लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू


आजची चाल मोठी आव्हानात्मक होती .गीता स्वाध्याय मंदिरातून निघेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता. आणि पुढे जंगलची वाट सुरू होणार असल्यामुळे पायांना प्रचंड गती देणे अतिशय आवश्यक होते . कारण अंधार पडायच्या आत मला रामदास बाबांची ज्ञानेश्वरी कुटी गाठायची होती . परंतु अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा माता इतकी सुंदर आहे की तिचे रूप पाहताच बसावे असे वाटते ! नर्मदा कुंडातून बाहेर पडल्या पडल्या नर्मदा माता पुन्हा थोडीशी लहान होते आणि थोड्याच अंतरावर घातलेल्या एका मोठ्या बंधाऱ्यामुळे एक विशाल स्वरूप धारण करते . असे छोटे मोठे अनेक बांध अमरकंटक च्या हद्दीमध्ये आहेत . इथे चांगले पक्के घाट बांधलेले असून त्या घाटावरती भाविकांची आणि स्थानिक लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . उगमाचेच स्थान असल्यामुळे पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की विचारू नका ! ज्याप्रमाणे एक दोन वर्षांची बाळे ही अतिशय तेजस्वी सुंदर आणि गोड दिसतात तशी ही नुकतीच जन्माला आलेली नर्मदा राणी दिसत होती ! तिचे ते रूप डावलून पुढे जाणारा कमनशिबीच म्हटला पाहिजे ! त्यामुळे मी अगदी किनारा पकडून काठाकाठाने चालू लागलो . या भागात नर्मदा टप्प्याटप्प्याने कशी लहान मोठी होत जाते त्याची काही नकाशा चित्रे आपल्या माहिती करिता खाली जोडत आहे . क्षणात भव्य दिव्य दिसणारे नर्मदा पात्र क्षणात दीड फुटाच्या ओढ्याचे स्वरूप घेते ! सारेच मजेशीर आहे ! हे सर्व तुम्हाला शब्दांमध्ये वर्णन करून सांगण्याचे सामर्थ्य माझ्या ठायी नाही त्यामुळे मी चित्रांचा आधार घेत आहे याची कृपया नोंद घ्यावी . आकाशातील उपग्रहातून घेतलेल्या या चित्रांमुळे आपल्याला साधारण मी कुठल्या परिसराचे वर्णन करतो आहे त्याचा अंदाज यावा इतकाच हेतू त्यामध्ये आहे .या चित्रातील भयानकता पाहून या मार्गाबद्दल आपल्या मनात भय उत्पन्न व्हावे असा भाव त्यात मुळीच नाही . 
अमरकंटक ते कपिलधारा हा नर्मदा काठचा मार्ग कसा आहे याची साधारण कल्पना यावी म्हणून हा सरधोपट नकाशा आपल्या माहितीकरता जोडत आहे .काठाकाठाने जातो तो पारंपारिक परिक्रमा मार्ग आणि डावीकडे वळलेला सडक मार्ग आहे तो सध्याचा परिक्रमा मार्ग . ( या लेखातील सर्व नकाशा चित्रांमध्ये नर्मदा खालून वर वाहते आहे याची कृपया नोंद घ्यावी)
वरील नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की अमरकंटक शहराचा अगदी थोडासाच भाग मानवी वस्ती असून तिथून पुढे संपूर्ण जंगल मार्गातून नर्मदा मैया वाहते . हेच चित्र नीट पाहिल्यावर आपल्याला मध्ये डावीकडे एक रस्ता फुटलेला दिसतो तो सध्याचा रुळलेला सोपा परिक्रमा मार्ग आहे . कबीर चबुतरा नामक स्थानावरून हा डांबरी रस्ता पुढे जातो .९९ टक्के परिक्रमावासी याच डांबरी मार्गाने परिक्रमेला पुढे मार्गस्थ होतात . याचे कारण वेगळे सांगण्याची गरज नाही . कपिलधारेच्या दिशेने आणि तिथून पुढे जे काही घनदाट अरण्य लागते तिथे एकट्या मनुष्य प्राण्याचा निभाव लागणे कठीण आहे असा कोणाचाही समज होणे स्वाभाविक आहे . आणि ते एका दृष्टीने खरे देखील आहे . रान डुकरे ,अस्वले ,बिबटे आणि वाघ या जंगली शापदांचा अतिशय मुक्त वावर या प्रदेशात आहे . याच वनातून समोरच्या तटावरून येताना दोन गाई आणि एक बैल खाल्लेल्या वाघाची कथा मी मागे सांगितली आहेच .त्यामुळे इथले स्थानिकच तुम्हाला जंगलातून जाण्यास विरोध करतात . विरोध इतका टोकाचा होतो की जंगल मार्गच त्यांनी मोठाल्या जाळ्या वगैरे टाकून बंद करून टाकला आहे .परंतु नर्मदा मातेची जर आपल्यावर कृपा असेल तर ती आपल्याला कुठल्याही मार्गातून पार करविते हा माझा ज्वलंत धगधगीत अनुभव आहे त्यामुळे मी या भय कारक विचाराशी सहमत नाही .त्यामुळेच की काय , परंतु अनेक लोकांनी सांगून देखील मी हट्टाने अरण्यातील मार्गानेच मार्गक्रमणा करण्याचे निश्चित केले होते. एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद करतो. हे अरण्य किती भयानक आहे हे यापूर्वी मी नकाशामध्ये वगैरे पाहिलेले नव्हते . आज परत आल्यावर जेव्हा मी हे अरण्य आणि त्याचा विस्तार बघतो तेव्हा त्याची भयानकता अधिक लक्षात येते . कदाचित आधीच हे सर्व माहिती असलेला मनुष्य या भानगडीतच पडणार नाही ! परंतु तरीदेखील ज्या कोणाला या मार्गाने जाण्याची इच्छा आहे त्या सर्वांना मी एकच सांगेन . नर्मदा मैया ची प्रार्थना करा , तिला सांगा आणि चालायला लागा ! ती सर्व काळजी घेते . या भागात मला खूप अद्भुत अनुभव आले ते पुढे ओघाने सांगेनच . हे अनुभव सांगावे की न सांगावे असे द्वंद्व मनामध्ये होते . परंतु माझ्या असे लक्षात आले आहे की सध्या परिक्रमावासी या मार्गाने जाणे अक्षरशः बंद झालेले आहे . त्यामुळे हे अनुभव मुद्दामहून सांगतो ज्यायोगे कोणालाही जरी या मार्गे जाण्याची इच्छा झालीच तर ती निर्भयपणे त्यांनी जावे आणि आपली मनोकामना पूर्ण करावी .असो .
या चित्रामध्ये आपल्याला (खाली )गीता स्वाध्याय मंदिर (तांबडा पत्रा ),नर्मदा उगमस्थान मंदिर ,कोटी तीर्थ कुंड व तिथून पुढचा नर्मदा मातेचा भव्यपात्राचा प्रवास दिसतो आहे .
इथला नर्मदा मातेचा काठ अतिशय सुंदर हिरवागार आणि अप्रतिम आहे . उगमा नंतर अचानक नर्मदा माता इति भव्य कशी झाली असा प्रश्न मनात पडतो . परंतु चालत अजून थोडे पुढे गेले की त्याचे उत्तर मिळते जेव्हा आपल्याला नर्मदेवर घातलेला पहिला आडवा बांध दिसू लागतो .
पुष्कर बांध नामक बंधाऱ्यामुळे इवल्याशा नर्मदा राणीला इतके भव्य स्वरूप प्राप्त झालेले आहे . इथे अतिशय सुंदर असा स्नान घाट देखील बांधलेला आहे
इथेच कुठेतरी तो आश्रम होता जो मी काल शोधत होतो परंतु तो काही मला सापडला नाही . पुष्कर सरोवराच्या काठावरून चालताना तिथे नर्मदा जलामध्ये कपडे धुणारे लोक पाहिले आणि फार वाईट वाटले . हे नर्मदा नदीमध्ये सुरू झालेले पहिले प्रदूषण . आपण वस्त्रे बाहेर कुठेतरी धुतली आणि ते पाणी जमिनीमध्ये सोडले की जमीन त्यातील अनावश्यक भाग काढून घेते ज्याचे सूक्ष्मजीव विघटन करतात आणि पाणी तेवढे झिरपून अंतिमतः नदीला प्राप्त होते इतके सोपे गणित आपल्याला का कळत नाही ! आपल्या सर्व घाणी थेट नदीत नेऊन अर्पण करणे याचा सारखे महापातक नाही ! तेच पाणी लाखो जीवांचे जीवन आहे . आपल्या स्वच्छते करता ते मलीन करण्याचा अधिकार आपल्याला अजिबातच नाही . हा लेखन प्रपंच वाचणार्‍या प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या आयुष्यामध्ये जलस्त्रोतांची अतोनात काळजी घ्या . कारण जोपर्यंत पाणी आहे तोवरच आपले जीवन आहे . आणि जलस्त्रोतांची काळजी घेणे आपल्याला वाटते तितके अवघड किंवा कठीण नाही . काही सोप्या सवयी आत्मसात केल्या की जलसाठे शुद्ध ठेवता येतात . कुठलीही घाण थेट पाण्यामध्ये नेऊन न सोडणे हा त्यातील एक सोपा उपाय आहे . जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात सूक्ष्मजीव असतात जे कचऱ्याचे विघटन करून त्याची पुन्हा माती करतात . पाण्यामध्ये अशा जिवाणूंचे प्रमाण कमी असते .ओघाने विषय निघाला म्हणून सांगितले . पुढे देखील परिक्रमेमध्ये अक्षरशः हजारो ठिकाणी अशा पद्धतीने नर्मदा मातेला प्रदूषित करणारे असंख्य लोक पाहिले आणि हृदय विदीर्ण झाले . याबाबतीत काहीतरी ठोस उपाय योजना करण्याची कोणाची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून ते कार्य अवश्य सिद्धीला नेऊयात ! त्यासाठी लागणाऱ्या अनेक कल्पना डोक्यामध्ये तयार आहेत . असो .
पुष्कर बंधारा हे एक अगदी छोटेसे धरण असून त्याच्या पुढे असलेल्या एका छोट्या बंधाऱ्यातून नर्मदा खाली झेपावते ते पुन्हा एकदा छोट्याशा बालिकेचे रूप घेते . या भागातील नर्मदा मातेचे रूप हे नितांत सुंदर आहे . आपण ज्या भव्य दिव्य नर्मदा नदीची कल्पना करतो ती इतकी छोटी देखील असू शकते हे मनाला पटतच नाही ! एक उडी मारली की पलीकडे जाता येते इतके छोटेसे पात्र या भागात आपल्याला आढळून येते . या भागातील स्थानिक लोक पुन्हा पुन्हा तुम्हाला नदीपात्राकडे जाण्यापासून परावृत्त करतात परंतु मी आपणाला अशी विनंती करेन की आपण आवर्जून येथील काठ अनुभवावा आणि धन्य व्हावे . 
पुष्कर बंधाऱ्याला लागून अजून एक छोटासा बंधारा आहे
भव्यरूपातून अचानक बालस्वरूप प्राप्त झालेली नर्मदा
यापुढे नर्मदेच्या काठाने बऱ्यापैकी दाट झाडी सुरू होते . 
इथून समोरच्या काठावरील काल मी आलो होतो मार्ग स्पष्ट दिसत होता . नर्मदेच्या काठावरती मोठी मोठी झाडे आता दिसू लागली होती आणि मोठाली लाकडे देखील तोडून ठेवलेली ठीक ठिकाणी मी पाहिली . इथे मानवी वावर हळूहळू कमी होत जातो . परिक्रमा वासी हा संपूर्ण टप्पा डांबरी रस्त्याने चालून पार करतात परंतु कोणाला जर काठाने चालण्याची इच्छा असेल तर मार्ग निश्चितपणे उपलब्ध आहे फक्त अत्यंत सावधपणे मार्गक्रमणा करावी इतकीच विनंती आहे . कारण असंख्य छोटे मोठे ओढेनाले नर्मदा मातेला येऊन मिळत असतात त्यामुळे नक्की नर्मदा कुठली याबाबत दृष्टी भ्रम होण्याचा संभाव असतो . 
कबीर सरोवर पार केल्यावर लागणारा डांबरी मार्ग .इथेच परिक्रमेचा जुना पायी मार्ग प्रारंभ होतो .
अजून एका बंधाऱ्यामुळे कबीर सरोवर नावाचे छोटेसे कुंड किंवा रुंदावलेले पात्र तयार झालेले दिसते आणि मग एक पूल लागतो ज्याच्या समोर रामकृष्ण कुटीर हा आश्रम आपल्याला दिसतो . इथून बहुतांश लोक डांबरी मार्गाने मार्गस्थ होतात . मार्ग घनदाट अरण्यातून जाणारा आहे आणि तीव्र उताराचा असल्यामुळे सावधपणे चालावे लागते असे त्या मार्गाने गेलेल्या लोकांकडून कळले . मी मात्र सरळ जाण्याचा निश्चय केला आणि काठाकाठाने पुढे निघालो . 
अजून एक लघु बंधारा यानंतर नर्मदा मातेचे खरे बाल स्वरूप सुरू होते .जे पुढे बराच काळ टिकते .
इथून पुढे चालताना नर्मदा मातेचे अजून एक भव्य दर्शन झाले आणि मग मात्र ती पुन्हा एकदा बालरूपामध्ये खळाळत वाहू लागली .
दोन्हीकडे घनदाट अरण्य आणि मध्ये बाल स्वरूपात वाहणारी नर्मदा मैया
या टप्प्याचा सर्वाधिक आनंद मला मिळाला कारण घनदाट जंगल असले तरी मोठी रुळलेली पायवाट होती आणि नर्मदा मातेचे सुंदर दर्शन उजव्या हाताला अखंड होत होते .अरण्यातील पशुपक्ष्यांचे घनगंभीर आवाज आणि किर्र झाडी यांना भेदण्याचे समर्थ फक्त त्या अवखळ नर्मदा बालेच्या चंचल खळखळाटामध्येच होते .एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्याचा आनंद काय आहे तो अशा निसर्ग संपन्न जागी लक्षात येतो ! असे सुख स्वर्गात देखील नाही ! सतत समोर दिसणारी रेवा माई आणि पायाखालून झरझर मागे सरणारी पायवाट ! मरेपर्यंत असे चालायला सांगितले तरी मी चालायला तयार आहे ! इतका आनंद अन्य कशातच नाही ! स्थिती पेक्षा गती मानवाला प्रिय असते . आणि नर्मदा परिक्रमे मध्ये तुमच्या पायाला प्राप्त झालेली गती ही तुम्हाला सद्गती मिळवून दिल्याशिवाय राहत नाही ! मध्येच पात्रातून वाहणाऱ्या एखाद्या पानाशी मी स्पर्धा करून पहायचो ! निरीक्षण केल्यावर असे लक्षात यायचे की सर्वत्र पाण्याची एकच एक गती नाही . कधी ती मंदावते तर कधी दुणावते ! लहान मुलं सुद्धा पहा . कधीही एकसमान गतीने पळत नाहीत. मध्येच थांबतात ,मध्येच उभी राहतात , मध्येच चालायला लागतात व मध्येच वायू वेगाने धावतात . नर्मदा मातेच्या या बाल लीला हृदय पटावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत . असे वाटत होते इथेच बसून राहावे आणि तिचे रूप न्याहाळत राहावे . परंतु लवकरच अंधार पडणार होता आणि तो पडण्याच्या आत मला कुठल्याही परिस्थितीमध्ये कपिलधारा पार करून रामदास बाबांचा आश्रम गाठायचा होता . मला वाटले होते की कपिलधारेपासून अमरकंटकचा मार्ग जसा सोपा आहे तसाच हा मार्ग देखील सोपा सरधोपट असणार . परंतु तो माझा भ्रम आहे हे लवकरच सिद्ध झाले . पुढे अरण्य दाट होत जाते व किनारा सुटल्यास रस्ता सापडणे कठीण होते . 
या ठिकाणी एक आश्रम होता परंतु तो नक्की कुठल्या काठावर आहे हेच कळत नव्हते . कारण त्याच्या आजूबाजूने वाहणारी नर्मदा ही अक्षरशः एखाद्या छोट्याशा नाल्यासारखी दिसत होती . त्यामुळे तिथे न जाण्याचा निर्धार करून मी पुढे चालत राहिलो . इतक्यात समोरून एक फक्कड साधू येताना मला दिसला . त्याला मी मार्ग विचारला नव्हता तरीदेखील त्याने मला सांगितले की डावीकडे वळ आणि सरळ जा म्हणजे तुला परिक्रमेचा मार्ग मिळेल . आता इथे मी संमोहित झाल्याप्रमाणे झालो हे नंतर माझ्या लक्षात आले . कारण नर्मदा उजव्या हाताला स्पष्ट दिसत असताना विनाकारण त्या साधूचे शब्द मी ऐकले आणि डावीकडे वळलो . साधूचा देखील काही दोष नव्हता कारण त्याला असे वाटले की मी मार्ग भटकलो आहे आणि त्याची इच्छा मला डांबरी मार्गाने पाठवण्याची होती . आणि मला मात्र असे वाटले होते की कदाचित नर्मदा डाव्या हाताला वळली आहे म्हणून साधू अलीकडे वळायला सांगतो आहे . एकंदरीत या जर तर अनुमान प्रकाराने पुढील दोन तास माझी चांगलीच परीक्षा पाहिली हे मात्र खरे ! कारण मी डावीकडच्या जंगलामध्ये शिरलो खरा परंतु नंतर मला बाहेर पडण्याचा मार्गच सापडेना ! शक्यतो उतार बघून चालणारा मी इथे आल्यावर चक्रावून गेलो कारण हे संपूर्ण जंगल समतल होते . सूर्याचा अंदाज घेऊन दिशा काढावी तर सूर्यदेव सुद्धा ढगांच्या आड लपून गेला . आणि पायाखाली तर पायवाट नावाचा प्रकारच नव्हता ! परिक्रमेमध्ये शक्यतो मागे फिरायचे नसते . त्यामुळे मी उजव्या हाताला मार्ग सापडेल या आशेने चालत राहिलो . परंतु परीक्षा अधिक कठीण करण्याचे नर्मदा मातेच्या मनामध्ये आले आणि मी त्या जंगलाच्या एका अशा टापू मध्ये पोहोचलो जिथे सर्वत्र बांबू च बांबू होते . जिकडे पहावे तिकडे वन खात्याने बांबूंची लागवड केलेली होती . साधारण एक समान अंतरावर लावलेले हे बांबू जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत दिसत होते . तिथे कोणाचाच वावर नसल्यामुळे काही बांबू आडवे तिडवे पडले होते . जे कोणी छाटले सुद्धा नव्हते त्यामुळे त्यांनी अक्षरशः मार्ग बंद केले होते ! या सर्व प्रकारामध्ये माझे दिशा भान पूर्णपणे हरपले ! साधारण दुपारी अडीच तीन ची वेळ असावी . माझ्या चारही बाजूंना मला बांबू च बांबू दिसू लागले ! बांबूच्या छोट्या काटक्या वाळल्यावर काट्याप्रमाणे पायामध्ये घुसतात त्यामुळे त्या टाळत अतिशय लक्षपूर्वक डोळ्यात तेल घालून चालणे भाग होते . माझ्या लक्षात आले की मी पुरता फसलेलो आहे .एक क्षणभरच नर्मदा मातेचे अनुसंधान सोडून दुसऱ्या कोणाचे तरी ऐकले आणि त्याची शिक्षा मी भोगत होतो . हा अरण्य प्रदेश किती भयानक आहे याची मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती परंतु आज जेव्हा मी नकाशामध्ये तो भाग बघतो तेव्हा अंगावरती काटा येतो .आपल्या माहितीकरता त्या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . सुमारे तास दीड तास मी या घनदाट अरण्यामध्ये वेड्यासारखा दिशाहीन पणे भटकत होतो . 
अचूक अक्षांश रेखांशासहित हेच ते आरण्य जिथे मला "बांबू लागले " !
मराठीमध्ये एक म्हण आहे . एखाद्या माणसाची वाट लागली की लोक म्हणतात की याला बांबू लागले त्याचा अर्थ मला त्यादिवशी कळला . चालता चालता कळकाचे बन अथवा बांबूचे बेट तुम्हाला लागले की तुमची वाट लागणे निश्चित असते . याचा साधा सोपा सरळ अर्थ असा आहे . खरे पाहायचे तर माझा स्वतःच्या दिशा भानावर अतिरेकी विश्वास होता . मला असे वाटायचे की माझ्या डोक्यात एकदा दिशा पक्क्या बसल्या की मी वाट चुकू शकत नाही . परंतु माझा हाच अहंकार ठेचण्यासाठी नर्मदा मातेने ही छोटीशी गंमत केली असावी ! कल्पना करून पहा ! तुम्ही सरळ डावीकडे उजवीकडे किंवा मागे कुठेही वळून पाहिले की तुम्हाला सर्वत्र एकसारखी दिसणारी बांबूची वने दिसत आहेत ! आकाशात सूर्य दिसत नाही आणि कुठल्या दिशेला जायचे तेच तुम्हाला माहिती नाही ! अशावेळी तुम्ही कुठल्या दिशेला पळाल ?मी देखील असाच वेड्यासारखा चहू दिशांना धावत सुटलो .मध्ये मध्ये पाणी पिऊन कमंडलू देखील रिकामा झाला .  खूप पळून जेव्हा माझ्या पायातील बळ निघून गेले तेव्हा मला लक्षात आले की आता आपल्याला यातून तारणारी एकच व्यक्ती आहे !आणि मी बेंबीच्या देठापासून पुकारा चालू केला नर्मदे हर ! नर्मदे हर ! हे नर्मदे माझे संकट हर ! विघ्न दूर कर ! 
क्षणाचाही विलंब न लागता मला दुरून एका स्त्रीचा आवाज आला . " इधर आओ बाबाजी ! इधर ! " तिचा आवाज सर्वत्र घुमत होता त्यामुळे नक्की कुठून आवाज येतो आहे हेच मला कळेना . मी आवाजाच्या दिशेला चालू लागलो .इतक्यात पुन्हा तिचा आवाज आला ,"अरे उधर नही बाबाजी ! इधर ! " मला काहीच कळेना . बांबूची घनदाट झाडी असल्यामुळे कोणी दिसतच नव्हते . इतक्यात मला दूरवर चरणाऱ्या दोन गाई दिसल्या . मी त्या दिशेने पळू लागलो . "आराम से आईये । हम कही नही जा रहे । " त्या बाईच्या आवाजातील आश्वासकता मनाला सुखावून गेली ! आता आपल्याला निश्चितपणे मार्ग सापडणार याची खात्री झाली . थोड्याच वेळात बांबूच्या बेटा खाली विसाव्याला बसलेली एक तरुण स्त्री उठून उभी राहिली . "यहा कहा रास्ता भटक गये बाबाजी ? यह परिकम्मा मार्ग नही है । " मी म्हणालो , "हा माताराम ।आप सही बोल रही है । लेकिन मुझे रास्ते मे एक साधू मिला जिसने मेरा रास्ता भटका दिया ।नही तो मै अच्छा खासा मैया के किनारे किनारे चल रहा था । " "किनारे से तो बिलकुल भी रस्ता नही है । साधूने ठीक रस्ता बताया था आपको ।  लेकिन अभी आप पक्की सडक छोडके बहुत आगे आ चुके हो । " मला त्या डांबरी सडकेच्या मार्गाने मुळीच जायचे नाही हे मी तिला निक्षून सांगितले . तिने एक दोन वेळा मला पुढील मार्गातील धोके सांगायचा प्रयत्न केला परंतु मी ऐकत नाही असे लक्षात आल्यावर मात्र तिने मला पुढील मार्ग दाखवला . तिने मला तिच्या हातानेच एक दिशा दाखवली आणि सांगितले आता ही दिशा अजिबात सोडू नकोस म्हणजे तू कपिलधारे पाशी पोहोचशील ! आधीच्या अनुभवामुळे मी इतका पोळलो होतो की मी ताबडतोब त्या दिशेला माझी काठी पकडली आणि तिचा कोन जराही न बदलता काठी हीच जणु माझी होकायंत्राची सुई आहे अशी भावना डोक्यात ठेवून झपाझप पावले उचलायला सुरुवात केली . थोडे पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहिले तर तिथे अजून एक म्हातारी स्त्री आली होती आणि दोघी बोलत उभ्या होत्या . माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी काठी पकडून वेगाने पळत सुटलो . पाच ते दहा मिनिटे झाल्यावर एक छोटा डांबरी रस्ता मला लागला . या निर्मनुष्य रस्त्यावर कोणी दिसते का ते पाहावे म्हणून मी क्षणभर थांबलो इतक्यात लुना सदृश गाडीवरून एक जोडपे माझ्याकडे येताना दिसले . "नर्मदे हर !आप गलत रस्ते से जा रहे है बाबाजी ।आपको पीछे मूडना चाहिये था । "  त्या माणसाने गाडी थांबवत मला सांगितले . त्याचा चेहऱ्यावरती हास्य होते आणि मला त्याचा चेहरा पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला . मी त्याला माझा रामदास बाबांना भेटण्याचा निश्चय सांगितला . मग तो मला म्हणाला तुम्ही एक काम करा . आता जर एकटे निघालात तर मार्ग सापडणे कठीण आहे . इथून एक सव्वा किलो मीटर पुढे माझे घर आहे . तिथे मी आपली वाट पाहत उभा राहतो . आपण या . मी आपल्याला कपिलधारे पर्यंत नेऊन सोडतो . इतक्यात त्याची बायको गाडीवरून उतरली आणि म्हणाली तुम्ही गाडीवर बसून पुढे जा . मी चालत येते . मी गाडीवर बसणार नाही हा माझा निश्चय त्याला सांगितला . मग तो म्हणाला हरकत नाही . थोडे पटपट चाला मी तुमची वाट पाहतो . हा सर्व संवाद हिंदी भाषेमध्ये झाला . मला हायसे वाटले . परंतु त्या माणसाला कुठे पाहिले आहे हे मात्र मला काही आठवत नव्हते . दहा पंधरा मिनिटातच त्याचे घर आले . रस्त्याच्या डाव्या हाताला एक दोन बैठी घरे होती . तो मला म्हणाला खरे तर तुम्हाला चहापाणी करून पुढे सोडले पाहिजे . परंतु तुम्हाला रामदास बाबांचा आश्रम गाठायचा असेल तर एकही सेकंद वाया न घालवता चालावे लागेल तरच तुम्ही पोहोचू शकाल . मी तुम्हाला कपिलधारेपर्यंतचा जंगलातील गुप्त मार्ग दाखवतो . हा मार्ग कोणालाच माहिती नाही . माझी त्या माणसाबद्दलची उत्सुकता वाढत होती . मी त्याला सरळ सरळ विचारले की आपण पूर्वी कधी भेटलो आहोत का ? तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला "अरे बाबाजी , कल ही तो हम मिले थे ! आप जब कपिलधारा पे बैठके बंदरो को भगा रहे थे तब मै ही तो बंदरों को गलोलसे पत्थर मार रहा था ! आपने मुझे बोला भी था कि मेरा निशाना बहुत अच्छा है ।" आणि मला एकदम तो प्रसंग आठवला . बहुतेक मागच्या प्रकरणात मी त्याचा उल्लेख देखील केला असेल ,कारण माझ्या डायरीमध्ये मी हा उल्लेख करून ठेवला आहे . तो त्या वनक्षेत्रामध्ये रोज येजा करणारा मनुष्य होता . त्याच्या पायाखाली अक्षरशः भिंगरी लावली आहे असे वाटावे इतकी त्याची गती होती . इथला वनमार्ग अजिबात सोपा नव्हता . रुळलेल्या पायवाटा चालायला सोप्या असतात परंतु आडमार्ग असल्यामुळे पायाखाली दगड आहे ,का पालापाचोळा आहे , का लाकूड आहे ,का काटे कुटे आहेत , काहीच अंदाज येत नव्हता . तो चालत होता आणि त्याच्या मागे मी अक्षरशः धावत होतो . जाता जाता तो मनुष्य मला त्या संपूर्ण परिसराची इत्थ्यंभूत माहिती देत होता . त्याने मला सांगितले की त्याच्या उभ्या आयुष्यात पहिला परिक्रमावासी या मार्गाने त्याला भेटला आहे . कारण किनारा पकडून चालणारे लोक एका अतिशय सोप्या पायवाटेने कपिलधारेपाशी येतात .परंतु मी वाटेत भेटलेल्या साधूची गंमत त्याला सांगितली .त्याच्यामुळेच असे झाले असे म्हणालो . परंतु असे का झाले असावे याचे उत्तर देखील त्यानेच देऊन टाकले ! तो म्हणाला की कदाचित मैयाची अशी इच्छा असावी की तुम्हाला आमचे अमरकंटकचे जंगल दाखवावे ! आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये राहतो याचा तुम्हाला अंदाज यावा ! आणि ते खरेच आहे . घराच्या बाहेर पडल्यावर काही फूट अंतरावर मीठ मिरची लिंबू भाजीपाला दूध फळे मिळणारे सोपे आयुष्य जगणारे आपण . कित्येक किलोमीटर पायपीट केल्याशिवाय पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही अशा वातावरणात कधी बरे राहणार ! आणि राहिलोच तर किती काळ तग धरणार ! इथले सर्वच अतिशय विषम आहे ! मी चालता चालता त्याला माझ्या शंका विचारत होतो आणि तो देखील अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तरे देत होता . मनुष्य हुशार आणि अभ्यासू होता .त्याला माकडांची भाषा कळत असे आणि माकडे त्याचे इशारे ऐकतात हे त्याने मला सांगितले आणि मी ते प्रत्यक्ष बघितले देखील होते .
थोडे अंतर गेल्यावर मानवी वस्तीच्या काही खुणा मला जाणवू लागल्या . इतक्यात त्याने सांगायला सुरुवात केली . मध्यप्रदेश मधली एक अतिशय मोठी बॉक्साइट खनिजाची खाण इथे काही वर्षांपूर्वी होती . 
हाच तो दुर्दैवी शापित परिसर जिथे कधीकाळी गोकुळ नांदत होते
खाण म्हटलं की खाण कामगार आले , ड्रायव्हर आले , इंजिनीयर आले , आणि त्या सर्वांची कुटुंबे कबीले , त्यांची मुले बाळे असे एक छोटेसे गावच जणूकाही इथे वसले होते .परंतु काही डाव्या लोकांनी केलेल्या चळवळीमुळे ही खाण कायमची बंद पडली . आता तिथे अतिशय भीषण शांतता नांदत होती . त्याने मला जुन्या चाळी , जुनी घरे , जुनी शाळेची इमारत ,सर्व काही दाखवले . मनुष्य वावर शून्य असल्यामुळे या सर्वांचा ताबा जंगलातील मिळेल त्या वनस्पतीने घेतला होता . एखाद्या भय पटाला शोभेल असे वातावरण तिथे होते . अगदी मोकळे मैदान सुद्धा होते आणि त्या मैदानाचे रूपांतर हळूहळू जंगलामध्ये होऊ घातले होते . मानवी वस्ती नष्ट झाली की निसर्ग किती कमीत कमी काळामध्ये आपले साम्राज्य पुन्हा उभे करतो याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते . मी तिथे उभा राहून एक क्षणभर भरलेल्या गोकुळाप्रमाणे नांदणाऱ्या गावाची कल्पना केली . खूपच सुंदर वातावरण असणार होते त्या काळातील ! परंतु सध्याचे विदारक वास्तव दुःखदायकच होते . आपल्याकडे उठ सूट कुठल्याही कारणासाठी चळवळ आंदोलन मोर्चा वगैरे करण्याची टूम अलीकडे वाढत चालली आहे . परंतु याचा दूरगामी परिणाम किती लोकांच्या जीवनावर ,रोजी रोटीवर होतो याचा अभ्यास आपण करून मगच ते केलेले बरे असे मला वाटते . त्या गावामुळे आजूबाजूच्या जंगलावर कुठलाही परिणाम झाला नव्हता हे मी स्वतः अनुभवले होते . तरीदेखील ती वस्ती उठवली गेली आणि अनेक लोक बेघर झाले . ज्यांना एखाद्या माणसाचे आयुष्य उभे करता येत नाही त्यांनी किमान एखाद्या माणसाचे सुंदर सुरू असलेले आयुष्य उजाड तरी करू नये असा सल्ला मी माझ्या सर्व डाव्या विचारसरणीच्या मित्रांना देईन . इथे गाव वसत असताना वातावरण किती सुंदर होते याचे वर्णन मला त्या माणसाने सांगितले . इथून अगदी थोड्या वेळात आम्ही कपिलधारेपाशी पोहोचलो . त्या माणसाने मला पुढे काय काय धोके वाढून ठेवले आहेत याची चांगली कल्पना देऊन ठेवली . समतोल जमिनीवरून चालणारे आम्ही अचानक एका खोल दरीमध्ये उतरतो आहोत असे मला जाणवले . आणि इतक्यात कालचा तो पूल मला दिसू लागला ज्यावरून अमरावतीच्या भूषण स्वामींची परिक्रमा खंडित झाली होती ! 
आता इथून पुढे मी सांगितले आहे त्याप्रमाणे जा .मी येतो .असे तो मनुष्य म्हणाला . मला एक क्षणभर काहीच कळेना . मला असे वाटले होते की हा मनुष्य चणे विकण्याकरिता कपिलधारे पाशी निघाला आहे . आणि जाता जाता मला मार्ग दाखवतो आहे . परंतु तो केवळ मला मार्ग दाखवण्याकरता एवढ्या दुरून जंगलामधून पायपीट करत आला होता . त्याने निरोप घेतला आणि एका क्षणात चढ चढत दिसेनासा देखील झाला . उतरण्याच्या गती पेक्षा चढण्याची त्याची गती अधिक होती .त्या माणसाचे नाव विचारायची फुरसत देखील मला मिळाली नाही . परंतु त्याची सहृदयता पाहून डोळ्यामध्ये पाणी आले . कोण कुठला मी ?त्याचा माझा काय संबंध ? मी त्याच्यासाठी असे काय केले होते ? किंवा करणार होतो की ज्यामुळे त्याने माझ्यासाठी इतके सौजन्य दाखवावे ? ज्याला सभ्य पांढरपेशा भाषेमध्ये कम्फर्ट झोन म्हणतात त्यातून बाहेर पडून माझ्यासाठी रान वाटा तुडवाव्यात ?  परंतु केवळ नर्मदा मातेचे नाव घेऊन मी निघालो आहे इतकीच ओळख त्याला पुरेशी होती . तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला इथले भूमिपुत्र तयार व्हायचे व होतात! हा अनुभव तुम्हाला जगात अन्यत्र कुठेही येणे कालत्रयी शक्य नाही ! नर्मदा मातेचा हा प्रताप आहे ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! समोर नर्मदा माता अतिशय सुंदर दर्शन देत होती ! 
दक्षिण तटावर बांधलेला नर्मदेचा पक्का घाट (संग्रहित छायाचित्र )
असे वाटत होते की काही काळ पक्क्या बांधलेल्या घाटावर बसावे आणि तिचे रूप डोळे भरून पाहावे .परंतु अंधार पडण्याची वेळ जवळ येऊ लागली होती . वनक्षेत्रामध्ये अंधार लवकर पडतो . त्यात इथली झाडी इतकी गर्द होती की दिवसादेखील रात्री सारखा अंधार पडलेला असायचा . इथे पर्यटकांची थोडीफार वर्दळ जाणवली . सर्वजण आपापले सेल्फी घेण्यामध्ये मग्न होते त्यामुळे मी समोरून गेलो तरी कोणाच्या लक्षात देखील आले नाही . नाहीतर शक्यतो परिक्रमावासी दिसल्यावर या भागातील लोक आवर्जून नर्मदे हर करतात . या भागातील एक दोन विक्रेत्यांनी मला सांगितले की पुढे मार्ग नाही . परंतु मुझे रामदास बाबा के पास जाना है असे सांगितल्याबरोबर ताबडतोब मग इथूनच जा असे ते सांगत होते . पुढे आलो आणि कपिलधारा जलप्रपाताचे अद्भुत दर्शन घडले ! 
कपिलधारा जलप्रपात
तीस-पस्तीस फुटावरून नर्मदामाता इथे मेकल पर्वताच्या खांद्यावरून जमिनीवर उडी घेते ! हे दृश्य पाहता यावे असा लोखंडी सज्जा इथे केलेला आहे . 
पर्यटकांसाठी केलेले पक्के कुंपण 
परंतु तिथे पर्यटकांची सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही . नंतर माझ्या लक्षात आले की इथून जंगलामध्ये जाणारा मार्ग चांगले साडेपाच सहा फूट उंचीचे पक्के कुंपण लावून बंद करण्यात आलेला आहे !
पर्यटकांसाठी केलेला सेल्फी पॉईंट .इथूनच पुढे जंगल मार्ग सुरू होतो .
आता मात्र थोर पंचाईत झाली ! पलीकडे कसे जावे असा विचार करता करता मी पाठीवरची झोळी काढली आणि पलीकडे फेकून दिली ! एक दोन स्थानिक लोक मला सांगू लागले अरे उधर मत जाना । रास्ता नही है ।
मग तर मी दंड पण पलीकडे टाकला आणि त्यांना सांगितले मेरा सामान उधर है । वह लेने के लिए जा रहा हू । आणि कुठलाही विचार न करता मी मोठी उडी मारून ते कुंपण ओलांडले आणि धप्प करून जमिनीवर उडी टाकली ! झोळी पाठीवर टाकली , दंड उचलला आणि जंगलामध्ये बाणासारखा घुसलो ! नर्मदे हर ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही . आता लवकरच रामदास बाबांची भेट होणार म्हणून अष्ट सात्विक भाव जागृत झाले ! जंगलामध्ये अतिशय छोटीशी पायवाट होती परंतु ती रुळलेली नाही हे स्पष्टपणे कळत होते . कारण सर्वत्र पालापाचोळाच दिसत होता . आत मध्ये प्रचंड अंधारून आलेले आहे असे माझ्या लक्षात आले . काही झाडांना छोट्या चिंध्या बांधल्या होत्या तोच मार्ग आहे हे माझ्या लक्षात आले . उजव्या हाताला खाली खोल दरीतून नर्मदा माता वाहत होती !  आजूबाजूला घनदाट अरण्य सोडून बाकी काहीच नव्हते ! हळूहळू ती पायवाट देखील पुसट होत गेली . आणि आता माझ्या साथीला उरले किर्र जंगल आणि नर्मदेचा खळखळ खळखळ आवाज ! थोड्यावेळाने माझ्या असे लक्षात आले की ही वाट डावीकडे डावीकडे सरकत आहे आणि नर्मदा माता माझ्यापासून दूर आणि खोल जात आहे . आता हळूहळू डावीकडून उजवीकडे जाणारे ओढे नाले मला लागायला सुरुवात झाली . हा मार्ग म्हणजे एक प्रकारचा डोंगर उतारच होता . परंतु अतिशय गर्द झाडी असल्यामुळे तोल जाण्याची भीती नव्हती . पावला पावलावर झाडे होती . आता पायवाट पूर्णपणे संपली आणि चिन्ध्या देखील दिसायच्या बंद झाल्या . माझ्या लक्षात आले की मी नर्मदेचे मूळ पात्र सोडून बराच डावीकडे आलो आहे . परंतु आता नर्मदा गाठायची तरी कशी ? मी असा विचार केला की नर्मदा सर्वात खालच्या पातळीवरून वाहत असणार . त्यामुळे जिकडे उतार दिसेल तिकडे चालायचे .परंतु लवकरच लक्षात आले की हे खूप अवघड आहे .कारण वाटेमध्ये असंख्य ओढे नाले ओहोळ होते . ते पार करताना चुकून नर्मदाच पार झाली तर ?सगळाच खेळ खल्लास ! इतक्यात माझ्यातील इंजिनिअरने तार्किक उत्तर दिले . नर्मदा आपल्या उजव्या हाताने वाहते आहे . म्हणजे तिचा प्रवाह उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे असला पाहिजे . आणि येऊन मिळणारे ओढे डावीकडून उजवीकडे वाहत आहेत . त्यामुळे प्रवाह पाहून नदी आहे का ओढा त्याचा निर्णय करायचा . वाचता क्षणी तुम्हाला देखील हे किती योग्य आकलन आहे असे वाटेल ! परंतु माझा तिथला अनुभव अत्यंत विपरीत होता ! डोंगराला अंतर्गत चढउतार असल्यामुळे हे ओढे कधी कधी उलटे सुद्धा वाहत होते ! आता माझ्या लक्षात आले की या मार्गाने का जाऊ देत नाहीत ! पायवाट संपली होती त्यामुळे जागा मिळेल तिथे पाय ठेवत होतो . इथली झाडी अस्पर्शीत असल्यामुळे ताठ मानेने चालताच येत नव्हते .अखंड पाठीमध्ये वाकून किंवा कधी कधी गुडघ्यावर बसून रांगत चालावे लागत होते .हे सर्व करताना तीव्र चढ-उतार असल्यामुळे तोल जाण्याचा आणि गडगडण्याचा संभव होता . काटेरी झाडे आणि वाळलेल्या काटक्या कुटक्या देखील खूप होत्या . कपडे अडकून फाटत होते . शक्यतो मानवी वावर असलेल्या वनक्षेत्रातील इंधन लोक सरपण म्हणून गोळा करतात . परंतु इथे कोणीच फिरकत नव्हते त्यामुळे इथली सर्व वाळलेली लाकडे जंगलातच कुजून माती होत होती . आता मात्र अंधार वाढतो आहे असे मला जाणवू लागले . समोर डावीकडे उजवीकडे कुठेच नर्मदेचा मागमूस नव्हता . दुपारी जशी माझी अवस्था झाली तशीच किंवा त्याहून भयानक अवस्था माझी होत आहे याची मला जाणीव झाली . तिथे निदान उजेड तरी होता इथे भयंकर अंधार होता .तिथे समतोल जमीन होती इथे तीव्र उतार होता . अखेरीस मी असा विचार केला जे व्हायचे ते होऊ देत परंतु आता उताराच्या दिशेने धावत सुटायचे .आणि मी नर्मदा मातेचा धावा करत मिळेल त्या वाटेने उताराच्या दिशेने उतरायला सुरुवात केली . पालापाचोळा इतका साठला होता की काही काही ठिकाणी अडीच ते तीन फुटाचा थर झाला होता . अशा ठिकाणी साप विंचू काटा प्रचंड प्रमाणात असतो . परंतु या प्राण्यांना हल्ल्याची संधी न देता क्षणात तुम्ही पुढे निघून गेलात तर ते तुम्हाला काही करत नाहीत . हीच युक्ती वापरून मी अतिशय गतीने उताराच्या दिशेला माझे सर्वस्व झोकून दिले . कधी कधी एकदम पाच दहा फूट घसरायचो पण तसाच उतरत रहायचो . तोल गेले . गडगडलो तरी  पुन्हा सावरायचो . सुदैवाने मध्ये सर्व उलटे वाहणारे ओढे मिळाले . तीव्र उतार उतरल्यावर अचानक सपाटी लागल्यासारखे झाले आणि मला समोर एक पिवळ्या रंगाची ताडपत्री लावलेली कुटी दिसू लागली ! मला खूप आनंद झाला ! मला वाटले की चला ! आता आपण रामदास बाबांच्या आश्रमामध्ये लवकरच पोहोचणार ! कुटी अतिशय स्वच्छ सारवलेली होती . आत मध्ये काहीच सामान नव्हते . पूर्णपणे रिकामी कुटी ! आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते . मी मोठ्या आवाजात नर्मदे हर !नर्मदे हर ! असा पुकारा चालू केला .परंतु संपूर्ण जंगलातून कुठूनही प्रतिसाद येत नव्हता . इथून पुढे एक खड्डा दिसत होता बहुतेक नर्मदा माता तिथेच असावी असा कयास मी बांधला . परंतु कुटी आणि परिसरात तर स्वच्छ झाडलोट केलेली होती याचा अर्थ कोणीतरी नक्की इथे राहत असणार ,मग आपल्याला प्रतिसाद का मिळत नाही असा विचार करून मी अजून थोडा प्रयत्न करायचा निश्चय केला . त्या घनदाट अरण्यामध्ये मला दुसरा कुठला सोयीचा मार्ग देखील दिसत नव्हता . मी ज्या भागामध्ये हे सर्व अनुभवले त्या भागातील अरण्याचा गुगल फोटो खाली जोडत आहे म्हणजे वाचकांना थोडीफार कल्पना येईल .
साधारण याच भागात ती कुटी होती . इथे नर्मदा शोधून देखील सापडत नाही हे वाचकांच्या सहज लक्षात येईल .
मी मनातल्या मनात खजिल झालो . आणि विचार केला जाऊ दे .अजून जास्त वेळ इथे थांबलो तर इथेच रात्र व्हायची . त्यापेक्षा थोडेफार दिसते आहे तोपर्यंत रामदास बाबांची कुटी गाठायचा प्रयत्न करूया . तोवर मी आजूबाजूला फिरून पाहिले तर माझा अंदाज बरोबर निघाला शेजारच्या खड्ड्यामधूनच नर्मदा माता वाहत होती ! तिचा तो विवक्षित रंग मी लगेच ओळखला !आणि मग काय विचारता ! आता हिला सोडायचीच नाही असा विचार करून मी काठाकाठाने चालायचा निर्णय घेतला . इतक्यात दूरवरून खणखणीत आवाज आला . , "आगे मत जाओ । रुको , हम आ रहे है। "
त्या आवाजात अतिशय जरब होती . तो आवाज त्या संपूर्ण जंगलामध्ये घुमत होता . मोठा आवाज झाल्यावर जंगलातील बाकीचे वन्य पशु पक्षी क्षणात चिडीचुप होतात तसे झाले . मला आवाज कुठून येतो आहे त्याचा मी अंदाज घेऊ लागलो . दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते . किंवा पालापाचोळा तुडवत चालल्याचा आवाज देखील येत नव्हता . परंतु , " मै आ रहा हु । " " मै आ रहा हु । " असा आवाज हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला . थोड्याच वेळात दूरवर मला खांद्यावर लाकडांची मोळी घेतलेला एक साधू दिसला . तो अतिशय वेगाने माझ्या दिशेने येत होता . त्याच्या ढांगा लक्षात येण्या इतपत मोठ्या होत्या . "क्षमा चाहता हु । जंगल मे लकडी इकठ्ठा कर रहा था । आपको बहुत समय रुकना पडा । "  मोळी एका बाजूला फेकत तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला ! मी म्हणालो "नर्मदे हर ,महाराज ! " नर्मदे हर , नर्मदे हर , यहा कहा रास्ता भटक गये? " "भटके कहा है महाराज ? मैया के किनारे किनारे तो चल रहे है । " " लेकिन आगे जाने का मार्ग तो उपर से है । यहा से कोई नही जाता । यहा चलने लायक मार्गही नही है ।" साधू म्हणाला .
 " उस उपर के मार्ग की तो बात ही मत बताओ मुझे ! बुरी तरह से फस गया था मै वहा । वहा कोई रास्ता नही है ।" मी म्हणालो .साधू मोठ्याने हसला . त्याचा रंग गोरापान होता . त्याने संपूर्ण अंगाला भस्म लावले होते . आणि कमरेला एक छोटासा मळकट पांढरा पंचा गुंडाळला होता . तब्येत लक्षात येण्या इतकी चांगली होती . शक्यतो खाण्यापिण्याचे हाल केल्यामुळे साधू अतिशय सडपातळ असतात . परंतु या साधूचे शरीर चांगले पिळदार होते . त्याने आणलेल्या मोळीचा आकार पाहूनच मी सुरुवातीला हबकलो होतो ! या सर्वांवर मात करत होते ते त्याचे निळे शार डोळे ! त्याचे डोळे अतिशय तेजस्वी बोलके आणि निळ्या रंगाचे होते ! डोळ्यांमध्ये असा सुस्पष्ट निळा रंग शक्यतो पाहायला मिळत नाही . डोक्यांवर जटांचा भार होता . आणि आवाज अतिशय भारदस्त होता . त्याच्या चेहऱ्यावर एक जबरदस्त स्मितहास्य अखंड विलसत होते . त्याचे ते रूप मी पाहतच राहिलो ! इथे राहून हा काय खात असेल ? काय पीत असेल ? कशी साधना करत असेल ! सगळेच अगम्य ! लहानपणी मी जेव्हा ऋषीमुनींच्या कथा वाचायचो तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक प्रतिमा तयार झाली होती . हा साधू बऱ्यापैकी त्या प्रतिमेमध्ये बसणारा असा होता . 
" अब एक काम करो l यहां से वापस ऊपर चले जाओ वहां आपको पगडंडी मिल जाएगी ।" " नहीं महाराज ,मैं ऊपर नहीं जाऊंगा । हमने परिक्रमा उठाई है मैया के दर्शन करने के लिए ।और अब जब मैया दिख रही है तो हम उसे छोड़ेंगे नहीं । आप कोई किनारे किनारे जाने वाला रास्ता बताइए ।" "लेकिन आप जाओगे कहां ?" "मुझे रामदास बाबा से मिलना है । बहुत लोगों ने बताया उनका दर्शन करो । धन्य हो जाओगे ।" 
" लेकीन रामदास बाबा का आश्रम तो यहां से काफी दूर है । पूरा अरण्य मार्ग है ।" " देखिए महाराज अब कुछ भी हो जाए । हम मैया को नहीं छोड़ेंगे । चाहे मैया में उतर के ही क्यों चलना ना पड़े । लेकिन हम अब मैया का किनारा नहीं छोड़ेंगे ।" माझा हा निश्चय ऐकून साधू एक क्षणभर विचारात पडला . त्याने डोळे मिटून घेतले . आणि ते तेजस्वी निळे निळे डोळे उघडून क्षणात मला म्हणाला "फिर तो एक बहुत आसान रास्ता है । अब यहा जो मैया का किनारा पकडा है उसे छोडना नही । सीधे-सीधे चलते रहो । कुछ भी हो जाए पीछे मुड़ना नहीं । वैसे तो १ घंटे का रास्ता है । आप आराम से रामदास बाबा के पास पहुंच जाओगे । " साधूने नर्मदा किनारी जाणारा रस्ता सांगितल्यामुळे मला खूप आनंद झाला ! " बाबा जी आप नाम क्या लिखते हैं ? " अंगभूत आगाऊपणातून मी त्याला प्रश्न केला . 
" शंकर " अतिशय धीर गंभीर आणि खड्या आवाजात साधू उत्तरला . पुढे मी विचारले "आप कहा बिराजते है ? " "मै यही पर रहता हु । " " ठीक बाबाजी । नर्मदे हर ! "
मी क्षणाचाही विलंब न लावता वळलो आणि किनाऱ्याचा रस्ता पकडला . त्या साधूचे पाणीदार निळे डोळे आणि त्याची तीक्ष्ण नजर डोळ्यासमोरून जात नव्हती . काही वेळापूर्वी भयभीत झालेले आणि बिथरलेले माझे मन क्षणात तळ्यावर आले .आता आपल्याला रामदास महाराजांचा आश्रम सापडतो की नाही या शंकेने मनामध्ये जे घर केले होते त्याची जागा निश्चिन्तीने घेतली . आता मला खात्री होती की तासाभरात मी आश्रमामध्ये पोहोचणार ! उजवीकडे नर्मदा मातेचे सुंदर बालरूपातील पात्र वाहत होते ! या पात्रामध्ये मला माझा दंड बुडवता येत होता इतक्या जवळून मी चालत होतो . संपूर्ण जंगलामध्ये अंधुक अंधार पसरला होता . धुके सदृश्य वातावरण पडले होते . आणि केवळ नर्मदा माता तेवढी तेजाने झळाळत होती . मी मनातल्या मनात विचार करीत होतो ,की लोक किती चुकीची माहिती देतात परिक्रमा वासींना . इतका चांगला मार्ग असताना इकडे रस्ता नाही म्हणून सांगतात . कारण मी ज्या मार्गाने निघालो होतो तो मार्ग खरोखरीच खूप प्रशस्त आणि बऱ्यापैकी सपाट होता . महिंद्रा थार किंवा जिप्सी सारखी एखादी फोर बाय फोर गाडी त्या मार्गावरून सहज गेली असती असा तो मार्ग होता . मी मनात क्षणभर असा विचार देखील केला की आपण कधीतरी इथे ऑफ रोडिंग करण्याकरता गाडी घेऊन येऊया ! माझ्या पायांनी चांगलीच गती घेतली होती . इतक्यात नर्मदा मातेचे पात्र रुंद होते आहे असे माझ्या लक्षात आले . हळूहळू नर्मदेच्या एका धारेपासून अधिक धारा निर्माण होऊ लागल्या . मला दुरूनच कोणीतरी बोलत आहे असा आवाज येऊ लागला . आवाज हळूहळू मोठा होत होता . नर्मदेच्या मध्ये तयार झालेली बेटे देखील गर्द झाडीने भरलेली होती . मी आवाज दिला , " नर्मदे हर ! " बेटावरून आवाज आला ,
"नर्मदे हर ! वहीं पर रुकना बाबा जी । मैया की धारा पार मत करना ।हम वहां आते हैं । "
" जी महाराज " मी उत्तरलो आणि जागेवर स्तब्ध उभा राहिलो .चालायला लागून उणीपुरी १५ मिनिटे सुद्धा झालेली नव्हती. मला अजूनही कोण बोलले ते कळत नव्हते .नीट डोळे विस्फारून पाहिल्यावर मला त्या अनेक बेटांच्या गर्दीतील एका बेटावरून झाडीतून चालत येणारी दोन माणसे दिसली . एक भव्य देहयष्टी असलेले साधु महाराज होते . व त्यांना आधार देत चालणारा दुसरा एक वनवासी म्हातारा होता.मी त्यांच्या दिशेला चालू लागलो इतक्यात महाराजांनी पुन्हा एकदा मला हात वर करून थांबायचा इशारा केला . "रामदास बाबा .. " मी बोलणार इतक्यात तो म्हातारा ओरडला ," हां रामदास बाबा ही है यह । रुको वह स्वयं आप को दर्शन देंगे । आप अंदर नहीं आ सकते । नहीं तो आपकी परिक्रमा खंडित हो जाएगी । "  मी जागेवरच उभा राहिलो .परिक्रमा खंडित होणे किती क्लेषदायक असते याचे अनुभव काही परिक्रमा वासींकडून ऐकले होते. रामदास बाबांना चालता येत नव्हते असे माझ्या लक्षात आले . त्यांचा संपूर्ण भार म्हाताऱ्याने आपल्या अंगावर घेतला होता . मला क्षणभर खूप वाईट वाटले . आपल्यामुळे त्यांना उठून इकडे यावे लागते आहे . त्यापेक्षा सरळ त्यांना सांगावे की तुम्ही माझ्यापर्यंत येण्याचे त्रास घेऊ नका , तिथेच थांबा . मी दुरून दर्शन घेऊन पुढे निघून जातो . असे माझ्या मनात आले . इतक्यात महाराज स्वतः मोठ्या आवाजात आणि चक्क मराठीमध्ये म्हणाले , " अहो माझी काही काळजी करू नका ! मला ही मैय्याच सर्व शक्ती देते . थोडा त्रास देतो तुम्हाला . पाच च मिनिटे थांबा ,मी आलोच . " रामदास बाबांना चालताना खरंच त्रास होत होता . परंतु त्यांचाच आदेश असल्यामुळे मी एका जागी स्तब्ध उभा राहिलो . चालता चालता दोघांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या . दोघे खूप वर्षांनी एकमेकांना भेटले असावेत अशा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या . साधारण दहा मिनिटे झाल्यावर महाराज नर्मदेच्या दोन-तीन धारा पार करून माझ्यासमोर एका सारवलेल्या दगड मातीच्या कट्ट्यावर येऊन बसले . "जय जय रघुवीर समर्थ ! राम कृष्ण हरी ! नर्मदे हर ! " रामदास महाराज मोठ्या आवाजात मला म्हणाले . मी धावतच जाऊन त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला . मी उठून उभा राहिलो आणि त्यांच्यासोबत असलेला म्हातारा माझ्यावरती एकदम खेकसला ! "आप यहां से कहां से आए ? " मी म्हणालो , " अमरकंटक से आया महाराज । " "हां वह तो ठीक है । लेकिन अमरकंटक से यह कौन सा रास्ता लेकर आए ? " "कपिलधारा तक आया । फिर वहां से जाली कूद के अंदर आ गया । "
"आप मेरी बात समझ नहीं रहे । आपके आने की आवाज मैं काफी समय से सुन रहा हूं । आप किनारे किनारे कैसे आ गए ? " मग माझ्या लक्षात आले .रामदास बाबांच्या आश्रमाकडे येण्याचा वरचा एक मार्ग होता . तो मी मगाशीच सोडला होता . मला असे वाटले की कदाचित म्हातार्‍याला हा नवीन मार्ग माहिती नसावा . मी त्याला म्हणालो , " यहां मैया के किनारे से आने के लिए बहुत बड़ा रास्ता है । यहा से सिर्फ पंधरा मिनिट की दूरी पर एक साधू की कुटी है । उसने मुझे यह रास्ता बताया ।नही तो मै पहले उपर वाले रस्ते से जा रहा था और बुरी तरह से भटक गया था । " मला अजूनही त्या म्हाताऱ्याचे समाधान झालेले आहे असे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटेना . त्याचा चेहरा अत्यंत त्रासिक आणि वैतागलेला वाटत होता . "बहुत बड़ा रास्ता है ? हमें तो नहीं पता ।और तुम कौन से साधु की बात कर रहे हो ? हमारी उम्र बीत गई इस जंगल में । क्या महाराज क्या बोलते हो ? आपको अमरकंटक के इस जंगल में कौन लेकर आया ? " रामदास बाबा मंद स्मितहास्य करत हिंदी मधे बोलू लागले , " यह सही बात बोल रहे है । इनको इस जंगल का चप्पा चप्पा मालूम है । यही मुझे यहा पंचधारा मे लेकर आये ।और मै पिछले पैतीस साल से यहा रह रहा हु । यहा से पीछे सीधा अमरकंटक तक जंगल मे एक भी साधू नही रहता और नही रह सकता । " हे सर्व बोलणे ऐकून मी चक्रावून गेलो . पंधरा मिनिटांपूर्वी घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर ताजा ताजा असताना आणि अतिशय प्रशस्त महामार्गासारख्या रस्त्याने नर्मदेच्या काठावरून मी इथे चालत आलेला असताना हे लोक असे का बोलत आहेत हे मला काही कळेना . एक क्षणभर मनात आले की हे खोटे तर बोलत नाहीत ? म्हातारा पुन्हा एकदा चिडून मला म्हणाला . "तुम यहां से आए ना ? देखो पीछे और बताओ मुझे कहां है तुम्हारा बड़ा वाला रास्ता ? "महाराज मैं सच बता रहा हूं । यहां से ठीक १५ मिनट की दूरी पर एक कुटिया है । पीले रंग की ताडपत्री में ढकी हुई है । वहां एक साधु भी रहता है । वह जंगल में लकड़ी जमा कर रहा था ।उसने मुझे यह रास्ता बताया है । चाहे तो अभी आपको उनसे मिलवाता हूं । ज्यादा दूर नहीं है उनके आश्रम का रास्ता । ''  " अरे पागल वही तो हम पूछ रहे हैं ।कहां है तुम्हारा यह रास्ता ?"म्हातारा चिडून माझ्यावर खेकसला. मी मागे वळून पाहिले . आणि माझ्या तोंडचे पाणीच पळाले ! कारण मी ज्या प्रशस्त मार्गाने चालत आलो होतो तो मार्ग आता मला कुठे दिसतच नव्हता . उलट प्रचंड गर्द किर्र झाडी मात्र दिसत होती .ही झाडी किती दाट असावी ? एखादे मांजराचे पिल्लू देखील त्यात शिरू शकणार नाही इतकी दाट झाडी होती . माझ्या अंगावर काटा आला ! हा नक्की काय प्रकार आहे माझ्याच लक्षात येईना .कारण मी महाराजांनी थांब म्हटल्यावर जागेवरती उभा राहिलो होतो .त्यामुळे मी ज्या मार्गाने आलो तो मार्ग मी सोडलाच नव्हता .आणि आता मागे वळून बघतो तर मागे मार्गच दिसत नव्हता . मी पूर्णपणे खोटा पडलो होतो . मी डोळ्यात पाणी आणून तळमळीने रामदास महाराजांना म्हणालो , " महाराज नर्मदा मैया की कसम मे इसी रास्ते से आया हू ।मतलब अभी मुझे वह रस्ता द
दिख नही रहा लेकिन  उस कुटीयासे यहा तक बहुत बढीया रास्ता था । हम स्वयम उसी पर चलकर आए हैं । हमने उस साधु को पूछा भी था की नर्मदा किनारे किनारे अगर चलना हो तो कौन सा रास्ता है वह बताओ ।" म्हातारा वैतागलेला दिसत होता परंतु रामदास बाबा मात्र अतिशय मंद स्मितहास्य करत माझ्याकडे पाहत होते . महाराज म्हणाले , " परस्ते ! समझे कुछ ? तू तो बड़ा जानकार है ना इस जंगल का ?" त्या म्हाताऱ्याचे नाव परस्ते आहे असे माझ्या लक्षात आले . "नही बाबा कुछ नही समझा । यह परिक्रमा वासी झूठ बातें बतला रहा है । " परस्ते म्हणाला . रामदास बाबा म्हणाले , "रुको अभी समज जाओगे । "आणि माझ्याकडे वळून मला म्हणाले , " कौन था वह साधु ? कुछ समझे ? " मी अजूनही तंतरलेल्या अवस्थेमध्ये होतो . माझ्यासमोर प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट आता वेगळीच दिसते आहे याचा धक्का मला बसला होता . तरी देखील धीर एकवटून मी म्हणालो . , "बाबा मैंने उसे उसका नाम भी पूछा । " "क्या नाम बताया उन्होंने ? " "शंकर । शंकर नाम है उसे साधु का ।नीली नीली आंखें है । और एकदम पहलवान जैसा हट्टा कट्टा दिखता है । " रामदास बाबा मोठ्या आवाजात हसू लागले ! त्यांचे ते गडगडाटी हास्य संपूर्ण जंगलामध्ये घुमू लागले ! , " वा भाई वाह ! माई तेरी लीला न्यारी।  परस्ते समझ गए ना कौन सा साधु था ? इस परिक्रमा वासी को छोड़ना नहीं चाहिए आज परस्ते। क्या कहते हो ! " "जी बाबा जी । इन्हें आज रोक लेते हैं हमारे आश्रम में ! " परस्ते उत्तरला . रामदास बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले आणि आकाशाकडे बघून दोन्ही हात वर करून जोर जोरात ओरडू लागले , "  शंकर ! शंकर ! नर्मदे हर ! शंकर ! " 


लेखांक एकोणतीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर