लेखांक ८२ : सेमलेटची भंगुरई आणि खारिया भादल चे नक्करसिंग सोलंकी

घोंघसा आश्रमातून निघाल्यावर थोडीशी झाडी लागते . मैया ला उजव्या हाताला ठेवून आपण चालत राहायचे . मध्ये अनेक डोंगर येतात . यातील एका डोंगराच्या डाव्या उतारावरून चालत राहावे लागते . मध्ये काही खिंडी लागतात . त्या पार करत करत आपण चालत राहायचं . पायाखालची जमीन मुरमाड आहे . त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते . पाय सटकला की दरीमध्ये पडणे निश्चित आहे . बरं इथे पडताना मध्ये धरण्यासाठी एखादे झाड सुद्धा नाही . 
इथे उजव्या हाताला मोरदेव झरना नावाचे एक गाव आहे . इथे पावसाळ्यामध्ये मोराच्या आकाराचा एक धबधबा पडतो असे ऐकले . नंतर मला भेटलेला एक परिक्रमा वासी या मार्गाने आला त्याने देखील या झऱ्याबद्दल सांगितले . गुगल नकाशावर याची काही चित्रं सापडली ती आपल्यासाठी देत आहे .
 मोरदेव झरना
डोंगराची सोंड धरून चालत राहिलो .
मी चालत एका खिंडीमध्ये पोहोचलो . इथे भिल्लांचे काही देव आहेत . लाकडाच्या कुऱ्हाडीने तासलेल्या मूर्ती असतात . इथे काही काळ कट्टयावर बसून विश्रांती घेतली .
हीच ती खिंड आणि हेच ते देव आणि हाच तो कट्टा .
( संग्रहित छायाचित्र )
मी इथे काही काळ बसलेला असतानाच मागून प्रजापती पिता पुत्र आणि राधे गिरी व अमर गिरी आले . त्यांना इथे बसून मी चटकन पुढे निघालो . डोंगराचा उतार तीव्र होता . आणि मी प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो . इतक्यात माझ्या मागून दोन माताराम आल्या . दोघीही तरुण होत्या . दोघींच्या डोक्यावर जड पिशव्या चुंबळ करून ठेवलेला होत्या .दोघीही बहिणी असाव्यात . यातली मोठी बहिण जी होती तिला पाहून मी अवाकच झालो . तिच्या डोक्यावर दोन मोठ्या पिशव्या होत्या . उजव्या कडेवर तीन वर्षाची मुलगी होती . आणि डाव्या हातात एक तान्हे बाळ तिने पकडले होते जे तिच्या पदराआड अमृतपान करत होते . परंतु हे सर्व करताना ती अतिशय वेगाने चालत होती . आणि ते देखील तीव्र उताराच्या मुरमाड पायवाटेने जिथून पाय सटकला की सर्वांचा कपाळमोक्ष निश्चित आहे ! तिच्या पायात साध्या स्लीपर होत्या ! मागून येऊन या दोघी अतिशय वेगाने पुढे निघून गेल्या . तिचा तो आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो ! जिथे प्रत्येक पाऊल टाकताना हजार वेळा विचार केला पाहिजे तिथे हे लोक बिंनधास्त पळत होते ! त्यांचे पाहून माझ्या देखील पायांना गती आली . त्या कुठे पावले टाकत आहेत त्याचा मी अभ्यास केला . आणि मग हळूहळू मला देखील वेगाने डोंगर उतरण्याची युक्ती सापडली . मी विनाकारण पडण्याला घाबरत होतो . एकदा पडण्याचे भय संपले की मनुष्य अचाट कृत्ये करू शकतो . जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे लागू होते ! अशा पद्धतीने परिक्रमेमध्ये भेटणारा प्रत्येक जीव तुम्हाला काही ना काही शिकवून जातो . तुमचे जीवन कालच्या पेक्षा अधिक समृद्ध करतो . तुम्हाला विचार करण्याची एक नवीन दिशा देतो .किंवा तुम्ही ज्या दिशेने चालले आहात ती दिशा योग्य की अयोग्य याचे मार्गदर्शन तरी करतोच करतो ! 
अजूनही काही लोक डोंगर उतरताना दिसले . अतिशय वेगाने धावत हे डोंगर उतरतात . या डोंगरांचा उतार सर्वसामान्य नाही . अतिशय निसरडे डोंगर आहेत .
हे सर्व लोक सेमलेट गावातील भंगुरै बघायला चालले होते . इथे असलेली शंभर एक गावे अशी आहेत की गावातील सर्वजण सर्वांना ओळखतात . प्रत्येक गावात कोण राहते आहे आणि त्याच्या घरात कोण कोण सदस्य आहेत हे जवळपास प्रत्येकाला माहिती असते . मुलींची लग्न देखील आसपासच्या गावातच लावलेली आहेत . त्यामुळे त्यांना देखील सर्वांची सर्व माहिती आहे . 
अखेर सेमलेट गावात पोहोचलो . सर्वत्र मोठाच मेळा भरला होता . कोणाचा कोणाला मेळ लागत नाही तो खरा मेळा ! छोटी मोठी दुकाने लागली होती . खाण्याचे पदार्थ , नाश्त्याच्या गाड्या , शीतपेये , दागिन्यांची दुकाने , वाणसामानाची दुकाने ,फळांची भाज्यांची दुकाने असे सर्व लागले होते . या गावापर्यंत डांबरी सडक येत होती त्यामुळे सर्वसामान इथे गाडीने आणण्यास सोपे होते . एक सारख्या कपड्यांच्या जोड्या परिधान करून आदिवासी मुले मुली जत्रा भर फिरत होते . इन्स्टंट फोटो काढण्याचा स्टॉलवर फार गर्दी होती .
नटून थटून भंगुरै बघायला आलेली एक आदिवासी तरुणी . बहुतांश तरुणांची लग्न या जत्रेतच जुळतात .तिच्या हातातील चांदीचे तोडे बघा ! जितके अधिक दागिने तितकी अधिक श्रीमंत घरातील मुलगी ! तितकी तिला मागणी अधिक ! 
आपल्या मुलाचे लग्न जुळण्यासाठी जत्रेत आलेल्या
 एका कुटुंबाने मला पकडले आणि माझ्यासोबत त्यांचा इन्स्टंट फोटो काढण्याची विनंती केली . लगेच स्टुडिओ वाल्याने तो फोटो काढून दिला . आणि त्याची एक छापील प्रत मला मोफत भेट दिली .  तो फोटो आपल्यासाठी खाली जोडत आहे . त्यावरून तुम्हाला मामा लोकांचा पारंपारिक वेश कळेल . 
एका आदिवासी कुटुंबासोबत प्रस्तुत लेखक सेमलेट गावातील यात्रेदरम्यान . पायात नवा कोरा बूट दिसतो आहे . आदिवासी लोकांची नजर किती भेदक असते पहा . आदिवासी स्त्रियांचे पारंपारिक अलंकार या काळात तुम्हाला पाहायला मिळतात . जे मुख्यत्वे करून चांदीमध्ये घडवलेले असतात . प्रत्येक तरुणाच्या गळ्यामध्ये शेला असतोच . बाहेर पडले की तो डोक्याला बांधला जातो . पुरुषांनी कमरेला लोकरीची शाल लुंगी सारखी गुंडाळलेली असते . परिक्रमावासींना मात्र जुने जाणते मामा लोक मान देतात .
या गावातील सरपंचाच्या घरी भोजन प्रसाद मिळतो असे मला कळले . खरे म्हणजे जत्रेमध्ये काय म्हणाल ते खाता आले असते . परंतु ते परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . इथे धनुष्यबाण विकणारा देखील एक मनुष्य मला सापडला . परंतु त्याने मला धनुष्याला हात देखील लावू दिला नाही . माहिती किंवा किंमत सांगणे तर फार लांबची गोष्ट . धनुष्यबाण फक्त आदिवासी लोकांना दिला जातो . त्याचे पावित्र्य हे लोक जपतात .
अगदी लहान असल्यापासून आपल्या मुलांना आदिवासी धनुर्विद्या शिकवतात . त्यांचे धनुष्यबाण लहान आकाराचे असतात . 
भाल्याने मासेमारी करणारा एक आदिवासी मुलगा . धनुष्यबाण , भाला , फाल्या नावाचा कोयत्या सारखा सुरा इत्यादी वापरण्याचे प्रशिक्षण लहानपणापासून यांना असते .  हे लोक अत्यंत निर्भय असतात . अशा जमातींना खरे म्हणजे लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये आग्रहाने भरती करून घेतले पाहिजे . म्हणजे गुन्ह्यांचे प्रमाण नगण्य होईल . 
सेम्लेट हे एक वनग्राम आहे . याच्या अंतर्गत आठ गावे येतात . भादल ,कोटबांधणी , धंजारा ,तुवरखेर्डा , खेरवणी , जीवनी , सेम्लर , पाटी आणि कारी ही ती गावे होत .  उमराव सिंग सोळंकी या गावचे सरपंच होते .

 सेम्लेट गावचे सरपंच उमराव सिंह सोळंकी
(संपर्क : ९७५४४९०८४८ /97544 90848 )

कन्हैयालाल राठोड हे इथले ग्रामसचीव आहेत .
 सेम्लेट गावच्या सरपंचाच्या घरी मी गेलो आणि उतार उतरून खाली असलेल्या एका खोलीमध्ये सामान ठेवले . घरात पाहुण्या रावळयांची गडबड चालू होती . तशा गडबडीत देखील सरपंचाच्या मुलीने मला ताटभर  गरमागरम ताजे भोजन आणून दिले . थंडगार फ्रिजमधील पाणी देखील आणून दिले . या भोजनाने अक्षरशः तृप्त झालो .
सरपंच तेवढ्या गडबडीमध्ये देखील दोन मिनिटांसाठी मला येऊन भेटून निघून गेला . विश्रांतीसाठी पडलो असतो तर झोप लागली असती म्हणून मी लगेच पुढे निघण्याचा निर्णय घेतला . बाहेर बंदोबस्तासाठी काही पोलीस उभे होते . त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला कळाले की इथे कुठल्याही प्रकारच्या पोलीस बंदोबस्ताची गरज लागत नाही . आदिवासींचे स्वतःचे कायदे आहेत आणि स्वतःचे नियम ते कठोरपणे पाळतात . पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ देणे म्हणजे अपयश मानले जाते . त्यामुळे पोलीसही फारसा हस्तक्षेप करत नाहीत केवळ ' ड्युटी ' लागली आहे म्हणून येऊन बजावून जातात . हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे . शहरांमध्ये अशी स्वयंशिस्त कुठेही आढळत नाही . पाश्चात्य राष्ट्रांमध्ये देखील पोलिसिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते . कारण पोलीस काढून घेतले की तिथले गुन्ह्यांचे प्रमाण कैक पटीने वाढते . या उलट आपल्या इथे सामाजिक दबावापोटी लोक बरेचसे नियम मनापासून स्वेच्छा पूर्वक पाळतात .
या जत्रेमध्ये मला विशाल देखील भेटला होता . पुन्हा मी त्याला पुढे निघून जायचा सल्ला दिला आणि भोजन प्रसाद घेतल्यावर मी देखील निघालो . जंगलातील वाट लागली . एक आदिवासी माझ्यासोबत चालू लागला . चालता चालता त्याने मला परिक्रमेविषयी बरेच प्रश्न विचारले . आणि ऐन जंगलाच्या मधोमध आल्यावर मला सांगू लागला की तो ख्रिश्चन झालेला आहे . आणि ख्रिश्चन होणे कसे फायद्याचे आहे हे तो मला ऐकवू लागला . मध्ये एक कोरडा ओढा लागला . तिथे एका झाडाच्या सावलीमध्ये मी त्याला घेऊन बसलो . आणि सुमारे एक तास न थकता न कंटाळा त्याला चांगले उद्बोधक प्रवचन दिले . पुन्हा एकदा आंग्लास्त्र इथे कामाला आले ! तो खरोखरच विचारात पडला आणि मी पुढे निघालो . परंतु अशा दुर्गम ठिकाणी देखील ख्रिस्ती धर्मप्रचारक येऊन कशा पद्धतीने धर्म परिवर्तन करत आहेत ही पाहून मला आश्चर्य वाटले . विशेषतः शेकडो परिक्रमावासी येथून जात असून देखील इथल्या लोकांना धर्मविषयक फारसे ज्ञान कोणी देत नाही याचे मला राहून राहून नवल वाटले आणि वाईट देखील वाटले . उलट पक्षी आपल्या वागण्यातून आपल्या धर्माविषयी समोरच्या माणसाच्या मनामध्ये घृणा किंवा तिटकारा तर निर्माण होत नाही ना याची काळजी घेणे प्रत्येक परिक्रमावासीचे महत्त्वाचे काम आहे असे मला वाटते .
 सेम्लेट कडे उतरणारा डोंगर . 
  आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती . घर अतिशय साधे होते परंतु त्यातील विटा नक्षीदार पद्धतीने बाहेर काढून त्रिमितीय नक्षी तयार करण्यात आली होती . घराला सुंदर असा रंग देखील देण्यात आला होता . आतून   शेणाने सारवलेल्या खोल्या भिंती ऐवजी गवताच्या तट्ट्यांनी शेकारल्या होत्या . कौलांमुळे उन्हाचा दाह कमी होत होता . अंगणामध्ये गाई म्हशी शेळ्या कोंबड्या होत्या . मी दारात उभा राहून नर्मदेहर असा आवाज दिला . नकरसिंग ची आई दारात आली एका झोपडीकडे हात करून तिथे आसन लावायला सांगितले . स्वतः नक्करसिंग आणि त्याचा भाऊ सेमलेटची होळी खेळायला गेले होते . खेळायला म्हणजे स्वतः भुत्या म्हणून तिथे नक्करमामा चा तो भाऊ नाचत असे . नक्कर सिंगची पत्नी पाणी देऊन गेली
 . मी उतरलो होतो त्याच खोलीमध्ये यांची आटा चक्की होती . जाता जाता तिने मला धान्याकडे लक्ष ठेवायला सांगितले . मला तेव्हा त्याचा अर्थ कळाला नाही परंतु काही वेळाने जेव्हा बाहेरच्या शेळ्या कशा चटकन आत मध्ये येऊन धान्य किंवा पीठ खाऊन जातात हे पाहिले तेव्हा राखण करण्याचे महत्त्व कळाले . यातली एक काळी पांढरी शेळी तर एवढी हुशार होती की कितीही अडवले तरी ती पीठ खाऊनच जायची !  शिवाय एक मारकुटी म्हैस देखील होती . तिच्याशी देखील मी खूप खेळलो . ती अत्यंत तापट होती . सुदैवाने या दोन्ही जीवांचे फोटो मला गुगल नकाशावर सापडले . 
नक्कर सिंहची तापट म्हैस आणि आगाऊ व चोरट्या शेळ्या ! 
याची आई म्हातारी होती परंतु खंबीर व करारी होती . सर्व घरावर तिचा वचक आहे असे मला जाणवले . घरातील सर्वजण भंगुरई बघण्यासाठी सेमलेटला गेलेले होते . सासु सुना दोघीच घरात होत्या . त्यामुळे दोघींचा वावर थोडासा मुक्त होता . मला देखील त्यांनी फारशी बंधने घातली नाहीत . उलट मला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या अंगणात बोलवले . अंगणामध्ये एक बाज ठेवलेली होती . त्याच्यावर घरातील मुख्य पुरुष झोपायचा . एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा रांजण जमिनीपासून वर बांधलेल्या लाकडी टेबलावर मातीत गाडून ठेवला होता . ही पद्धत इकडे सर्वत्र आढळते . या दोघींकडून मला आदिवासी प्रथा परंपरां बद्दल बरीच माहिती कळली . त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली की येणारी सर्व माणसे प्रचंड दारू पिऊन आलेली असतील त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू नये . किंवा मोजकेच बोलावे . माझा स्वभाव बोलका आहे हे म्हातारीच्या लक्षात आले ! एकंदरीत आदिवासी कुटुंबामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाचक असतो असे मला जाणवले . म्हातारीची सुनेपुढे अक्षरशः दहशत होती . म्हातारीला चार शब्द वाकडे बोलले की इथल्याही सुनेला लगेच आनंद व्हायचा ! सुनेची चूक दाखविताच म्हातारी खुश व्हायची ! घरोघरी मातीच्या चुली ! इतक्यात डोंगर उतारावरून यात्रा संपवून येणारी माणसे दिसू लागली . सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि हा डोंगर पूर्वेला होता त्यामुळे सूर्याच्या उजेडामध्ये उंच च उंच माणसे डोंगर उतरताना दिसू लागली ! ही माणसे चमचम चमकत होती ! नक्की काय प्रकार आहे कळत नव्हते . सर्वच जण थोडे जवळ आल्यावर लक्षात आले की त्यांनी आपल्या डोक्यावर मोठ्या मोठ्या टोपल्यांच्या साह्याने मोरपिसे बांधलेली होती . शिवाय त्याला लटकवलेले आरसे चमकी वगैरे चमकत होते . 
बहुतेक वाघाला मोठा प्राणी समोर उभा आहे असे वाटावे म्हणून हा वेष तयार झाला असावा असे वाटते कारण दुरून पाहताना खरोखरच सात-आठ फूट उंचीची माणसे येत आहे तसे वाटत होते  .बांबूच्या मोठ्या मोठ्या कामठ्या वापरून मजबूत अलंकार तयार केले होते . आणि ते उत्कृष्ट सजवले होते . या सर्वांच्या कमरेला विशिष्ट आकाराचे वाळवलेले भोपळे होते व त्याचा आवाज खूप दूरपर्यंत घुंगरासारखा ऐकू यायचा . शिवाय मोठी मोठी घुंगरे होती ती वेगळी . अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे व गोल काढून गळ्यात उंबराच्या माळा घातल्या होत्या .हातात काठ्या ,भाले ,तलवारी , धनुष्यबाण , फाल्या अशी हत्यारे होती . काही पुरुष स्त्रीच्या वेषामध्ये देखील नटले होते . काहींनी अंगावर रंगीबेरंगी चिन्ध्या गुंडाळल्या होत्या . सोबत धीर गंभीर वाजणारे ढोल , ढोलकी व थाळी अशी वाद्ये होती . एकाच रंगाच्या घागरा चोळ्या व चांदीचे ठसठशीत दागिने घातलेल्या स्त्रिया होत्या . मुलांच्या गळ्यात साखळ्या होत्या . उतरणारे सर्व लोक आमच्यासमोरूनच जात होते . मी उठून सर्वांना सामोरा गेलो . आणि येणाऱ्या लोकांशी भरपूर चर्चा केली , गप्पा मारल्या . काही उत्साही तरुणांनी माझ्यासोबत फोटो काढले . मी त्यांच्यासोबत ढोल वाजवला . त्यांचे ताल आत्मसात करून घेतले . इथे प्रत्येक गोष्ट आदिवासी लोक आपल्या स्वतःच्या हाताने बनवितात . अगदी ढोला साठी लागणारे कातडे देखील स्वतः मिळविले व कमविले जाते . केवळ चारच छिद्रे व पाचवे तिरके छिद्र असलेली सुंदर व एक सू री वाजणारी बासरी देखील यांच्याकडे होती . ती देखील वाजवून पाहिली . तिच्यावर वाजणारी विवक्षित धून आणि ढोलाचा धीर गंभीर खर्जातला आवाज थेट ध्यानामध्ये घेऊन जाई ! इथे तरुणांनी माझ्यासोबत जे फोटो काढले ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले . नर्मदा मातेची असीम कृपा कशी आहे पहा ! या आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याचे भाग्य मला लाभले ! नाहीतर आजकाल हे सर्व लोक आधुनिक पेहराव करतात ! परंतु आजही महत्त्वाच्या सणासमारंभाला आपला पारंपारिक वेष ते पुन्हा धारण करतात . या आदिवासी पेहरावाचा आनंद सर्वांनी घ्यावा !
 सेमलेटची यात्रा करून आलेले आदिवासी तरुण ! सोबत प्रस्तुत लेखक . आपादमस्तक त्यांचा पेहराव नीट अभ्यासा !
असा वेष घालून ज्या वेगाने ते डोंगर उतरले ते पाहता पूर्वी लुटमार होताना परिक्रमावासींची काय अवस्था होत असेल हे लक्षात आले !
हे लोक आपापल्या गावी गेल्यावर घरी न झोपता बाहेर अंगणातच एकत्रितपणे झोपतात . व दुसऱ्या दिवशी पूजा पाठ झाल्यावरच घरी परत जातात . यांनी केलेला पेहराव एक व्रत म्हणून ते पाळतात . व त्याची थट्टा केलेले त्यांना चालत नाही . याची कृपया नोंद घ्यावी . 
हे चारही फोटो एकाच वेळी काढलेले असले तरी वेगळे वेगळे आहेत . म्हणून सर्वच्या सर्व जसेच्या तसे दिलेले आहेत .  या मुलांनी मला त्यांचे नृत्य देखील करून दाखवले . एकंदरीत कुठेतरी मुक्काम करायचा तो त्यांनी नकरसिंहच्या अंगणातच ठोकला त्यामुळे मला यांच्याशी खूप वेळ संवाद साधता आला . मी ढोल वाजवला हे त्यांनी पाहिल्यामुळे माझ्याशी ते व्यवस्थित बोलले . वाद्य वादन यांच्याकडे खूप पवित्र मानले जाते . सहजासहजी कोणाला वाद्याला हात लावू दिला जात नाही .
अशा रितीने नटून थटून हे लोक जत्रेमध्ये जाऊन नक्की काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे . म्हणूनच सेम्लेटच्या जत्रेतील त्याच दिवशी व रात्री घेतलेले हे व्हिडिओ पहा .




इतक्यात नकरसिंह आणि त्याचा भाऊ तिथे आले . भाऊ भुत्या झाला होता . मी माझा परिचय त्याला करून दिला आणि त्याच्या घरी आज मुक्कामी असल्याचे सांगितले . त्याला फार आनंद झाला . आणि त्याने सांगितले की सणाच्या नियमानुसार आज तो घरी झोपायला येऊ शकत नाही . आज हे सर्व तरुण जंगलामध्ये चिकन मटन शिजवून खातात आणि दारू पिऊन झोपी जातात . असे सांगेपर्यंत सर्वजण गोल करून मोहाची दारू प्यायला बसले सुद्धा ! उद्या होळी होईपर्यंत हे लोक आपले कपडे बदलणार नव्हते आणि आपल्या घरी देखील जाणार नव्हते . हे सर्व पावरी आदिवासी किंवा भिल्ल लोक आहेत .त्यांची भाषा पावरी . आडनाव लावताना सोळंकी पावरा अशी आडनावे लावतात .आणि जात लिहिताना डावरा किंवा दावरा अशी जात लिहितात . होळी हाच यांचा प्रमुख सण आहे .  हेच लोक पूर्वी लुटालूट करायचे . परंतु आता चित्र बदलले आहे . आता यांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करता येणे अशक्य आहे ! एक पिढी पूर्वीपर्यंत हे लोक केवळ लंगोटीवर फिरायचे . आणि स्त्रिया फक्त अर्धा घागरा घालायच्या .उपवस्त्र देखील नेसत नसत . आता हे लोक अंगभर कपडे घालतात . यूट्यूबर लोकांनी जगातल्या अनेक प्रांतातील पेहराव बदलून दाखवले आहेत त्याचे हे एक उदाहरण ! प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये पकडण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे लोकांनी आपले नैसर्गिक राहणीमान बदलून टाकले आहे ! या लोकांची याहा मोगा नामक एक देवी आहे .जी गुजरातमध्ये वडफळी जवळ आहे .तिलाच हे मानतात . मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील नंदुरबार या भागामध्ये सर्वत्र हे लोक फक्त पावरी भाषाच बोलतात . यांच्या गाडीवर याहा मोगा किंवा जय आदिवासी असे लिहिलेले असते .हे लोक चिवट , तापट परंतु परिक्रमावासींसाठी मात्र उपकारक आहेत .नवीन मुले थोडीशी ब्रिगेडी झाल्यासारखी वाटतात . हे लोक लहान मुलांनाही खुशाल दारू पाजतात . दारू पिणे इथे सन्मानाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते . मोहाची दारू औषधी देखील असते . पोट साफ करण्याचे काम ही दारू करते . अर्थातच योग्य प्रमाणात घेतली तर . प्रस्तुत लेखक व्यक्तिगत जीवनात अपेयपान व सुरापानाचा कडक निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी . ही सर्व माहिती आपणा करता जशी आहे तशी देत आहे इतकेच .
इथली लहान मुले एक जात शूर , भित्री , बुजरी व नागडी उघडी असतात .एखादा परिक्रमावासी दिसल्याबरोबर जीवाच्या आकांताने एक दीड किलोमीटर दूरवरून डोंगरावरून पळत खाली येतात .यांना पडण्याचे , घसरण्याचे ,आपटण्याचे जणू भयच नसते . हलकीफुलकी मुले टणाटण उड्या मारत खाली येताना पाहून मला भीती वाटायची . एका गोळीसाठी हा सर्व आटापिटा ! या भागातील मुलांना पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींनी बिघडवले आहे असे पालकांचे स्पष्ट मत आहे . सतत गोळ्या खाऊन इथल्या मुलांचे दात कधी नव्हे ते किडू लागले आहेत . त्यामुळे यांना शक्यतो चॉकलेट गोळ्या दिल्या नाही पाहिजेत . परंतु असे जरी असले तरी देखील तुम्हाला बघून ही एक दीड किलोमीटर पळत येणार हे निश्चित आहे . त्यामुळे त्यांना काहीतरी खाऊ द्यावाच लागतो . मी इतके सूत्र पाळले की प्रत्येक मुलाला चॉकलेट देताना प्लास्टिक पर्यावरणासाठी कसे घातक असते हे समजावून सांगितले आणि प्लास्टिक माझ्याकडे जमा करून घेतले आणि मगच गोळी खायला सांगितली . ठराविक अंतराने एखाद्या चुलीमध्ये मी ते प्लास्टिक नष्ट करायचो . 

आता हळूहळू या भागामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत . सोलरची वीज देखील घरोघरी आलेली आहे . साध्या विजेचे जोडदेखील प्रत्येक गावात पोहोचले आहेत . इथले लोक अतिशय निर्भय आहेत हे मात्र अगदी खरे . राहून राहून असे वाटते की ही लढाऊ जमात पोलीस लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये पाहिजे . तेच त्यांच्यासाठी योग्य स्थान आहे . असो .
हेच ते नकरसिंग सोलंकी . वनग्राम खारिया भादल .मागे त्याचे सजवलेले घर
 नकरसिंगच्या घरावर लावलेली पाटी . हे तिघेजण या भागातील तीन चार लोकांना सेवेसाठी मदत करतात असे दिसते . 
उजवीकडे बसलेला नकरसिंग सोलंकी . अन्य आदिवासी तरुणांच्या तुलनेने नकर मामा ची तब्येत मला चांगली धष्टपुष्ट वाटली . डोळ्यातील भेदकपणा मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारच . 
इथेच आसन लावले
याच भागातील अन्य एक घर . घरांची रचना कशी आहे लक्षात यावे म्हणून चित्र जोडले .
श्रीमंत आदिवासींची घरे आतून अशी असतात .
नकरसिंगचे आंगण .होळी साजरी करून परत आलेली सर्व मंडळी इथेच झोपली .
डावीकडून नकरसिंगची खंबीर आई , डोक्याला केशरी पागोटे बांधलेला नकरसिंह ,उजवीकडून दुसरा त्याचा भाऊ आणि भावजय . मधोमध उभे मराठी पद्धतीचे पागोटे घातलेले बहुतेक त्याचे वडील किंवा वडील बंधू आहेत . (संग्रहित छायाचित्र )
घराच्या आतून अशी चित्रे काढली जातात
 सुदैवाने मी गेलो तेव्हा इथे एकटाच होतो . 

नक्करसिंग सोलंकी यांना आपण जि पे वर अन्नदानासाठी मदत पाठवू शकता . त्यांचा जी पे क्रमांक खालील प्रमाणे आहे . 96694 99092 . फक्त या गावांमध्ये रेंज नसल्यामुळे ते रेंजमध्ये आल्यावर आपल्याला रिप्लाय करतील एवढे लक्षात ठेवावे .

माझ्या आधी विशाल जवंजाळ इथे दुपारचे जेवण घेऊन गेला असे मला म्हातारीने सांगितले . परंतु मुक्कामाला मी एकटाच होतो . ती रात्र अतिशय संस्मरणीय अशी गेली . हा माझा ७३ वा मुक्काम होता . संध्याकाळपर्यंत घरातील सर्वजण परतले . खूपच मोठे कुटुंब होते . भरपूर लहान मुले होती . कोण कोणाचे कोण आहे हे कळणार नाही इतकी माणसे होती . नकरसिंगचा जो भाऊ भुत्या बनला होता त्याच्या हातामध्ये एक वडिलोपार्जित अप्रतिम अशी तलवार होती . माझ्या काही शस्त्रविद्या पारंगत मित्रांमुळे या शस्त्रांचे थोडेफार  ज्ञान मला झालेले आहे. त्यानुसार ही एक अप्रतिम तलवार होती . हिचा धातू देखील अप्रतिम होता आणि बऱ्यापैकी वापर देखील झालेला होता . ही तलवार घेऊन तो झोपण्यासाठी खाली गावामध्ये निघून गेला . एक तरुण भाऊ जो काहीच बनला नव्हता तो मात्र घरी थांबला . प्रचंड दारूच्या नशे मध्ये असलेला हा घराच्या आत मध्ये ठेवलेला ढोल काढून वाजवू लागला . आपण गणपती मध्ये जो गजाढोल बघतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि लाकडाच्या खोडापासून बनवलेला अतिशय जड परंतु अतिशय अप्रतिम असा हा ढोल असतो . तो ठेवण्यासाठी लाकडाचे एक मेज बनवलेले असते.  आदिवासींच्या नियमानुसार कोणीही अचानक येऊन वाद्य वाजवू शकत नाही . त्यातले ज्ञान आहे अशीच व्यक्ती हात लावू शकते . हा डोळे मिटून धीर गंभीर ढोल वाजू लागला . मी एक ढोलक उचलून त्याला हळूहळू साथ देऊ लागलो . माझा ताल पक्का आहे आणि तो जो ताल वाजवतो आहे तो मला कळलेला आहेत हे लक्षात आल्यावर आमची चांगली जोडी जमली . आम्ही दोघांनी हे वादन चालू केले आणि उत्स्फूर्तपणे घरातील लहान मोठ्या मुली मुले आणि सर्वच जणांनी हातात हात घालून आमच्या भोवती फेर धरला . आणि आदिवासी नृत्य करायला सुरुवात केली . हे सर्व अतिशय धीर गंभीर शांत आणि स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे घडलेले होते . यात कुठलाही दिखावा भपका अजिबात नव्हता ! मैयाची निर्मळ भावंडे ! मामालोक ! तास दोन तास वादन झाले . त्यानंतर मला नकर सिंग च्या बायकोने भाकरी आमटी आणून दिली . भोजनप्रसाद झाल्यावर मी पुन्हा ढोलावर गेलो . रात्री बारा वाजेपर्यंत मी अखंड ढोल वाजवत होतो . मंडला दिंडोरी भागातील आदिवासी लोकांचे जे ताल आहेत त्याच्यात आणि इथल्या तालामध्ये खूप साधर्म्य होते . लय देखील एकसारखी  ठाय होती . जोवर जागे आहेत तोवर घरातील सर्व नृत्य करत राहिले . हा त्या वाद्याचा मान असतो . ते वाद्य वाजत आहे आणि तुम्ही लोळत पडले आहात असे कोणी करत नाही . नकरसिंगच्या बहिणी उत्तम शिवणकाम करत . आता देखील अख्या गावाचे कॉस्च्युम्स त्यांनीच शिवलेले होते . त्यांचे एका बाजूला शिवणकाम सुरू होते . घरामध्ये खोल्या फारशा नसतात . आम्ही ढोल वाजवत होतो ती एक पातळी . फुटभर उंचीच्या पायरीच्या पातळीत सारे घर . त्याला मध्ये एक लांबच लांब आडवी भिंत . आत स्वयंपाक घर . बाकी झोपायला सर्वजण अंगणामध्ये येत . 
त्या ढोलाचा धीर गंभीर आवाज इतका जबरदस्त होता की त्याने मी अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये गेलेलो होतो . एकच एक ठेका एकच एक ताल तुम्ही सलग दोन-तीन तास अतिशय ठाय लयी मध्ये अखंड वाजवत राहिलात तर तुम्हाला उन्मनी अवस्था निश्चितपणे प्राप्त होते . तसेच आमचे झाले होते . अखेरीस तो भाऊ वाजवता वाजवता ढोलावरच झोपला . मग मात्र मी भानावर आलो आणि वादन थांबवले . आणि ताबडतोब झोपायला निघून गेलो . एक परिक्रमावासी वाद्यवादन करत आहे त्याचा सन्मान म्हणून मला कोणीही थांबवण्याची सूचना वगैरे केली नाही ,उलट मला साथ दिली ,त्याचे मला फार कौतुक वाटते . अतिथी देवो भव या वचनाचे याहून सुंदर पालन ते काय असू शकते ! 
त्या ढोलाच्या तालाने माझ्या मनाला एक संथपणा आणला होता . पडल्या पडल्या माझ्या कानामध्ये तो ताल वाजत राहिला . हा ताल ओळखीचा वाटत होता . डोळे मिटल्या-मिटल्या माझ्या डोळ्यासमोरून काही दृश्य झरझर सरकू लागली . परिक्रमेतून उलटा चालत मी जबलपूर ला पोहोचलो . तिथून उलटी दृश्य पहात पहात हळूहळू लहान झालो . बालपणीचा माझा अवतार पाहता पाहता तान्हे लेकरू झाला . आणि त्यानंतर माझ्या जन्माचा प्रसंग आठवला .एका क्षणामध्ये मी एका द्रवामध्ये तरंगतो आहे असे दिसू लागले . आणि माझ्या लक्षात आले की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये आहे . आणि आता पुन्हा एकदा तोच ताल मला ऐकू येऊ लागला ! हा ताल होता माझ्या आईच्या हृदयाची धडधड ! तो ताल आणि हा ताल यात खूप साम्य होते ! नव्हे नव्हे हाच तो ताल ! नर्मदा मातेच्या उदरामध्ये अतिशय खुशाल पणे पडलेल्या एका लेकराच्या कानावर पडणारा नर्मदा मातेचा हृदय नाद होता तो ताल !  परिक्रमा म्हणजे जणू गर्भवासच ! गर्भाला जसे अन्न पाणी सर्वकाही आईकडून मिळते तसेच परिक्रमा वाशीला सर्व काही नर्मदा माई देते . गर्भारमाता जिथून जशी जाईल तिथून तिथून गर्भाला जावेच लागते परंतु मातेची सोबत असल्यामुळे आणि तिच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळे त्याच्या जीवाला कुठलाही धोका होत नाही . तसेच परिक्रमेमध्ये परिक्रमावासीचे होते  . नर्मदा माता जिथून कुठून जाईल तिथून फक्त आपण जात राहायचे . बाकी सर्व चिंता तिला असते . आपण फक्त साक्षी भावाने पहात राहायचे . या परिक्रमे नंतर प्रत्येक माणसाचा आवर्जून पुनर्जन्म होतो ! पूर्वजन्मीचे संस्कार , वासना , ईषणा , अहंकार , विचार सारे सारे नष्ट होऊन जाते . उरते ते फक्त एक तान्हे बालक .
आणि आता या बाळाला माहिती असते की काहीही हवे असेल तर फक्त आईला हाक मारायची !
 नर्मदेssssss हर !





लेखांक ब्याऐंशी समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. |नर्मदे हर|🙏🙏🙏💐
    अप्रतिम!

    उत्तर द्याहटवा
  2. "एक आदिवासी माझ्यासोबत चालू लागला . चालता चालता त्याने मला परिक्रमेविषयी बरेच प्रश्न विचारले . आणि ऐन जंगलाच्या मधोमध आल्यावर मला सांगू लागला की तो ख्रिश्चन झालेला आहे . आणि ख्रिश्चन होणे कसे फायद्याचे आहे हे तो मला ऐकवू लागला . मध्ये एक कोरडा ओढा लागला . तिथे एका झाडाच्या सावलीमध्ये मी त्याला घेऊन बसलो . आणि सुमारे एक तास न थकता न कंटाळा त्याला चांगले उद्बोधक प्रवचन दिले . पुन्हा एकदा आंग्लास्त्र इथे कामाला आले ! तो खरोखरच विचारात पडला आणि मी पुढे निघालो ."

    आदिवासी महोदयांनी काय मुद्दे मांडले आणि त्याला विचारात पाडण्यासाठी त्याला काय प्रतिवाद केला गेला हे महत्त्वाचे आहे. हे विवेचन द्यायला हवे. कारण हेच तर मर्म आहे. येथेच परिक्रमा सफल झाली आहे!

    उत्तर द्याहटवा
  3. आदिवासींच्या कमरेला बांधलेले भोपळे यांना तुंबी किंवा तुंबा असे म्हणतात हे नर्मदा काठी बऱ्याच ठिकाणी वेलावर्ती येतात विशेषतः आदिवासी भागामध्ये, लहान मुलांचा खुळखुळा असतो तसे वाजतात मी आलीराजपुर भागातल्या सोडंवा आणि नर्मदा काठावरील भागांमध्ये विशेष करून भगोरिया करता जात राहतो. या तुंब्यांना एका बाजूने वरून थोडेसे कापून त्याच्याने महुवा ही दारू वितरित केली जाते. या तुंब्यांचा पळिसारखा फार छान उपयोग होतो याला आतून कोरून काढले जाते.
    सदानंद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी बरोबर ! साधू लोक याच तुंब्याचा वापर करून कमण्डलू देखील बनवतात . हा भोपळा चवीला अतिशय कडू असतो . परंतु त्याचे बाकीचे उपयोग खूप असतात . याच्या पासून बनवलेली भांडी सतत स्वच्छ घासून ठेवावी लागतात नाहीतर ती खराब होतात . आपले या भागातील अनुभव ऐकायला आवडेल !

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर