लेखांक ९३ : वाल्मिकी आश्रम बोरिया इथले अश्वत्थाम्याने स्थापन केलेले श्री माखणेश्वर शिवलिंग

दुपारी निघाल्यावर नर्मदा मातेच्या किनाऱ्याने जावे असा विचार करत असतानाच एका साधूने सांगितले की इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर अश्वत्थाम्याची तपोभूमी आहे . तिचे दर्शन अवश्य करावे . बोरिया नावाचे हे गाव आहे . इथे अश्वत्थामा स्वतः राहिलेला असून त्याने स्वतःच्या हाताने माखनेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केलेले आहे . इथून नर्मदा मातेचा तट केवळ तीन किलोमीटर आहे . आल्यासरशी या स्थानाचे दर्शन करावे असा विचार केला , आणि बोरिया बिस्तर उचलून डांबरी सडकेने चालत बोरिया गाव गाठले . गावामध्ये शेती आणि झाडी चांगली होती . अश्वत्थाम्याच्या कठोर तपामुळे महादेव त्याला इथे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या कपाळाला माखन लावले अर्थात लोणी लावले म्हणून या महादेवाचे नाव माखनेश्वर / माखणेश्वर किंवा नवनीतेश्वर असे पडले . (गुजराती मध्ये माखणेश्वर असे म्हणतात ) . त्यामुळे इथे असलेल्या शिवलिंगाला पाण्यासोबतच लोण्याने देखील लेप केला जातो . इथल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की याचा आकार दरवर्षी थोडा थोडा वाढत आहे . पूर्वी अतिशय छोटे असलेले हे शिवलिंग आता जलहरीच्या देखील बाहेर आलेले आहे . गणपतीपुळे मूळ गाव असलेले बडोद्याचे कमलाकर बापट नावाचे एक परिक्रमावासी वयाच्या २८ व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आले .त्यांनी शूलपाण्याची झाडी आणि तिथले कठीण लोकजीवन अनुभवले होते . त्यामुळे या भागातील मुलांसाठी काहीतरी भरीव कार्य करावे या हेतूने या मंदिरामध्ये ते राहिले आणि आपल्या सोबत आदिवासी मुलांना शिक्षणासाठी ते ठेवू लागले . हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली . आणि कमलाकर महाराज संपूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये लोकांना माहिती झाले . हा मनुष्य निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांची शिक्षणे मोफत करून देत आहे हे कळाल्यामुळे या परिसरातील जवळपास सर्व महत्त्वाच्या गावातील मुले इथे राहून शिकून गेली . आज या आदिवासी वस्तीगृहामध्ये २५० ते ३०० मुले शिकत आहेत .या वसतिगृहाला त्यांनी वाल्मिकी आश्रम असे नाव दिले . ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याप्रमाणे रानोमाळ भटकणाऱ्या , आणि कुसंगतीमुळे व्यसनाधीनतेकडे झुकणाऱ्या मूलतः तापट स्वभावाच्या आदिवासी मुलांचे शिक्षणाद्वारे कल्याण करण्याचे महत्त्वाचे कार्य कमलाकर महाराजांनी केले . त्यामुळे हे नाव समर्पक वाटते . या आश्रमाचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे . इथे प्रवेश घेण्यासाठी कुठलीही प्रक्रिया नाही . कुठलेही कार्यालय नाही . कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही . कुठलीही कागदोपत्री नोंद ठेवली जात नाही . ज्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी यावे , इथे राहावे , खावे , प्यावे , अभ्यास करावा आणि योग्य वाटेल तेव्हा निघून जावे .इतके सोपे गणित कमलाकर महाराजांनी ठेवलेले आहे ! महाराजांनी कुठलाही ट्रस्ट स्थापन केलेला नाही आणि कुठल्याही बँकेत त्यांचे खाते सुद्धा नाही . तरी देखील एवढ्या सार्‍या मुलांचे सर्व काही नर्मदा मैया करते आहे असा त्यांचा पक्का विश्वास आणि अनुभव देखील आहे .या आश्रमामध्ये पोहोचल्यामुळे मला जी काही धन्यता वाटली ती शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . 
मी आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा कमलाकर महाराज बाहेर गेले होते . यांचे वय आता ७५ च्या पुढे गेलेले आहे . परंतु कोणीतरी परिक्रमावासी आपल्या आश्रमामध्ये आलेला आहे हे पाहिल्याबरोबर चार-पाच मुले मला सामोरी आली . सर्वांनी मला नर्मदे हर केले आणि दंडवत प्रणाम केला . मी देखील सर्वांना नमस्कार केला . परस्पर देवो भव । त्यांनी मला मी कुठून आलो वगैरे विचारून घेतले . आज मुक्काम करणार आहे का असे न विचारता आज तुम्ही आमच्या सोबत मुक्काम करा अशी गळ मला घातली ! त्यांच्या या प्रथम दर्शनी प्रेमानेच मी पुरता भारावून गेलो ! वयाच्या नवव्या वर्षापासून मी वसतिगृहामध्ये राहून शिकलेलो आहे . त्यामुळे वस्तीगृहामध्ये कोणीतरी पाहुणे आले आणि त्यांनी आपल्याला लळा लावला की किती छान वाटते याचा अनुभव मी बालवयात घेतलेला आहे . ते गणित डोक्यात ठेवूनच माझे लहान मुलांशी वागणे आपोआप होत असते . मुलांनी माझी झोळी काढून घेतली आणि एका झाडाखाली ठेवली . आणि मला हातपाय धुवायला एका नळावर घेऊन गेले . एका मुलाने पटापट पायावर पाणी घातले एकाने हात धुवायला पाणी दिले . तोपर्यंत अजून एक मुलगा पळत आला आणि त्याने सांगितले की अश्वत्थामा इथे तप करायचा ! चला तुम्हाला मी ती जागा दाखवतो ! हे बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये इतका आत्मविश्वास आणि त्या जागेविषयी मालकी हक्क असल्यासारखा भाव होता की मला मौज वाटली ! सगळे लटांबर आणि मी माखणेश्वर मंदिरामध्ये आलो . महादेवाचे शिवलिंग अतिशय सुंदर होते . यापूर्वी केदारनाथ येथील शिवलिंगाला तूप चोळण्याचा अनुभव मी घेतला होता . केदारनाथचा प्रलय झाल्यानंतर अक्षरशः दोनच महिन्यांनी मी तिथे गेलो होतो . आणि निसर्गाने केलेला भयंकर विध्वंस याची देही याची डोळा पाहिला होता . तेव्हा तर तिथे जाणारा रस्ता देखील वाहून गेल्यामुळे सुरू झालेला नव्हता . आता जी काही बांधकामे पायऱ्या वगैरे दिसतात त्यातील काहीच नव्हते . फक्त भारतीय लष्कराने उभे केलेले तात्पुरते तंबू आणि एक छोटासा हेली पॅड होता . फक्त हेलिकॉप्टरने जाता येत होते . त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती . बराच वेळ मी त्या गाभाऱ्यामध्ये बसून राहिलो होतो . आणि त्या शिवलिंगाचा स्पर्श अगदी परिचयाचा झालेला होता . १००% तसाच स्पर्श या माखनेश्वर शिवलिंगाचा होता .
केदारेश्वराचे शिवलिंग म्हणजे रेड्याच्या वशिंडाचा भाग आहे असे मानले जाते . त्याची आख्यायिका थोडक्यात सांगतो . पांडव स्वर्गाला जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितले की या क्षेत्रामध्ये महादेवांचा वास आहे . परंतु महादेवांना काही कारणामुळे पांडवांना दर्शन देण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे त्यांनी एका रेड्याचे रूप घेतले . आणि हजारो रेड्यांचा एक कळप चरत होता त्यात ते शिरले . पांडवांना महादेवांचे दर्शन घेण्याची इच्छा असल्यामुळे भीमाने युधिष्ठराला विचारले की आता महादेवांना ओळखायचे कसे ? त्यांनी सांगितले की या कळपातील एक रेडा म्हणजे महादेव आहेत तरी तू अशी काहीतरी युक्ती कर ज्यामुळे तुला त्यातील महादेव कोण आहेत ते लक्षात येईल . भीमाने दोन डोंगरांवर पाय ठेवून त्याच्या पायाखालून नकुल आणि सहदेव यांना ,सर्व रेड्यांना हाकलायला सांगितले . सर्व रेडे पळाले परंतु महादेव काही त्याच्या पायाखालून जायला तयार होईनात . हेच महादेव होते परंतु भीमाला हा रेडा आपल्या पायाखालून जात नाही यामुळे राग अनावर झाला आणि त्याने गदेचा प्रहार जोरात त्या रेड्याच्या पाठीवर केला . त्यामुळे हे महादेव भूमिगत झाले . आणि केवळ त्यांचे वशिंड शिल्लक राहिले . डोके जमिनीत घुसून नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात बाहेर आले . आणि शेपटीचा भाग पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर कुठेतरी बाहेर आलेला आहे . तो आता मुस्लिम देश झाल्यामुळे ते मंदिर नष्ट झाले . परंतु केदारनाथ अजून शिल्लक आहे . नंतर सर्वांना पश्चाताप झाला आणि महादेवांना पाठीला लागले असेल म्हणून तूप चोळायला सर्वांनी सुरुवात केली . आजही ती प्रथा कायम आहे . मी स्वतः अनुभव घेतला आहे की कितीही तूप चोळले तरी हे शिवलिंग त्या तुपाला शोषून घेते . आणि क्षणात तुमचे हात पुन्हा पहिल्यासारखे स्वच्छ होतात . अगदी तशीच अनुभूती माखणेश्वर महादेवाच्या इथे येते .कितीही लोणी लावले तरी ते शोषून घेतले जाते . आणि हाताला मेंचटपणा राहत नाही .अर्थात माझ्याकडे लोणी नव्हते त्यामुळे मला स्वतःला हे करण्याचे भाग्य लाभले नाही . मी मुलांशी गप्पा मारू लागलो . इतकी अफाट माहिती या मुलांना आहे की विचारू नका . मी येताना कुठल्या कुठल्या मार्गाने आलो ते त्यांना सांगितले आणि माझ्या असे लक्षात आले की इथल्या प्रत्येक मुलाचे भूगोलाचे ज्ञान अफाट आहे . जवळपास प्रत्येक मुलाला आसपासच्या प्रत्येक गावाची नावे माहिती होती . मी एखाद्या गावाचे नाव घेतले की त्या गावातील मुलाला धावतच जाऊन हजर केले जायचे ! मुळात वरती वसतिगृहामध्ये असलेल्या मुलांमध्ये देखील हा नवीन प्राणी कोण आला आहे त्याला भेटावे अशी उत्कंठा आहे हे माझ्या लक्षात आले . त्यामुळे मुलांना घेऊन मी स्वतः वरती त्यांच्या निवासस्थान असलेल्या खोल्यांमध्ये गेलो . मी आत मध्ये येतात मुलांना काय करू आणि काय नाही काय दाखवू आणि काय नाही असे झाले ! मुलांनी त्यांनी केलेले प्रकल्प दाखवायला सुरुवात केली . कोणी शाळेतल्या वह्या दाखवल्या . कोणी तोडून आणलेली फळे दाखवली . कुणी गोळा केलेल्या बिया दाखवल्या . कोणी फक्त समोर येऊन हसून दाखवले ! सगळी मुले माझ्या मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेली होती ! त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून गालावरून हात फिरवला की त्यांना खूप बरे वाटत होते ! आई-वडिलांपासून दूर राहून सरकारी शाळेत जाऊन शिकणारी ही मुले त्यांच्या उपजत कुतूहलापोटी आणि चौकसपणामुळे माझ्या भोवती गराडा करून बसली ! इथल्या जवळपास प्रत्येक मुलाने मला येऊन मिठी मारली ! लवकरच त्यांच्या लक्षात आले की हा परिक्रमावासी हाड हुड करणारा नसून प्रेमळ आहे . माझ्याकडे उरलेल्या सर्व गोळ्या मी इथे वाटून टाकल्या . प्रथेप्रमाणे चित्रकलेचा वर्ग सुरू झाला . इथल्या मुलांनी मोठ्या प्रमाणात माझ्याकडून चित्रं काढून घेतली . शहरी मुलांमध्ये मुख्यत्वे पालकांकडून शिकवण्यात झालेल्या चुकीमुळे आलेली एक आपापसातील चढाओढ या मुलांमध्ये कुठेही दिसत नव्हती . आधी माझेच चित्र काढा वगैरे कोणीही मला म्हणाले नाही तर मी ज्या क्रमाने वह्या हातात घेईन , त्या क्रमाने चित्रे काढून घेण्यात मुलांनी धन्यता मानली ! हा गुण किती शिकण्यासारखा आहे विचार करून पहा ! मुख्य म्हणजे इथे मुलांना शिकवणारे कोणीही नाही . मुलांनी संपूर्ण वस्तीगृहाचा परिसर मला फिरवून दाखविला . खाली मोठे स्वयंपाक घर आहे . त्याच्यामध्ये भांडीकुंडी आणणे , ती लावणे , ती वापरून , घासून ठेवणे , स्वयंपाक करणे , त्याची पूर्वतयारी करणे , केलेला स्वयंपाक वाढणे , ही सर्व कामे मुले स्वतः आपापल्या इच्छेने आणि आपापल्या जबाबदारीने आवडीनुसार करतात . त्यासाठी कुठलीही नियमावली नाही किंवा कुठलेही बंधन कोणावरही नाही . मी आतापर्यंत अनेक वसतिगृहे पाहिली आहेत . अक्षर भारती नावाची एक संस्था स्थापन झाल्यापासून मी तिचा संस्थापक सदस्य होतो . ५० जणांनी मिळून चालू केलेले हे कार्य पुढे इतके वाढत गेले की आम्ही जवळपास ४०० पेक्षा अधिक ग्रंथालयं , ७ राज्यात त्या काळात उभी केली होती . आणि यातील प्रत्येक ग्रंथालयाचे मूल्य चाळीस हजार ते एक लक्ष रुपये इतके  होते . यानिमित्ताने अनेक शाळांची आणि वसतिगृहांशी माझा संबंध यायचा . मी वैयक्तिक देखील अनेक आदिवासी वसतिगृहांमध्ये जाऊन राहिलेलो आहे . पुण्यातील वेल्हा ज्याचे नाव आता राजगड तालुका झाले आहे त्या वेल्हा गावातील संघसंचलित वनवासी मुलांचे वसतीगृह देखील असेच खूप सुंदर आहे . अतिशय सेवाभावी वृत्तीने हे चालवले जाते . परंतु त्या प्रत्येक वस्तीगृहाची थोडीफार काहीतरी शिस्त असायची . इथे कुठलाही नियम नसून मुलांमध्ये असलेली स्वयंशिस्त पाहून मी अक्षरशः अचंबित झालो ! संध्याकाळ झाल्यावर मुलांनी आपण होऊन आश्रमाची स्वच्छता सुरू केली . झाडू किंवा हातात मिळेल त्या झाडाची फांदी घेऊन अक्षरशः पाचच मिनिटांमध्ये संपूर्ण परिसर मुलांनी एकदम चकाचक करून टाकला .हे करा असे त्यांना कोणीही सांगितलेले नव्हते परंतु एक कोणीतरी करतो आहे पाहिल्यावर बाकीची लहान मुले त्याचे अनुकरण करत आणि अशा पद्धतीने हे संस्कार ही परंपरा पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केली जात होती . आपल्या घरी देखील लहान मुले असतील तर आपण हा प्रयोग करून पहावा की त्यांना अमुक एक गोष्ट कर असे सांगण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपण ती गोष्ट केली तर मुले अधिक सहजतेने त्याचे अनुकरण करतात कारण तो त्यांचा मूळ स्वभाव आहे . 
वाल्मिकी आश्रमातील मुलांसमवेत प्रस्तुत लेखक
स्वयंस्फूर्तीने हातात मिळेल त्या फांदीच्या साह्याने झाडलोट करताना आदिवासी मुले . मला बळेच देखरेख करायचे काम त्यांनी सोपवून दिले !
आपल्या देशाची खरी संपत्ती जर काही असेल तर ती म्हणजे अशी सद्वर्तनी मुले आहेत
प्रत्येक मुलगा स्वतंत्रपणे काही ना काही करत आहे हे वरील चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल
मुलांनी आश्रम फिरवून दाखवता दाखवता माझ्याकडून परिक्रमेची भरपूर माहिती विचारून घेतली . इथली सर्व व्यवस्था कोण पाहते असे विचारल्यावर त्यांनी प्रकाश दादा असे नाव सांगितले . याच आश्रमामध्ये शिकून बाहेर पडलेला प्रकाश नावाचा विद्यार्थी आता सपत्नीक तिथे राहून या सर्व मुलांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत होता . थोड्याच वेळात प्रकाशदादा आले . मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आश्रमाची कार्यपद्धती समजून घेतली . मला प्रकाश दादाशी बोलल्यावर कमलाकर महाराजांना भेटण्याचे वेध लागले . गेली ५० - ६० वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये असून या माणसाबद्दल तुम्हाला कुठेही काहीही लिहायला वाचायला पाहायला मिळणार नाही . त्यांचा साधा एक फोटो किंवा एखादा व्हिडिओ सुद्धा सापडणे दुरापास्त आहे . 
मोठ्या कष्टाने मला ही एक बातमी मिळाली . यावर कमलाकर महाराजांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे . आदिवासी मुलांचे टोकाचे कल्याण करणाऱ्या या लोकोत्तर महात्म्याला शतशत नमन !
अखेरीस माझी महाराजांना भेटण्याची तळमळ पाहून प्रकाश तडवी यांनी महाराजांना फोन लावला आणि बोलावून घेतले . कमलाकर महाराज त्यावेळी फोनवर माझ्याशी बोलले आणि म्हणाले की प्रत्यक्ष भेटून बोलूयात .मी येईपर्यंत आश्रम सोडू नका. आता सुद्धा मी प्रकाशभाई तडवी यांचा क्रमांक कमलाकर महाराजांकडून घेतला आणि त्यांना बँकेच्या माहितीकरता संपर्क केला तेव्हा त्यांना हा प्रसंग आठवला . 
आमच्या नुकत्याच झालेल्या इ संभाषणाचा काही भाग !
हजारो परिक्रमावासी या आश्रमांमध्ये येत असतात . त्यातून एखादी व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवते तेव्हा ती नर्मदा मातेचीच कृपा !

आपणही कमलाकर महाराजांना संपर्क साधण्याऐवजी थेट प्रकाश भाई तडवी यांच्याशी संपर्क करू शकता . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे .
प्रकाशभाई तडवी : ९७ २७ ८८८ ३१५
इच्छुक देणगीदारांसाठी बँकेची माहिती खालील प्रमाणे .
BOB KEVDIA COLONI
VALMIKIASHRA
A/C NO....13280100013558
IFSC ....BARB0KEVADI
(कृपया देणगी दिल्यावर तसे प्रकाशभाई यांना व mazinarmadaparikrama@gmail.com वर कळविणे ही नम्र प्रार्थना म्हणजे आपल्या यादीमध्ये नाव जोडता येते . . .)
या मुलांची संध्याकाळी शाखा लागते . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेल्यामुळेच कमलाकर महाराज या अध्यात्मिक मार्गाकडे वळले होते . संघासाठी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित राहिलेले आहे . परंतु त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनामध्ये देखील त्यांनी संन्यस्त वृत्तीचा स्वीकार केलेला आहे . त्यामुळे तोच संस्कार या मुलांना देखील मिळावा यासाठी प्रथम पासून येथे शाखा लागते .शाखेचे अप्रतिम संचालन मुलेच करतात . इथे एक सुंदर असा तीन मंदिरांचा समूह आणि त्यामुळे बांधलेला कट्टा होता . त्या कट्ट्यावर बसून मी संपूर्ण शाखा आणि त्यांचे खेळ पाहिले . महादेवाच्या मंदिरासमोर एक झोपाळा होता . त्यावर देखील मुलांसोबत गप्पा मारत बसलो . याखेरीज एका बाजूला भव्य दिव्य असे व्यासपीठ बांधण्यात आलेले आहे . तिथे सुद्धा मुले मला घेऊन बसली . या मुलांना मला कुठे नेऊ आणि कुठे नको असे झाले होते . या मुलांचे शेतीतले वनस्पतींचे आणि पर्यावरणाचे ज्ञान पाहून मी अचंबित झालो . विशेषतः या मुलांना कुठलेही बंधन नसल्यामुळे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा कुठेही जायचे त्यांना स्वातंत्र्य होते . आदिवासी समाज हा मुळात स्वतंत्रपणे जगणारा आहे .त्यांना बंधनामध्ये जगणे आवडत नाही म्हणून तर त्यांनी शहरे ,नगरे ,गावे यांचा त्याग करून डोंगरदऱ्या राहण्यासाठी निवडल्या . अशा स्थितीमध्ये त्यांना शिक्षणाच्या नावाखाली पुन्हा बंधनामध्ये अडकवणे कमलाकर महाराजांना पटणारे नव्हते . आणि हे केवळ बोलण्यात नव्हे तर वास्तवात आणलेले दिसत होते ! मी माझी संध्याकाळची उपासना करून घेतली . आणि साक्षात भगवंत आलेच ! कमलाकर महाराज आल्याबरोबर मुलांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मी स्वतः पाहिले ! मी देखील वस्तीगृहामध्ये राहिलो आहे . आमचे रेक्टर आले की आमच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जायचा आणि हातपाय थरथर कापायला लागायचे ! इतकी त्यांची दहशत होती . इथे मात्र बरोबर उलटे चित्र होते . कमलाकर महाराज आल्याबरोबर मुलांनी त्यांना गराडा घातला . ते कुठे गेले होते काय काय करून आले अशा प्रश्नांची सरबत्ती केली . महाराजांनी देखील न कंटाळता न थकता सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . महाराजांची खोली म्हणजे उघडी तिजोरी होती ! आओ जाओ घर तुम्हारा ! ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे अशी मुले त्यांच्या खोलीत येऊन अभ्यास करत बसली होती .ज्या मुलांना झोप येत नाही ती मुले इथे येऊन झोपू शकतात . काही मुले तर महाराज आले तेव्हा त्यांच्या बेडवर आधीच झोपलेली होती ! तरी देखील महाराज त्यांना काहीही बोलले नाहीत ! मी महाराजांना साष्टांग नमस्कार केला . भगवे कपडे घातलेले अनेक लोक परिक्रमेमध्ये भेटतात . परंतु या भगव्या कपड्याचे सामर्थ्य जाणून आणि जबाबदारी पेलून त्याची गरिमा वाढवणारे फार थोडे लोक असतात त्यातील एक कमलाकर महाराज निश्चितपणे होते ! महाराजांनी मला भरपूर वेळ दिला . माझ्या सर्व बालिश आणि मूर्खपणाच्या प्रश्नांची उत्तरे दिली . आदिवासी शिक्षण या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच त्यांनी बदलून टाकला ! शहरामध्ये राहून किंवा नागरिकरणा मध्ये राहून शिक्षणाविषयी काही ठोकताळे आपल्या मनामध्ये बसलेले असतात त्यातील एकही या भागात चालणारा नसतो . मुलांना मुक्त वातावरण मिळवून देणे आणि चांगले पोषण देणे , त्यांचा शारीरिक , मानसिक , बौद्धिक , भावनिक आणि अध्यात्मिक विकास करणे हेच अधिक महत्त्वाचे आहे . एकदा हे ध्येय निश्चित झाले की मार्ग कुठलाही असू शकतो . बरेचदा असे होते की ध्येय मागे पडून मार्गाच्या नियमांमध्येच आश्रम शाळा आणि वसतीगृहे अडकत जातात . एखादी गोष्ट का करायची यापेक्षा कशी करायची यात अडकून पडले की असे होते . परंतु इथे मात्र कमलाकर महाराजांनी असामान्य बुद्धीचातुर्याने सर्व मॉडेल उभे केलेले होते ! माझी अशी विनंती आहे की ज्यांना ज्यांना वसतिगृह चालवण्याची इच्छा आहे किंवा आधीचीच वसतिगृहे जे लोक चालवत आहेत त्यांनी नक्की वाल्मिकी आश्रमाला एकदा भेट देऊन त्यांचे मॉडेल समजावून घ्यावे .
आपल्याला एकदा या आश्रम शाळेची फेरी करवितो .
गुगल नकाशा वरून साभार प्राप्त झालेली खालील छायाचित्रे आपल्याल वाल्मिकी आश्रमाचे यथार्थ दर्शन घडवतील .
बोरिया किंवा बोडिया गावाच्या चौकातून अतिशय गर्द वनराजीतून जाणारा एक छोटासा रस्ता आपल्याला या आश्रमात घेऊन येतो . 
वाल्मिकी आश्रमाची मुलांनीच बांधलेली आणि सांभाळलेली नवीन इमारत
खाली भोजन सभागृह आहे आणि वरती मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे .
इथे कमलाकर महाराजांची खोली असून तिला महाराजांची खोली म्हणणे चुकीचे आहे कारण त्या खोलीमध्ये त्यांच्यापेक्षा अधिक काळ मुलेच फिरत असतात . मुलांना इथे अक्षरशः कुठलेही बंधन नाही आणि कुठलीही गोष्ट करू नकोस असे कोणी ऐकवत नाही . तरीदेखील मुले स्वयंशस्तीने राहतात आणि कुठलाही अपराध कधीच करत नाहीत हे खरोखरच कौतुकास्पद आहे .
गरुडेश्वर आणि शूलपाणेश्वर या दोन मंदिरांपासून समान अंतरावर आणि सरळ रेषेत वाल्मिकी आश्रम आहे . 
या माखणेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार कमलाकर महाराजांनी केलेला असून या परिसरातील सर्व मंदिरांची पूजाअर्चा आदिवासी मुलेच करतात . 
मंदिराशेजारी असलेल्या याच हातपंपावर मुलांनी मला हात पाय धुवायला मदत केली ! 
आश्रमाच्या शेजारीच मंदिर आहे . समोर प्रचंड झाडी आहे . मोठी मोठी झाडे सतत सावली धरून आहेत .
विशेषतः काही झाडे नजरेत भरण्याइतकी मोठी आहेत .इथली आदिवासी मुले लीलया या झाडांवर चढतात आणि खेळत असतात .
हेच ते मोठे व्यासपीठ जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि मुलांनी माझ्याबरोबर काही काळ इथेच गप्पा मारल्या .
मंदिरासमोरील या झोपाळ्यावर बसून मुलांशी अनेक विषयांवर चर्चा करता आली
वाल्मिकी आश्रमाची इमारत अत्यंत मजबूत असून ३०० मुले इथे आरामात राहू शकतात अशी सोय केलेली आहे .
मुलांसाठी फोमच्या आरामदायक गाद्या बनविलेल्या असून जमिनीवरती त्या अंथरून मुले झोपतात
प्रत्येकाने आपापला एक पेटारा आणलेला असतो ज्यात त्याचे सामान कुलुप बंद ठेवलेले असते .
यातही कुठलेही बंधन नसते कोणीही आपले समान कुठल्याही कप्प्यात ठेवू शकते . आदिवासी समाजामध्ये एक उपजत शिस्त असते त्यामुळे त्यांना प्राधान्य किंवा ठरलेली जागा वगैरे द्यावी लागत नाही ते आपोआप स्वतःमध्ये तडजोड करून सर्व काही वाटून घेतात .
अशी दोन मोठी मोठी दालने आहेत . शिवाय अनेक छोट्या मोठ्या खोल्या देखील आहेत . प्रकाश भाई तडवी आणि त्यांची पत्नी मुलांची पोटच्या पोराप्रमाणे देखभाल करतात .
इथे सायं शाखा लागते . उपस्थिती अजिबात अनिवार्य नाही . परंतु तरीही सर्व मुले स्वेच्छे ने सहभागी होतात . 
शाखेमध्ये विविध खेळ घेतले जातात . यातून आपोआप मुलांचे अंगभूत गुण बाहेर पडतात आणि गटकार्य करण्याची सवय तसेच नेतृत्व देखील विकसित होते .
मुलांना ही शाखा खूप आवडते असे माझ्या लक्षात आले .
ह्याच कट्ट्यावर बसून मी हा सारा खेळ पाहत होतो . हा कट्टा यज्ञकुंड सारे मुलांनी तयार केलेले आहे .
इथली पूजा अर्चा देखील मुलेच पाहतात .या मुलांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे . आणि श्री कमलाकर महाराज यांना द्यावेत तितके धन्यवाद अपुरे आहेत .
रात्र पडली तशी सर्व मुले आपण होऊन अभ्यासाला लागली . मी कमलाकर महाराजांच्या खोलीमध्ये त्यांच्या चरणाशी बसून त्यांचा सत्संग अनुभवला.
रात्री मुलांनीच  बनविलेल्या भोजन प्रसादाचा आस्वाद मुलांसोबतच घेतला . वाढायला सुद्धा मुलेच असतात .
इथे रात्री अश्वत्थामा महादेवांच्या दर्शनासाठी येतो असे मुलांनी मला सांगितले . त्यामुळे त्या मंदिरामध्ये झोपावे आणि अश्वत्थाम्याचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा होती . परंतु मुलांनी मला तसे करू दिले नाही . म्हणजे मी झोपताना मंदिरातच झोपलो . परंतु महादेवाच्या आणि दरवाज्याच्या मध्ये नाही झोपलो . रात्री जागे राहून बाबाजी भेटतात का पहावे असा विचार मी केला परंतु दिवसभर झालेल्या बौद्धिक थकव्यामुळे पाठ टेकताच क्षणात झोप लागली . पहाटे उठल्यावर महादेवाची पूजा झालेली आहे असे माझ्या लक्षात आले . या महादेवाच्या पिंडीचा आकार कमलाकर महाराज येथे आले तेव्हापेक्षा आता खूपच अधिक मोठा झालेला आहे हे स्वतः महाराजांनी मला सांगितले . असे अजूनही काही देव आपल्या देशामध्ये आहेत . उदाहरणार्थ मीनाक्षी मंदिर मदुराई येथे खांबावर असलेला एक मारुती गेली अनेक वर्षे हळूहळू मोठा होत चालला आहे . वाईचा ढोल्या गणपती देखील यासाठी प्रसिद्ध आहे . तसेच काहीसे या शिवलिंगाचे होते . नर्मदा परिक्रमा आणि अश्वत्थामा असे एक समीकरणच आता झालेले आहे . माझी परिक्रमा नर्मदा मातेच्या कृपेने पूर्ण झाली असे कळाल्याबरोबर सर्वात पहिला प्रश्न हाच विचारला जायचा की तुम्हाला अश्वत्थामा भेटला का ! अश्वत्थामा भेटला की नाही माहिती नाही परंतु अश्वत्थाम्याला स्वतःचा शोध ज्या ठिकाणी लागला ते ठिकाण मात्र मी नक्की पाहिले ! आणि तेच हे बोरियाचे श्री माखणेश्वर महादेव मंदिर !
पहाटे लवकर उठून महादेवाची स्तवने गायली आणि महाराजांची आज्ञा घेऊन प्रस्थान ठेवले . आज बाणा सारख्या सरळ रेषेत चालल्यावर मी पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठावर पोहोचणार होतो . इथे समोर गरुडेश्वर होते आणि अलीकडच्या काठावर वरुणेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र होते . नर्मदा मातेचे एक वेगळे च रूप इथे पाहायला मिळणार होते . मला कधी एकदा नर्मदा मातेमध्ये डुबकी मारतो असे झाले होते ! त्यामुळे मी अश्वत्थाम्याच्या तपोभूमीला रामराम गेला ! आणि पायांना गती दिली . 





लेखांक त्र्याण्णव संपूर्ण (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर