लेखांक १२७ : कानबेड्याचे मन्नुभाई जैस्वाल , कवांट चा नीलकंठेश्वर आणि वाजेपूरची बावडी

भाखा आश्रमातील सर्वसाधारण एकेक करून झोपू लागले . कडकडीत दुपार होती . भयंकर ऊन पडले होते . सूर्य जणू आग ओकत होता . तशा उन्हातच मी पुढे निघालो . माझा एक संकल्प होता की परिक्रमेमध्ये दुपारी अजिबात झोपायचं नाही . कारण माझे झोपेवर नियंत्रण नाही ! ओंकारेश्वर च्या पूर्वी सकाळी झोपून रात्री उठल्याचा अनुभव लक्षात होता ! तसे काहीतरी होऊन नर्मदा परिक्रमेचे दिवस कमी करायचे नव्हते . प्रत्येक क्षण जागृती मध्ये घालवायची इच्छा होती . त्यामुळे तशा उन्हातच पुढे निघालो . पोटामध्ये सुरू झालेले पचन म्हणजे एक मोठे अग्नीकुंडच असते . उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असेच त्याला म्हटलेले आहे . उलट आयुर्वेद तर असे सांगतो की जेवण झाल्याबरोबर काही काळ वज्रासनामध्ये शांत बसावे . तत्पूर्वी आपल्या डोळ्यांना पाणी लावावे आणि पायावर देखील पाणी घ्यावे . त्यामुळे आपल्या शरीरात समान पद्धतीने पसरलेल्या अग्नीला अशी सूचना मिळते की आपल्याला आता पोटाकडे कूच करायची आहे . आणि पचनक्रिया सुलभ होते . परंतु नेमके अशाच वेळी आपण भरपूर पाणी पोटामध्ये घातले तर मात्र अग्नी संपूर्ण शरीरामध्ये पसरतो आणि उत्पात माजवतो ! हनुमंताने रावणाची लंका जशी जळली तसे मग शरीर धुमसू लागते ! आणि माझ्या बाबतीत आज नेमके हेच झाले ! पोटभर जेवण केलेले होतेच . परंतु वाटेमध्ये थांबवून थांबवून कोणी उसाचा रस  . कोणी ताक  . तर कोणी बर्फासारखे गार पाणी पाजले . बरं नाही म्हणायचे नाही ! त्याच्यामुळे झाले असे की भयानक जाड्य आले आणि चालणे अजूनच कठीण झाले ! तरीदेखील मी खूप प्रयत्न करत अंतर तोडत होतो . परंतु हळूहळू पायाची गती मंदावत चालली आहे असे माझ्या लक्षात आले . मी वरती जे विश्लेषण केलेले आहे ते कदाचित ऍलोपॅथिक डॉक्टरांना पटणार नाही . परंतु ऍलोपथी फक्त अन्नमय कोशावर काम करते . त्याच्या आत मध्ये असलेला प्राणमय कोष देखील संपूर्ण शरीरभर व्यापलेला असतो हे जाणून आयुर्वेद साकल्याने विचार करतो . फार दूर जायची गरज नाही मी तुम्हाला एक गंमत सांगतो ! आपल्या शरीरामध्ये आपण नाकाने श्वास घेतो तेव्हा तो कधीच दोन्ही नाकपुडयांतून चालत नाही . आता लगेच आपल्या नाकापुढे ओठाच्यावर बोट आडवे धरून पहा . कोणाची उजवी नाकपुडी चालू असेल तर कोणाची डावी . तर कोणाच्या दोन्ही नाकपुड्या चालू असतील . ह्या आपल्या शरीरातील तीन नाड्या आहेत . यांना इडा पिंगला आणि सुषुम्ना अशी नावे आहेत . डावी म्हणजे इडा उजवी म्हणजे पिंगला . तमिळ भाषेत सुद्धा इडद म्हणजे डावे . 
मानवी शरीरातील नाडी
अशा अजून अनेक सूक्ष्म नाडी आहेत .त्यांची एकूण संख्या ७२ हजार आहे . पैकी इडापिंगला सुषुम्ना आदि मुख्य तीन नाडी आहेत
डावी नाकपुडी चालू झाली की शरीर थंड पडते .म्हणून तिला चंद्र नाडी देखील म्हणतात . उजवी नाकपुडी शरीरामध्ये उष्णता निर्माण करते .त्यामुळे ती सूर्यनाडी ठरते. आणि सुषुम्ना अतिप्रचंड उष्णता निर्माण करते . त्यामुळे तुम्ही जेवत नसता तेव्हा शक्यतो डावी नाकपुडी आपोआप चालू असते . भोजन घेतल्याबरोबर आपोआप उजवी नाकपुडी चालू होते . किंबहुना चालू होणे आवश्यक असते . ती होत नसेल तर त्यासाठी डाव्या काखेवर दाब द्यावा लागतो . चला वामकुक्षी असे म्हणतात . डाव्या कुशीवर झोपले की उजवी नाकपुडी आपोआप चालू होते . उजव्या कुशीवर काही काळ झोपले की डावी नाकपुडी चालू होते . म्हणून जेवल्यावर शक्यतो उजव्या कुशीवर झोपू नये . समजा तुम्ही अति आहार केला , पोटाला तडस लागेपर्यंत तुडुंब खाल्ले तर मात्र सुषुम्ना नाडी चालू होऊन सर्व अन्नाचे भस्म करून टाकते . अशावेळी ते अन्न पचत नाही किंवा अंगी सुद्धा लागत नाही . उजवी नाकपुडी चालू आहे तोपर्यंत शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत राहते . हे सर्व अत्यंत शास्त्रीय आहे आणि सगळ्यात सोपे म्हणजे यासाठी अन्य कोणाकडे जाण्याची गरज नसून आपल्या स्वतःच्या शरीरावर आपण हे प्रयोग करून पाहावेत ! आपल्या पूर्वजांनी शरीर शास्त्राचा किती सखोल अभ्यास करून ठेवलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल ! मी सहज गंमत म्हणून इ एन टी सर्जन लोकांना विचारले आहे की आपला श्वास कसा चालतो ? तर त्यांनी दोन्ही नाकपुड्यातून चालतो असे सरसकट उत्तर मला आजवर दिलेले आहे ! आणि मला तर बालवाडी पासून माहिती आहे की माझी एकावेळी एकच कुठलीतरी नाकपुडी जोरात चालते ! कारण खेळताना जेव्हा मी धडपडायचो आणि मैदानातील मातीमध्ये जेव्हा  पालथा पडायचो तेव्हा एकाच बाजूची माती उडताना मी स्वतः पाहिलेली आहे ! जे बालवयातील भारतीय लोकांना माहिती आहे ते पाश्चात्य पद्धतीने एमडी झालेल्या लोकांना सुद्धा माहिती नसावे यासारखे दुर्दैव काही असू शकते काय ! असो . आता तरी शिकावे ! शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते ! तुम्ही दहा उड्या मारा तुमची सुषम्ना नाडी आपोआप चालू होते ! अशी कल्पना करा की एक गाडी आहे जिला दोन इंजिन आहेत . उतार चालू झाल्यावर कमी क्षमतेचे इंजिन चालू होते . चढावर चढण्यासाठी एक शक्तिशाली इंजिन चालू होते . आणि समजा चढावर आणि वेगाने चढायचे असेल तर दोन्ही इंजिन एकत्र काम करू लागतात ! तशीच काहीशी आपल्या श्वसन संस्थेची रचना आहे . जितकी शरीराला गरज आहे तितका ऑक्सिजनचा पुरवठा , माफ करा प्राणवायूचा पुरवठा नाकपुड्या करतात ! आता तुम्ही म्हणाल प्राणवायू आणि ऑक्सिजन मध्ये काय फरक आहे ? खूप मोठा फरक आहे ! ऑक्सीजन म्हणजे 02 . प्राणवायू म्हणजे त्यातून आपले शरीर काढून घेत असलेले प्राण तत्व ! जर ऑक्सिजन मुळे मनुष्य जिवंत राहिला असता तर प्रेताच्या नाकामध्ये बलपूर्वक ऑक्सिजन घुसवल्यावर ते उठून बसायला पाहिजे ! परंतु तसे होताना दिसत नाही कारण त्या ऑक्सिजन मधील प्राण तत्व काढून घेण्याची त्याची क्षमता संपलेली असते ! असो माझी इतकीच विनंती आहे की कुठलेही शास्त्र परिपूर्ण आहे असे न मानता सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करावा , विचार करावा ,प्रयोग करावेत , अनुभव घ्यावा आणि मगच निष्कर्षाप्रत यावे ! याबद्दल अधिक न बोलणे उत्तम ! इकडे माझी अवस्था विविध प्रकारचे थंडगार द्रवरूप पदार्थ पोटामध्ये ढकलल्यामुळे विचित्र झालेली होती ! तशातच कानबेडा नावाचे गाव लागले .  एक अतिशय सुंदर अशी गोमाता शेतामध्ये बांधलेली होती . तिच्याकडे पाहत पाहत मी पुढे चाललो होतो .इथे शेजारीच एक दुकान होते . दुकानातून एका माईने आवाज दिला . "नर्मदे हर बाबाजी ! आओ । तनिक बैठकर जाओ । " मी चालून थकलेलो होतोच . क्षणभर बसावे असा विचार करून मी दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन बसलो . माताराम घरामध्ये गेल्या आणि त्यांनी तांब्याभर गार पाणी आणून दिले ! मी देखील ते घटा घटा घटा पिऊन टाकले ! पाणी पिताना नेहमी बसून प्यावे असे आयुर्वेद सांगतो . त्याचे देखील कारण हेच आहे . उभ्याने पाणी पिल्यावर पोटामध्ये कार्य करणारा अग्नी पटकन जागा बदलून पायांमध्ये जातो किंवा सरकतो . आणि आपले सर्व सांधे वंगण म्हणून पाणी वापरत असल्यामुळे तिथे जाऊन अडचण करतो . हायड्रोलिक प्रेस मध्ये बुडबुडा गेल्यावर कसे होईल तसे मग त्या सांध्याचे होते . आणि गुडघे सांधे कुरकुर करू लागतात . ही ॲनालॉजी किंवा हे वास्तव तुम्ही कुठल्याही ऍलोपॅथिक डॉक्टरला सांगितले तर तो तुम्हाला वेड्यात काढेल आणि तुमची चेष्टा करेल हे मी प्रिस्क्रिप्शन वर लिहून द्यायला तयार आहे ! परंतु असे असेल तर मग आतापर्यंत संधिवात किंवा गुडघेदुखी यावर त्यांना काही ठोस औषध का शोधता आले नाही याचा विचार आपण करून पहावा . आणि पाणी नेहमी बसूनच प्यावे . आपण नेहमी आपल्या आई-वडिलांचे ऐकावे ! कारण ते ऐकून नुकसान कमीत कमी होण्याची शक्यता असते . तसे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले हे शास्त्र आहे . त्यावर चक्क अंधविश्वास टाकावा ! थंडगार पाण्याचा तो तांब्या रिचवला मात्र मला अजूनच सरदगर्मी झाली . आणि डोके गरगरायला लागले ! कडकडीत उन्हातून चालत असताना अचानक गार पाण्याचा मारा शरीरावर आतून झाला की सरद गरमी होते . अर्थात उष्णता व शीतलता असे दोन विरोधाभास शरीरामध्ये निर्माण होतात आणि शरीर आपली नित्य नियमित कामे करणे बंद करते . यापूर्वी मी ह्या प्रकारचा जीवघेणा अनुभव बद्रीनाथ तीर्थक्षेत्रावर घेतलेला होता . आयुष्यात प्रथमच मी बद्रीनाथ केदारनाथ यात्रा ला गेलो होतो .

श्रीक्षेत्र बद्रीनाथ येथे प्रस्तुत लेखक . 
 त्यामुळे हिमालयातली थंडी काय असते याचा मला फारसा अनुभव नव्हता . त्यावेळी मी चप्पल सोडलेली होती . भिडे गुरुजी अनवाणी चालतात . त्यांना नक्की काय वाटत असेल व त्यांचे पाय काय काय भोगत असतील याचा अनुभव मला प्रत्यक्ष घ्यायचा होता म्हणून मी सुमारे अडीच वर्षे चप्पल सोडलेली होती . बद्रीनाथ च्या यात्रेला देखील मी अनवाणीच फिरत होतो . बाहेर तापमान उणे सात पर्यंत उतरलेले होते . अर्थात इतरांपेक्षा मला थंडी कमी वाजत होती कारण सर्वांचे पाय मोजे बूट यामध्ये दाखले होते व मी अनवाणी असल्यामुळे माझ्या शरीराने प्रचंड उष्णता निर्माण करण्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली होती . अर्थात माझी अखंड सुषुम्ना नाडी चालू होती . थंड प्रदेशात तुमच्या नाकातून बाहेर पडलेला उछ्वास वाफेच्या रूपाने दिसतो . त्यामुळे मला सतत दिसत होते की माझ्या दोन्ही नाक पुड्यातून जोरात श्वास चालू आहे . बद्रीनाथ इथे एक गरम पाण्याचे कुंड आहे . मी भल्या पहाटे साडेतीन वाजता उठलो आणि त्या कुंडामध्ये स्नानासाठी उतरलो . बाहेरचे तापमान वजा सात डिग्री सेल्सिअस होते तर पाण्याचे तापमान साठ पासष्ठ डिग्री सेल्सिअस होते . मी त्या पाण्यामध्ये सुमारे अर्धा तास डुंबत होतो . माझ्यासमोर जटाधारी साधू यायचे पाण्यामध्ये तीन डुबक्या मारायचे आणि पटकन बाहेर निघून जायचे . मी मात्र चांगला अर्धा तास त्या पाण्यामध्ये खेळत होतो . मध्येच मला काय हुक्की आली कोणास ठाऊक मी विचार केला आपणही तीन डुबक्या माराव्यात , आणि मी तीन डुबक्या मारल्या त्याबरोबर माझ्या डोक्यावर साठलेले जे पाणी आहे ते थंड पडू लागले आणि थोड्याच वेळात त्याचा बर्फ झाला ! आता सगळेच अवघड झाले मी असा विचार केला की आता बाहेर पडावे . पहाटेचे चार वाजले होते . तिथे फारसे कोणी नव्हते . मी बाहेर पडलो मात्र उणे सात डिग्री तापमानाने माझा घात केला ! मला इतकेच आठवते आहे की मी मागे सरकून एका भिंतीचा आधार घेतला आणि खाली बसलो . माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येऊ लागली . साधारण मिनिटाला २० २२ ठोके पडत होते इतकी ती मंद झाली होती . मला लक्षात आले की आता आपला मृत्यू जवळ आला आहे . आणि मी सर्व काही सोडून सद्गुरूंनी दिलेले नाम मनात उच्चारायला सुरुवात केली . सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा उच्चार मृत्यू समयी केला की मोक्ष निश्चितपणे मिळतो असे शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहे . नशिबाने नाम सुरू करणे इतपत भान मला होते . नंतर मात्र साधारण पंधरा मिनिटे काय होत आहे मला कळतच नव्हते . माझ्या मुलाच्या बाबा अशा आर्त हाकेमुळे मी भानावर आलो ! तो माझ्या गळ्यामध्ये मिठी मारून बसलेला मला दिसला . मी उठून बसलो . माझ्या आजूबाजूला तीन-चार माणसे उभी होती . एक मनुष्य अखंड माझी छाती चोळत व दाबत होता . दोघे तिघे माझे तळहात तळपाय चोळत होते . मी जागा झाल्याबरोबर तो मनुष्य म्हणाला "थँक गॉड ! ही इज आऊट ऑफ डेंजर नाऊ " मला कळत नव्हते मी कुठे आहे ! त्यांनी मला एका टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवले होते . ते मला म्हणाले तुझी बॅग कुठे आहे दाखव  . तुझे कपडे तुला घालतो . त्या सर्व लोकांनी मला कपडे घातले . मला वाचवणाऱ्या त्या पुण्यात्म्याचे नाव होते डॉक्टर सुनील साठे ! जे पुण्यातील एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत ! पुण्यातील मनसे कार्यकर्ता आंजनेय साठे यांचाच मुलगा !
हेच ते डॉक्टर सुनील साठे ज्यांच्या रूपाने येऊन परमेश्वराने माझे प्राण त्यादिवशी वाचवले !
 पुरेसा शुद्धीवर आल्यावर त्यांना विचारलं की मला नक्की काय झाले होते ? डॉक्टर साठे सांगू लागले , "मी स्नानासाठी म्हणून इथे आलो . आणि तुला या भिंतीपाशी पडलेला पाहिले . मला तुला काय झाले आहे ते लक्षात आले . तू बराच वेळ त्या पाण्यामध्ये थांबलेला असणार . रात्रभर थंडी असल्यामुळे तुझ्या शरीराने थंडीसाठी सानुकूलन केलेले होते . अर्थात तापमान कमी करून ठेवले होते . परंतु अशावेळी गरम पाण्यात केवळ काही सेकंद थांबून बाहेर यायचे असते . तू काही मिनिटे आत मध्ये थांबल्यामुळे शरीर पुन्हा एकदा गरम झाले . त्यामुळे तुझा श्वास त्याप्रमाणे बदलला . आणि त्यातून अचानक पुन्हा थंडीमध्ये आल्यामुळे शरीराला नक्की काय करायचे कळेना . रक्त प्रवाह गर्मीच्या दृष्टीने कमी झालेला होता . तू अचानक थंडी मध्ये आल्यामुळे ब्लड प्रेशर कमी पडू लागले  आणि ते वाढवण्यासाठी नसा आकुंचन पावू लागल्या आणि त्याचा ताण हृदयावर येऊन तुझे हृदय हळूहळू बंद पडू लागले होते . vasoconstriction अर्थात रक्तवाहिन्या व धमन्या आकुंचन पावल्यामुळे तुझे शरीर hypothermia हायपोथरमिया अनुभवत होते . नशिबाने मी तिथे आलो आणि तुझी कंडीशन पाहून तुला सीपीआर दिला आणि अन्य आवश्यक उपचार केले ! आता तुला काळजी करण्याचे काही कारण नाही कारण तू हृदयरोगी नाहीस . आता तुझे हृदय नॉर्मल चालेल ! पण हे नेहमी लक्षात ठेव की शरीराशी असे तापमानाचे खेळ कधी करायचे नाहीत ! " डॉक्टर साठे त्या दिवशी माझ्यासाठी देवदूत ठरले ! ते इतके मोठे हृदयरोग तज्ञ आहेत की << त्यांचे सहकारी हृदय उघडून ठेवतात व ते फक्त इकडची नस तिकडे जोडण्यापुरते तिकडे जातात ! अशी दिवसभरात अनेक ऑपरेशन्स ते महाराष्ट्रभर देशभर जागोजागी वेळप्रसंगी विमानाने फिरून करतात . आणि आता तर ते हेलिकॉप्टर घेणार आहेत वगैरे वगैरे >>  हे सर्व मी ऐकून होतो . डॉक्टर नीतू मांडके यांच्यानंतर यांचेच नाव ऐकले होते . परंतु आपले हृदय हिमालयातल्या एका कोपऱ्यात बंद पडेल तेव्हा नेमका हाच मनुष्य येऊन आपल्याला वाचवेल ही योजना माझ्या हातात नव्हती तर ती देवाची योजना होती ! देवाला काही आपण कमी त्रास दिलेला नाही ! असो .
तात्पर्य इतकेच की सरद गर्मी जीवघेणी ठरू शकते ! 
मला आता तसाच काहीसा फक्त कमी प्रमाणातला अनुभव येत होता . थोडे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मी माताजींना म्हणालो , "मी थोडा वेळ बसलो तर चालेल ना ? माझे डोके गरगरते आहे . " त्या म्हणाल्या , "निवांत बसा बाबाजी . पुढचा आश्रम इथून खूप जवळ आहे . अजून भरपूर उजेड आहे . तुम्ही निवांत पणे पोहोचाल . " मी बसलेलो असतानाच त्यांचा नातू ज्याचे नाव युग होते तो धावतच माझ्याकडे आला . तीन वर्षाचा होता .साखर सुद्धा फिकी वाटावी इतका गोड होता ! आला आणि माझ्या मांडीवरच येऊन बसला ! आणि म्हणाला , " बाबाजी आप कैसे है ? " मला खूप कौतुक वाटले . मी म्हणालो , "नर्मदा मैया की असीम कृपा से बहुत अच्छा हू बेटा । " तो मला सांगू लागला , "मैने भी नर्मदा मैया को देखा है । बहोत बडी है । " असं म्हणत त्याने त्याचे हात जितके मोठे करता येतील तितके करायचा प्रयत्न केला ! आपल्या मानवी देहाला मर्यादा आहेत !  आणि नर्मदामाई अमर्याद आहे ! त्या इवल्याश्या जीवाच्या कवेमध्ये मावणारी ती नव्हती ! परंतु तरीदेखील लहान मुले सुद्धा कसा विचार करू शकतात हे मला त्यातून कळत होते ! लहान मुलांना नेहमी मोठ्या गोष्टींचे आकर्षण असते ! त्यांना लहान का मोठा असा पर्याय दिला तर ते नेहमी मोठा पर्याय निवडतात ! त्यांचे विश्वच खूप मोठे असते ! आपण उगाचच त्यांना लहान लहान म्हणून हिणवत असतो . खरे लहान तर आपण आहोत . आपले घर आपला संसार आपली मुलं आपले घरदार याच्या बाहेर जाऊन फारसा विचार आपण करत नाही . लहान मुले मात्र नेहमी सगळ्यांचा विचार करतात ! हे सगळं आपलंच आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये दृढ असते ! त्यामुळे बिनधास्त कोणालाही न विचारता ते कुठलीही वस्तू उचलू शकतात ! कारण हे सर्व आपलेच आहे अशी त्यांची पक्की धारणा असते ! तुझे माझे फारसे त्यांना कळत नसते . तो धावतच आत मध्ये गेला आणि शाळेचे दप्तर घेऊन आला . त्याला नवीन आणलेल्या सर्व वस्तू मला दाखवू लागला . अजून त्याला शाळेत घातलेले नव्हते . फक्त सामान आणून ठेवलेले होते . मी त्याच्या वहीमध्ये त्याला एक दोन चित्र काढून दिली ! तो भलताच खुश झाला ! आणि माझ्या गळ्यामध्येच पडला ! मला म्हणाला बाबाजी आज तुम्ही इथेच रहा . मी त्याला म्हणालो अरे मला पुढे जायचे आहे . इथून पुढे दोनच किलोमीटर अंतरावर कबीर आश्रम होता तिथे जाऊन मुक्काम करावा असे माझ्या डोक्यात होते . मी काकूंना हाक मारली आणि विचारले , "माताराम , अगला आश्रम दो किलोमीटर दूर है ना ? " त्या काही बोलणार इतक्यात युग मोठा आव आणत म्हणाला , " दो नही बाबाजी तीन मीटल दूल है आत्लम  ! " मीटर बरका किलोमीटर नाही ! जयस्वाल काकू आणि मी जोर जोरात हसायला लागलो ! मी म्हणालो नाही मला तिकडेच जायचे आहे .  तर म्हणतो कसा ! तिथे नका जाऊ ! आमच्याकडेच रहा ! तिकडे जेवण उशिरा देतात ! आम्ही लवकर जेवण देतो ! मी पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागलो ! त्या बालहट्टाने तो करत असलेले युक्तिवाद मोठे मजेशीर होते ! एवढ्या छोट्या डोक्यामध्ये इतके प्रगल्भ विचार कसे काय येतात ? मला मौजच वाटली !  मी म्हणालो अरे पण मला आज जेवायचेच नाहीये ! तर मला काय म्हणाला माहितीये ? म्हणे आमच्याकडे नळ आहे . तिकडे नळ नाही ! थोडक्यात काहीही करून मला इथे थांबवायचेच असा चंग युग ने बांधला होता ! मी आणि आजी खूप हसलो ! जयस्वाल काकू मला म्हणाल्या , "बाबाजी , बच्चा इतनी जिद कर रहा है , तो एक दिन रुकीये ना हमारे घर । आप जायेंगे तो युग को बुरा लगेगा । " मी देखील विचार केला लहान मुलांच्या मुखातून परमेश्वरच बोलत असतो ! " जैसी मैया की इच्छा " असे म्हणून मी काकूंनी सांगितलेल्या जागी बाहेर ओट्यावरच आसन लावले . युगला खूप आनंद झाला !एखादा मोठा युक्तिवाद जिंकल्यावर वकिलाला जसा रुबाब चढतो तशा रुबाबात तो इकडे तिकडे फिरू लागला ! तो अखंड माझ्या कडेवर होता ! त्याची सुंदर अशी कांक्रेज गाय आम्ही जवळ जाऊन पाहिली . मला काय सांगू आणि काय नको असे त्याला झाले होते ! नर्मदा खंडातील मुले खरंच खूप हुशार आहेत ! खरं म्हणजे अशी तुलना करू नये परंतु एक ऐतिहासिक नोंद म्हणून सांगून ठेवतो की अन्य भारतातील मुले आणि या भागातील मुले यांच्यातला फरक जाणवण्या इतपत स्पष्ट आहे ! इथली मुले अधिक हुशार चुणचुणीत नम्र आणि कष्टाळू आहेत . नर्मदा मातेच्या जलाचा तो प्रभाव निश्चितपणे असणार . मी थांबलो ते बरेच झाले . मला आलेला थकवा विश्रांतीमुळे निघून गेला . आणि युग नावाचा डॉक्टर मला भेटला ! माझ्यापुढे दोन पर्याय ठेवले की लहान मुलांशी खेळायचे किंवा मोठ्या विद्वानांशी चर्चा करायची तर मी नेहमी आजही लहान मुलां सोबत खेळणे पसंत करतो ! त्यात खरा आनंद मिळतो ! शुद्ध परब्रह्माचे निखळ प्रकट स्वरूप म्हणजे लहान मुले ! 
संध्याकाळी मन्नुभाई आले .यांचे नाव अनिल कुमार जयस्वाल असले तरी पंचक्रोशी मध्ये मन्नू भाई नावाने ते प्रसिद्ध होते .उंचापुरा देह ! पक्के व्यावसायिक होते ! जेसीबी ट्रॅक्टर जीप मोटरसायकल अशी सर्व वाहने घरामध्ये होती . या भागामध्ये घरात एखादी मोटर सायकल असणे सुद्धा श्रीमंतीचे लक्षण मानले जाते ! सर्वत्र गरिबी . गरिबी म्हणजे आर्थिक गरिबी . बाकी हे लोक आपल्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत असतात ! कारण शहरवासीयांसारखे लाखो करोडो रुपयांचे रोग यांना होत नाहीत ! सारे निरोगी निस्वार्थ आणि आनंदी ! मन्नू भाई आले तेच तणतणत . त्यांना पटकन कुठेतरी कामासाठी जायचे होते . आणि नेमका त्यांच्या गाडीचा कार्बोरेटर खराब झाला होता . त्यांनी नवीन कार्बोरेटर आणला होता . परंतु अचानक गावातला मेकॅनिक परगावी गेला त्यामुळे ते चिडले होते . याने मला फसवले . काम करतो सांगून पळून गेला . वगैरे तणतण ते काकूं जवळ करत होते . त्यात हा परिक्रमावासी दारात आणून बसवलेला ! आता याची सेवा करू का माझी कामे करू ? असा भाव मला त्यांच्या वागण्यातून जाणवला ! आणि ते बरोबर आहे . नर्मदा खंडामध्ये परिक्रमावासी घरी आला की त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते . द्यावेच लागते अशी तिथली शिकवण आहे .  परंपरा आहे .मी मन्नू भाईंना म्हणालो , मी तुम्हाला काही मदत करू शकतो का ? ते म्हणाले मेकॅनिक येईपर्यंत काहीच उपयोग नाही . तुम्ही निवांत आराम करा . माझे मी बघतो काय करायचे ते . थोड्यावेळाने त्यांचा मुलगा योगेश आला . याचे पुढील कवाट गावामध्ये घाऊक खरेदीचे दुकान आहे . रोज दोन तीन लाख रुपयांची उलाढाल तो करतो असे त्याने मला सांगितले . मी योगेशला म्हणालो की मला अमुक अमुक हत्यारे आणून दे . आणि कार्बोरेटर आणून दे . माझ्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे सर्विसिंग आणि किरकोळ कामे मी घरीच करायचो . अंधार पडू लागला होता . डोक्याच्या फेट्यामध्ये बॅटरी खोचून साधारण १५ ते २० मिनिटांमध्ये मी त्यांच्या गाडीचा कार्बोरेटर बदलून दिला .  योगेश माझ्या मदतीला शेजारी बसलेला होताच . किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली ! आणि मन्नुभाई पळतच बाहेर आले ! त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . " गाडी चालू कैसे हुई ? " त्यांनी विचारले . "बाबाजी ने कार्बोरेटर बदल दिया " योगेश सांगू लागला . जयस्वाल काकांनी येऊन माझे पाय धरले . मी पण त्यांच्या पायावर डोके ठेवले . मला म्हणाले , "क्षमा करा बाबाजी . मी आल्यापासून थोडा टेन्शनमध्ये होतो . एक मोठे काम मार्गी लावायचे होते आणि माझ्याकडे गाडी नव्हती .म्हणून मला राग आला होता मेकॅनिक चा . कारण आज तो मला गाडी चालू करून देणार होता . तुम्ही कशी काय गाडी चालू केली ? तुम्ही कोण आहात ? कुठले गाव ?  काय करता ? " जे प्रश्न त्यांनी आल्या आल्या मला विचारणे अपेक्षित होते ते आता त्यांनी मला विचारले . मी सर्व प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिली . आणि त्यांना सांगितले की आता बिनधास्त गाडीवर जाऊन यावे . लगेचच कपडे बदलून जयस्वाल काका आणि योगेश गाडीवर कुठेतरी जाऊन आले . माझे हातपाय गाडीचे काम केल्यामुळे काळवंडले होते . घराच्या मागे परिक्रमावासींसाठी एक नळ लावला होता . तिथे जाऊन मी हातपाय धूत होतो . परंतु जयस्वाल काकूंनी त्यांच्या बाथरूम मध्ये गरम पाणी माझ्यासाठी काढले आणि घरामध्ये आंघोळ करण्याची विनंती केली . गरम गरम पाण्याने मस्तपैकी आंघोळ केली आणि मैय्याची पूजा आरती करून घेतली ! हे सर्व करताना युग माझ्या मांडीवर बसलेला होता हे वेगळे सांगायला नकोच ! लोहचुंबकासारखा मला येऊन चिकटला होता !  माझी मैया लहान मुलांना फार आवडायची ! युग ला सुद्धा खूप आवडली ! मला म्हणाला की ही मी घेऊ का खेळायला ? त्याला उत्तर देताना माझ्या नाकी नऊ आले होते ! बाल हट्ट खरंच कठीण असतो हेच खरे ! रात्री उत्तम पैकी भोजन मिळाले . ओट्यावरतीच बसलो होतो . रात्री उशिरा जयस्वाल पिता पुत्र आले . त्यांनी माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या . मी जेव्हा त्यांना सांगितलं की त्यांची गाय खूप सुंदर आहे आणि प्रेमळ आहे ! तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघायला लागले ! ते म्हणाले अहो ती प्रचंड मारकी आहे ! म्हणून तर तिला शेतात एका बाजूला नेऊन बांधलेली आहे . मला मात्र उलटा अनुभव आला होता ! ते सांगू लागले की ती फक्त युग ला मारत नाही ! मग माझ्या लक्षात आले . मी युगला कडेवर घेऊन तिच्याकडे गेलो होतो . त्यामुळे तिने मला मारले नाही ! मुक्या जनावरांना सुद्धा किती विवेक असतो पहा ! तिने ओळखले या माणसाला मारले तर तिच्या लाडक्या युग ला इजा होणार ! त्यामुळे तिने मला देखील प्रेमाने चाटले ! अर्थात युग देखील तिला सांगतच होता , " देखो गैया , यह मेरे बाबाजी है ! बहुत अच्छे है ।  वगैरे वगैरे" मुक्या जनावरांना लहान मुलांची भाषा कळते ! कारण दोघेही निस्वार्थ असतात . गाय कधी दुधाचे पैसे मागत नाही ! आणि लहान मुले कधी दूध पिल्यावर पैसे देत नाहीत ! व्यवहाराचे जग आपण उभे केले ! मोठ्या माणसांनी ! परमेश्वराच्या सृष्टीमध्ये व्यवहाराला थारा नाही ! तिथे फक्त प्रेमाचा व्यवहार चालतो ! 
" प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता
चित्त जाणे " या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे इथला व्यवहार आहे ! रात्री माझ्यासोबतच झोपायचा हट्ट युग करू लागला . अखेरीस त्याला मी मांडीवर झोपवले आणि मग त्याच्या वडिलांकडे सोपवले . घरातल्या सर्वांनाच हा प्रकार पाहून मजा वाटत होती . लहान मुले खरोखरच खूप निर्मळ असतात ! त्यांच्या सहवासात गेले की आपण देखील निर्मळ होतो . एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ ऑफिसमध्ये गेला की कर्मचाऱ्यांना झाडू लागतो ! परंतु तोच घरी आल्यावर नातवाशी खेळताना लहान बाळ होऊन जातो ! माणूस एकच असतो . त्याच्यासमोर कोण आले आहे त्यानुसार त्याचे बाहेर पडणारे गुण अवगुण ठरतात ! त्यामुळे आयुष्यात एखादा अवगुणी मनुष्य दिसला तर त्याच्या आजूबाजूला कोण आहे ते पाहावे ! किंवा एखादा गुणी मनुष्य दिसला तरी देखील त्याच्या आजूबाजूला कोण आहे ते पाहून ठेवावे ! संगती संग दोषा: । रात्री त्या उघड्या ओट्यावर छान झोप लागली ! पहाटे लवकर उठून नळावर आंघोळ केली . गोमातेचे दर्शन घेतले . तिने मला लक्षात ठेवले होते . अतिशय प्रेमाने तिने मला चाटले ! तिचा तो दिव्य स्पर्श म्हणजे मला साक्षात नर्मदा मातेचा स्पर्श वाटला ! तिच्या प्रत्येक चाटण्याबरोबर माझ्या अंगातून प्रचंड लहरी निघत होत्या ! जणूकाही ती माझ्या सर्व रोगांचा परिहार करत होती ! माझ्या सर्व वेदना दूर करत होती ! मी पुन्हा एकदा तिची गळाभेट घेतली आणि ओट्यावर येऊन सामान आवरले .संध्याकाळी पूजनासाठी उशा जवळ काढून ठेवलेली मैया मी सकाळपर्यंत तशीच ठेवायचो . आणि रात्री तिच्याकडे पाहतच झोपी जायचो . पहाटे पुन्हा एकदा पूजन करून मग तिला झोळी मध्ये ठेवायचो . जयस्वाल काकूंनी चहा आणून दिला .त्यांनी विचारल्यामुळे गरम गरम चहाचा आनंद घेत मैयाचे काही अनुभव त्यांना सांगितले . पुढे निघालो .
हेच ते दुकान !त्याच्यापुढे बांधली गेलेली पत्र्याची शेड नवीन दिसते आहे . मी राहिलो तेव्हा फक्त दुकान होते . शेजारच्या शेतामध्ये जेसीबी जीप कार ट्रॅक्टर अशी वाहने लावलेली दिसत आहेत .समोर मोटरसायकल आहे .
दुकानाच्या याच ओट्यावर मी मुक्काम केला होता दुकानात ग्राहकांची सतत वर्दळ असे . मागे जेसीपी ४०७  ट्रक वगैरे दिसत आहेत .
लाल खुणेने दाखवलेल्या झाडाखाली कांकरेज गाय बांधण्यात आली होती . जिने मला खूप प्रेम दिले .
 कांकरेज प्रजातीची गाय अशी दिसते
 साधारण सात आठ किलोमीटर अंतरावर कवाट नावाचे गाव होते . हे या भागातील मोठे गाव आहे . वाटेत योगेश गाडीवर पुढे गेला . कवांट गावात आपले दुकान आहे तिथे नक्की या असे सांगायला विसरला नाही .  इतक्या लवकर दुकान उघडणारा व्यापारी पुणेकरांसाठी जागतिक आश्चर्यच ! इथे अकरा वाजल्याशिवाय दुकाने उघडत नाहीत ! अखेरीस कवाट गावात आलो . तालुक्याचे ठिकाण होते . यावनी वस्ती मोठ्या प्रमाणात होती . योगेश दुकानाच्या बाहेर थांबलेलाच होता . त्याने मला प्रेमाने दुकानात नेले . दुकानदार स्वतःच्या खुर्चीवर परिक्रमासींना बसवतात . अशी पद्धत इकडे आहे . परिक्रमावासीच्या रूपाने नर्मदा मैया दुकानामध्ये बसून जाते असा त्यांचा दृढ भाव असतो . त्याने मला सुंदर असा चहा पाजला . त्याच्याकडे एक वजन काटा होता . त्या काठावर मी माझ्या झोळीचे वजन केले . ७८०० ग्राम वजन भरले . म्हणजे पावणेआठ किलो . प्रगती होती ! कारण थोड्याच दिवसापूर्वी माझ्या झोळीचे वजन १५ किलोच्या पुढे गेलेले होते ! रामनवमीला भेटलेल्या देवन माता-पुत्रींनी अर्धे सामान ताब्यात घेऊन माझा भार हलका केला होता ! हे आजवरचे सर्वात कमी वजन होते ! योगेशला नर्मदे हर केले आणि पुढे निघालो . कवाट पर्यंत येण्यासाठी मी बरीच गावे पार केली होती . भाखा  , भेखडिया , मंदवाडा , खंडानिया , थडगाम , आठा डुगरी ,कानबेडा , विजली ,देवाढ , मोटी सांकल , चापरिया ही सर्व गावे पार करत मी कवांट गाठले होते . भरगच्च बाजारपेठेतून चालत होतो . कोणीतरी मला सांगितले की इथे निळकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे तिथे अवश्य जावे . भर बाजारपेठेत मी मंदिर शोधून काढले . राम दुबे कानपूर वाले नावाचा एक फुल टू बोल बच्चन पुजारी मंदिराची व्यवस्था पाहत असे ! त्याच्या डोळ्यांमध्ये देवाचे अलंकार घालताना पितांबरी गेल्यामुळे त्याला तात्पुरते अंधत्व आले आहे असे त्यांने मला सांगितले . परंतु वावरताना तसे काही वाटत नव्हते . सराईतपणे मंदिराच्या पायऱ्या चढत उतरत होता . समोर याचा डुप्लिकेट शोभावा असा त्याचा भाऊ शाम दुबे याचे राम नावाचे हॉटेल होते .दोघेही क्रमांक एक चे बोलबच्चन ! एकाला झकावा आणि दुसऱ्याला काढावा !  सकाळचे नऊ वाजले होते मला पुढे जायचे होते परंतु याने सांगितले की तुम्ही इथे भोजन घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही ! त्यामुळे मी इथे थांबलो परंतु याने जागतिक दर्जाचे बोल बच्चन मारत सगळा स्वयंपाक मलाच करायला लावला ! मला दिसत नाही मला दिसत नाही असे म्हणून फोडणी पातेल्याच्या बाहेर टाकायचा ! मी त्याचा हात पकडून पातेले दाखवायचो . शेवटी मीच सर्व स्वयंपाक केला . हा नुसत्या गप्पा मारत होता ! याचे वडील भारतीय लष्करामध्ये मेजर होते म्हणाला . थोड्यावेळाने येथे मध्य प्रदेशातील एक दलित परिक्रमावासी आला . यांनी निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्ला लावला होता . डोक्यावर निळे टापसे बांधले होते . परंतु अत्यंत भाविक होता आणि सर्व नियम पाळत नर्मदा परिक्रमा करत होता . मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो . मी खिचडी करतो आहे म्हटल्यावर मला म्हणाला की मी जेवणारच नाही . मध्यप्रदेश मधील लोक भाताला नकार देतात असे माझे निरीक्षण आहे . दुबे बंधू इथेच जेवणार याची मला खात्री होती त्यामुळे मी चार-पाच जणांची खिचडी केली . आणि खरोखरीच दोघेही भाऊ हॉटेलमधला डबा घेऊन आले परंतु आमच्यासोबत तिथेच येऊन जेवले आणि भरपूर खिचडी खाल्ली . शेवटी हा दलित परिक्रमा वासी सुद्धा आमच्या सोबत गपगुमान जेवला .  कारण भुकेला काहीही अन्न चालते ! "भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा " अशी म्हण माझी आजी नेहमी सांगायची . अर्थात खरी भूक लागल्यावर कोंडा सुद्धा चांगला लागतो आणि खरी झोप आल्यावर धोंड्यावर सुद्धा झोप लागते ! त्याला खिचडी खूप आवडली मला समाधान झाले ! राम शाम बंधूंचे बोलबच्चन ऐकून माझे फार मनोरंजन झाले ! केवळ स्वयंपाक टाळण्यासाठी तात्पुरते अंधत्व आल्याचा जो काही अभिनय त्याने केला  त्याला नर्मदा खंडाच्या भूगोलामध्ये तोड नाही ! असो . इथे अधिक काळ न थांबता पुढे निघालो . 
कवाटच्या भर बाजारपेठेमध्ये असलेलं हेच ते नीलकंठेश्वराचे मंदिर
इथेच दत्त मंदिर सुद्धा आहे .रंगावधूत महाराज परंपरेतील हे मंदिर  .
दत्तप्रभू बापजी आणि थोरले स्वामीजी या तिघांच्या मूर्ती वरती भक्ती भावाने टांगलेले गुजराती पतंग ! गुजरात मध्ये पतंग उडवण्याची भारी हौस आहे लोकांना !
 संक्रांतीच्या काळात तर पतंगाच्या मांज्यामुळे वाहन चालकांचा गळा कापला जाऊ नये म्हणून प्रत्येक गाडीला अनिवार्यपणे एक तार बांधावी लागते इतके पतंग इथे उडवले जातात . असो

श्री निळकंठेश्वर महादेव आणि खाली त्याचे सभागृह

राम दुबे यांनी दिलेला मंदिराचा शिक्का आणि क्रमांक
इथून पुढे दोन मार्ग आहेत . जुना मार्ग मैयाच्या काठाने जाणारा आहे . व एक मार्ग गावागावातून जाणारा आहे .दोन्ही मार्ग डही नावाच्या गावात आणून सोडतात . शहरांचा किंवा मोठ्या गावांचा मार्ग असा आहे . कवाट रेणदा छकतला उमराली सोंडवा कवडा डही . परंतु मला कधी एकदा नर्मदा मातेला भेटतो असे झाले होते . दुसरा मार्ग असा होता . कवाट कडीपानी हाफेश्वर आणि तिथून परत कवाट ! आणि वरचा मार्ग !परंतु मला मात्र खात्री होती की काठावरुन नक्की मार्ग असणार आहे . त्यामुळे पुस्तकामध्ये हाफेश्वर पासून परत फिरा असे लिहिलेले असले तरीदेखील मी काठाकाठाने सरळ जायचे ठरवले . त्यासाठी मी उजवीकडे वळलो आणि नर्मदा मातेकडे जाणारा रस्ता पकडला .
आत्म कृष्ण महाराजांच्या पुस्तकामध्ये देखील पुन्हा थोडे मागे यावे लागते असे लिहिले आहे .
वाटेमध्ये हमीरपुरा ,वझेपूर ही गावे लागली . इथे साताऱ्या जवळील लिंब गोवे या गावात असलेल्या बारा मोटेच्या विहिरीची आठवण करून देणारी किंवा माझे मूळ गाव सप्तर्षी कवठे इथल्या प्रसिद्ध विहिरीची आठवण करून देणारी अशी नितांत सुंदर ऐतिहासिक बावडी अथवा विहीर होती ! ७० पायऱ्या होत्या म्हणजे आताच्या काळातील बांधकामानुसार सुमारे सात मजले खोल अशी ही विहीर होती . अगदी कुळकळीत काळ्या पाषाणांमध्ये बांधलेली होती .आणि अप्रतिम कोरीव काम केलेले  . बर्फासारखा गारवा संपूर्ण विहिरीमध्ये साचून राहिलेला होता . या विहिरीला सात कमानी आणि तीन मोठे मजले होते .परंतु दुर्दैवाने या विहिरीला वरून यावनी विळखा पडलेला होता . शेजारी एक मोठा दर्गा बांधून त्याच्या तटबंदीमध्ये ही विहीर घेतलेली होती . दर्ग्याच्या बांधकामाचा दर्जा पाहिला तर लक्षात येत होते की या विहिरीच्या एका दगडाचा निर्मिती खर्च जितका असेल तितक्या खर्चात तो अख्खा दर्गा उभा राहिला होता . वक्फ बोर्डाने ही जागा ताब्यात घेतली आहे असे मला सांगण्यात आले . या विहिरीच्या पाण्यामध्ये काहीतरी मिसळलेले आहे त्यामुळे गावकरी ते पाणी चांगले असूनही पीत नाहीत असे मला नंतर कानावर आले . मला फार म्हणजे फार वाईट वाटले . आपले अनमोल ऐतिहासिक ठेवे जर अशा पद्धतीने बळकावले जाणार असतील तर आपल्या देशाला काय भविष्य असणार आहे याची कल्पना केलेली बरी ! केवढे मोठे दुर्दैव आणि केवढी घोर अनास्था ! शेजारीच दोन ऐतिहासिक पडके किल्ले होते . बहुतेक राणी रूपमतीचे ते किल्ले होते . त्याला वझेपूरचा भुईकोट  किल्ला म्हणतात . दुसरा किल्ला म्हणजे याच किल्ल्याचा भाग आहे . इथे पण दर्गा झालेला आहे . मागे जंगल युक्त झाडी आहे . 
वाजेपूरचा भुईकोट किल्ला
किल्ल्याचे भग्न अवशेष
वाजेपूरच्या बावडी वरचे अर्थात विहिरीवरचे कोरीव काम
 भुईकोटाचा बुरुज आतून असा दिसतो
बावडी मध्ये उतरणाऱ्या ७० पायऱ्या
हा बावडी चा पहिला मजला आहे .विहिरीमध्ये पाणी भरले की इथे देखील पाणी भरण्याची सोय आहे .
अलीकडच्या काळात शेजारीच एक दर्गा बांधून विहिरीच्या जमिनीवर कब्जा मारण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झालेला आहे .
विहिरीमध्ये पाणी भरण्याची इतकी उत्तम व्यवस्था केलेली आहे की एकावेळी सारा गाव तिथे पाणी भरू शकतो .
वरून बघितल्यावर खाली इतकी मोठी विहीर असेल असे लक्षात सुद्धा येत नाही
दर्गा वाल्यांनी कब्जा मारल्यामुळे विहिरीची सध्याची अवस्था फार वाईट आहे . आजूबाजूच्या झाडामुळ विहीर ढासळते आहे .


सध्या जरी या कमानी सुस्थितीत दिसत असल्यास तरी त्यांच्यावरती प्रचंड झाडे वाढलेली आहेत .त्यामुळे त्या कधीही खाली येऊ शकतात .
विहिरीचे पाणी देखील थंडगार असले तरी बऱ्यापैकी दूषित आहे
अशा पद्धतीने कुंपणे टाकून आपले एक एक ऐतिहासिक वारसे कोणी कब्जामध्ये घेणार असेल तर आपल्या देशाचे भवितव्य अवघड आहे .
परिक्रमावासी ही विहीर पाहत नाहीत असे मला स्थानिकांनी सांगितले . माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे . परिक्रमा हा स्वार्थ निश्चितपणे आहे . कारण त्यातून आपण आत्मोन्नती ,आत्मोद्धार , आत्मसाक्षात्कार प्राप्त करणार आहोत . परंतु जाता जाता अशा ऐतिहासिक ठिकाणांना जर आपण भेटी दिल्या तर केवळ आपल्या संख्याबळामुळे राष्ट्रोन्नती , राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रसाक्षात्कार देखील साध्य होणार आहे . परिक्रमावासींची संख्या आणि परिक्रमावासींचे तपोबळ हे त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे . त्याचा वापर करून आपण किमान परिक्रमा मार्गातील बिघडत चाललेली धार्मिक क्षेत्रे जरी सुधारली तरी त्यासारखे पुण्याचे दुसरे कुठले काम असणार आहे ? कल्पना करून पहा . या विहिरीवर येणारा प्रत्येक परिक्रमावासी जलपान करण्यासाठी थांबू लागला तर कोणाची हिंमत आहे ही विहीर ताब्यात घेण्याची ? इथे रात्री जर शंभर शंभर परिक्रमा वासी मुक्काम करू लागले तर असा कोण माईचा लाल आहे जो त्यांना अडवू शकेल ? परंतु आपण हे करत नाही . हे आमचे नाही असे वाटणे याच्यासारखे मोठे पाप नाही . या विहिरीतील प्रत्येक दगड बघताना मी तो दगड घडवणाऱ्या कारागराची मानसिकता कशी असेल याची कल्पना करून पाहत होतो . हे कोरीव काम करतानाच जर त्याला कोणी सांगितले असते की बाबा रे नको एवढे कष्ट घेऊस . पुढे तुझे हे सर्व कोरीव काम दुसऱ्या लोकांच्या ताब्यात जाणार असून ते त्याची तोडफोड करणार आहेत . तर त्याने एवढी सुंदर कलाकृती उभी केली असती काय ? किमान आपल्या त्या पूर्वजांची आठवण आणि आदर म्हणून तरी आपण या कलाकृती जपायला काय हरकत आहे ? आपण आतापर्यंत लाखो मंदिरे गमावलेली आहेत . सर्वधर्मसमभाव नावाची अफूची गोळी आपल्याला अनेक वर्ष रीतसर सकाळ दुपार संध्याकाळ चारण्यात आली . त्यातून आपला समाज षंढ झाला . आपला कोण , परका कोण ,वैरी कोण , कैवारी कोण ,शत्रू कोण ,मित्र कोण ,चांगला कोण ,वाईट कोण याचा विवेक नष्ट होऊन गेला . आणि सगळीकडे आपल्याला समानता दिसू लागली . ही समानता दांभिक होती . कारण आपल्याला कळत होते की सर्व काही समान नाही तरी विनाकारण आपण सर्व कसे चांगले आहे ,उत्तम आहे वगैरे थापा मारू लागलो . हा आत्मघात आहे . ही आत्महत्या आहे . शरीराला रोग झाल्यावर जंतूंना सुद्धा कसा जगण्याचा अधिकार आहे अशा जंतू अधिकाराच्या गप्पा जंतू संसर्ग झालेल्या रुग्णाने मारण्यासारखे हे आहे . मुळात आपण आपल्या मूळ गोष्टी ताब्यात घेणे म्हणजे कोणावर अन्याय करणे अजिबात नाही हे सर्वप्रथम आपण लक्षात घेणे आवश्यक आहे . त्यातून वरकरणी कोणालातरी बाजूला करतो आहोत असे चित्र उभे राहणे स्वाभाविक आहे . परंतु आपण ज्यांना बाजूला करतो आहोत ते त्या जागेचे मूळ मालक नसून कब्जा पार्टी आहे हे लक्षात घ्यायला आपण का विसरतो बरे ?
सर्व धर्म समान आहेत सर्व देव एकच आहेत वगैरे सांगणाऱ्या नालायक लोकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी अरब देशांमध्ये जाऊन साधना करून दाखवावी . जर सर्व देव आणि सर्व धर्म समान आहेत तर मग तिथे जाऊन देवाची पूजा करायला काय हरकत आहे ? त्यासाठी भारतच कशाला लागतो ? अशा नादान हलकट बेशरम लोकांमुळे आपल्या समाजाची माती झालेली आहे .आपल्या देशाचे तुकडे तुकडे झालेले आहेत . आपल्या आई वडिलांचा पत्ता नसलेली जमातच अशी भिकार बडबड करू शकते . ज्याचा बाप एक नाही आणि आई नेक नाही अशी अवलादच सर्वधर्मसमभावाच्या गप्पा एखाद्या भग्न मंदिरामध्ये बसून मारू शकते . ज्याने या भारत मातेचे , नर्मदा मातेचे मातृस्तन्य प्यायलेले आहे तो मनुष्य अशा वृथा वल्गना प्राणांतिक संकट आले तरी करूच शकत नाही .क्षमा करा थोडेसे कठोर बोलतो आहे . परंतु औषध हे कडूच असते . लाखो मंदिरांचा चुराडा झालेल्या आपल्या देशामध्ये आपलेच लोक जेव्हा सांगतात की आहो सर्वकाही अलबेल आहे तेव्हा त्यांच्या खाड करून मुस्काटात पेटवून त्यांना जागे करावेसे वाटते . नावे सांगत नाही परंतु परिक्रमे मध्ये मला असले फालतू तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या प्रत्येक साधूचा मी असा काही पाणउतारा केलेला आहे की अक्षरशः त्यांनी माझ्या पायावर डोके ठेवून मला साष्टांग नमस्कार करून क्षमा मागितलेली आहे . स्थानिक राजकारणी लोकांकडून पैसे घेतल्यामुळे त्यांची लाचारी पत्करून त्यांच्या इच्छेनुसार असले पुळचट तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या आणि वर स्वतःला साधू म्हणवणाऱ्या  लोकांमुळेच इतक्या मोठ्या संख्येने भाविक भक्त असूनही आपला देश अजूनही माती खातो आहे ! सगळेच साधू असे नसले तरी देखील एखादा तरी साधू असा कसा काय असू शकतो ? हे खरे दुःख आहे .ती खरी वेदना आहे . कालाय तस्मै नमः असे म्हणून शांत बसणारा वर्ग असूही शकेल . परंतु काळाच्या नरड्यावर पाय ठेवून त्याला "बाबारे तू थोडावेळ थांब .आम्हाला अजून थोडे काम करू दे " असे सांगणाऱ्या पुण्यश्लोक धर्म भास्कर श्री शिवछत्रपतींची आम्ही लेकरे आहोत .बहुता दीसांचे माजले बंड । म्लेंछ दुर्जन उदंड । त्यांचे करुनी दुखंड ।राज्य करावे ॥ असे सांगत काळाच्या नरड्याला दोरी बांधून त्याला आपल्या सोबत फरफटत नेऊन भारत यात्रा करवणाऱ्या आणि तरुणांचे मजबूत संघटन उभे करून यवनांची सळो की पळो अवस्था करून टाकणाऱ्या समर्थ रामदासां चे आम्ही दास आहोत . भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या काठी हाणू माथा ॥ असे म्हणणाऱ्या तुकोबारायांचे आम्ही पाईक आहोत .  आपल्या अतिविक्राळ रूपाने ,खळाळत्या प्रवाहाने ,धडकी भरवणाऱ्या खोलीने पूर्व पश्चिम ऐस पैस वाहत दक्षिण भारतातील धर्म वाचवणाऱ्या नर्मदा मातेचे आम्ही परिक्रमा वासी आहोत ! धर्म वाचला तर सहिष्णुता वाचेल . धर्म वाचला तर संस्कृती वाचेल .धर्म वाचला तर भाषा वाचेल . धर्म वाचला तर परंपरा वाचतील . धर्म वाचला तर देश वाचेल . धर्म वाचला तर तुम्ही आम्ही वाचू . आणि धर्म वाचला तरच आपल्या पुढच्या पिढ्या वाचतील . त्यामुळे आधी धर्म वाचायला शिकावा . मग धर्म वाचवायला शिकावे . आणि मग धर्म वचनाप्रमाणे चालायला शिकावे . धर्मो रक्षति रक्षित: । अर्थात जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचेच रक्षण करतो . हे शास्त्र वचन नेहमी हृदयाशी बाळगावे . क्षमा करावी . थोडेसे भान हरवून अधिकार विसरून अधिकचे बोललो . परंतु हे बोल खोल खोल मनातून आलेले आहेत . हे वरवरचे बोलणे नाही . नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगतो . गुरुजींनी आम्हाला शिकवले आहे त्याप्रमाणे आजवर कधीही कुठेही बोलण्याचे भाडेखर्चाचे पैसे घेतलेले नाहीत . अगदी शालही स्वीकारली नाही आणि नारळ देखील घेतलेला नाही . केवळ आणि केवळ पोटतिडीक मांडलेली आहे . ही तळमळ ऐकीव माहितीतून आलेली नाही . सर्वसामान्य लोक ज्याला संसार संसार म्हणतात त्याची स्वतःच्या हाताने राख रांगोळी करून उभा भारत उघड्या डोळ्यांनी फिरून देव देश धर्माची परिस्थिती पाहून त्यानंतर अभ्यासातून बाहेर आलेली ही तळमळ आहे . कोणाचातरी अजेंडा पुढे रेटण्यासाठी घर चालवण्यापुरते पैसे घेऊन उभा केलेला हा बनाव नाही .भाषणासाठी , प्रवचनासाठी , कीर्तनासाठी पैसे घेणारी पोटार्थी जमात तुम्हाला हा तळमळीचा उपदेश कधी सांगणार नाही . जिथं पिकतं तिथं कधी विकत नाही . नद्या कधी पाण्याचे पैसे घेत नाहीत . सूर्य कधी सौर ऊर्जा टॅक्स लावत नाही . फुल कधी सुगंधावर सुगंध अधीभार लावत नाही .झाडे कधी फळांचे पैसे लावत नाहीत .गाय कधी दुधाचे मोल मागत नाही .त्याप्रमाणे स्वतःच्या आत्मचिंतनातून स्वतःचे अस्सल विचार उफाळून येतात त्याचे कोणी विचारवंत पैसे घेऊन विक्री करत नाही .त्यामुळे त्या भाष्याची खोली लक्षात घ्यावी . शत्रूचे शेण सारवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आपलं आयुष्य तथाकथित बुद्धिवंतांनी खर्ची घालू नये . अजूनही वेळ गेलेली नाही . शहाणे व्हावे . डोळे उघडे ठेवावेत . मेंदू जागृत ठेवावा . कान उघडे ठेवावेत . आपल्या धडावर आपलेच डोके ठेवावे . आणि थोरा मोठ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी टिकवून ठेवलेला समाजाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग असलेला आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षावा . वाचवावा . वाढवावा . समृद्ध करावा . नर्मदा मातेचे देखील हेच सांगणे आहे . कारण धर्म वाचला तोवर सिंधू नदी वाचली . धर्म बुडाला . तत्काळ सिंधू संस्कृती बुडाली . धर्म बुडाला आणि तत्काळ ब्रह्मपुत्रा बुडाली . धर्म वाचेल तरच नर्मदा वाचेल . धर्म बुडाला की ... नर्मदे हर !



पुढील लेखांक 

लेखांक एकशे सत्तावीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर