लेखांक १४८ : जंगलाच्या मधोमध वसलेले कुंडी गाव व सीतावनातील रेवाकुंडाचे महंत श्री मोहनदास त्यागी जी

कोठावा गावातील करंजेश्वर महादेव अथवा कश्यप ऋषी आश्रम आणि च्यवन ऋषी आश्रम मागे टाकून मी पुन्हा एकदा जंगलात शिरलो . दुपारचे साधारण दोन वाजले होते . च्यवन ऋषी आश्रमामध्ये येण्याचा मार्ग वेगळा आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा आहे .म्हणजे आलो त्या मार्गाने जाता येते परंतु जंगलातून एक चटकट आहे असे मला एका साधूने सांगितले होते. तो मी विचारून घेतला आणि जंगलामध्ये शिरलो .का कोणास ठाऊक परंतु आता जंगलाची भीती वाटायची बंद झाली होती. कारण जंगलचा राजा आपल्या बाजूने आहे असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता .एक प्रकारे मला भेटलेल्या वाघाने मला अभय दिले होते .मला आता थेट कुंडी नावाचे गाव गाठायचे होते. मध्ये थेंब भर सुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे सोबत भरपूर पाणी ठेवणे असा सल्ला सर्वच साधूंनी दिलेला होता .त्यामुळे मी आश्रमातच भरपूर पाणी पिऊन घेतले आणि सोबत चार लिटर पाणी ठेवले . सियाराम बाबांनी दिलेल्या रिकाम्या बाटल्या माझ्याकडे होत्या त्या या कामी आल्या . डोलडालच्या बाटलीमध्ये देखील पाणी भरून घेतले .इथून पुढे चालताना मध्ये कुठेही थांबू नये असे सर्वांनी सांगितले होते .इथून पुढे जंगलाला खरी सुरुवात होते असाच सर्वांचा सूर होता .उन्हाचा तडाका एवढा जबरदस्त होता की केवळ दहा पावले चालल्याबरोबरच घामाने संपूर्ण अंग भिजून गेले . अंगावरून येणारा घाम आणि वरून असलेला सूर्याचा ताप यामुळे अंगातून चांगल्या वाफा निघत होत्या . खाली तापलेला फुफाटा , वर आग ओकणारा सूर्य आणि पोटात धगधगणारा जठराग्नी , यावर कडी म्हणून आजूबाजूला सर्व पानगळ झालेले रुक्ष जंगल ! एकंदरीत भट्टी चांगलीच जमली होती ! यालाच तापणे म्हणतात . तापणे म्हणजे तप ! तप म्हणजे तापणे ! त त प प न करता तळपत्या तेजोनिधीच्या तेजपूर्ण तपात तारतम्याने तुफान तापणे हेच खरे तप ! मी असे मनोमन ठरविले की मध्ये कुठेही बसायचे नाही किंवा थांबायचे नाही . आणि तो निर्णय योग्य ठरला कारण न थांबता सलग आठ ते दहा किलोमीटर मी चाललो . थोडासा जंगलातील रस्ता पार केल्यावर पूर्वी मला लागलेला मुख्य जयंती माता रस्ता लागला आणि त्यावर अर्धा किलोमीटर चालल्या नंतर पुन्हा एकदा डावीकडे जंगलामध्ये जाणारा कच्चा रस्ता लागला .इथे मुख्य डांबरी रस्ता सोडताना एक चमत्कार घडला . मी मनातल्या मनात असा विचार केला की आपण कालच शहरामध्ये असताना बिस्कीटचे पुढे सोबत घ्यायला पाहिजे होते .म्हणजे आत्ता जंगलामध्ये भूक लागल्यावर ते खाता आले असते . आता जंगलामध्ये शिरल्यावर काही मिळणार नाही . मी असा विचार करतो न करतो तोच रस्त्याने भरधाव वेगाने एक गाडी आली आणि माझ्या शेजारी थांबली . १५ वर्षाचा पोरसवदा मुलगा गाडी चालवत होता .त्याने माझ्या हातात दोन पारले जी बिस्किटांचे पुडे टेकवले आणि पुन्हा भरधाव वेगाने निघून गेला ! मी मनोमन नर्मदा मातेचे आभार मानले ! आता मातीचा रस्ता सुरू झाला . माती म्हणजे बारीक मुरूम देखील होते . त्यामुळे पायाला थोडेसे कष्टदायकच प्रकरण होते . झाडे विरळ होती आणि पानगळ झालेली होती . परंतु सलग झाडी मात्र होती .कडक उन्हामुळे सर्वच प्राणी पक्षी गायब होते .परंतु धुळीने माखलेल्या रस्त्यावर त्यांच्या पाऊलखुणा मात्र स्पष्टपणे दिसत होत्या . तरस ,बिबट्या , लांडगा ,नीलगाय ,सांबर , मोर इत्यादी अनेक प्राण्यांच्या पक्ष्यांच्या पाऊलखुणा मला वेळोवेळी जागोजागी दिसल्या .या मातीच्या आणि जंगलातल्या वाटेमध्ये मला एकही मनुष्यप्राणी किंवा गाडी आडवी गेली नाही . थोड्यावेळाने रस्ता वळला . आता जंगल अधिकच दाट झाले . इथे मला अचानक उजव्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली . एक मोठे तरस अचानक रस्त्यावर आले . आणि माझ्याकडे एकदा बघून उजवीकडे वळून रस्त्याने चालू लागले . मी क्षणभर थांबलो परंतु माझ्या असे लक्षात आले की ते त्याच्या वाटेने जात आहे . आणि मी जर थांबलो तर त्याला मी काहीतरी हल्ला करतो आहे अशी शंका येईल . त्यामुळे मी देखील त्याच्या मागे चालत राहिलो . साधारण २०० ते ३०० मीटर ते माझ्यासोबत माझ्यासमोरून चालले आणि नंतर एकदा मागे वळून पहात डावीकडच्या जंगलामध्ये पसार झाले . मी जणू काही झालेच नाही असे दाखवत चालत राहिलो . यापूर्वी देखील मी जंगलामध्ये समोरासमोर तरस पाहिलेले आहेत . परंतु दोघेही जमिनीवर उभे आहोत असा हा पहिलाच प्रसंग होता .

तरसाचे प्रातिनिधिक चित्र

अंगावरचे पट्टे स्पष्टपणे दिसणारा तो एक नर होता . त्याचा तो जबडा आणि चालण्याची विशिष्ट लकब लक्षात राहिली .तरसाचे पुढचे पाय मोठे असतात आणि मागचे पाय ओढत चालायची त्याला सवय असते . अंगावर असलेल्या पट्ट्यांमुळे बरेचदा दुरून त्याला लोक वाघ समजतात . शूलपाणी झाडीतील आदिवासी तरसाला झरखडो म्हणतात . आणि खोटा वाघ किंवा लांब तोंडाचा वाघ असे देखील म्हणतात . कारण तो वाघासारखा दिसतो . हा प्राणी अतिशय निर्भय असतो परंतु तितकाच निरुपद्रवी देखील असतो . शिकार करून खाण्यापेक्षा दुसऱ्याने केलेली शिकार पळवून खायला त्याला आवडते . याच्या जबड्यामध्ये खूप ताकद असते . असो .माझ्यासोबत पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे मी असे ठरवले होते की दर अर्ध्या तासाने दहा घोट पाणी प्यायचे .चढ उतार असलेले रस्ते देखील लागले . मोठमोठे जंगलातील मार्ग देखील दिसले . परंतु साधूंनी मला आधीच सांगितले होते की कुठेही डावीकडे उजवीकडे वळायचे नाही .नर्मदा परिक्रमे मध्ये अनुभवी लोकांचे ऐकणे हा फार महत्त्वाचा भाग असतो . पूर्वी अनेक प्रकारचे अनुभव घेऊन त्यांनी आपल्याला जे ज्ञान मोफत दिलेले असते त्याला हलक्यात घेऊ नये . इथे कोणीतरी मध्येच एका झाडा खाली एक माठ आणून ठेवला होता .परंतु दुर्दैवाने तो रिकामा होता . जाईल तिथे २० रुपयाची बिसलेरी बाटली सहज मिळण्याची सवय लागलेल्या आपल्या शहरी जीवनाला पाण्याचे महत्व अशा दुर्गम ठिकाणी आल्याशिवाय कळायचे नाही .


या चित्रामध्ये आपल्याला नर्मदा माता कावेरी माता संगम दिसतो आहे जिथे कश्यप ऋषींचा आश्रम आहे तिथून च्यवन ऋषींच्या आश्रमा पर्यंतचे घनघाट जंगल दिसते आहे .आणि तिथून पुढे कुंडी गावापर्यंतचा रस्ता किती घनघोर जंगलातून जातो आहे हे आपण पाहू शकतो .
च्यवन ऋषी आश्रमा नंतर थोडासा डांबरी रस्ता लागतो आणि मग संपूर्ण जंगलातून वाटचाल आहे !अतिशय अविस्मरणीय असा हा प्रवास आहे .

कुंडी गावापर्यंत पोहोचण्याच्या आधी एक छोटेसे हनुमान मंदिर लागते

अखेरीस हळूहळू लोकांचे आवाज येऊ लागले . आठ किलोमीटर पर्यंत निर्मनुष्य जंगल हा अनुभव अतिशय आनंददायक आणि लक्षात राहणार होता !इथे जंगलामध्येच झाडाखाली एक हनुमान जी विराजमान होते आणि आजूबाजूला जंगलात सर्व आदिवासी लोक तेंदू पत्ता तोडण्यासाठी जमलेले होते .

हेच ते जंगलातील हनुमान जी

प्रत्येकाची पाने तोडण्याची लगबग सुरू होती . कोणी पाने वाळत घालत होते .जंगलामध्ये फिरत ठरलेले सात दिवस तेंदु पत्त्याला आलेली चैत्रपालवीची हिरवीगार पाने तोडून ५०-५० पानांचे गठ्ठे बांधून फॉरेस्ट रेंजरच्या समोर शिस्तीने लावले जात .असे दहा x दहा चे गठ्ठे लावले किती ते तीनशे रुपयाला विकले जात . तीन रुपये ५० पैसे असा तेंदु पत्त्याचा सरकारी दर होता .इंदूरचे शेठ लोक यायचे . चार-पाच दिवस तिथे थांबून वरून खालून सगळी पाने वाळवून घ्यायचे . चांगली दिसणारी पाने गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला बांधली जायची . तांबूस दिसणारी किंवा छोटी किंवा किडकी पाने खाली टाकली जायची . या संपूर्ण भागामध्ये आदिवासी लोकांचे उत्पन्नाचे हे एक महत्त्वाचे साधन होते . त्या निमित्ताने त्यांना जंगलामध्ये फिरायला परवानगी मिळायची . परंतु फॉरेस्ट रेंजर त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचे त्यामुळे लाकडे तोडायला परवानगी नव्हती . तरी देखील पाने तोडण्याच्या निमित्ताने जंगलात कुठे लाकडे पडलेली आहेत हे आदिवासी हेरून ठेवायचे . आणि नंतर गुपचूप ती लाकडे गायब केली जायची ! ही सर्व माहिती अर्थातच मला तिथे बसून लोकांशी गप्पा मारल्यावर कळाली. मी देखील त्यांच्याबरोबर तेंदूपत्ता तोडून पाहिला . या पानांचा उपयोग पुढे अनेक प्रकारे केला जातो . पत्रावळी बनवणे असेल किंवा बिड्या बनवणे असेल या प्रत्येक ठिकाणी तेंदुपत्त्याचे पान लागते .याच झाडाला आदिवासी टेमरं असे देखील म्हणतात . सातारा पाटण जवळ हेळवाकची घळ आहे . त्या भागातील वनवासी लोक याला अळू असे म्हणतात . 

हे आहे तेंदुपत्ता किंवा टेंभुर्णी चे झाड . 

याची अजून बरीच नावे आहेत . वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याची नावे खालील प्रमाणे आहेत .


  • मराठी: तेंदू, टेंभुर्णी , अळु
  • शास्त्रीय नाव Diospyros melonoxylon
  • हिंदी: तेंदू , कोरोमंडल
  • संस्कृत: तिन्दुक
  • इंग्रजी: Tendu leaf
  • आंध्र प्रदेश: अब्नस
  • ओडिशा आणि पश्चिम बंगाल: केंदू
  • गुजरात: टेंबू
  • केरळ: कारी
  • तामिळनाडू: बाली तुपरा 
या झाडाची चांगली पाने खुडून गठ्ठे बांधले जातात
भारतामध्ये लाखो लोकांचा हा हंगामी रोजगार आहे . त्यात ९०% महिलांचा समावेश आहे .
सरकार निविदा मागवते . आणि ही पाने खरेदी करण्यासाठी विविध कंत्राटदार निविदा भरतात .एकदा निविदा मंजूर झाली की मग वन रक्षकांच्या समक्ष पानांची तोडणी आणि वाळवणी केली जाते .
कित्येक एकर परिसरामध्ये अशी पाने वाळत घातलेली आपल्याला पाहायला मिळतात . या पानांचे दर ठरवण्याचा अधिकार कंत्राटदाराला असतो .नंतर तो ती पाने स्वखर्चाने वाहतूक करीत बिडी कंपन्यांना विकतो . आदिवासींकडे लक्ष दिले नाही तर आदिवासी तेंदुपत्त्याचे अख्खे झाड तोडून टाकतात त्यामुळे आम्हाला इथे डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते असे एका वनरक्षकाने मला सांगितले . परंतु अलीकडच्या काळात पूर्वीपेक्षा तेंदूपत्त्याची झाडे कमी झालेली आहेत त्यामुळे उत्पन्न देखील कमी होत आहे . जी झाडे शिल्लक आहेत त्यांची उंची कमी झाली आहे .सरकार प्रतिवर्षी प्रयत्नपूर्वक तेंदुपत्त्याची नवीन झाडे लावायचा उद्योग करत असते .तेंदुपत्त्याचे जे फळ आहे ज्याला पावरा आदिवासी टेम्भरु किंवा टेम्णे म्हणतात . याची चव थोडीशी चिक्कू सारखी असते .चवीला तुरट असते आणि  शरीराला अत्यंत आवश्यक अशा जीवनद्रव्यांचा अतिशय उत्तम असा हा स्रोत आहे .त्यामुळे आदिवासी मुले हे फळ आवडीने खातात . याच्या बिया देखील गोळा करता येतात .हुबेहूब चिकूच्या बियांसारख्या या बिया दिसतात . तेंदुपत्ता गोळा करणे या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे हे खालील आकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल . २०२१ - २२ या वर्षांमध्ये संपूर्ण भारतभरातून गोळा झालेल्या तेंदुपत्त्याच्या गठ्ठ्यांची संख्या होती तीन लाख वीस हजार .यातून सुमारे ४००० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती . मध्य प्रदेश आजही सर्व राज्यांमध्ये अग्रणी तेंदू पत्ता उत्पादक राज्य आहे .जोपर्यंत बिड्या सिगार आदि पिणारे लोक आहेत तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही . असो . हळूहळू कुंडी गावामध्ये पोहोचलो . इथे सिंगाजी महाराजांचा भक्त असलेला एक पटेल नावाचा गवळी होता . त्याच्या घराजवळ एक मंदिर होते तिथे तो उतरायची सोय करायचा आणि स्वतः जेवण बनवून आणून द्यायचा .त्याच्याकडे आज देव बसणार होते . भिलट बाबा आणि ख्वाजा बाबाच्या मंदिरातून वाजत गाजत देवांना आणले जाई आणि सकाळी पाच वाजता कढाई असे .कढाई म्हणजे गाव जेवण ! याच्या घराजवळ शंभर एक लोक जमलेले होते . मी थकून भागून आल्यामुळे आंघोळ करावी असा विचार केला . इथे एक हातपंप होता . परंतु त्याचे पाणी प्रचंड खोल गेले होते . पाच एक मिनिटे सलग हापसल्यावर पाणी यायचे . तसे करून आंघोळ केली . बिड्या आणि गांजा ओढून गांजलेला बंगाली बाबा इथे आधीच आलेला होता . प्रचंड खोकत होता . मला त्याची खूप दया आली . परंतु तो काही बिडी सोडायला तयार नव्हता . असे लोक खोकला येऊ लागल्यावर अधिकच बिड्या ओढतात .जणू काही बिडी हे खोकल्यावरचे औषध च असावे असा त्यांचा आविर्भाव असतो .
हेच ते कुंडी गावातील मंदिर . याच्या आवारामध्ये झोपलो होतो .
मंदिरात श्रीरामाच्या मूर्ती आहेत .
हनुमान जी देखील आहेत .

समोरच एक नंदी देखील आहे .

रात्री कुंडी गावातच सर्व गवळी लोकांसोबत पुरी भाजी खाल्ली आणि मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो . उकाडा खूप होता .घामाने सर्व बिछाना भिजून गेला . कशीबशी रात्र काढली . रात्रभर बंगाली बाबा खोकत राहिला . पहाटे लवकर उठून भिलट बाबाच्या मंदिरातील ५ वाजता मिळणारा प्रसाद घेतला . हापश्यावरती स्नानासाठी गेलो होतो इतक्यात एक किस्सा घडला . इथे खाजगी बसेसचे प्रमाण खूप आहे . मध्यम आकाराच्या गाड्या असतात . ड्रायव्हर अतिशय सराईतपणे परंतु बेदरकारपणे गाडी चालवतात . असाच एक ड्रायव्हर वेगाने बस घेऊन आला . आणि त्याने कुठल्याही प्रकारे गाडी न थांबता दोन गाड्या आणि एक गाय उडवली ! हे सर्व माझ्या नजरेसमोर घडले ! सर्वत्र एकच हाहाकार उडाला ! सगळे गावकरी ड्रायव्हरच्या दिशेने धावले . त्या सर्वांनी मिळून चालकाला धावत्या गाडीतूनच बाहेर खेचला ! चालकाला तुफान मारहाण सुरू झाली . परंतु या गडबडीमध्ये बस मात्र चालूच राहिली आणि पुढे पुढे पळत राहिली . मी धावतच तिकडे गेलो . बसच्या पुढे दगड टाकून लोक तिला थांबवायला पाहत होते . एका तरुणाला मी पटकन बस मध्ये चढून किल्ली काढून घ्यायला सांगितले . त्याला किल्ली कुठे असते माहिती नव्हते . बसच्या शेजारून पळत मी त्याला किल्ली दाखवली .किल्ली काढल्याबरोबर गाडी जागेवर उभी राहिली.नशीब त्या गाडीचा वेग अधिक नव्हता .अन्यथा तिने अजून पाच-सहा जिवांचा कार्यक्रम नक्की केला असता !या गावामध्ये गवळी , आदिवासी आणि बंजारा अशा तीन जातीचे लोक राहतात .हा चालक बंजारा जातीचा होता आणि गाय गवळ्याची होती .मोठाच राडा सुरू झाला . काल परवा पर्यंत डोक्यावरून पदर घेऊन महाराजजी , बाबाजी म्हणणाऱ्या स्त्रिया ज्या पद्धतीने लाथा बुक्क्या आणि इरसाल शिव्या घालू लागल्या ते पाहून मी अवाक् झालो ! इथे फार थांबण्यात अर्थ नव्हता कारण कोणीच शुद्धीवर नव्हते .सर्वजण संतापाने फणफणलेले होते . त्यामुळे हळूच मी तिथून काढता पाय घेतला . पुन्हा एकदा जंगल लागले . आणि पुन्हा तेंदुपत्ता वेचणारे आदिवासी दिसू लागले .वनउपज विकत घेऊन वनखाते यांना खूप सारे पैसे देते .सर्व प्रकारच्या जंगली बिया किलोवर विकत घेतल्या जातात व पुन्हा जंगलात उधळल्या जातात . वाटेत संकलन केंद्रे जागोजागी सुरू होती . त्यामुळे वन्य पशुंचा वावर त्या भागात असणे दुरापास्तच होते .कुंडी नंतर बडेल गाव लागले इथे सुंदर असे दुमजली मंदिर होते .इथून पुढे चार किलोमीटर जंगल तुडवल्यावर मेहंदी खेडा गाव होते .ते पार करताच पुन्हा एकदा घनदाट जंगलातून चालत तरान्या हे गाव लागले . इथपर्यंत येता येता सकाळचे साडेदहा वाजले . आणि ऊन अति कडक झाले .इथल्या सरपंचाकडे उतरलो . भोजन संपले आहे असे त्या घरातल्या माऊलीने सांगितले .मग मी तिथेच काही काळ शांत बसून राहिलो . इतक्यात शेजारून दोन चपात्या व तिखट जाळ आमटी आली . ती खाऊन झाडाखाली उन्हामध्ये पडून राहिलो .दुपारी तीन वाजता निघून पिपरीची वाट धरली . सलग नऊ किलोमीटर लांबीचे जंगल होते . मध्ये सावलीच नव्हती . तत्पूर्वी कनाड नावाची नदी गुडघाभर गरम पाण्यातून उतरून पार केली . पाणी अतिशय स्वच्छ होते .इथे सर्व वन्य पशु पाणी प्यायला येत . जंगल मस्त होते .
कनाड नदी आणि तिच्या आसपासचे दाट जंगल
कनाड  नदीचीच अन्य काही रुपे
कनाड नदीच्या काठावरील घनदाट जंगल .

बरेच अंतर चालल्यावर पिपरी गावात आलो .या संपूर्ण विभागातच
पिपरी गाव मोठे होते . मोठ्या गाड्या वगैरे फिरत होत्या .हा आता देवास जिल्हा सुरू झाला होता .इथून इंदोर ६५ किलोमीटर दूर होते . इथून केवळ बारा किलोमीटर अंतरावर धाराजी अर्थात धावडीकुंड नावाचे परम पवित्र तीर्थक्षेत्र होते . जिथे उंचावरून खाली पडणाऱ्या नर्मदा मातेच्या प्रवाहामुळे अनेक छोटे मोठे रांजणखळगे तयार झालेले होते .आणि त्या ठिकाणी वाहून येणाऱ्या दगडांची सुंदर अशी शिवलिंगे तयार होत . या कुंडामध्ये सूर मारून ती शिवलिंगे काढून देणारा एक मनुष्य होता असे मी अनेकांकडून ऐकले होते .आता मात्र ओंकारेश्वर बांध झाल्यामुळे ही धावडी कुंड संपूर्णपणे जलमग्न झालेले आहे .

धाराजी ही आता नर्मदा मातेच्या या प्रचंड जलाशयामध्ये जलमग्न झालेली आहे .
जलाशयाच्या मधोमध ध्वज दिसतो आहे तिथे धावडीकुंड आहे
या तुझ्यापासून सुमारे १०० फूट खाली हे धावडी कुंड आहे .
आजही लोक नावेने जाऊन या भागाचे दर्शन घेऊन येतात .
इथपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता उपलब्ध आहे . पायी परिक्रमेदरम्यान धारा जी यांचे दर्शन घेऊ न शकल्यामुळे मध्यंतरी पुन्हा एकदा खास दर्शनासाठी गेलो असताना काढलेले हे फोटो आहेत .
धारा माई कशी दिसायची याचे चित्र येथे लावलेले आहे . 
धावडीकुंडाचे मूळ चित्र
हीच ती नर्मदा मातेची परमपवित्र धाराजी

इथे मोठ्या रांजणखळगे असल्यामुळे त्या शिवलिंगे नैसर्गिक रित्या तयार व्हायची
हे रांजणखळगे फार प्रचंड होते
हा संपूर्ण प्रस्तर असल्यामुळे इथे खाली देखील घळी गुफा वगैरे होत्या .
या भागात अनेक गुफा असून त्याबाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत .त्यापुढे वेळोवेळी पाहूच .



अशा रांजणखळग्यामध्ये काही दगड पडले की ते नर्मदा मातेच्या प्रवाहामुळे एकमेकांवर आपटून गोलाकार आकार धारण करत .हीच नर्मदा मातेतील खरी शिवलिंगे होती . ही धाराजी वाचवता आली असती का हा संशोधनाचा विषय निश्चितपणे आहे .
असो . पिपरी गावामध्ये ग्रामस्थांनी दोन मजली सुंदर नर्मदा मंदिर बांधले होते .इथे परिक्रमावासींची राहण्याची सोय खाली केलेली होती . स्वतंत्र भोजन कक्ष पत्र्याच्या शेड मध्ये बांधण्यात आला होता . समोर मोठे पटांगण होते . एक छोटीशी इमारत होती जिथे सेवादार राहायचे . मनकामनेश्वरी माँ रेवा माता मंदिर व अन्नक्षेत्र असे या अन्नक्षेत्राचे नाव होते .मी इथे आलो तेव्हा गुप्ता नामक दोन बंधू जळगावचे डॉक्टर रमेश पाटील इत्यादी सेवक इथले कामकाज पाहायचे .डॉक्टर पाटील मला त्यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी चहा दिला .तसेच काही औषध पाणी हवे असल्यास देतो म्हणाले . अर्थातच उत्तम मराठी बोलत होते .कोल्हापूरच्या एक माताराम होत्या ,ज्यांना देवास जिल्ह्यामध्ये दिलेले होते .त्या इथली भोजन सेवा पहायच्या .त्यांचा पती हिंदी भाषिक होता . सांगली कोल्हापूरकडचा परिक्रमा वासी आल्यावर त्यांना माहेरचा माणूस आल्यासारखे व्हायचे आणि काय करू आणि काय नको असे व्हायचे ! त्याचा अनुभव मी देखील घेतला ! इथे पाण्याची मोठी टाकी होती . तिचे गळणारे पाणी प्यायला खूप पक्षी यायचे . इथे मी येण्यापूर्वीच केरळी साधू महाराज येऊन उतरलेले होते . सभागृह मोठे असल्यामुळे त्यांच्यापासून थोडेसे लांबच मी आसन लावले . इथे पाण्याची सोय चांगली असल्यामुळे स्नान केले व कपडे देखील धुतले . संध्याकाळी आश्रमाच्या गच्चीवर असलेल्या नर्मदा माता मंदिरामध्ये आरती केली . आरतीसाठी गावातील काही आजोबा आणि नातवंडे येत असत . नातवंडांशी भरपूर खेळलो .नर्मदा खंडातील लहान मुले परिक्रमावासींशी लवकर एकरूप होतात असे माझे निरीक्षण आहे . रात्री केरळी साधूशी भरपूर गप्पा मारल्या . तो सवयीप्रमाणे पहाटे पाच पासूनच पुढे चालायला लागला  . माध्यान्ह होईपर्यंतच तो चालायचा .अगदी सलग विना थांबा चालायचा . आणि मग दुपारी मुक्काम करून टाकायचा . मी निवांत सात वाजता उठून स्नानादी आटोपून चहा घेऊन मग निघालो . डॉक्टर पाटील यांनी पुन्हा एकदा मला चहा पाजला .या आश्रमातील सेवेने मी प्रसन्न झालो . आश्रमामध्ये सुंदर सुविचार लावलेले होते . तसेच उत्कृष्ट चित्रे काढलेली होती . नर्मदा मातेचे मंदिर आपल्या डोक्यावर असल्यामुळे छान वाटायचे . उशिरा परिक्रमा उचललेली असल्यामुळे सोबत फारसा परिक्रमावासींचा जथा नसायचा हा फार मोठा लाभ मला अशा रितीने झालेला होता . ज्यांना ज्यांना एकट्याने परिक्रमा करायची आहे त्यांनी देखील आवर्जून उन्हाळ्यातच  चालावे . म्हणजे चांगले तप घडते . मनुष्य तापून निघतो .
पिपरी गावचा नर्मदा माता मंदिर आणि आश्रम असा दुमजली होता .
आश्रमाच्या दोन्ही बाजूंनी वर मंदिराकडे जाणारा जिना असून त्यावर धाराजीचे सुंदर चित्र काढले आहे .
गच्चीवर नर्मदा मातेचे सुंदर मंदिर आहे
मंदिराचा कळस असा दिसतो
नर्मदा मातेची सुंदर मूर्ती 
धाराजी किंवा धावडीकुंडाचे जुने दृश्य जिन्यावर काढलेले आहे .

इथून जवळच सीतावन आहे . हे मोठे पौराणिक स्थान आहे . साधारण एक किलोमीटर चालून एका शेताला वळसा मारला की सीतावन लागते . या ठिकाणी खालच्या बाजूला एक रेवाकुंड आहे तसेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे . डोंगर वजा टेकडी चढली की वरच्या बाजूला सीतामातेचे मंदिर आहे . हा एक सुंदर जलप्रपात असून रेवा कुंडामध्ये सतत पाणी असते . अतिशय रम्य असे हे स्थान आहे . श्री श्री १००८ मोहनदासजी महंत नावाचे एक थोर तपस्वी साधू इथे गेल्या २० -२२ वर्षांपासून स्थानधारी आहेत .यांची तपस्या इतकी मोठी आहे की त्यांच्या जटांची लांबी १२ फुटांपेक्षा जास्त आहे ! यांचा एक डोळा निकामी झालेला असून एकाच तेजस्वी डोळ्याने ते आपल्यावर कृपा कटाक्ष टाकतात .महाराजांचा खूप चांगला सत्संग मला लाभला . मी खरे तर हे कुंड जिथे आहे तो झरा ओलांडायचा की नाही अशा द्विधेमध्ये होतो . परंतु स्वामींनी मला सांगितले की कुंडाचा उगम खाली आहे त्यामुळे तू येऊ शकतोस . महाराजांनी मला आदेशच दिला की जेवल्याशिवाय जायचे नाही . त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता . असा वेळ मिळाला की चांगला सत्संग होतो आणि स्थान दर्शन देखील होते .इथे एक राजस्थानचा साधू थांबलेला होता . त्याने उत्तम प्रकारे कणिक मळली आणि साधूंचा रोटाला केला.साधू रोटला कसा करतात हे सांगायचे असेल तर डोळ्यासमोर मी सांगतो तसे चित्र आणा . एकावर एक पाच पिझ्झा बेस ठेवले तर कशी जाडी होईल त्याच आकाराचा आणि त्याच जाडीचा एकच रोटला बनवला जातो .हा रोटला धुनीमध्ये शेकला जातो . हा बनवण्यासाठी तो भरपूर मळणे हीच महत्त्वाची प्रक्रिया आहे . या काळामध्ये गव्हाच्या पिठाचे किण्वन होते आणि आतून रोटला जाळीदार बनतो . हा चुरून भाजी किंवा आमटी सोबत खाता येतो .गुळासोबत देखील खाता येतो . दुधासोबत खाता आला तर दुग्ध शर्करा योगच ! रोटाला बनेपर्यंत स्वामींचा खूप चांगला सत्संग घडला . स्वामींना मी अनेक शंका विचारून घेतल्या . त्यांनी देखील कुठलाही किंतु परंतु न ठेवता सगळ्या प्रश्नांची चांगली उत्तरे दिली . नंतर स्वामिनी मला सगळा परिसर बघून यायला सांगितला . लवकुशांचा जन्म झाला ती गुहावजा जागा इथे दाखवली जाते . तसेच सीता जमिनीमध्ये पुन्हा प्रवेश करती झाली ती जागा देखील इथे दाखवतात . त्यामुळे जमिनीला पडलेली भेग इथे दिसते . रामायण हे भारतीय लोकांना इतके परम प्रिय आहे की अशा जागा अनेक ठिकाणी लोक दाखवतात .अगदी देशाविदेशामध्ये रामायणातील कथा आमच्याच इथे घडल्या असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात .यामध्ये या महाकाव्याचे महत्त्व दडलेले आहे . इथे एक गंमत झाली . फिरता फिरता मला एक नेल पॉलिशची भरलेली बाटली सापडली . जंगलात कचरा नको म्हणून मी ती उचलली . परंतु माझ्या डोक्यात एक कल्पना आली . नेल पॉलिश च्या रंगाने मी स्वामींची परवानगी घेऊन आश्रमात सगळीकडे सिताराम नर्मदे हर वगैरे अक्षरे लिहून काढली !स्वामींनी मला काही चौपाया लिहायला सांगितल्या . परंतु तेवढा रंग माझ्याकडे नव्हता . परंतु साधुसंतांची इच्छा ही परमेश्वराला देखील पूर्ण करावीच लागते . त्याप्रमाणे पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाला मध्यंतरी ( फेब्रु २५ ) गेलो असताना त्यांनी लगेच रंगाचा डबा माझ्या हातात दिला आणि सांगितले मागच्या वेळी राहिलेल्या चौपाया आता लिहून काढ ! मग मात्र मी त्या चौपाया लिहून काढल्या !ब्रश नव्हता परंतु मागे डोंगरावर बांबूचे झाड कुठे आहे मला माहिती होते . तिथला बांबू तोडून आणला आणि दाताने चावून ब्रश तयार केला ! इथे भोजन प्रसादी घेऊन पाठ टेकायचा प्रयत्न केला परंतु प्रचंड उन्हाळा असल्यामुळे बसून राहिलो .इतक्यात इथे तीन शिक्षक आले .एक रतनपुरचे होते .व सध्या बडेल ला राहत . एक जण राधास्वामी सत्संग बियास चे साधक होते . मारवाड प्रांतातील लोकांची ही संस्था आपल्याला परिचित असेल . अनेक छोट्या मोठ्या गावांच्या बाहेर अगदी एक सारखे दिसणारे यांचे आश्रम असतात . अगदी भिंतीची रचना देखील सारखी असते आणि आत लावलेल्या झाडांचा क्रम देखील ठरलेला असतो ! तिघांशी भरपूर गप्पा झाल्या . त्यांनी मला नर्मदा परिक्रमे विषयी प्रश्न विचारून भंडावून सोडले ! तिघे देखील समाधान पावले ! मोहनदास स्वामी कौतुकाने आमची ही मैफल बघत होते ! कुठलेही उत्तर दिले की मी "बरोबर आहे ना स्वामीजी ? " असे विचारून खात्री करून घ्यायचो ! स्वामीजी देखील हसून अनुमोदन द्यायचे ! मोहनदास स्वामीजींचे पेन्शनचे रखडलेले एक काम होते ते मी तिथे करून दिले . माझ्याजवळ सातूचे पीठ होते ते मी दुपारी महाराजांना खाऊ घातले . त्यांना खूप आवडले ! शिक्षकांनी काही फोटो त्या वेळी काढले . ते सोबत जोडत आहे . 
नेल पॉलिश च्या रंगाने रंगवलेली अक्षरे दाखविताना प्रस्तुत लेखक
श्री श्री १००८ मोहनदास त्यागी जी यांच्यासोबत प्रस्तुत लेखक
बडेल गावामध्ये शिकवणारे शिक्षक महाराज आणि प्रस्तुत लेखक .आणि होय हीच ती बाटली !
नेल पॉलिश ने सिताराम अक्षरे रंगवताना प्रस्तुत लेखक
अलीकडेच वाहन परिभ्रमणात पुन्हा एकदा महाराजांच्या दर्शनाचा योग आला होता . त्याप्रसंगी प्रस्तुत लेखक .
महाराजांचा जटाभार खरोखरीच "भार " अर्थात जड आहे .
महाराजांच्या जटांची लांबी
ठीक १२ फूट लांब अशा या जटा आहेत .
 
दाढीच्याही जटा झालेल्या आहेत .
महाराजांनी प्रस्तुत लेखकाकडून लिहून घेतलेली चौपाई व सीताराम
रोटला केला ती धुनी व मागे सीता गुंफा मार्ग
चौपाई व आश्रम परिसर
इतक्या जटांचा त्रास होत नाही का विचारल्यावर महाराज सांगतात की प्रचंड त्रास होतो . परंतु प्रत्येक क्षणाला त्या जटा " तू साधू आहेस " अशी जाणीव जटाधारीला करून देतात ! आणि स्थान भ्रष्ट होण्यापासून वाचवतात !
मागे दिसणारी सीता गुफा
संत मिलन को चालिये । तज माया अभिमान । ज्यो ज्यो पग आगे धरे । कोटीन यज्ञ समान ॥
श्री श्री १००८ मोहनदास त्यागीजी महाराज फोन व फोन पे वापरतात . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे आहे . 
६२६४०७३४११
+916264073411
येता येता मी स्वामीजींच्या आज्ञेनुसार   "पवित्र रेवाकुंड "अशी पाटीही लिहून आलो . 


स्वामीजींनी अलीकडेच प्रस्तुत लेखकाकडून लिहून घेतलेली अजून एक चौपाई
 

श्री मोहनदास स्वामींनी केलेला उपदेश हृदयात साठवुयात .
अब मोहि भा भरोस हनुमंता । बिन हरी कृपा मिलहि नही संता ॥
बडेल गावातील शिक्षकांनी काढलेली महाराजांची छायाचित्रे




टिप्पण्या

  1. वेळ मिळाला की मागील लेखांक चा दुवा जोडावा. नर्मदे हर!

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार,
    पाठच्या व या लेखांका मध्ये आलेलं वर्णनात्मक जंगलाचा भाग वर्षानुवर्षापासून ट्रेकिंगच्या छंदामुळे फिरत असतो ओंकारेश्वर पासून वर नेमावरपर्यंतचा नर्मदेचा अतिसुंदर प्रदेश आहे दुर्दैवाने दोन धरणांमुळे सर्व भाग जलमग्न आहे.
    ओंकारेश्वर ते धाराजी असे नावेतून ट्रेकिंग आयोजित करत असताना दोन्हीकडच्या काठावरील सुंदर जंगल दृष्टीपत्तात येत असे.
    तसेच धाराजीच्या मूळ स्थानी लोक अचानक पाणी सोडल्यामुळे वाहून गेलेली आहेत. या धाराजीच्या परिसरामध्ये दोन्हीकडे किनाऱ्यावर रॉक्स ची कटिंग जबलपूर जवळच्या भेडाघाट सारखे सुंदर होते ते आता जलमग्न झालेले आहेत फक्त ते काळ्या पाषाणात होते.
    च्यवंन ऋषी,कोठावा हे दरवर्षी ट्रेकिंग स्पॉट आहेत.
    धाराजी जवळच कावड्या पहाड नावाची फत्रांच्या लांब शिळा खंड ठेवलेली जागा आहे. या शिळा कुणी व केव्हा इथे आणून ठेवले याचा पत्ता नाही.
    आम्ही अभिमानाने म्हणतो की जसा महाराष्ट्राला सह्याद्री आहे , तशीच इंदूरकरांना नर्मदामाई आहे.

    सदानंद काळे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सदानंद जी ! पुढील लेखामध्ये आपण दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहितीचा समावेश आपल्या नामोल्लेखासह केलेला आहे .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !