लेखांक ५५ : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण , चतुर्मुख महादेव भोला आणि घोघरा

आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही . लहान मुल सतत आईच्या पदराचा काठ धरून चालते पहा तसे काहीसे माझे होते ! मला इथे फार कुणाला भेटण्याची इच्छा नव्हती . म्हणून माईचा काठ धरून चालत राहायचो . आपल्या मनातल्या या सर्व इच्छा नर्मदेला वेळोवेळी कळत असतात . याची अनुभूती मला काही मिनिटातच आली ! कारण आज मी जो मार्ग पकडला होता त्याने कोणीच जात नाही . काही अंतर झाडाझुडपातून चालल्यावर थोडीफार शेती लागली . आणि अचानक एक मोठी नदी समोर आडवी आली . नंतर पार केल्यावर मला कळाले की तिचे नाव इंद्रावती होते . नदी एका सरळ रेषेमध्ये येऊन नर्मदेला काटकोनामध्ये मिळत होती . इथे नर्मदेचे पात्र देखील रुंद खोल आणि धीर गंभीर आहे . या नदीचे पात्र देखील खूप खोल आहे असे वाटत होते . हिच्या पाण्याला खूप गती होती . हा परिसर नक्की कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून या भागाची उपग्रह प्रतिमा सोबत जोडत आहे .
हा आहे नर्मदा इंद्रावती संगम . चित्रामध्ये दिसणारी वाळू देखील त्यावेळी पाण्याखाली होती . म्हणजे पाण्याची पातळी थोडी वाढलेली होती . दोन्ही नद्या खोल आहेत हे नकाशात सुद्धा लक्षात येत आहे . इंद्रावती नदीच्या समोरच्या बाजूला जंगल आहे .
आता मला ही नदी ओलांडणे क्रमप्राप्त होते . मी नदीचा अंदाज घेऊ लागलो . नदी अतिशय खोल होती आणि पाण्याला फार गती होती . पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती . आणि पाणी थोडेसे गढूळ होऊन दृश्यमानता कमी झाली होती .अशा परिस्थितीमध्ये नावे ने नदी ओलांडणे सुद्धा अवघड असते . मी पाहू लागलो की आजूबाजूला कोणी केवट , कोळी ,शेतकरी ,गुराखी किंवा गावकरी दिसतो आहे का .परंतु हा संपूर्ण परिसर अतिशय निर्मनुष्य होता . बहुतेक मला कुठलाही जनसंपर्क नको असे म्हणून मी काठाने चालत असल्याचा हा परिणाम असावा ! नर्मदा मैयाने माझी परीक्षा पाहायचे ठरविले होते ! दहा मिनिटे झाली , पंधरा मिनिटे झाली , वीस मिनिटे झाली .अखेरीस अर्धा तास मी तिथे वेड्यासारखा एकटाच उभा राहिलो ! आता मात्र माझ्या संयमाचा अंत होऊ लागला . इतका वेळ झाला तरी कोणीच तिथे येत नाही हे पाहून मला काय करावे ते सुचेना . अखेरीस मी नर्मदा मातेला म्हणालो , " हे पहा मी तुझ्या काठाने चालणार आहे हे तर निश्चित आहे . तू कितीही संकटे टाक किंवा अडथळे उभे कर . मी तुझा किनारा सोडणार नाही . मला सुरक्षित पुढे नेणे ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे . वेळोवेळी तू माणसे पाठवून मला मार्गदर्शन करते सुद्धा आहेस . परंतु आज तुला काय झालेले आहे माहिती नाही ! " वाचकांनो मी खरोखरीच नर्मदा माते शी असा संवाद करायचो . अगदी वैखरीमध्ये म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचो . कोणाला काय वाटेल ?कोण आपल्याला काय म्हणेल ? याची फिकीर मी एरवी सुद्धा करत नाही , तर तिथे करण्याचा प्रश्नच नव्हता . " मी गेले अर्धा तास इथे उभा आहे . तू मला मार्गदर्शन केलेले नाहीस . आता मी माझे स्वतःचे डोके वापरून ही नदी पार करणार आहे . माझे काय व्हायचे ते होऊ दे . ती आता सर्वस्वी तुझी जबाबदारी राहणार आहे . मला जर काही बरे वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी नर्मदा मातेची असणार आहे ! ऐकून ठेवा रे झाडांनो ! मै आ रहा हू नर्मदा मैया ! " अशी जोरात आरोळी ठोकून मी काठी टेकत-टेकत पुढे सरकू लागलो . वाळूचा एक तीव्र उतार इंद्रावती नदीमध्ये निर्माण झाला होता . खरे तर काठावरील वाळूचा उतार पाहून नदीची खोली सहजपणे काढता येते . परंतु अजून पर्यंत मला इतक्या मोठ्या नद्या फारशा लागल्याच नव्हत्या .त्यामुळे हा अंदाज मला इथे असताना आलेला नव्हता ,हे मान्य करतो . वाळूचा उतार जर तीव्र खोल असेल तर याचा अर्थ नदी खोल असते . आणि अतिशय तिरपा ,कमी कोनाचा उतार आहे म्हणजे ती नदी उथळ असते .  हा उतार साधारण ६० अंश कोनाचा होता . त्यामुळे त्या वाळू ने लगेच तिचा रंग दाखवला . एका क्षणात मी भसकन गुडघाभर खोल पाण्यात गेलो . पाण्याची ओढ आता जाणवू लागली . मी काठीने पुढची जमीन चाचपत होतो .आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत होतो . या नदीमध्ये प्रचंड पाण गवत आणि शेवाळे वाढलेले होते . त्याची पाती पंधरा-वीस फूट पर्यंत लांब होती . ती पायाच्या भोवती वळवळ करत होती . जणू काही साप पायाला विळखा घालतो आहे असे वाटायचे . हळूहळू पुढे सरकताना अखेरीस शेवाळ्याच्या जाळ्यांनी माझे पाय पूर्णपणे जखडून गेले . एक मन सांगत होते अजूनही मागे फिर आणि कोणाची तरी वाट बघ . एखादा नावाडी येईल . तो तुला नावेने पलीकडे सोडेल . परंतु मी जर असे केले असते तर तो नर्मदेवर दाखविलेला अविश्वास ठरला असता . तिला मी एकदा शब्द दिला होता की तुझ्या जीवावर मी आता नदी पार करणार आहे .तर ती पार करणे हे माझे कर्तव्य होते . मला तारायचे का मारायचे हा तिचा प्रश्न होता ! 'द बॉल वॉज इन हर कोर्ट नाऊ ! ' पायाखाली वाळू होती . परंतु ती नदीच्या वेगवान प्रवाहामुळे पुढे पुढे सरकत होती . समुद्रामध्ये जशी पायाखालची वाळू लाटांमळे सरकून जाते तसे काहीसे होत होते . मी साधारण ४० टक्के नदी पार केली असावी . आता पाण्याला प्रचंड ओढ होती . पाणी इतके काळे होते की तळ अजिबात दिसत नव्हता .उलट हलणाऱ्या त्या पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते . नर्मदेचे पाणी इतके शुद्ध आहे की दहा दहा फूट खोल काय आहे ते सुद्धा स्पष्ट दिसते . इथे मला दहा इंचावर देखील काय आहे कळत नव्हते . माझे मन हळूहळू कच खाऊ लागले . आणि माझ्या लक्षात आले की आपला निर्णय चुकला आहे . कारण नदीची खोली अजून वाढतच चालली होती . आणि माझ्या पाठीवर तर झोळी वगैरे सर्व होते . आता मी मुंगीच्या गतीने पावले पुढे सरकवू लागलो . परत फिरता येणे आता अशक्य होते . कारण पायांना शेवाळ्याच्या पानांचे प्रचंड विळखे पडले होते . मी मनामध्ये अचानक काही संकट आले तर काय काय करता येईल याचा विचार करू लागलो . परत फिरता येणे हा एक पर्याय होता .परंतु तो खूप कठीण होता . कारण पाण्याला प्रवाह इतका जबरदस्त होता की ते करताना मी पाण्यामध्ये पडलो असतो . शिवाय वळताना शेवाळ्याने पायाला अजून घट्ट विळखा घातला असता तो वेगळाच . विचार करता करता माझ्या लंगोटीला इंद्रावती नदीच्या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला . आणि माझ्या लक्षात आले की आता माझा पाय खरोखरीच खोलात पडलेला आहे . पोहत पलीकडे जावे हा एक उपाय होता परंतु पाण्याला गती असल्यामुळे ते अवघड होते . पाण्याची गती इतकी जबरदस्त होती की पाण्याने मला थेट नर्मदेमध्ये नेले असते आणि माझी परिक्रमा खंडित झाली असती . शिवाय पाठीवर असलेल्या पिशवीचे ओझे प्रचंड होते . तशी ती पाठीवर ठेवून पोहता येणे अशक्य होते . आता काय करावे असा विचार करत मी तिथे उभा होतो . एक शेवटचा उपाय म्हणून पुढे वाळू किती खोल आहे ते तपासावे असे मी ठरवले . माझे द्विधा अवस्थेमध्ये असलेले मन स्वतःला शिव्या घालू लागले . कुणी सांगितलं होतं नसता द्रविडी प्राणायाम करायला !शांतपणे बसला असतास काठावर तर काय मेला असता का ? आता कोण वाचवणार तुला ? दुसरे मन सांगत होते .गप रे ! नर्मदा मैया आहे ना ! बिनधास्त जायचे ! जे होईल ते होईल ! फार फार तर काय होईल ? नर्मदे मध्ये बुडून मृत्यू येईल ! ह्याच्यासारखी पुण्यदायक घटना अजून काय असू शकते !  मी थोडेसे पुढे वाकून काठी खाली घुसवली ! आणि माझे डोळेच पांढरे झाले ! काठी भसा भसा भसा तीन साडेतीन फूट आत मध्ये गेली ! अगदी सरळ घुसली ! तिला कुठलाही अडथळा नाही ! विरोध नाही !काही नाही ! याचा अर्थ माझ्या पायाखालची कडक वाळू आता संपली होती आणि मऊ शार गाळमाती सुरू झाली होती ! लाखो वर्षे नद्यांनी डोंगराचे कडे घासून गोळा केलेले बारीक मातीचे कण असतात ते ! त्याची बरोबरी जगातली दुसरी कुठलीच माती करू शकत नाही ! या माती इतके सूक्ष्म काहीही नसते ! अचानक माझ्या पायाखालची वाळू ठप्प करून तुटली आणि माझे पाय गुडघाभर खोल गाळात रुतले ! एका क्षणात झालेल्या या प्रकारामुळे मी गांगरून गेलो . माझे पाठीवरील दप्तर सहा इंच पाण्यामध्ये बुडलेले होते . आणि आत मध्ये ठेवलेले सर्व काही भिजू लागले . मी काठीने आधार घ्यायचा प्रयत्न केला . परंतु कुठेही खोचली तरी काठी खोल खोल आत मध्ये जात होती . इकडे माझ्या असे लक्षात आले की हळूहळू मी खाली खाली चाललो आहे . मी एक पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की दुसरा पाय खोल जायचा आणि पुन्हा बाहेर नाही यायचा . इतका तो चिखल पक्का आणि मजबूत होता . अशा ठिकाणी कितीही पट्टीचा पोहणारा मनुष्य असला तरी तो काहीही करू शकत नाही .कारण जर तुम्हाला तुमचे पायच हलवता नाही आले तर काय पोहणार !  आता मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे माझ्या लक्षात आले . मघाशी पायाखाली वाळू होती तोपर्यंत परत उलटे फिरता आले असते . आता माझे दोन्ही पाय गाळात रुतले असल्यामुळे मी पुरता फसलो होतो . हा नदीचा साधारण मध्यभाग असल्यामुळे अतिशय वेगाचा प्रवाह मला उजवीकडे नर्मदे कडे ढकलत होता .सतत ढकलत होता . हातातील काठी काहीच कामाची नव्हती . पाठीवरील दप्तर आता अर्धे भिजले होते . भिजून जड झाल्यामुळे दप्तराने माझे वजन वाढविले होते . आणि त्यामुळे मी अजूनच वेगाने खाली खाली रुतू लागलो होतो . एक क्षणभर असे वाटले की दप्तर प्रवाहामध्ये सोडून द्यावे . काठी सुद्धा सोडून द्यावी . आणि हाताने काही करता येते का पहावे . परंतु दप्तरामध्ये नर्मदा मैया होती . त्यामुळे प्राण गेला असता तरी तिला सोडले नसते . बहुतेक मृत्यू मृत्यू म्हणतात तो आता जवळ आलेला आहे अशी मी मनाची समजूत घालायला सुरुवात केली . कारण पाण्यामध्ये शेवाळे , पाण गवत इतके जास्त होते की काही केल्या मी या जंजाळातून सुटणे अवघड वाटत होते .  त्यामुळे आता काहीही हालचाल न करता शांतपणे उभे राहायचे असे मी ठरवले . हळूहळू थोडे थोडे खचत खचत मी खोल पाण्यामध्ये चाललो होतो . आता पाणी माझ्या छातीपर्यंत आले होते . आणि पाय गुडघ्याच्याही वरपर्यंत खाली गाळामध्ये रुतले होते . हळूहळू पाणी वर सरकत होते आणि मी खाली खचत होतो . कॉम्प्युटरची 'शट डाऊन प्रोसिजर ' असते तशी मी 'प्राणा शट डाऊन प्रोसीजर ' सुरू केली . मृत्यू समयी डोक्यात जो विचार असतो तसा पुढचा जन्म येतो . त्यामुळे अंते मतिः सा गतिः ।  हे डोक्यात ठेवून शेवटी देवाचे स्मरण करावे असे शास्त्रात सांगितले आहे . असा विचार मी करेपर्यंत माझे संपूर्ण दप्तर पाण्यामध्ये बुडले . आणि पाणी गळ्यापर्यंत आले . पाय अजूनच खोल खोल चालले होते . मी काठी समोर खोचून दिली आणि हात जोडले . गजेंद्र मोक्षाची कथा मला मनोमन आठवली . हत्तींचा राजा असाच एकदा पाणी प्यायला जातो आणि एक मगर त्याला खोल दलदलीमध्ये खेचून नेते . आधी स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेला गजेंद्र तिचा खूप प्रतिकार करतो .परंतु जेव्हा तो खोल खोल चिखलामध्ये बुडू लागतो , तेव्हा मात्र समोर उगवलेले एक कमळ सोंडेने खुडून वैकुंठाच्या दिशेला भिरकावतो आणि विष्णूचे स्मरण करतो ! लहानपणी कीर्तनामध्ये कधीतरी ऐकलेली ही कथा बरोबर योग्य वेळी आठवली बर का ! आता माझी अवस्था त्या गजेंद्रहून काही वेगळी नव्हती . फरक फक्त इतकाच होता की मी अजूनही देवाचे स्मरण केलेले नव्हते . मी खाली खचतच होतो . हनुवटीला पाणी लागले . ओठ पाण्यात बुडाले . आता मला या संकटातून वाचवणारे कोणीही दिसत नाही असे वाटत होते आणि आता नाकात पाणी जाणार इतक्यात लक्षात आले की अरे नर्मदा मैया शेजारीच आहे की ! आपण नर्मदे हर तर म्हणालोच नाही ! म्हणून शेवटचा पुकारा करायचा असा विचार करून दोन्ही हात वेगाने आकाशाकडे उंचावले .खांदे पडलेले शरीर ताणून उंच करून ओठ पाण्याबाहेर आणले आणि जोरात ओरडलो नर्मदे s s s s s s हर ! हे म्हणताना सुद्धा इंद्रावती नदीचे थोडेसे पाणी माझ्या तोंडात गेले होते . माझे र अक्षर पूर्ण होत नाही तोपर्यंत समोरच्या काठावर असलेल्या मातीच्या डोंगरावर एक मुलगा मला दिसू लागला ! तो दोन्ही हात उंचावून मला आवाज देत होता ! समोर कोणीतरी मनुष्यप्राणी आहे हे पाहिल्याबरोबर माझी जगण्याची आशा पल्लवीत झाली ! आशा म्हणजे नक्की काय असते हे त्या दिवशी मला कळले ! तो ओरडून मला सांगू लागला , "बाबाजी दाए तरफ सरको ! " उजवीकडे तर नर्मदा होती म्हणजे पाणी अजून खोल असणार होते परंतु तो सांगतो आहे म्हणून मी पाय हलवायचा प्रयत्न केला . तोपर्यंत मी पुन्हा नाका तोंडात पाणी जाईल इतका बुडलो होतो . मी पटकन आधी खोचून सोडून दिलेली माझी काठी हातात घेतली . श्वास थांबवून डोळे पाण्याखाली घातले .  आणि काठीने उजवीकडे चाचपले . तर तिथे वाळू आहे असे माझ्या लक्षात आले . तिथे काठी रोवून मी हळूहळू माझा एक पाय सोडवायला सुरुवात केली . आता काठीचा आधार मिळाल्यामुळे हळूहळू माझा उजवा पाय गाळातून बाहेर निघाला . पायाला विळखा मारलेल्या गवताने आणि शेवाळ्याने खरे तर माझे फार मोठे काम केले होते . पायाला तो विळखा असल्यामुळे मी पटापटा जमिनीमध्ये घुसलो नाही . उजवा पाय अजून उजवीकडे टाकल्याबरोबर मी फुटभर वर आलो आहे असे माझ्या लक्षात आले ! त्या पायावर भार देऊन हळूहळू मी माझ्या डावा पाय सोडवला ! आता मी छाती एवढया पाण्यात उभा होतो ! मी त्या मुलाकडे पाहिले . त्याने ओरडून सांगितले . "अभी तीन कदम सीधे हात की तरफ जाओ . " भाषेचा अभ्यास किती आवश्यक आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल . सिधे हात म्हणजे सरळ जा असा अर्थ नाही . तर या भागात उजव्या हाताला सिधा हात म्हणतात . उजवीकडे खोल संगम आहे हे माहिती असून देखील तो मुलगा आपल्याला तारणार आहे याची खात्री मला असल्यामुळे मी उजवीकडे तीन पावले सरकलो !  आता मी अजून फुट भर वर आलो होतो ! आता खरे तर माघारी वळावे आणि पुन्हा मागचा काठ गाठावा असे मला वाटत होते . परंतु मुलगा वरून ओरडत राहिला . अभी आठ कदम आगे आओ ! हळूहळू आठ पावले मोजून पुढे गेलो तेव्हा लक्षात आले की मी अजून बाहेर आलो आहे ! आता माझ्या भिजलेल्या सॅकमधून प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर गळत होते ! आणि मी पुरेसा बाहेर आलेलो होतो ! अभी पाच कदम बाए हाथ ! त्याचे शब्द ऐकून मी अतिशय शांतपणे आणि विश्वासाने डावीकडे पाच पावले सरकलो . अशा पद्धतीने मार्ग सांगत सुमारे दहा पंधरा मिनिटात त्याने मला संपूर्णपणे नदीच्या बाहेर काढले ! मी बाहेर गेलो , पाठीवरील दप्तर जमिनीवर फेकून दिले ! काठी फेकून दिली ! आणि धावतच जाऊन नर्मदा मातेला जमिनीवर लोटांगण घातले ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे माझे संकट हर ! असा धावा काय केला !आणि क्षणात तिने मला या संकटातून सोडवले होते ! मी विचार करू लागलो की ही धावा करण्याची बुद्धी मला आधी का नाही सुचली !आधी माझा स्वतःच्या तर्कशक्तीवर आणि तोकड्या अनुभवावर अतिशय फाजील असा अति आत्मविश्वास होता ! तो होता तोपर्यंत नर्मदेने मला काहीही सहकार्य केले नाही . आणि एकदाच धावा केल्याबरोबर मला किती सहज तारले !  हे कसे काय शक्य आहे ?कुठून आला तो मुलगा ! ? कोण होता तो ! ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर सांगतो . मी साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेमध्ये पडून राहिलो . इतक्यात तो मुलगा खाली आला . तो अजून कोणालातरी आवाज देत होता असे माझ्या लक्षात आले . त्याच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा असलेला एक मुलगा एका गीर गाईला पकडून तो देखील उतारावरून पळत खाली आला . दोन्ही मुले माझ्यासमोर येऊन उभी राहिली . माझ्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली होती . मृत्यू काय असतो हे जवळून अनुभवायला मिळाले होते . गलित गात्र होणे कशाला म्हणतात आणि आशा पल्लवीत होणे कशाला म्हणतात हे पुस्तकात वाचून खरोखरीच आपल्याला शिकायला मिळत नाही . त्यासाठी असा एखादा नचिकेतानुभव यावा लागतो ! पडल्या पडल्या मी दोघांना माझ्यासमोर बोलवले . आणि दोघांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला . "नर्मदे हर बाबाजी . आपको दंडवत . " असे म्हणून दोघांनी मला नमस्कार केला . मी उठायचा प्रयत्न करत होतो हे पाहून दोघांनी मला उठायला मदत केली .  आता मी उताणा पडलो .  बसण्याची शक्तीच अंगात राहिली नव्हती . मी पडल्या पडल्या त्यांना विचारू लागलो . कोण आहात तुम्ही ?  कुठून आलात ? ही कुठली नदी आहे ? नर्मदे काठची मुले फार हुशार असतात . धाकटा मला म्हणाला . हिंदीमध्ये म्हणाला . मी मराठी मध्ये लिहितो आहे , बाबाजी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो .पण तुमची झोळी भिजलेली आहे . त्यातले सगळे सामान काढून बाहेर ठेवू का ? म्हणजे वाळायला सुरुवात होईल .  चालेल असे म्हणून अनुमोदन दिल्याबरोबर दोघा भावांनी आतील एक एक वस्तू बाहेर काढून घट्ट पिळून पसरून उन्हामध्ये वाळत टाकायला सुरुवात केली . मला पुस्तके जपून ठेवायची सवय आहे . त्यामुळे एकात एक दोन प्लास्टिकच्या पिशव्या घालून मी माझी पुस्तके आणि नर्मदा परिक्रमेचे दिनमान लिहायचो त्या वह्या जलरोधक करून ठेवत असे . त्या पिशव्यांनी त्यांचे काम चोख बजावले होते . आणि किरकोळ ओलावा वगळता माझी सर्व पुस्तके वह्या थोडक्यात वाचली होती .  बाकी नर्मदा मैया आणि पूजा साहित्य मात्र पूर्ण भिजून गेले . परंतु माझ्याकडे एका दुकानदाराने पाटणच्या पुढे एका गावात , तंबाखूचा टीनचा रिकामा डबा दिला होता , त्यामध्ये मी काडीपेटी ,कापूर , फुलवाती ठेवत असल्यामुळे ते मात्र कोरडे राहिले होते .  बाकी प्रत्येक गोष्ट भिजून गेली होती . अंगावरचे कपडे सुद्धा काढून पिळून ठेवा . इथे कोणी बघायला येत नाही . पोरांनी मला सांगितले . आणि मी अंगावरचे वस्त्र देखील काढून पिळून वाळत घातले . सुदैवाने डोक्यावरचा फेटा तेवढा अर्धा कोरडा होता . तो लुंगी सारखा गुंडाळून मी उन्हात बसून राहिलो . 
नक्की काय प्रकार झाला होता हे वाचकांच्या लक्षात यावे म्हणून काढलेले स्मरण चित्र

मुलांची गीर गाय शांतपणे चरत होती . हा आता सांगतो काय झाले ते . छोटा मुलगा सांगू लागला . आम्ही दोघे भाऊ आहोत . शेजारी आमचे गाव आहे भेला नावाचे . ही इंद्रावती नदी आहे . तिच्या काठावर इंद्रदेवाने तप केले म्हणून ही इंद्रावती . या नदीच्या काठावर पुढे थोडेसे जंगल आहे . तिथे आम्ही रोज गुरे चरायला घेऊन येतो . इथून बरोबर एक किलोमीटर अंतरावर आत्ता आमची बाकीची गुरे चरत आहेत . "मग तुम्ही इथे कसे काय आलात ? " मी आश्चर्याने विचारले . अहो बाबाजी काय सांगायचं तुम्हाला ! ही बघा ही आमची गाय ! ही सर्वात शांत गाय आहे . आणि सर्वात म्हातारी सुद्धा आहे . हिला काय झाले काय माहिती ! ही अचानक उधळली आणि इकडे पळत सुटली . आम्ही दोघे हिच्या मागे पळत सुटलो . असा वेडेपणा ती कधीच करत नाही . पण आज तिला काय झाले माहिती नाही ! ती पुढे पळते आहे आणि आम्ही मागे पळतो आहोत !  शेवटी ती इथे संगमावर येऊन थांबली . आता तिला ताब्यात घेणार , इतक्यात नर्मदे हर असा आवाज आला आणि तुम्ही पाण्यामध्ये बुडत असलेले मला दिसले . म्हणून मी ओरडून तुम्हाला रस्ता सांगायला सुरुवात केली . "पण तुला रस्ता कसा काय माहिती ? " वरती उभे राहून बघा ना बाबा ! तिथून नदीचा तळ व्यवस्थित दिसतो आम्हाला . म्हणजे खाली काळे असेल तर गाळ असतो आणि पांढरे दिसते ती वाळू असते . त्याच्यावरून अंदाज लावता येतो . आमच्या गावातले लोक ही नदी अशीच पार करतात . आधी उंचावर उभे राहून रस्ता कुठून आहे पाहून ठेवतात . आणि मग त्याप्रमाणे पावले टाकत नदी पार करतात . तुम्ही मघाशी जिथे बुडत होता तिथे खूप खोल डोह आहे . पण उजवीकडे वाळू आहे हे मला वरून दिसले . अशीच पुढची वाळू कुठे दिसते आहे ते बघून तुम्हाला मी वरून सांगत होतो . मुलगा अतिशय स्वाभाविकपणे हे सर्व मला सांगत होता . त्याचे चातुर्य आणि प्रसंगावधान पाहून मला फार कौतुक वाटले .त्याचे वय सात आठ वर्षाचे असावे . आणि भाऊ दहा वर्षाचा असेल . पाण्यामध्ये उभे राहिल्यावर खरोखरीच खाली काय आहे ते दिसत नाही .कारण तुम्हाला पाण्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत असते . परंतु तिरक्या कोनातून मात्र नदीच्या तळाशी काय आहे याचा अंदाज येतो . माझ्या लक्षात आले की ज्या क्षणी मी नर्मदा मातेला आवाज दिला की मी आता पाण्यात येतो आहे , त्या क्षणी त्या गोमातेला तिकडे कोणीतरी बुद्धी दिली ! की पळ ! कोणीतरी म्हणजे नर्मदा मातेनेच ! तिने स्कॅनर मारून पाहिले असेल की आता सर्वात जवळपास कोण आहे जो याला मदत करू शकतो ? तिला ही दोन मुले सापडली असतील . मुलांना तिने sos सिग्नल देऊन पाहिला असेल ही . परंतु मुले आपापल्या खेळामध्ये मशगुल असतात . त्यामुळे तिने गाईला धावण्याची बुद्धी दिली असे माझे स्पष्ट मत आहे . त्या क्षणी ती गाय तिथे पोहोचली नसती तर आज हा ब्लॉग वाचायची पाळी तुमच्यावर आलीच नसती . सिहोर जिल्ह्यातल्या एखाद्या बुधनी टाईम्स वगैरे स्थानिक वृत्तपत्रातील कोपऱ्यातील चार ओळीच्या बातमीने माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असती . 
इंद्रावती नदीमे एक परिकम्मावासी की मौत ! बास !खेळ खल्लास ! परंतु नर्मदा जागृत आहे . नर्मदा तत्व अतिशय जागृत आहे ! स्वयम कार्यरत आहे ! एक हजार एक टक्के कार्यरत आहे ! नर्मदा माता आहे म्हणून आज मी आहे ! बरेचदा तुम्हाला हा ब्लॉग वाचून असे वाटत असेल की हा मूर्ख मनुष्य सतत मैया ,मैया ,नर्मदा , नर्मदा असे का करतो आहे ? त्याचे कारण हे असे काही अनुभव आहेत !की जे मला तिचा गुलाम बनवतात ! होय तिचा गुलाम बनून राहणे मला प्राणांपेक्षाही प्रिय आहे ! ती आहेच अशी की तिच्यासाठी काहीही करायला कोणीही तयार होईल ! नर्मदे हर !नर्मदे हर !नर्मदे हर !
मुले जायला निघाली . मागच्या गावात मला बिस्कीटचे एक दोन पुडे मिळाले होते ते मी मुलांना दिले . इथे वरती असलेल्या एका पुरातन मंदिराची माहिती मुलांनी मला दिली . आणि तिथे जाऊन विश्रांती घेण्याची सूचना केली . मी छाटी गुंडाळली आणि अर्धे ओले सामान पिशवीमध्ये भरून पुढचा मार्ग पकडला . माझे सर्वांग चिखलाने माखलेले होते . अवतार बघता क्षणीच कोणीही सांगावे की हा माणूस आता कुठल्यातरी संकटातून बाहेर आला आहे अशी माझी अवस्था होती . थोडेसे चालल्याबरोबर डावीकडे छोट्या पायऱ्या दिसल्या . हे भेला नावाचे गाव होते आणि चतुर्मुख महादेवाचे पुरातन असे मंदिर वरती होते . 
चतुर्मुख महादेव मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या
.
डावीकडे छोटासा आश्रम आणि शेजारी चतुर्मुख महादेव मंदिर .
गेल्या गेल्या मी या गोल पायऱ्यांवर ऊन खात बसलो . 
तत्पूर्वी शेजारी असलेल्या दुसऱ्या आश्रमाच्या हद्दीतील या सार्वजनिक नळावर मी हात पाय तोंड स्वच्छ धुतले .
हातपाय धुवून मंदिराच्या पायरीवर जाऊन बसलो . इतक्यात शेजारी राहणाऱ्या कुटीतून ममता गिरी नावाच्या अतिशय तेजस्वी साध्वी बाहेर आल्या . यांचे वडील कैलासवासी प्रेमभारतीजी यांनी ही कुटी बांधली होती . त्यांनी माझी विचारपूस केली . मी नर्मदे कडून घाट चढून वर आलो आहे हे सांगितल्यावर त्यांचा विश्वासच बसेना . त्या म्हणाल्या की त्या बाजूने तर रस्ताच नाही मग तुम्ही कसे काय आले ? मग मी त्यांना खाली घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला . मी अजूनही त्या प्रसंगाच्या धक्क्यातून पुरता सावरलेला नव्हतो . त्या मला म्हणाल्या की या नदीला चालत पार करून आलेला तू पहिला परिक्रमावासी आहेस . निदान मी इथे आहे तेव्हापासून तरी कोणी या मार्गाने आलेले पाहिलेले नाही . मी नर्मदा मातेला त्रास दिला त्याबद्दल मला अजूनच वाईट वाटले . तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊन या तोपर्यंत मी चहा बनवते असे ममता गिरींनी सांगितले . ममता गिरी यांच्या अंगावरील वस्त्र फाटलेले होते हे त्या मागे वळल्यावर माझ्या लक्षात आले . केवळ नर्मदे काठी असलेले एक पवित्र स्थान आणि त्याचे पावित्र्य जपले जावे , तसेच आपल्या वडिलांची परंपरा टिकावी म्हणून आजन्म ब्रह्मचारी राहून तिथे असे आयुष्य जगणाऱ्या ममता गिरी या किती श्रेष्ठ साध्वी असतील याचा विचार फक्त करून पहा ! आताच्या काळामध्ये दर महिन्याला नव नवीन उंची साड्या आणि वस्त्रप्रावरणे विनाकारण विकत घेणाऱ्या माता-भगिनींना हा त्याग कळणे कदापि शक्य नाही हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते . या मंदिरातील शिवलिंग खाली खोल खड्ड्यामध्ये होते . अतिशय तुळतुळीत अशा काळ्याभोर पाषाणाचे चार मुखे असलेले हे दुर्मिळ शिवलिंग होते . शिवलिंग फारच शक्तिशाली आहे असे मला दर्शन घेताना जाणवले . साध्वी कोरा चहा घेऊन आल्या आणि मला त्या शिवलिंगाची माहिती सांगू लागल्या . नेपाळमध्ये पशुपतिनाथाची स्थापना ज्या क्षणी झाली , त्याचवेळी त्या पशुपतीनाथाच्या शिवलिंगाची हुबेहूब प्रतिकृती म्हणून हे शिवलिंग तयार करण्यात आले होते . आणि दोन्ही शिवलिंगांचा पाषाण हा काळी गंडकी नदीतील शालिग्राम आहे . ज्या क्षणी तिकडे पशुपतिनाथ स्थापन झाले त्याच वेळी इकडे भेला गावात , ज्याचे त्या काळातील नाव भोला असे होते , त्या भोला गावामध्ये हे शिवलिंग स्थापन झाले . 
२२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती स्थापन झाल्यावर अन्य दोन रामाच्या मूर्ती अन्यत्र स्थापन झाल्या तसेच काहीसे हे असावे .  त्यामुळे ज्याला पशुपती नाथाला जायला जमत नाही ती माणसे इथे दर्शन घेतात . माझे पशुपतिनाथाचे दर्शन झालेले नाही त्यामुळे मला आनंद झाला ! इंद्राची ही तपोभूमी खरोखरीच पवित्र होती . ममता गिरी मला म्हणाल्या की तुम्हाला जर मुक्काम करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता . फक्त तुम्हाला मंदिरात उघड्यावर झोपावे लागेल . कारण कुटीमध्ये मी एकटीच असते . गावातील विघ्न संतोषी लोकांनी त्यावरून काही अपप्रचार करायला नको . मी त्यांना म्हणालो की मला या स्थानावर राहायला नक्की आवडले असते . परंतु अजून थोडासा दिवस शिल्लक आहे . तर चालून घेतो . आपले खूप खूप आभार ! त्या तपस्विनी साध्वीला मनापासून दंडवत नमस्कार केला आणि पुढे निघालो . घोघरा गावामध्ये नर्मदेचे पात्र इतके विस्तीर्ण होते की बास ! सुमारे तीन किलोमीटर तरी त्याची रुंदी होते ! मध्ये एक भव्य बेट व दोन्ही बाजूने खळाळत वाहणारी माताराणी ! अतिशय विहंगम असे दृश्य आहे ! नुकत्याच पडलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल माजला होता .शेतातील गहू निघण्यापूर्वी थोडे पाणी घालतात . त्यामुळे त्याचा शेवटचा चिखल देखील सर्वत्र होता . त्यामुळे शेत सोडून अगदी मैयाच्या काठाने चालायला सुरुवात केली . म्हणजे काठी पाण्यामध्ये बुडवत चाललो . मैय्याच्या पातळीवरील शेती सोडून वरती देखील एका पातळीवर खूप शेती होती आणि तिथून मोठा रस्ता होता जो घोघरा गावात जायचा . वरून बरेच परिक्रमावासी चाललेले मला दिसत होते . त्याच्यातील एक तरुण मुलगा वरून खाली उतरला आणि नर्मदा मातेचे फोटो काढता काढता त्याने माझा देखील एक फोटो काढला . पुढे आश्रमात गेल्यावर या मुलाशी खूप चांगली ओळख झाली .याचे नाव देवेंद्र प्रभाकर सारंग परंतु तो त्याचे नाव सारंग देव असे सांगायचा . हा मुंबईला प्रभादेवीला राहत होता . 
घोघरा गावानजीक नर्मदेच्या काठावरील मार्गाने चालताना प्रस्तुत लेखक. पायामध्ये पाचवा बूट घातलेला आहे .
प्रभादेवी मुंबई येथील परिक्रमावासी सारंग देव यांनी काढलेले प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र . या पातळीच्या लगेच वर चिखल भरलेली शेती आहे . त्याच्यावर सुमारे तीस फुटावर जमिनीची पातळी चालू होते जिथून रुळलेला परिक्रमा मार्ग आहे .
परंतु मला सतत नर्मदेच्या काठावरील हे रस्ते खुणवायचे . इथे तिचा प्रत्यक्ष सहवास लाभतो .
इथून एका उंच टेकाडावर सुंदर असा हा आश्रम होता . आश्रमामध्ये एक मोठा झाडाचा पार होता . दोन झोपड्या होत्या . अंगणामध्ये मधोमध झाडांची एक रेष लावून अंगणाचे दोन भाग केले होते . एका बाजूला स्वतः स्वयंपाक करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला बसून खायचे अशी व्यवस्था होती . 
घोघरा येथील नर्मदा घाट
इथे पाणी उथळ असल्यामुळे पात्र विस्तृत होते .मध्ये एक खूप मोठे बेट आहे पलीकडे पुन्हा नर्मदा आहे .
 घोघरा गावा समोर दिसणारे बेट
स्वच्छ सुंदर नर्मदा जल
याच उतारावरून सारंगदेव खाली उतरला आणि माझा फोटो काढला
मध्ये येऊन मिळणारे ओढे नाले
आश्रमाकडे जाणारी शेतातली वाट
आश्रमातील पिंपळाचा पार
 घोघरा आश्रमातील निवास व्यवस्था . सुरेख सारवलेले अंगण दिसते आहे .डाव्या बाजूला झाडांच्या रेषेच्या पलीकडे आम्ही उघड्यावरच स्वयंपाक केला . आश्रम छोटासाच परंतु स्वच्छ सुंदर आणि पवित्र आहे .
इथे एक जोडपे शिधा देण्याचे काम करण्याकरता ठेवले होते . मी इथे गेलो तेव्हा आधीच बरेच परिक्रमा वासी येऊन थांबलेले दिसले . मी आल्यावर देखील काही जथे आले आणि एकूण परिक्रमा वाशींची संख्या सुमारे २५ ते ३० झाली . प्रत्येक जण आपापल्या गटानुसार वेगळा वेगळा शिधा घेऊन स्वयंपाक करायला लागला होता . हीच सर्वांना एकत्र करण्याची संधी आहे हे ओळखून मी सर्वांना आवाहन केले की आपण सर्वांनी वेगळा वेगळा स्वयंपाक करून अधिक अन्न वाया जाण्याची शक्यता आहे . शिवाय प्रत्येकाला स्वयंपाक करावा लागेल . त्यापेक्षा सर्वांचा स्वयंपाक एकत्रच कोणीतरी दोघा तिघांनी केला तर कसे राहील ?  कल्पना तर चांगली होती परंतु पुढाकार कोणी घेईना . अखेरीस मी जाहीर केले की सर्वांच्या पोळ्या मी बनवेन .कोणीतरी भाजीची जबाबदारी घ्यावी . पुण्याचे एक काका तिथे आले होते त्यांनी भाजी बनवण्याची जबाबदारी घेतली . नंतर मला कळाले की त्यांना स्वयंपाक येतच नव्हता .परंतु कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून त्यांनी मी भाजी बनवतो असे म्हटले होते ! याला म्हणायचे मॅनेजर !मी सुमारे १३० जाडजूड मोठ्या पोळ्यांची कणिक एकट्याने मळली ! बहुतांश परिक्रमावासी वयोवृद्ध असल्यामुळे सर्वांनाच आराम आणि विश्रांती मिळाली त्याचे मला समाधान होते . इथे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले श्री औंधकर म्हणून एक होते व त्यांची विशाखा नावाची बहिण परिक्रमेमध्ये होती . मी एकट्याने शंभर एक पोळ्या केलेल्या होत्याच . थोड्यावेळाने काही परक्रमासी मदतीसाठी आले . काही वेळाने विशाखा ताई माझ्या मदतीला आल्या आणि शेवटच्या काही पोळ्या त्यांनी लाटल्या . मी भाजल्या . मी केलेल्या पोळ्या आणि त्यांच्या पोळ्या याच्यामध्ये जमीन आस्मानाचा फरक होता ! त्यांच्या पोळ्या गोल गरगरीत आणि अतिशय मऊसूत होत्या . नर्मदा परिक्रमेमुळे मला स्वयंपाकाची खूप आवड निर्माण झाली हे मात्र खरे. हळूहळू एक एक जण मदतीला येऊ लागले आणि बघता बघता पिठलं भात देखील तयार झाला ! 
(ता. क. : नुकतेच या घटनेचे काही फोटो मला प्राप्त झाले . ते वाचकांसाठी सोबत जोडत आहे . )
पोळ्या लाटताना प्रस्तुत लेखक . उजव्या हाताला मळून ठेवलेली कणीक किती आहे पहावी . एक परिक्रमावासी चुलीकडे बघताना . आणि एक जण कणिक अजून ताकतीने मळताना . एकीकडे ताटामध्ये मी करून ठेवलेली भाजीची तयारी .
दिवसभर भरपूर चालून आल्यावर विश्रांती घ्यायच्या ऐवजी शंभर पोळ्या लाटणे हा एक आनंद सोहळा होता ! इतरांसाठी कष्ट करताना आनंद अधिक मिळतो . कारण ते निष्काम कर्म असते . सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्म अधिक आनंददायक असते . काही वेळात हे एक एक पाकवीर गळून गेले . परंतु मी नेटाने लाटत राहिलो ! मैया शक्ती देत राहिली !
सदर चित्रात पोळ्या लाटण्यास नुकतीच सुरुवात केलेली आहे .

सर्वांना अंगणामध्ये मस्तपैकी जेवायला वाढले ! त्या दिवशीचे भोजन सर्वांनाच खूप आवडले ! सुमन तोपर्यंत पारावर बसून गाणी म्हणत राहिला आणि लोकांचे मनोरंजन करत राहिला . पहाटे लवकर उठून आश्रम सोडला . जिथे पात्र विस्तृत होते आणि पाणी खळखळत वाहते तिथे धुके निर्माण होते हे आपण मागे पाहिले ! आजवरचे सर्वात घनदाट धुके अनुभवत नर्मदेचा काठ पकडला !अक्षरशः एका पावलापूर्ती जमीन दिसत होती ! केवळ नर्मदा मातेचा रव अर्थात आवाज ऐकत चालावे लागत होते . रव या शब्दातूनच रेवा या नावाची निर्मिती झालेली आहे . नर्मदा मातेला रेवा का म्हणतात ते आज खऱ्या अर्थाने कळाले ! रेवा मैया की जय ! 
याच्यापुढे एक चित्त थरारक प्रवास मी केला . त्याचे वर्णन पुढच्या लेखात पाहू . नर्मदे हर !



लेखांक पंचावन्न समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. नर्मदे हर. मातेचा जयजयकार करण्यापलिकडे आपल्या हातात काय आहे? पुन्हा एकदा नर्मदे हर.

    उत्तर द्याहटवा
  2. Narmade Har... Sarv Varnan vachatana angawar kata aala.. Narmade Har.. "Everything is being taken care of" ya vakyacha pratyat tumache varnan wachatana satat yetoy...
    Narmade Har..
    - Smita Shripad

    उत्तर द्याहटवा
  3. tumhala sashtang dandavat! itaka thakun alyavar 130 polya karane, svayampak karane sope kam nai!

    उत्तर द्याहटवा
  4. Indravaticha prasanga vachun tumhi kharokhar punyavan ahat hech parat janavale.. maiyachi krupa kashi asate te hi aat kholvar pochale! Narmade Har!

    उत्तर द्याहटवा
  5. https://www.youtube.com/watch?v=OgtW3d-ds4g - Sir...what r your thoughts abt this clip?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नर्मदाखंडात एक प्रसिद्ध वाक्य आहे .

      मराठी माणूस ,
      आता है
      खाता है
      *गता है और
      भागता है ।
      दुर्दैवी आहे . पण आता सकारात्मक बदल होतो आहे .
      नर्मदे हर !

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर