले नसून केवळ गावांची यादी , तीर्थक्षेत्रांची यादी , गावांमधील अंतर , नद्यांची नावे ,जिल्ह्याची तालुक्याची नावे इतकीच माहिती लिहिलेली आहे .नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका असे पुस्तकाचे नाव आहे . हे आत्म कृष्ण महाराज सध्या तिलकवाडा या गुजरात मधील गावातील आपल्या आश्रमामध्ये राहत असून त्यांची प्रकृती सध्या ठीक नसते .त्यामुळे पूर्वीसारखी परिक्रमावासीयांची सेवा ते आता करू शकत नाहीत. त्यांचे गुरुबंधू असलेले डॉक्टर चंद्रमौली स्वामी म्हणून एक आहेत ते त्यांची सर्व व्यवस्था पाहतात . वासुदेव दास साधूने मला हे पुस्तक कसे पाहायचे ते शिकविले .आणि उदाहरणादाखल जिथे आम्ही भेटलो ते गाव शोधून तिथे स्वतःचा नाव क्रमांक त्यांनी लिहून दिला . याने ही दुसरी परिक्रमा केवळ ८४ दिवसांमध्ये पूर्ण केली . अजून एक परिक्रमा करण्याचा त्यांचा मानस आहे सध्या ते उत्तराखंडातील चारधाम पदयात्रेचे नियोजन करीत आहेत . असो .
     प्रत्येक परिक्रमावासी कडे हे पुस्तक हवेच !

या पुस्तकामध्ये दिलेला नर्मदा परिक्रमेचा नकाशा हा अतिशय मार्गदर्शक आहे .वाहनाने परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी देखील नकाशा दिलेला आहे .नर्मदा परिक्रमेची भूमिका , ती का करतात, कशी करतात, याशिवाय नर्मदाष्टक , नर्मदा मातेची आरती , नर्मदेची उत्पत्ती कथा , छोटी भजने ,अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत . हे पुस्तक माझ्यासाठी पुढे अतिशय उपयुक्त ठरले यात वादच नाही . मला हा साधू बिछिया गावाजवळ भेटला . त्याने तशी नोंद पुस्तकांमध्ये करून दिली . आपल्या देशावर इंग्रजांचा फार खोल प्रभाव पडलेला आहे .संपूर्ण परिक्रमेमध्ये मला केवळ एकच साधू भेटला जो देवनागरीमध्ये आकडे लिहीण्याचा आग्रह धरायचा .बहुतांश साधू देवाने निर्माण केलेली देवनागरी लिपी सोडून आपल्या देशाची वाट लावणाऱ्या इंग्रजांची लिपी अंगीकारतात हे पाहून दुःख होते .आपण मात्र सर्व नोंदी देवनागरीमध्येच करत होतो याचा मैय्याला आनंद होत असणार . असो .

त्याने सांगितल्याप्रमाणे मी ज्या गावांमध्ये जायचो त्याची नोंद या पुस्तकात खुणेने करून ठेवायचो . भोजन प्रसाद घेण्यासाठी एक खूण केली होती आणि मुक्कामासाठी वेगळी खूण होती . अधिक काही माहिती मिळाली तर मी पुस्तकातच लिहून ठेवायचो . बिझौली अमगवा गावात अखेरीस पोहोचलो . एक मोठा काँक्रीट रस्ता लागला . हा रस्ता उजवीकडे थेट निवास गावाला जात होता तर डावीकडे शाहपुरा गाव होते . रस्त्यावर मोठे मोठे फूटपाथ बांधले  होते . गाव छोटेसेच होते परंतु टुमदार होते . गावामध्ये एक अतिशय सुंदर असे अति प्राचीन दुर्गा माता देवालय होते . 

तिथे मुक्कामाची इच्छा झाली .मंदिरामध्ये खूप प्राचीन मूर्ती आणि खांबांचे कोरीव कामाचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत . 

 प्राचीन दुर्गामाता व अन्य भग्नावशेष 
ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे .शनीचेही स्थान गतवर्षीच उभे केले आहे .एकंदरीत स्थान उत्तम आहे . शेजारीच नगरार नदी वाहते . संगमावर एक स्मशानभूमी आहे . पाण्याची एक उपसा विहीर   (जॅकवेल ) तिथे आहे . मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . आणि संपूर्ण परिसर फिरून आलो . कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर आसन लावून झाले की , तो संपूर्ण परिसर डोळ्याखालून घालायचा असा परिपाठ ठेवला होता . अनेक छोटी मोठी मंदिरे आजूबाजूला होती . नदीला चांगले पाणी होते . मंदिरामध्ये एक धुनी होती . तिच्या जवळच मी आसन लावले होते . मंदिरामध्ये दर्शनासाठी लोक येत राहत .त्यातील काही लोक जाता जाता नमस्कार करून जात .काहीजण गप्पा मारण्यासाठी थांबत असत .असेच एक माजी शिक्षक असलेले रमेश झारिया नावाचे सद्गृहस्थ बोलण्यासाठी म्हणून शेजारी येऊन बसले .त्यांनी माझ्याकडून बरीच माहिती जाणून घेतली .इथल्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे .ते तुमच्याकडून भरपूर माहिती काढून घेतात .अगदी त्यांना माहिती असलेल्या विषयाबद्दल देखील तुमची मते देखील ,जणू काही त्यांना काहीच माहिती नसल्याप्रमाणे जाणून घेतात !मला नंतर नंतर हे लक्षात येऊ लागले . परंतु सुरुवातीला मी अगदी उत्साहाने ते जे विचारतील ते सांगत राही ! 

त्यांनी माझे सोबत दोन फोटो काढून ते माझ्या मित्राला पाठवले . मित्र मोबाईलवर जमेल तेव्हा  अशा पद्धतीने दिनांक व वेळ याची नोंद करून ठेवत असे .पहिले चित्र दुर्गा माता मंदिरातील आहे. तर दुसरे त्यांचे घर आहे . जिथे त्यांनी रात्री मला जेवणासाठी आमंत्रित केले होते .दुसऱ्या चित्रात त्यांचे बंधू माझे सोबत आहेत .
 झरिया यांचे निवास स्थान
 मंदिरात गप्पा मारत बसलेले ग्रामस्थ व झरिया जी
रात्री भोजन प्रसादाला घरी येण्याचे सांगून झरीया निघून गेले .दरम्यान मंदिरामध्ये बरेच परिक्रमावासी येऊन उतरले .त्या सर्वांनी भोजन बनविण्याचा घाट घातला व मला बोलावू लागले परंतु माझे भोजन मैय्याने आधीच निश्चित केलेले असल्यामुळे मी नम्र नकार दिला . मी माझी आरती , उपासना आटोपून त्यांच्या घरी गेलो . त्यांच्या घरी एक मोठी चक्की होती . त्या चक्कीच्या खोलीमध्येच मस्त शेकोटी करून दहा-बारा ग्रामस्थ आणि मी गप्पा मारत बसलो .बराच वेळ गप्पा रंगल्या .राजकारण समाजकारण अर्थकारण अशा विविध विषयांना स्पर्श करत या लोकांची मते जाणून घ्यायला खूप मजा येत होती .वरवर खेडवळ दिसणारी ही माणसे प्रत्यक्षामध्ये अतिशय हुशार आणि अभ्यासू असतात हे सर्व शहरी लोकांनी कायम लक्षात ठेवावे .मनुष्याचा वेश पाहून त्याची बुद्धी ठरवण्याची पाश्चात्त्य पद्धत भारतामध्ये चालत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे . समोर बसलेल्या माणसांपैकी चार पाच जण धूम्रपान करत होते .सौजन्य म्हणून मला देखील बिडी पुढे करायचे मी नम्रपणे नकार देत असे .इथे एक मोठे संत शे दीडशे लोकांची पायी परीक्रमा घेऊन नुकतेच येऊन गेले होते .त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील यांनी मला दाखविले . गप्पा झाल्यावर आत अतिशय मोठ्या असलेल्या घरामध्ये त्यांनी मला बोलावले .बाहेर ओसरी वरच बसून मी गरमागरम पुऱ्या भाजी आणि खिरीचा आस्वाद घेतला .प्रत्येक पुरी तळून झाले की थेट ताटामध्ये वाढली जात होती .ताजे अन्न खाणे ही आपली संस्कृती आहे ती आपण हळूहळू विसरत चालले आहोत .आणि तेच अनेक रोगांचे मूळ ठरत आहे .असो .रात्री मी पुन्हा मंदिरामध्ये परतलो .मंदिरामध्ये उतरलेल्या परिक्रमावासींची ओळख करून घेतली. बुधराम सिंग पवार हे खाटी मोहंदी या गावचे होते .अनुपपूर जिल्ह्यामध्ये यांचे गाव पडत होते .यांचा भाऊ बलराम नायक आणि त्याचा मुलगा मथुरा सिंग हे गावचे सरपंच होते .मला लवकरच हे गाव वाटेमध्ये भेटणार होते .तिथे नक्की आमच्या घरी येऊन जा असे आमंत्रण त्यांनी दिले .यानंतर रात्रीची थंडी भयानक वाढत आहे असे पाहून मी माझे आसन अगदी धूनीला चिकटून लावले .आणि अग्नीदेवतेचा शेक घेत घेत निद्रादेवी च्या अ
आधीन झालो . तीनच तास झोप पुरली . हा दिवस होता पौष शुद्ध चतुर्थी शके १९४३ .६ जाने २२ . गुरुवार .
नगरार नदीमध्ये स्नान आटोपले . पाणी अतिशय थंड होते . मंदिरामध्ये आल्यावर पुन्हा नळावर स्नान केले कारण हे पाणी थोडे गरम होते ! लवकरच सर्व आटोपले आणि उजाडता उजाडता पावलांनी गती घेतली .

सदर लेख दृकश्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक सोळा समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढील लेखांक


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर