लेखांक ८५ : बिलगांव ची होळी आणि धडगावचे राजू टेलर


पहाटे लवकर उठून मान्याभाई पावरा यांचा निरोप घेतला आणि पुढे निघालो . डांबरी सडक मला तशी आवडत नव्हतीच . आपण खूप वेगाने चालतो आहे असे वाटायचे . इतक्यात एखादे आदिवासी कुटुंब माझ्या दुप्पट वेगाने अगदी सहज पावले टाकत माझ्या पुढे निघून जायचे ! तुमच्या मारुती गाडीच्या सर्वोच्च वेगाने तुम्ही दृतगति महामार्गाने चाललेले आहात आणि अचानक तुमच्या दुप्पटीहून अधीक वेगाने एखादी पोर्श करेरा जी टी गाडी तुम्हाला मागे टाकून पुढे निघून जाते तेव्हा कसे वाटते तसे काहीसे माझे व्हायचे ! गंमत म्हणजे कितीही प्रयत्न करा आपण त्यांना गाठू शकत नाही ! मुळातच त्यांच्या पावलांमध्ये इतकी सहजता आहे आणि ढांगा इतक्या मोठ्या असतात की आपण त्यांना गाठूच शकत नाही . हे लोक चालण्यासाठी बनलेले आहेत . दिवसभरात कुठेही जाण्यासाठी ते कितीही चालू शकतात . चालण्याचा त्यांना जरा देखील कंटाळा नाही .
        आज माझ्यासोबत विशाल जवंजाळ देखील काही काळ चालत होता . सोबत म्हणजे गप्पा मारता येणार नाही असे अंतर ठेवून आम्ही चालत होतो . मला डांबरी सडके ने चालण्याचा प्रचंड कंटाळा आला . आणि काही कोणाला कळायच्या आत मी उजवीकडच्या जंगलामध्ये घुसलो . विशाल ही धावत धावत माझ्या मागे घुसला . एका अरुंद पायवाटेने चालत राहिलो . उजवीकडे एक ओढा होता त्या ओढ्या मध्ये उतरलो .  ओढा जवळपास कोरडा पडत आलेला होता .वाहणारे पाणी थांबले होते . परंतु साचलेले पाणी शिल्लक होते . त्यातील दगड गोट्यांवरून उड्या मारत चालत राहिलो . मला खात्री होती की हा ओढा जाऊन जाऊन कुठे जाणार आहे ! त्याचे पात्र सोडायला नको ! म्हणजे मैय्याचे दर्शन होईल ! डांबरी रस्ता हळूहळू खूप वर गेला आणि लांब निघून गेला . आम्ही खोल दरीत उतरत होतो . ओढया ने अनेक वळणे घेत , उड्या मारत मार्गक्रमणा सुरू ठेवली .  एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी याहून सुंदर जागा मिळणे कठीण आहे ,असा तो ओढा होता . सुमारे तासभर आम्ही त्या ओढ्यातून चाललो असू . अचानक समोर एक छोटीशी टेकडी आली . ओढ्याने टेकडीला वळण घातले होते . मी असा विचार केला की आपण ओढ्या सोबत न चालता ही छोटीशी टेकडी चढून उतरावी . टेकडीवर चढलो मात्र समोरचे दृश्य पाहून बेभान झालो ! जिथवर नजर जाईल तिथवर फक्त नर्मदा मातेचे जल च पसरलेले होते ! आज पर्यंतच्या परिक्रमेमध्ये इतका भव्य दिव्य जलाशय कोठेच पाहिला नव्हता ! समोर साक्षात मैय्याला पाहून उत्स्फूर्तपणे .बेंबीच्या देठापासून तिचा जयजयकार सुरू झाला ! विशाल ही मागून आला आणि ते दृश्य पाहून अवाक झाला ! दोघांनी आनंदाने टेकडी पळतच उतरली आणि झोळ्या काठ्या टाकून मैया मध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता क्षणात उतरलो ! उतरताना लक्षात आले की गुडघाभर चिखल काठावर झालेला आहे . परंतु इतक्या दिवसांनी नर्मदा मैया चा स्पर्श होत असल्यामुळे ते सर्व क्षम्य होते ! इथे एक नाव नांगरलेली होती . मी विशालला एक कल्पना सांगितली . इथे पाणी खूप दिवस थिजलेले असल्यामुळे प्रचंड चिखल गाळ झालेला होता . या नावेचा आधार घेत आम्ही थोडेसे अजून खोल पाण्यात जाऊ शकत होतो . त्यामुळे पाण्यातूनच नावेला बाहेरून पकडून आम्ही थोडे अजून खोल पाण्यात गेलो . नावेला धरण्याचा फायदा इतकाच की बुडावे लागणार नाही . स्वच्छ निळ्या रंगाची ती फायबरची नाव होती . इथे सुंदर असे नर्मदा स्नान करून दोघे बराच वेळ काठावर बसून राहिलो . कोणीही कोणाशीही बोलत नव्हते . मौनामध्ये सर्वांचे बोलणे सुरू होते . सर्वजण म्हणजे मी , विशाल आणि मैया ! 
वाचकांना या भूभागाची कल्पना यावी म्हणून गुगल वरून या भागाचे चित्र सोबत जोडत आहे .

इथे समोर मध्य प्रदेश आहे आणि आपण महाराष्ट्रा मधून पाहत आहोत . नर्मदामाईच्या मधून जाणारी तुटक रेषा ही दोन राज्यांची सीमारेषा आहे .
हा भाग अतिशय निसर्ग संपन्न आहे .
इथे मानवी वावर अतिशय कमी आहे . अगदी अलीकडे पर्यंत इथे येण्यासाठी रस्ता नव्हता . आता इथून बिलगाव कडे कसे जायचे माहिती नव्हते . साधारण डाव्या हाताला कुठेतरी बिलगाव आहे इतकेच माहिती होते माहिती होते . या भागातून मैयाच्या काठाने चालण्यासाठी रस्ता उपलब्धच नव्हता . मुळात हे भयानक पर्वताचे शिखर होते . मैयाचे पाणी दरीमध्ये भरल्यामुळे ही जमीनी ची पातळी आहे असे वाटायचे .

आता या भागातील हाच किनारा पहा .इथे तुम्ही काठाने कसे काय चालू शकणार आहात ? हे केवळ कठीण नव्हे अशक्यच आहे .
मैया चे पाणी अक्षरशः हजारो शाखांनी आत मध्ये घुसलेले आहे त्यामुळे चालायला मार्ग मिळतच नाही .
हे चित्र पावसाळ्यात असून उन्हाळ्यामध्ये हा सर्व परिसर अतिशय रुक्ष असतो .
उन्हाळ्यातील शूलपाणी . डोंगराचे हे तीव्र उतार चालणे कठीण करतात . अत्यंत सावधपणे प्रत्येक पाऊल टाकावे लागते . चुकलेले एक पाऊल तुम्हाला किती खाली घेऊन जाईल याचा अंदाज लावता येणे कठीण असते . 
आम्ही देखील असाच एक डोंगर चढायला सुरुवात केली . आसपास कोणीही माहिती सांगणारे भेटत नव्हते . अक्षरशः कुठे जावे काय करावे काहीच कळेनासे झाले . कारण जिकडे बघावे तिकडे मैयाचे पाणीच शिरलेले दिसत होते . 
अशा पद्धतीने नर्मदा मातेचे पाणी सर्व नदी ,नाले , ओढे यांच्यामध्ये उलटे शिरलेले असते .
विशालला आता पुढे निघून जायचे होते . त्यामुळे मी त्याला काही अनुभव जन्य सूचना विनाकारणच देत होतो . उदाहरणार्थ मी त्याला सांगितले की हे पहा जेव्हा असा प्रसंग येईल की कुठे जायचे कळत नाही तेव्हा नर्मदा मातेला हाक मारायची . काहीतरी सोय होते . असे म्हणून आम्ही दोघांनी नर्मदे हर असा पुकारा केला . तेवढ्यात समोरच्या डोंगरा आडून एक तरुण स्त्री शेळ्या हाकत आमच्याकडे आली . तिने फाटका तुटका गाऊन घातला होता . इतक्या भयंकर डोंगर उतारावरून गाऊन घालून ही कशी काय चालू शकत होती हे मला कळले नाही ! त्या माताराम ला आम्ही बिलगाव कडे जाण्याचा रस्ता विचारला . तिने दोन-तीन मार्ग सांगितले . पैकी डांबरी सडके कडे जाणाऱ्या मार्गाने विशाल मार्गस्थ झाला . इथे एक उदे किंवा उदय नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते . त्या नदीमध्ये अनेक सुंदर सुंदर धबधबे आहेत असे मला त्या मातारामने सांगितले . मी असे ठरविले की मार्कंडेय ऋषी ज्याप्रमाणे उपनदी च्या काठाने चालत तसे काहीतरी करत आपण जाऊया . त्यासाठी एक अतिशय उंच डोंगर चढणे मला आवश्यक होते . तिथून पुढे नदीसोबत फक्त उतरायचे होते . 
जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर पर्याय येतो की सोपा मार्ग निवडावा की अवघड मार्ग निवडावा तेव्हा तेव्हा माझे प्राधान्य कायम कठीण मार्गालाच राहते . कारण त्या निमित्ताने तुम्हाला तुमची क्षमता जोखण्याची एक संधी प्राप्त होते आणि समजा अपयश आलेच तर सोपा मार्ग आहेच हे तुम्हाला आधीच माहिती असते ! आता सुद्धा डांबरी मार्गाने चालण्यापेक्षा इथे कधी नव्हे ते आलेलो आहोत तर इथले सृष्टी सौंदर्य पाहत चालावे असे मला फार वाटले . समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
सदा सेवी आरण्य तारुण्य काळी ।
 मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ।
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥
याच लोकांचा एक अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ निश्चितपणे आहे . परंतु समर्थ रामदास हे फार मोठे कवी होते त्यामुळे अनेक अर्थ ध्वनित होणारे काव्य लिहिणे ही त्यांची विशेषता राहिलेली आहे . नाही श्लोकाचा अर्थ विविध प्रकारे सांगता येतो विविध प्रकारे सांगता येतो . अरण्य याचा अर्थ सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून निःसंग रहाणे असा आहे त्याचप्रमाणे याचे साधे शब्दार्थ देखील प्रभावी आहेत . साध्या शब्दात अर्थ पहायचा झाला तर समर्थ सांगतात ही जोर करून आहात तोपर्यंत अरण्यवास दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकून घ्या . कारण एकदा का तुम्ही वयस्कर झालात की अशा ठिकाणी जाण्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार नाही अशी तुमची अवस्था होणार आहे ! फक्त अशा ठिकाणी भटकताना आपल्या मनाचा दृढ निश्चय मात्र ढळू देऊ नका . असे जो कोणी करेल तो प्रभू रामाचा दास धन्य होय ! मला सर्वच संतांचे वाङ्मय वाचण्याची खूप आवड आहे .परंतु
समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा माझा जीवनावर अतिशय खोल प्रभाव राहिलेला आहे . याचे कारण त्यांना असलेली भटकंतीची आवड हे एक असू शकते ! त्यांच्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी अरण्यवासाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे . 
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ॥
 किंवा 
गिरी कंदरे राहीजे दुरी देशे । 
किंवा
सुखालागी आरण्य सेवीत जावे ।
किंवा 
खनाळामध्ये जाऊन राहे ।तेथे कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥
अशा त्यांच्या अनेक काव्यांमधून आपल्याला त्यांचे निसर्ग प्रेम आणि एकांत वासाची उत्कट इच्छा दिसून येते . असो .
इथे असलेले काही धबधबे प्रसिद्ध आहेत . त्यातील दोन मी पाहिले . अर्थातच पाणी नव्हते परंतु कठीण मार्गाने येथे उतरण्याचा आनंद मला घेता आला . पावसाळ्यामध्ये मात्र हा परिसर खूप सुंदर असतो .वाचकांच्या माहिती करता या जलप्रपातांची चित्रे सोबत जोडत आहे . 
त्रिशूल नावाच्या गावातून उदयनदी थोडीशी पुढे आल्यावर कुवरखेत नावाचा सुंदर धबधबा आहे .
हाच तो कुवरखेतचा धबधबा .एक मोठी सलग दगडी घसरगुंडी हे या धबधब्याचे वैशिष्ट्य आहे .
अतिशय सुंदर असा हा खडक आहे .
आमखेडीपाडयाचा धबधबा
एकंदरीत हा भूभाग असा आहे .
इथला सर्वात प्रसिद्ध धबधबा मात्र बारधाऱ्या धबधबा हाच आहे . नीट पाहिले असता हा १२ मोठया धारांनी खाली पडतो .
मी गेलो तेव्हा अर्थातच हा धबधबा जवळपास कोरडा पडला होता परंतु धोकादायक पद्धतीने दगडांवरून खाली उतरण्याचा आनंद मी इथे घेतला ! ( प्रस्तरावगमन )
थोडेसे अंतर चालल्यावर बिलगाव लागले . मला लक्षात आले की गेले काही दिवस मी ज्या ज्या गावात जातो आहे त्या प्रत्येक गावातील होळीचा सण त्या त्या दिवशी च आयोजित करण्यात आलेला आहे ! नर्मदा मातेचे नियोजन कसे असते पहा ! मी स्वप्नातही अशा पद्धतीने परिक्रमा करण्याचे नियोजन कधी करू शकलो नसतो .  ही केवळ तिची कृपा ज्यामुळे मला हे सर्व सण समारंभ उत्सव पाहता आले ! अगदी मूळ स्वरूपात पाहता आले ! बिल गावामध्ये होळीची प्रचंड लगबग चालू होती ! सर्वत्र नटलेले थटलेले आदिवासी तरुण-तरुणी फिरत होते . सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला तुम्हाला या काळामध्ये आवर्जून दिसतो . एरव्ही ही माणसे फार साधी राहतात . 
पावरा आदिवासी तरुणाचे याच भागातील छायाचित्र . 
याची पॅन्ट जागोजागी जी फाटलेली आहे ती फॅशन नसून अनेक दिवस एकच एक वस्त्र नेसून कष्ट केल्याचा तो परिणाम आहे . डोंगर चढताना उतरताना आपटून धोपटून वगैरे फाटल्याची ही चिन्हे आहेत . सध्या मात्र अशा प्रकारे कपडे फाडून ते चढ्या भावाने विकण्याची पद्धत फॅशन जगतामध्ये आढळते . एसी खोलीतून बाहेर पडत एसी उद्वाहकाने खाली उतरत एसी कार मध्ये बसून गाव बोंब मारणाऱ्या " शहरी कष्टकऱ्यांना " असे खऱ्या कष्टकऱ्यांची आठवण करून देणारे फाटके कपडे घालण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे ! असो .
बिलगावामध्ये मी पुन्हा एकदा पावरा आदिवासी लोकांचे निरीक्षण करू लागलो . या लोकांची मी जी काही निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत अगदी बऱ्यापैकी तीच सर्व निरीक्षणे विकिपीडिया वर देखील नोंदविण्यात आलेले आहेत असे माझ्या लक्षात आले . त्यातील छोटासाच लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे म्हणून आपल्याशी शेअर करावा असे मला वाटले . कृपया आपण तो वाचावा म्हणजे आपल्याला पावरा आदिवासी समाजाची थोडक्यात तोंड ओळख होईल . तो लेख खालील प्रमाणे .

आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळते .

पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे .

पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला व पाल्या म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.

पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पॅंट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात तर आताचे स्त्रीया साडी परिधान करू लागल्या आहेत. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.

पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या ( भुत्या )बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी आधी भौंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात.

होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात.

पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरिष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात महूच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

पावरा समाज आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करून लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

होळीच्यानिमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या आधी १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात रायबावा बुद्यावन्य प्राणीचेटकीण वा काली इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात . होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात.

नाटकांचे प्रकार :

राय : हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्यांचा पेहरावात दोन ९ वारी साडयांचे केलेले उपरणे असते. कंबरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तलदार व डोक्यावर रंगीत पागोटे असते. यांच्या सोबत साडी नेसलेले स्त्री वेषातील पुरुष असतात. या सर्वांना गेर नृत्यातील शिस्त चोखपणे पाळावी लागते. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यास मनमोहक असते.

  • बावा बुद्या: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूंपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढऱ्या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती  दुधी भोपळ्याची वाळलेली फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. व कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा ढोलाच्या ठेक्यावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते.
  • वन्यप्राणी: वेषात अस्वल वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात.
  • चेटकीण वा काली: प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते. ( विकिपीडिया वरील लेख इथे समाप्त होतो . सौजन्य : विकीपेडिया आणि त्यावरील विविध लेखक व संपादक)

आपण यापूर्वी जे अनेक व्हिडिओ आपल्या लिखाणातून अपलोड केलेले पाहिले त्यातील सर्व नृत्यांमध्ये तुम्हाला वरील सर्व पात्रं भेटतील .पावरा आदिवासी नृत्याची एक वेगळी प्ले लिस्ट आपल्या यूट्यूब चैनल वर केलेली आहे ती आवर्जून पहावी म्हणजे आपल्याला यांची संस्कृती लक्षात येईल .

होळी किंवा भगुरै किंवा भंगुरई सणाच्या प्रसंगी पावरा आदिवासी बांधव करत असलेले गेर नृत्य

आजचा माझा दिवस चालण्याचा होता . बहुतांश डोंगराचा उतार असल्यामुळे खूप वेगाने चालत होतो . बिलगावा मध्ये खूपच मोठी होळी पेटवण्यात आली होती . या गावातील लोकांच्या होळ्या किती मोठ्या असतात त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही . अक्षरशः मान दुखेल इतक्या उंचीची होळी रचलेली असते . मला तर काही लोकांनी सांगितले की बिलगाव मधील होळी भमाण्यामधून सुद्धा दिसते ! हे अंतर साधेसुधे नाही , तब्बल २२ किलोमीटर आहे ! होळी निमित्ताने इथे खूप मोठा मेळा देखील लागला होता . बिलगावातली होळी पहात पुढे निघालो . हा नावाला महाराष्ट्र होता . इथे अजूनही कोणीही मराठी बोलत नव्हते . मुळात हे सर्व सण उत्सव याच काळात का होत असतील ? विचार केल्यावर मला जाणवले , की हा परिसर मानवी वस्तीसाठी किती विषम आहे पहा . पावसाळ्यामध्ये इथे इतका मुसळधार पाऊस असतो की बाहेर फिरकता देखील येत नाही . थंडीच्या दिवसांमध्ये इतकी प्रचंड थंडी पडते की माणूस गोठून जातो . उन्हाळा तर इतका कडक आहे की तुम्हाला भाजून काढतो . त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंचा संधी काळ अर्थात होळी हा एकमेव कालावधी येथे मानवी वावरासाठी किंवा एकत्रीकरणासाठी सुसह्य असा उरतो . 
बिलगावानंतर सर्व सपाटीवरील गावे लागली . या भागातली सपाटी म्हणजे दोन गावांच्या मध्ये पर्वत न लागता टेकड्या लागतात ! हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आहे . आता हळूहळू डोंगर उतारावर दाट झाडी दिसू लागली होती . शेतीचे प्रमाण वाढले होते . सुंदर अशा नदीला समांतर रस्ता चालला होता . त्यामुळे मी बहुतांश वेळा नदीपत्रातूनच चालायचो . नदी महाराष्ट्रामध्ये वाहत असल्यामुळे अर्थातच खाली जमीन कमी आणि खडक जास्त होता . त्या खडकावरून लागणारे छोटे मोठे धबधबे आणि नदीपात्राचा आनंद घेत चालत होतो . इथे कोळी लोक छोट्या छोट्या दगडांची मोठी रांग करतात त्यामुळे एक छोटेसे धरण तयार होते . अशा धरणामध्ये मग ओढणीने किंवा साडीने मासे पकडले जातात . ज्यांना जाळे देखील विकत घेणे शक्य नाही असे लोक या पद्धतीने मासे पकडून स्वतःच्या जेवणाची सोय करतात . साडी देखील धुवून निघते आणि मासे देखील सापडतात .
रस्त्याला समांतर चाललेली नदी . मागे दिसणारे खप्परमाळ चे डोंगर .
नदीमध्ये मासे धरण्यासाठी गरीब कोळी बांधवांनी घातलेले छोटे छोटे बांध . पुढे डोह असल्यामुळे तिथे मासे धरणे अवघड होते . 
नदीच्या आजूबाजूला सर्वत्र अभेद्य महाराष्ट्राचा काळा कातळ आहे .
मी जेव्हा या भागात सपाटी लागली असे म्हणतो तेव्हा या बालकाच्या मागे दिसणारा रस्ता पहा , तसा रस्ता मला अपेक्षित असतो .
हळूहळू या भागामध्ये बारमाही शेती ,झाडे आणि ताडाची झाडे दिसू लागली .
ताडाच्या झाडाचे खोड होळीच्या मधोमध वापरले जाते यावरून तुम्ही होळीच्या उंचीचा अंदाज घ्यावा ! मागे दिसणारे पर्वत मी काल उतरून आलो होतो . अजूनही मी डोंगरांमध्येच होतो . मूळ महाराष्ट्राची भूमी गाठण्यासाठी तुम्हाला अजून बरेच डोंगर खाली उतरावे लागते . (सर्व चित्रे संग्रहित )
या भागात आल्यावर आपला महाराष्ट्र किती सुजलाम सुफलाम आहे ते कळते .
यालाच मी सपाटी म्हणतो आहे !
एकंदरीत हा परिसर सुगम आणि सुरम्य आहे .इथवर येण्यासाठी बरेच रस्ते आहेत .
गावांची नावे आता जरा आपलीशी वाटू लागली होती .तसे पाहायला गेले तर ही महाराष्ट्रातील सर्वात गरीब गावे गणली जाणारी गावे होती . परंतु मध्य प्रदेशातील मोठ्या गावांपेक्षा सुद्धा अधिक समृद्धी येथे नांदत आहे हे सहज कोणालाही दिसत होते . आपला महाराष्ट्र सर्वार्थाने पुढारलेला आहे आणि देशाचे अग्रगण्य नेतृत्व करणारा आहे हे नुसता असा त्याचा भूगोल पाहीला तरी लक्षात येते . लहानपणी कीर्तनामध्ये मी आर्या या अक्षरगण वृत्तातले एक सुभाषित ऐकले होते व ते कायमचे लक्षात राहिले होते . 
कीर्तनकार सांगतात की काय केल्यामुळे मनुष्य चतुर होतो किंवा मनुष्याला चातुर्य प्राप्त होते ? तर

केल्याने देशाटण ।
पंडित मैत्री सभेत संचार ।
शास्त्र ग्रंथ अवलोकुनि ।
मनुजा चातुर्य येतसे फार ॥

नर्मदा परिक्रमा तुम्हाला यातील प्रत्येक गोष्ट करण्याची खूप चांगली संधी देते . पर्यायाने परिक्रमेच्या अखेरीस तुमची चातुर्य पातळी वाढली पाहिजे अशी तिची फलश्रुती आहे . विशेषतः ज्यांना राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रामध्ये जीवित कार्य करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी नर्मदा परिक्रमा हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे . आळंदी येथे परम पूज्य जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था नावाची संस्था आहे , जीने वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुनरुज्जीवन केले असे एकमुखाने मानले जाते .
संस्थेची आळंदी मधील मूळ इमारत
या संस्थेने आजवर मानव जातीला हजारो अत्युत्कृष्ट कीर्तनकार दिले .
 या संस्थेमध्ये चार वर्षे राहून कीर्तनाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आहेत . या सर्वांना कीर्तनाचा परिपूर्ण अभ्यास झाल्यावर नर्मदा परिक्रमा करून येणे अनिवार्य केलेले आहे . कारण चार वर्षांमध्ये तुम्ही जे शिकलात त्याचे प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये प्रकटीकरण कसे होते आहे हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी नर्मदा परिक्रमे मध्ये जेवढे तुम्हाला मिळू शकते तेवढी अन्यत्र कुठेही मिळणार नाही हे धगधगीत सत्य आहे . ही केवळ वदंता नसून अशा रीतीने परिक्रमा करणारे अनेक वारकरी विद्यार्थी मला माझ्या परिक्रमेदरम्यान भेटले . रामदासी संप्रदायातील नर्मदा परिक्रमा केलेले देखील अनेक लोक मला माहिती आहेत . विवेकानंद केंद्र किंवा रामकृष्ण मठाचे देखील अनेक साधक नर्मदा परिक्रमा करतात . थोडक्यात काय तर नर्मदा परिक्रमा करणे या गोष्टीचे महत्त्व भारतातील सर्वच सांप्रदायांनी ओळखलेले असून ती करून आलेल्या व्यक्तीचा लाभ विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला करून घेता आला पाहिजे . ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष अनुभूती याच्यामध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो . असो .
राजबर्डी , कामोद , भोगावडे ,उमरणी , धनाजे , वडफल्या अशी गावे पार केल्यावर धडगाव लागत होते .
यातील धनाजे गावामध्ये मी आलो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सुंदर आश्रमाने माझे लक्ष वेधले . हनुमंताचे मंदिर भरपूर झाडी आणि दोन सुंदर कुटी असलेला हा छोटासा आश्रम होता . खरे म्हणजे बिलगाव च्या जत्रेमध्ये खाण्यापिण्याचे खूप सारे स्टॉल लागलेले होते आणि माझ्याकडे थोडेफार पैसे देखील होते . परंतु परिक्रमा वासीं कडून लोक इथे पैसे घेत नाहीत . आणि तसेही परिक्रमेमध्ये विकत घेऊन खाणे वर्ज्यच आहे . त्यामुळे दिवसभर उपाशीपोटी चालत होतो . विशालची आणि माझी केव्हाच ताटातूट झालेली होती . सोबत एखादा परिक्रमावासी चालत असेल तर त्याच्या जवळचे खाणे थोडेफार आपल्याला खायला मिळते . आज एकटाच चालल्यामुळे तसेही काही झाले नव्हते . त्यामुळे कडकडून भूक लागली होती .  या आश्रमाची व्यवस्था अच्युतानंद सरस्वती नावाचे एक तेजस्वी संन्याशी सांभाळीत होते . मी हनुमंताचे दर्शन घेऊन आत मध्ये गेलो . आणि स्वामीजींना ओम नमो नारायण केले . त्यांनी मला माझे नाव विचारले .मी त्यांना नाव सांगितले . इथे एका अनपेक्षित घटना क्रमाने माझ्या परिक्रमेचा ताबा घेतला . प्रत्यक्षामध्ये मला ओंकारेश्वरच्या मुक्कामी राजू टेलर म्हणून धडगाव चे जे परिक्रमा वाशी भेटले होते त्यांना भेटून त्यांच्याकडे मुक्काम करायचा होता . म्हणजे तशी प्रेमळ तंबीच त्यांनी मला दिलेली होती . या राजू टेलर यांचे घर इथून किती लांब आहे हे मी स्वामीजींना विचारत होतो . स्वामीजींनी राजू टेलरला फोन लावून मला बोलायला दिले . परंतु तत्पूर्वी दोघेजण जे काही बोलले ते अतिशय संशयास्पद होते ! तो आला आहे . त्याला तिकडे पाठवू का इकडेच ठेवू वगैरे दोघांचे बोलणे चालले होते ! जणूकाही माझा ताबा घेण्यासाठी दोघांची चर्चा चालली होती असे मला वाटले ! सर्व संशयास्पद होते . अखेरीस न रहावून मी स्वामीजींना विचारले की स्वामीजी नक्की काय झाले आहे मला सांगा .  तरी देखील स्वामी मला केवळ आज तू धडगावातच राहा पुढे जाऊ नको असेच सांगत राहिले . वाचकहो तुम्हाला अधिक गोंधळामध्ये न टाकता प्रत्यक्षामध्ये काय झाले होते ते सर्व सांगतो . आदल्या दिवशी मी फोदला गारद्या पावरा यांच्याकडे भोजन घेतले होते .तिथे त्यांचा मुलगा दिनेश याने माझ्याबरोबर काढलेले दोन-तीन फोटो नंतर जेव्हा केव्हा रेंज येईल तेव्हा तुमच्या मित्राला पाठवतो असे मला सांगितले होते . यानंतर मी पुढे मार्गस्थ झालो होतो परंतु माझ्या मागोमाग काही वेळातच दिनेश देखील डोंगर चढून वर आला तिथे त्याला रेंज आली आणि त्याने माझे फोटो माझ्या मित्राला पाठवून दिले . माझ्या मित्रमंडळींना मी महाराष्ट्रामध्ये आलो आहे असे लक्षात आल्याबरोबर त्यांनी अचानक असा विचार केला की चटकन गाडी काढावी आणि माझी नर्मदे काठी भेट घ्यावी ! अशा रीतीने मला भेटण्यासाठी माझे चार मित्र तयार झाले ! ज्यांना मी सर्व फोटो पाठवत होतो ते बाळासाहेब वाल्हेकर , त्यांच्याकडे त्या काळामध्ये राहणारे माझे इतिहास संशोधक मित्र श्री घनश्यामराव ढाणे , मी आर्टिक क्षेत्रात नोकरी करत असताना माझे वरिष्ठ राहिलेले श्री प्रशांत चन्ने आणि त्याच कंपनीतील सह कर्मचारी श्री अनिल पावटे असे चौघेजण एका क्षणात तयार झाले आणि गाडी काढून नंदुरबारच्या दिशेने निघाले सुद्धा ! दिनेशने पुढील क्रमांक म्हणून यांना धनाजे आश्रमातील स्वामीजींचा क्रमांक दिला . साधारण तुमची चाल वगैरे पाहून या लोकांना अंदाज येतो की हा परिक्रमावासी उद्या कुठे मुक्कामाला पोहोचलेला असेल . तसेच माझ्या मित्रांनी कुठून तरी राजू टेलरचा क्रमांक देखील मिळवला आणि या दोघांशी त्यांचे बोलणे सतत चालू होते . माझे मित्र या दोघांना फक्त एवढेच सांगत होते की आम्ही येत आहोत तोपर्यंत त्याला थांबवून ठेवा . कारण एकदा हा पुढे सटकला तर आमचा संपर्क होणे अवघड आहे . आणि हे दोघे त्यांना सांगत होते की अजून तरी तुमचा मनुष्य आमच्या आश्रमात आलेला नाही परंतु तो येईलच याची खात्री देता येत नाही . दिनेशला खात्री होती की मी या दोन्हीपैकी एका कुठल्यातरी आश्रमामध्ये नक्की थांबणार आहे आणि तसे तो माझ्या मित्रांना सांगत राहिला . माझ्या अपरोक्ष हे सर्व प्रकार सुरू आहेत याची मला तीळ मात्र कल्पना नव्हती . स्वामीजींना असे वाटले की बहुतेक मी घरदार सोडून पळून आलेला परिक्रमावासी आहे आणि मला पकडून घरी नेण्यासाठी माझे मित्र येत आहेत . त्यामुळे ते मला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते . परंतु का थांबवून ठेवत आहे ते सांगत नव्हते . अखेरीस मी स्वामीजींना म्हणालो की कृपा करून नक्की काय सुरू आहे ते सर्व मला सांगावे . मग त्यांनी मला माझ्या मित्राला फोन लावून दिला . मला फोनवर संवाद साधल्यावर लक्षात आले की हे चौघे मला भेटण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत . आता इथे अजून एक गंमत घडणार होती . माझे आध्यात्मिक गुरु श्री जनार्दन स्वामी खेर  यांची समाधी नंदुरबार जिल्ह्यातच टाकरखेडा नावाच्या गावामध्ये आहे तिथे जाऊन दर्शन करून येण्याची मला इच्छा होती . आणि माझे मित्र येताना त्या ठिकाणावरूनच येणार होते . सर्वप्रथम मी स्वामीजींना सांगितले की मी काही पळून वगैरे आलेला परिक्रमावासी नसून मी परिक्रमा अर्धवट सोडून परत वगैरे जाणार नाही आहे . परंतु मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन अवश्य घ्यायचे आहे . हे ठिकाण साधारण ७० किलोमीटर दूर होते याचा अर्थ दोन दिवस जायला आणि दोन दिवस यायला मला लागणार होते . परिक्रमेमध्ये ७० किलोमीटर हे अंतर अतिशय किरकोळ वाटते . परंतु माझ्या मित्रांपैकी बाळासाहेब वाल्हेकर आणि प्रशांत चन्ने या दोघांना देखील टाकरखेडा येथील आश्रम बघण्याची इच्छा होती त्यामुळे सगळाच घोळ झाला होता कारण ते निघालेले असल्यामुळे लवकरच या परिसरामध्ये पोहोचणार होते . अखेरीस अतिशय हुशार असलेल्या अच्युतानंदन सरस्वती स्वामी महाराजांना सर्व घटनाक्रमाचा अंदाज आला आणि त्यांनी मला पुढील मार्ग सुचविला तो याप्रमाणे .
त्यांनी मला सांगितले की माझे गुरुस्थान हे परिक्रमेपासून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे तिथे जाण्यासाठी परिक्रमेप्रमाणे चालत जाण्याची गरज नाही . तरी मी परिक्रमा मार्गावरील एखाद्या ठिकाणी नर्मदा मैया आणि माझी झोळी वगैरे सर्वसामान ठेवावे .नर्मदेची प्रार्थना करावी की मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन सुरळीतपणे घडवावे आणि मिळेल त्या मार्गाने गुरुस्थानचे दर्शन घेऊन पुन्हा त्या अधिष्ठानापाशी यावे आणि परिक्रमा पुढे सुरू करावी हे उत्तम आहे . तिथे जाण्यासाठी गाडी मार्ग धडगाव या पुढच्या गावातून होता . त्यामुळे अधिक वेळ न घालवता मी पुढे धडगावात निघून जावे असे त्यांनी मला सांगितले . ही दोन्ही गावे शेजारी शेजारी असून मध्ये फक्त एक नदी आहे . मी धडगाव मध्ये जाऊन राजू टेलर यांचे दुकान गाठले . त्यांना देखील मित्रांचा फोन आल्यामुळे ते माझी वाटच पाहत होते . यांचे एक अतिशय छोटेसे टेलरिंग चे दुकान गावामध्ये असून गुंठा भर जागेमध्ये छोटेसे घर यांनी बांधलेले आहे . इथे परिक्रमावासींची अगदी आश्रमासारखी सेवा होत नसली तरी कोणी अचानक आले तर ते नाही म्हणत नाहीत इतकेच . शिवाय आता स्वतः नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आल्यामुळे हे परिक्रमावासींना मार्गदर्शन देखील आवर्जून करतात . यांना जेव्हा कळाले की मी सकाळपासून उपाशीपोटी ४४ किलोमीटर चालत आलेला आहे , तेव्हा त्यांनी ताबडतोब घरी भोजन प्रसादी बनविण्याचा आदेश दिला . वरच्या मजल्यावर बांधलेल्या छोट्याशा खोलीध्ये मी आसन लावले होते . एक पातळ लोखंडी जिना वरती घेऊन जात होता . विचार करून पहा .मुळात हा सर्व मागासलेला परिसर आहे आणि अशा ठिकाणी छोटेसे टेलरिंग चे दुकान . ते असे किती चालत असणार ? परंतु तरी देखील मला काही सेवा द्यावी अशी इच्छा राजू दादा यांना होत होती हे फार महत्त्वाचे आणि मोलाचे होते . त्या दिवशी मला मिळालेल्या भोजनाप्रसादीचे मूल्य शब्दांमध्ये कसे काय करता येईल ! यांचा तरुण मुलगा माझ्याशी लगेच 'कनेक्ट ' झाला . जेन झी का काय नावाचा नवीन प्रकार सध्या बाजारात आहे ! मला या प्रकाराबद्दल आमच्या चिरंजीवांकडून कळले जे स्वतः जेन झी आहेत ! १९९७ ते २०१२ या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या मुलांना जेन झी असे म्हणतात . १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेले मिलेनियल म्हणून ओळखले जातात . २०१२ ते आजतागायत जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन अल्फा म्हटले जाते . मला यातील कुठलीही पिढी वर्ज्य नाही . माझे अतिशय जवळचे मित्र जर तुम्ही पाहू गेलात तर त्यात सत्तर ते ८० या वयोगटातील मित्र अधिक आहेत ! गंमत म्हणजे मी त्यांचा मित्र असा उल्लेख करत नसून ही गुरूतल्य व्यक्तिमत्त्वे इतरांना ओळख करून देताना हा आमचा मित्र आहे अशी ओळख करून देतात ! याचा अर्थ कुठल्याही जनरेशन अर्थात पिढीतील माणसाशी जुळवून घेऊन संवाद साधण्याची युक्ती मला साधलेली आहे . परंतु त्यातल्या त्यात अधिक आनंद देणारे संवाद हे या तथाकथित जेन झी सोबत घडतात असा माझा अनुभव आहे . राजू टेलर यांचा चिरंजीव या वयोगटातला होता . त्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या ! जेव्हा मी राजू टेलर यांना स्वामीजींनी मला दिलेला सल्ला सांगितला तेव्हा त्यांनी देखील तो योग्य असल्याचे सांगितले आणि आज रात्रीच तुला एखाद्या दुधाच्या वगैरे गाडीमध्ये बसवून शहाद्याच्या दिशेला पाठवून देतो असे मला सांगितले . राजू टेलर यांची नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांनी घरामध्ये त्यांची नर्मदा मातेची कुपी पूजेमध्ये ठेवली होती तिच्या शेजारीच माझी नर्मदा मैय्या देखील स्थापित केली . आणि गाडीची चौकशी करण्याकरता आम्ही दोघे मुख्य रस्त्यावर आलो . इथे एक ट्रक जो रोज रात्री शहाद्याला जायचा तो उभा होता परंतु नेमका त्याच दिवशी तो जाणार नव्हता . आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली परंतु त्या दिशेला जाणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती . ट्रकचा मालक डेअरी चालवायचा त्याला देखील विचारले परंतु त्याने असमर्थता दर्शवली . सुदैवाने माझे निघालेले मित्र देखील मध्ये कुठेतरी मुक्कामासाठी थांबले त्यामुळे मला अजून एक दिवस मिळाला . अखेरीस उद्या पहाटे पाचच्या सुमाराला पहिली एसटी पकडून शहादा सारंगखेडा मार्गे टाकरखेडा गाव गाठायचे आणि माझ्या मित्रांनी देखील त्याच वेळी तिथे पोहोचायचे असे ठरले . त्यानंतर ते मला पुन्हा धडगावला आणून सोडणार होते आणि माझी परिक्रमा पुढे सुरळीत सुरु होणार होती .  ज्या गुरुदेवांमुळे आज माझे अस्तित्व आहे त्यांच्या समाधीस्थानाचे दर्शन आपल्याला घडणार आहे आणि नर्मदा जलाने त्यांना अभिषेक करता येणार आहे , या कल्पनेनेच माझी झोप उडाली ! रात्रभर मी तळमळत राहिलो . कधी एकदा उजाडते आणि कधी एकदा मी गुरुस्थानाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होते असे मला झाले ! माझे धड धडगावामध्ये पडलेले होते परंतु मन मात्र कधीच टाकरखेड्याला पोहोचले होते !





लेखांक पंचाऐंशी समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. Narmade Har Babaji🙏 Pudhil bhaganchya pratikshet ahe. Nitya ek bhaag upload karava hi namra vinanti.🙏 Narmade Har.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही अपरिहार्य धार्मिक कारणामुळे थोडासा प्रवास घडतो आहे . लिखाण चलभाषावरून करतो आहे आणि इंटरनेटची यथायोग्य गती व एकांत मिळाल्यावरच लिहिणे होते आहे . हे सर्व योग जुळून येणे थोडेसे अवघड असल्यामुळे लिखाण मागे पडत आहे तरी सर्वांनी कृपया सहकार्य करावे ही नम्र प्रार्थना !

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर