लेखांक ३१ : जंगलात मुक्काम आणि अपरात्री आलेला अनुभव

परस्तेने सांगितल्याप्रमाणे मी कुठे मोकळे आकाश दिसते आहे का ते शोधत चालू लागलो . परंतु ते अरण्य इतके घनदाट होते की आकाश दिसतच नव्हते . एव्हाना अंधार पडायला सुरुवात झालेली होती . अरण्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . अखेरीस मला एक जागा सापडली जिथे मुक्काम करावा अशी आतून प्रेरणा झाली . 
अमरकंटकच्या जंगलातील नर्मदा मातेचे संग्रहित चित्र

आत्ता गुगल मॅप वर मी ती जागा शोधून काढली आहे , ती साधारण अशी होती .
चित्रात अंधारी रेषा दिसत आहे ते नर्मदेचे पाच दहा फुटाचे पात्र आहे .
ह्या घोर जंगलातून शक्यतो जाऊ नका असे नर्मदा परिक्रमा विषयक पुस्तके देखील आवर्जून सांगतात .

इथे फार काही मोकळी जागा नव्हती परंतु थोडीशी सपाटी जाणवली . या भागातील झाडी इतकी दाट आहे की तुम्हाला खरोखरच आकाश दिसत नाही .डिस्कवरी चैनल वर येणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये बेअर ग्रील्स हा माजी इंग्लिश सैनिक जसे जंगलात मुक्काम करतो तसे काहीतरी मला करायचे होते . आता मला एखादी तात्पुरती कुटी उभी करायची होती .माझ्याकडे एक दंड होता . तेच माझे एकमेव हत्यार होते . जास्ती आवाज करून देखील चालणार नव्हते . कारण त्यामुळे तिथे मी असल्याची चाहूल वन्य प्राण्यांना लागणार होती . अंधार आता फार वेगाने दाटू लागला . अंधार पूर्णपणे पडायच्या आत मला जळण्यासाठी भरपूर लाकूड गोळा करून ठेवायचे होते . परंतु पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे दोन-तीन दिवसांपूर्वी याच अरण्या  मध्ये जोरदार पाऊस झाला होता . त्या पावसामुळे सर्व लाकडे कुजलेली व भिजलेली होती . एकही लाकूड जळायच्या लायकीचे वाटत नव्हते . इतक्यात मला एक दोन मोठे ओंडके दिसले . मी ते आनंदाने उचलायला गेलो ,तर क्षणात त्या संपूर्ण ओंडक्याची माती होऊन ते खाली पडले ! त्यांना संपूर्णपणे वाळवीने खाऊन पोखरून टाकलेले होते ! 
 प्रातिनिधिक चित्र
सर्व असलीच लाकडे सापडू लागली . आता मात्र मला भीती वाटू लागली .अंधार जवळपास पडलाच होता . तिन्ही सांजा झाल्या होत्या . आणि माझ्याजवळ पुरेसा काय कणभर सुद्धा लाकूड फाटा गोळा झाला नव्हता . शिवाय विजेरी माझ्याकडे नव्हती तो एक वेगळाच ताप . शेवटी मी ठरविले छोट्या छोट्या काड्या काटक्या सुद्धा गोळा करायच्या . काहीही सोडायचे नाही . आणि अशा पद्धतीने त्या काड्या काटक्या मी जिथे जागा ठरली आहे तिथे आणून टाकू लागलो . आग चांगली भडकावी म्हणून वाळलेला पालापाचोळा जो ताजा ताजा आज पडला होता तो देखील गोळा केला . खालचा पालापाचोळा सगळा ओला आणि कुजलेला होता . इतक्यात मला नर्मदेमधून एक मोठा 
ओंडका गडगडत वाहत येताना दिसला . मी धावतच दंड घेऊन गेलो आणि ओढून काठाला लावून तो ताब्यात घेतला .
ओंडका चांगलाच जड होता . आणि वरून ओला असला तरी आतून कोरडा असण्याची शक्यता होती .
 प्रातिनिधिक चित्र
  तो मी ढकलत ढकलतच जागेपर्यंत नेला . अजून काही मनगटा एवढ्या जाडीची लाकडे मला मिळाली . एका झाडाच्या साली खूप पडत होत्या . त्या सालींच्या ढलप्या चांगल्या चार चार पाच पाच फूट लांबीच्या होत्या .त्यादेखील मी गोळा केल्या . 
एकूणच बऱ्यापैकी लाकूडफाटा माझ्याकडे गोळा झाला होता . हे सर्व करेपर्यंत प्रचंड थंडी वाढली होती . माझे हात पाय कुडकुडायला लागले . आता लवकरात लवकर एक तंबू उभा करणे आवश्यक होते . दोन छोटी झाडे पाहून मी त्याला माझी काठी आडवी अडकवली . खाली पालापाचोळ्याचा बिछाना केला . माझ्याकडे दोन शाली आणि दोन छाट्या ( पांढर्‍या लुंग्या) इतकीच वस्त्रे होती आणि ती निश्चितपणे असल्या थंडीमध्ये पुरणार नव्हती . शिवाय अशा ठिकाणी पहाटे खूप दव पडते हे मला माहिती होते . त्यामुळे मी एक छाटी पालापाचोळ्यावर चादरी सारखी आंथरली . आणि दुसरी मोठी शाल होती .ती काठीवर दोन्ही बाजूंनी टाकून तिचा तंबू केला . त्याच्यावर भरपूर पालापाचोळा टाकला . 
 माझी कुटी साधारण अशी तयार झाली . शेकोटी अजून तोंडाजवळ होती .( प्रातिनिधिक चित्र )

माझ्याकडे असलेल्या शाली मी वाटत वाटत आलो होतो . आता कदाचित त्या कामाला आल्या असत्या असे मला वाटू लागले . आता माझ्याकडे फक्त पांघरायला एक शाल होती . डोक्याला थंडी वाजू नये म्हणून पंचा गुंडाळला होता . शेकोटी लवकरात लवकर पेटवणे आवश्यक होते . कारण आता पूर्ण अंधार पडला होता . माझ्या पूजेच्या साहित्यातली काडेपेटी मी काढली . त्याच्यामध्ये मोजून अठरा काड्या होत्या . काडेपेटीच्या एका एका काडीची किंमत मला त्या रात्री कळाली . पालापाचोळा व काड्या ओलसर असल्यामुळे पेटच घेत नव्हत्या. विझलेल्या काड्या सुद्धा मी जपून ठेवत होतो . अखेरीस एका काडीवर वाढलेले शेवाळे मला सापडले . ते चटकन पेट घेत होते .
 प्रातिनिधिक चित्र
 त्याचा वापर करून मी काही बारक्या काड्या काटक्या पेटवल्या . ती ऊब वापरून पालापाचोळा धुमसवला . आणि मग मध्यम आकाराच्या लाकडांनी हळूहळू धग धरायला सुरुवात केली ! माझ्या जिवात जीव आला . मोठा ओंडका मी समोरच ठेवला होता . त्याला लागून ही छोटीशी शेकोटी पेटवली होती ज्यायोगे तिची उष्णता लागून ओंडका देखील प्रज्वलित व्हावा . समोरच्या तटावर याच भागात राजाराम म्हाताऱ्याने मला हे तंत्र शिकवले होते .ते इतक्या लवकर वापरावे लागेल असे वाटले नव्हते . 
 प्रातिनिधिक चित्र
थंडी इतकी जबरदस्त पडली होती की पुढून पोटाला शेक बसेपर्यंत मागे पाठीचा बर्फ होत होता . माझी ती छोटीशी झोपडी एका बाजूने झोळी लावून मी बंद करून टाकली होती . त्याच बाजूला सारे अरण्य होते . आणि माझ्यासमोर साधारण पंचवीस फुटावर नर्मदा मैया वाहत होती . तिचा आवाज तेवढा माझ्या कानावर पडत होता .

मी ज्या पद्धतीने मुक्काम केला होता त्याच्या अगदी जवळ जाणारे हे चित्र मला इंटरनेटवर सापडले .फक्त जंगल थोडे अधिक घनदाट होते

 शेकोटीतील लाकडे सुद्धा एका बाजूने जळत होती तर दुसऱ्या बाजूने गार पडली होती . आग आणि थंडी यामध्ये थंडीचा विजय लवकर होत होता . ती शेकोटी इतकी हलकी पेटली होती की अखंड डोळ्यात तेल घालून तिच्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक होते . जरा मला डोळा लागला तर ती विझून जाण्याची शक्यता होती . मी मनोमन प्रार्थना करत होतो की वरूण देवा आजचा दिवस थोडी विश्रांती घे !  त्या शेकोटीवर मी ओली लाकडे वाळायला ठेवीत होतो . 
 प्रातिनिधीक चित्र
पंचमहाभूतांच्या सामर्थ्याची यथार्थ कल्पना यावयाची असेल तर परिक्रमा केलीच पाहिजे ! आता हळूहळू अरण्या मधले आवाज वाढू लागले . मी असा विचार केला की आता थोडे आडवे पडावे . परंतु झोपल्या झोपल्या माझ्या असे लक्षात आले की प्रचंड थंडी झोपडीला व्यापून उरलेली आहे ! आणि मी फक्त आणि फक्त शेकोटीपासून फूट दीड फुटापर्यंत झोपू शकतो . त्याच्या मागे गेलो की थंडीने माझा बर्फ होणार ! इतकी थंडी मी आयुष्यात कधी अनुभवली नव्हती . पुन्हा उठून बसलो ,आणि नित्य उपासना उरकून घ्यायची ठरवली ! मग माझ्या लक्षात आले की फार काही झाले तर तुपातील वाती थोड्याफार आहेत . किंवा थोडेसे तेल देखील माझ्याजवळ होते . परंतु याचा वापर अगदी कठीण काळ आला तरच करायचा असे मी ठरविले . समोरच वाहणाऱ्या नर्मदा मातेची मी भावपूर्ण आरती केली . शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणताना भीतिहारी या शब्दातील भीतीचा अर्थ आज मला पहिल्यांदा कळत होता . आणि नर्मदा मैया निश्चितपणे त्या भीतीचे हरण करत होती . जंगलातून श्वापदे पळाल्याचे वगैरे आवाज येत होते . वटवाघळे पंखांचा मोठा आवाज करत उडत होती . सर्व अर्थात सरपटणारे प्राणी यांच्यासाठी तर रात्र म्हणजे नंदनवन ! विशेषतः मण्यारी सारखे काही विषारी साप रात्रीच बाहेर पडतात . परंतु इथे हे सर्व धोके किरकोळ होते . इथे एक मोठे जनावर बाहेर पडलेले आहे हे मी गेले दोन-तीन दिवस ऐकत होतो ! आणि त्याचे प्रताप देखील कानावर पडत होते . वाघ किती भीतीदायक असू शकतो याचा अनुभव मी लहानपणी पेशवे उद्यानात घेतला होता . तिथला एक वाघ एकदा माझ्या दिशेने जोरात पळत आला . खरे तर माझ्या मागे उभे असलेल्या एका शिपायावर त्याचा राग होता परंतु त्या दोघांच्या मध्ये मी उभा असल्यामुळे तो माझ्या दिशेने येतो आहे असे मला वाटले आणि क्षणात माझ्या पायातील बळ गेले आणि मी बसकण मारून खाली बसलो . मध्ये जाळी आहे हे माहिती असताना वाघाची जर इतकी भीती वाटत असेल तर खुल्या जंगलात काय होईल विचार करून पहा ! त्यात परस्तेने मला कल्पना दिली होती की जरी वाघ जवळ आला तरी कुठलीही हालचाल न करता त्याच्याकडे पाहत रहा , तो तुला काही करणार नाही . त्याचे पोट गाई खाऊन भरलेले आहे . तो फक्त तुला पाहत निघून जाईल ! हे असले सल्ले आठवत होते आणि त्यात माझ्याकडे बॅटरी देखील नव्हती . बॅटरी वरून मला तो प्रसंग पुन्हा आठवला . रामदास बाबांची ती खोली रामदास बाबांच्या त्या गप्पा मला आठवू लागल्या . रामदास बाबा आता काय करत असतील असा विचार मी करू लागलो . ते मला म्हणाले होते की माझी आठवण काढली की मला कळते ! म्हणजे कदाचित रामदास बाबांना आता माझी आठवण येत असेल या विचाराने मी सुखावलो . मनोमन मी त्यांना सांगितले की बाबा माझी बॅटरी तुमच्या पेटार्‍यामध्ये विसरलेली आहे . वेळ मिळेल तेव्हा कोणाकडून तरी ती काढून घ्या आणि वापरून टाका . चांगली एव्हरेडी कंपनीची आहे बरं ! 
ती बॅटरी ठेवण्यासाठी मी दप्तराचा बाहेरचा बाटली ठेवण्याचा कप्पा वापरत असे . त्यातून ती सहजपणे काढता घालता येत असे . आणि अंधारात फार चाचपडावे लागत नसे . मी हा सर्व विचार करीत असताना एक अतिशय मोठे जनावर धप धप धप धप असा आवाज करत माझ्या दिशेने पळत येत आहे असा आवाज मला येऊ लागला ! माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले ! आता ह्या कोणत्या संकट टाकलेस माई ? नर्मदे हर !
माझी प्रतीक्षिप्त क्रिया झाली आणि मागे वळून मी बॅगेतील बॅटरीच्या कप्प्यात हात घालून बॅटरी बाहेर काढली आणि मैया ! असे ओरडलो ! बॅटरीच्या प्रकाश झोतामध्ये पाहिले तर काहीच दिसत नव्हते ! शेकोटीपासून उठून बाजूला जाऊन मी चारी बाजूला बॅटरी मारून पाहिले . काहीच दिसत नव्हते . इतक्यात माझ्या लक्षात आले की माझ्या हातामध्ये बॅटरी कशी काय बरे आली ? कारण काही वेळापूर्वी प्रेम सिंग परस्ते समोर मी तीन वेळा संपूर्ण सामान तपासले होते त्यात ती नव्हती ! आणि मला खात्री होती की ती रामदास बाबांच्या इथेच मी पेटार्‍यामध्ये विसरलो होतो . बरं तिथे मी ती चालू ठेवली होती . त्यामुळे तिचे सेल संपणे क्रमप्राप्त होते . ही विजेरी मात्र अतिशय तेजस्वी आणि लख्ख उजेड देणारी झाली होती ! मी पुन्हा निरीक्षण करून पाहिले तर ती माझीच विजेरी होती कारण तिला मी गुंडाळलेला सेलोटेप तसाच होता ! मैयाचा जयजयकार करणे याच्या पलीकडे माझ्या हातात काहीही नव्हते ! मी तिथे उभे राहून मैयाचा आणि रामदास बाबांचा मोठ्या आवाजात जयजयकार केला ! त्या एका छोट्याशा गोष्टीमुळे मला फार मोठी शक्ती प्राप्त झाल्यासारखे वाटले . आता मला साधारण वीस फूट आजूबाजूला काय काय चालू आहे हे स्पष्ट दिसत होते . त्यापूर्वी शेकोटीच्या उजेडात चार फुटा पलीकडे काहीही दिसत नव्हते . मुख्य म्हणजे या विजेरीचा उजेड नर्मदेच्या पाण्यापर्यंत जात होता . मी जागाच मुळी अशी निवडली होती की जिथून नर्मदेमध्ये आणि माझ्या मध्ये एका शेकोटी खेरीज काहीही नव्हते . राहून राहून मला बॅटरीच्या या चमत्काराचे आश्चर्य वाटत होते . हा चमत्कारच आहे हे पुढे सिद्ध झाले . कारण तिथून पुढे संपूर्ण परिक्रमा संपेपर्यंत ती विजेरी माझ्यासोबत होती .परंतु एकदाही त्याच्यामध्ये मला नवीन बॅटरी सेल घालावे लागले नाहीत . आणि परिक्रमा संपायच्या शेवटच्या दिवशी ती माझ्या हातातून जी गायब झाली ती पुन्हा कधीच सापडली नाही . संपूर्ण परिक्रमे मध्ये मात्र मी तिचा पुरेपूर वापर करून घेतला . रामदास बाबांच्या इथे मला अशा तऱ्हेने खूप चमत्कारिक अनुभव आले . आता माझी पूजा अर्चा देखील आटोपली होती आणि झोपायची तयारी करणे क्रमप्राप्त होते . परंतु प्रचंड थंडीमुळे झोपच येत नव्हती . त्यात माझ्या पोटामध्ये हळूहळू कावळे ओरडायला लागले . परिक्रमावासी सोबत शक्यतो थोडेफार खाणे पिणे ठेवत असतात . परंतु माझ्याकडे बिस्किटचा एक पुडा सुद्धा नव्हता किंवा खडीसाखर नव्हती किंवा शेंगदाणे नव्हते किंवा गूळ नव्हता , काहीच नव्हते . सुमारे तासभर मी भुकेने असा तळमळत होतो . भूक लागली आहे असा विचार आला की मी माझे मन दुसऱ्या कुठल्यातरी विचारावर न्यायचो . रामदास बाबा कसे आपल्याला भेटले वगैरे प्रसंग आठवायचो . परंतु माझ्या विचारांमध्ये आलेला प्रत्येक महात्मा हातामध्ये काहीतरी घेऊन मला वाढायला येतो आहे असाच भास व्हायचा ! त्यादिवशी कष्ट पण थोडे जास्त झाले होते . आधीच्या दोन दिवसांचा थकवा भरीला होताच . भूक किती बेकार असू शकते याचा अनुभव त्या दिवशी मी घेतला . यापूर्वी पुणे ते सज्जनगड पायी जाताना बामणोली ते सज्जनगड च्या जंगलामध्ये मी हा अनुभव घेतला होता . परंतु तिथे खाण्यासाठी गवत होते . ते खात खात मी दोन दिवस काढले होते . इथे मात्र खाता येण्यासारखे काहीच नव्हते . अखेरीस मी वाळलेल्या लाकडांच्या साली काढून खाऊ लागलो . मनात विचार आला की फुलवातीमधील तूप खाऊन टाकावे . परंतु हे अतिशय चुकीचे ठरले असते म्हणून तो विचार बारगळला . असे भुकेवर चिंतन करता करता एक दीड तास निघून गेला असेल . मी लहान बाळासारखा रडू लागलो . भुकेने व्याकुळ होऊन मी नर्मदा मातेला आर्त स्वरात हाका मारू लागलो .रात्रीचे सुमारे दहा-साडेदहा वाजले असावेत असा माझा अंदाज होता . अचानक मला समोर नर्मदेच्या पात्रामध्ये कोणीतरी चालते आहे असा आवाज आला . घाबरून मी पटकन माझी बॅटरी ची शलाका तिकडे टाकली . " कौन ? " मी ओरडलो . साधारण २०- २२ वर्षाचा एक तरुण मुलगा डोक्यावरती काहीतरी घेऊन येतो आहे असे मला दिसले . तो कमरे एवढ्या पाण्यातून चालत येत होता . पाणी बर्फासारखे गार होते . हळूहळू तो माझ्या शेकोटी समोर येऊन उभा राहिला . "नर्मदे हर " मी म्हणालो . तो मुलगा खाली बसला आणि त्याने डोक्यावरील पाटी खाली ठेवली . त्याने वरचे झाकण काढताच खालच्या ताटात ठेवलेल्या गरमागरम भोजनातून वाफा येऊ लागल्या ! "भोजन पाइये " तो मला म्हणाला . माझ्या आनंदाला पारावर उरला नाही !
एका मोठ्या थाळ्यामध्ये गरमागरम आमटी भात , पोळी भाजी , कोशिंबीर ,पापड असे सर्व पदार्थ असलेले साग्र संगीत भोजन तो घेऊन आला होता ! मी क्षणाचा ही विलंब न लावता ते ताट हातात घेतले आणि या स्वामी जेवायला म्हणत बकाबका घास भरायला सुरुवात केली . मला भूक लागलेली असल्यामुळे ताट पटापटा रिकामे होऊ लागले . त्या ताटातील सर्वच पदार्थ अप्रतिम असे होते . कुठला एक पदार्थ चांगला आहे असे सांगताच येणार नाही इतके सर्व पदार्थ सर्वोत्कृष्ट होते . आमटी तर इतकी गरम होती की चटके बसत होते ! पोळीवर तुपाची धार होती . इतक्या मऊसूत पोळ्या मी आयुष्यात पुन्हा कधी खाल्ल्या नाहीत . भाजी सुद्धा तेलकट किंवा तिखट अजिबात नव्हती ! काय ते भोजन !आहाहा !
अरे बापरे परंतु हे सर्व माझे सुरू असेपर्यंत समोरचा मुलगा काय करतो आहे इकडे माझे लक्षच गेले नाही .
तो बिचारा शेकोटीच्या समोर उभा राहिला होता . पोटात थोडेसे अन्न गेल्यावर मला ज्ञान सुचू लागले . मी त्याला म्हणालो " बैठो ना । नीचे बैठो । "  तो म्हणाला , "मैं ठीक हूं । " मी त्याला  विचारले " आप तो पूरे गीले हो गए हो ।आपको बदन पोंछने के लिए तौलिया गमछा वगैरा दूं क्या ? " तो म्हणाला , "नहीं उसका कोई फायदा नहीं । मुझे वापस पानी में ही जाना है । " "लेकिन आपको पता कैसे चला कि मैं यहां पर हूं ?" "यहां सामने दमगढ़ नाम का गांव है ।वहां मैं रहता हूं । आपने आगी जलाई उसका धुंआ मुझे दिखा । मैंने सोचा कोई परिक्रमा वासी होगा । उसके लिए खाना ले चलते हैं । "
माझे इकडे उदरभरण चालूच होते . "वा भाई वाह ! बहुत मजा आया । तुम्हें जितने धन्यवाद दूँ कम है । वैसे नाम क्या है तुम्हारा ? " मी विचारले
" नर्मद ... नर्मद सिंग नाम है मेरा । "
"अरे वाह ! धन्य है तुम्हारे माता-पिता जिन्होंने इतना सुंदर नाम आपको रखा ! " माझ्या या वाक्यावर तो फक्त गालातल्या गालात हसला . एव्हाना माझे भोजन झाले होते . ते ताट मी चाटून पुसून स्वच्छ केले . मी म्हणालो, " रुकीये आप को थाली धो के देते हैं । " "नहीं हम स्वयं कर लेंगे । आप अभी निश्चिंत सो जाइए । कोई कुछ नहीं करेगा । सुबह उठते ही ऐसे ही किनारे किनारे पगडंडी से आगे चले जाना । रास्ते में रुकिएगा नहीं जबतक रामघाट ना आजाए। चलते है । " मी त्या युवकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो . एक क्षणभर माझ्या मनामध्ये विचार आला की मी किती कृतघ्न आहे त्याला बस देखील म्हणालो नाही , अंग पुसण्यासाठी पंचा दिला नाही ,थाळी देखील धुवून परत दिली नाही , आता किमान तो निघाला आहे तर त्याला मला सापडलेल्या विजेरीचा उजेड तरी दाखवावा . असा विचार करून मी मागे वळलो आणि दप्तरातील माझी बॅटरी काढून त्याच्या दिशेला धावलो . "अरे नर्मद रुको । हम तुमको रास्ता दिखाते हैं । " असे म्हणत मी विजेरीचा झोत चालू केला . पाहतो तो समोर कोणीच नव्हते . मला वाटले तो आजूबाजूला कुठेतरी गेला असेल . म्हणून मी चहू बाजूंना प्रकाशझोत मारू लागलो . परंतु कोठेच हालचाल नाही. समोरच्या किनाऱ्यापर्यंत माझा प्रकाश झोत जात होता .तोही रिकामा ... "नर्मद ?? ओय नर्मद ? ?? " " नर्मद ओय ! "  " नर्मदे !" आणि एकदम लखकन् माझ्या डोक्यात प्रकाश पडला . "मुझे वापस पानी मे ही जाना है ... " नर्मदा सिंगचे ते शब्द कानात घुमू लागले . बघता बघता मी शेकोटी पासून फार दूर आलो होतो . सोबत कोणीतरी असल्यामुळे माझे धाडस वाढले होते आणि त्यामुळे मी माझी शेकोटीपासून पाच फुटाची मर्यादा ओलांडली होती . मी धावत धावत पुन्हा शेकोटी पाशी गेलो . खाली बसलो . तृप्तीचा ढेकर आला .पोट गच्च भरले होते . शेकोटी नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी भासत होती . जंगलातील वारा जणू काही ते जंगल हसते आहे असे सुचवत होता . समोरून खळखळखळ वाहणारी नर्मदा माता जणु मला सांगत होती , " खुशाल झोपी जा बाळा ! मी आहे तोवर तुला कुठलेच भय नाही ! " साश्रु नयनांनी तिला झोपडीतूनच साष्टांग नमस्कार घातला . आणि त्याच क्षणी त्याच स्थितीत प्रगाढ निद्रेच्या आधीन झालो . . .



मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. केवळ अद्भूत!!!!कितीदा वाचले तरी परत परत वाचावेसे वाटते!!

    उत्तर द्याहटवा
  2. चार दिवसा पासुन वाचता किंवा you tube बघता येनारा bolg आहे.
    इतका आवडला की intrested लोकान्ना share पन केला.
    नर्मदा परिक्रमा आणि त्यात येणारे रोमांचक, अद्भुत, अचंभित करणारे लेखकाचे अनुभव म्हंजे आपणच परिक्रमा करतो आहे की काय असा अनुभव
    $$नर्मदे हर $$

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर