लेखांक २१ : एकादशी आयुष्याची

साधू ने बघता बघता नदीच्या काठचा रस्ता पकडला . काठावरून म्हणजे किती काठावरून चालावे त्याने ?उजव्या हातातील काठी सतत नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडत होती इतक्या काठाने आम्ही चालत होतो . डावीकडे प्रचंड माजलेले गवत आणि झाडी होती .उजव्या हाताला खळखळून वाहणारी नर्मदा माई होती . कुठून कोणास ठाऊक परंतु एक पाऊल ठेवण्या इतका मार्ग सगळीकडे निर्माण झालेला होता . साधूने मला काठाने कसे चालायचे ते शिकवले . मला खात्री आहे की जर मी एकटा त्या मार्गावर गेलो असतो तर रस्ता नाही असे समजून परत उलटा फिरलो असतो .परंतु त्याने मला समोर रस्ता आहे का नाही हे कसे ओळखायचे ते शिकवून ठेवले . काठावरती उभे राहिल्यावर दोन चार किलोमीटर पुढील नदीची वळणे दिसतात तिथला मार्ग देखील इथूनच ताडून ठेवता येतो ती कला देखील त्याने शिकविली . वाटेत येणाऱ्या नद्या आणि नाले कसे ओलांडायचे ते देखील त्यांनी शिकविले . समोर दूरवर एखादा संगम असेल तर तो देखील अलीकडूनच कळतो, तो कसा ओळखायचा ते देखील त्याने शिकविले .नर्मदे पासून चालत चालत लांब गेल्यावर नर्मदा माता नक्की कुठल्या दिशेला आहे हे ओळखण्याची एक खतरनाक युक्ती त्याने मला शिकविली . कुठल्याही पाण्यामध्ये पाऊल ठेवताना पायातील पादत्राणे हातात घ्यावी असा संकेत आहे . कुठलीही नदी नाला किंवा जलस्त्रोत ही जलदेवता मानली असल्यामुळे तिथे पादत्राणे लावणे मान्य नाही . चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये पाय रुतू नये म्हणून कसे वेगाने पळत जायचे हे देखील त्याने मला शिकवले . नदीच्या काठाला उगवलेले पाण गवत आडवे पाडून त्यावर पाऊल ठेवून चिखलापासून कसा बचाव करता येतो हे देखील मी शिकलो . वाटेत येणारे खेकडे, साप, विंचू कसे बाजूला करायचे हे देखील त्याने मला शिकवले . विविध प्राण्यांचे ठसे आम्हाला दिसू लागले . तेव्हा त्यातील कुत्र्याचे ठसे कुठले ,लांडग्याचे कुठले आणि कोल्ह्याचे कुठले हे ओळखायला त्याने मला शिकवले . मजल दरमजल करत आम्ही शिवालय घाटावर पोहोचलो . इथे नर्मदेचे पात्र अत्यंत विस्तृत झालेले असून या पात्रामध्ये हजारो शिवलिंगे स्थापित केलेली आहेत . पाणी स्वच्छ निर्मळ असल्यामुळे किंवा पातळी उतरली की ही शिवलिंग दिसू लागतात . इथे एक छोटीशी धर्मशाळा आणि त्याला लागून छोटीशी स्वयंपाकाची खोली होती .
पत्रे लावलेले स्वयंपाक घर आणि पलीकडे पक्की धर्मशाळा (शिवालय घाट )

दुसऱ्या बाजूने धर्मशाळेचे दर्शन .समोर हापसा .
शिवालय घाटावरील नर्मदा व शिवमंदिर
नर्मदा मैया आणि शिवजी
शिवालय घाटावरून होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन
साधूने मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या .ज्यापुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये पदोपदी माझ्या कामाला आल्या .अगदी आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर आपण बोलावे कसे , वागावे कसे , बसावे कसे ,झोपावे कसे , पूजा कशी करावी इथपासून सर्व गोष्टी त्याने मला शिकविल्या . गेल्या गेल्या जेवण आहे का असे विचारू नये . तर इथे शिधा मिळू शकतो का असे विचारावे . प्रत्येक ठिकाणी बनविलेले जेवण मिळेलच याची खात्री नसते . किंवा स्वयंपाक बनवणारी व्यक्ती त्यादिवशी तिथे उपस्थित असेल याची खात्री नसते .अशावेळी समोरच्या व्यक्तीला आपण अन्नदान करू शकत नाही याचे दुःख होऊ नये ही आपली जबाबदारी आहे . त्याप्रमाणे आम्ही तेथील साधू कडून सदाव्रत अर्थात शिधा मागून आणला . तिथून पुढे मी आपण होऊन कधी भोजनाची विचारणा केलीच नाही .समोरच्या साधूने अथवा मठपतीने देऊ केले तरच शिधा / भोजन घेतले .
शिवालय घाट आश्रमाचा शिक्का

सोबत नाशिकचा एक म्हातारा आमच्या सह मुक्कामाला होता . हा अतिशय तापट आणि भांडकुदळ होता असे जाणवले . या दोघांनी हापश्यावरील गरम पाण्यावर आंघोळ केली .मी मात्र बर्फासारख्या थंडगार नर्मदा मातेच्या पाण्याने अंघोळ केली .नर्मदेचे पाणी अतिशय स्वच्छ ,नितळ , सुंदर आणि चविष्ट होते . आता चवीचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो .नर्मदा मातेच्या काठावर बसून कधीकधी चिंतन घडायचे त्यात मला जाणवलेले काही मुद्दे .नर्मदेच्या पाण्याची गंमत अशी आहे की उगमापासून ते संगमापर्यंत कुठेही पिऊन पहा त्याची चव एक सारखीच लागते . बरेचदा समोर आलेली नदी नर्मदा आहे की अन्य कुठली नदी आहे असा संभ्रम निर्माण झाला तर पाणी पिऊन पाहणे किंवा पाण्याचा रंग पाहणे या दोन सोप्या परीक्षा आहेत .  इतकी त्या पाण्याची चव वेगळी आहे . थोडेसे भस्म मिश्रित तीर्थ पिल्यासारखे आपल्याला वाटते . रंगही हिरवट निळसर राखाडी असा वेगळाच आहे . अन्य कुठल्याही जलस्त्रोता पुढे हा वेगळा रंग लगेच लक्षात येतो . 
                  नर्मदा जलाचा विवक्षित रंग

याचे कारण काय असावे याबाबत मी विचार केल्यावर मला असे जाणविले की नर्मदा परिक्रमा करणारे लोक गेली लाखो वर्षे नर्मदेच्या संगमातील पाणी ,नाभि क्षेत्रातील पाणी , जानु क्षेत्रातील पाणी , हृदय क्षेत्रातील पाणी आणि उगमावरील पाणी आपल्या बाटलीमध्ये भरून घेतात व बाटलीतले थोडेसे पाणी तिथे टाकून देतात . प्रत्यक्षामध्ये या प्रक्रियेमध्ये त्या भागातील सूक्ष्मजंतूंचे आदान प्रदान केले जाते . कुठल्याही नदीचा प्रवाह एकाच दिशेला वाहत असल्यामुळे संगम क्षेत्रातील सूक्ष्मजंतू कधीच उगम क्षेत्रापाशी जाऊ शकत नाहीत परंतु नर्मदा मात्र याला अपवाद आहे . परिक्रमा वासी गेली अनेक वर्षे इकडचे पाणी तिकडे आणि तिकडे पाणी इकडे करत असल्यामुळे संपूर्ण नर्मदेमध्ये एकसारखे जिवाणू आढळून येतात . या जिवाणूंमुळे पाण्याची चव ठरत असते . त्यामुळेच नर्मदेच्या पाण्याची चव कुठेही प्या एकसारखीच वाटते .अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे . याबाबत तज्ञांनी अधिक खुलासा करावा .
 इकडे साधूने मला चूल कशी पेटवायची , त्यासाठी लाकडे कशा पद्धतीची गोळा करायची ,त्यांची रचना कशी करायची इथपासून ते पातेले कसे तयार करायचे आणि भाज्या कशा कापायच्या किंवा सोबत हत्यार नसेल तर चमच्याने देखील भाज्या कशा कापता येतात इत्यादी सर्व शिकविले . अगदीच काही नसेल तर निखाऱ्यांमध्ये बटाटे , टोमॅटो ,कांदे कसे भाजून मीठ लावून खाता येतात हे देखील शिकवले . त्याने मला कणिक मळायला शिकवली आणि टिक्कड हातानेच कसे बनवतात आणि लाटून कसे बनवतात हे दोन्ही शिकविले . तिघांनी मिळून पटापट स्वयंपाक केला . साधू रोट्या खूपच हलक्या व सुंदर बनवत होता , त्यामुळे चार रोट्या अधिकच खाल्ल्या गेल्या . बहिर्दिशेला जाताना देखील काय काय नियम पाळायचे हे सर्व साधूने मला सकाळी व्यवस्थित समजावून सांगितले . वाचकांच्या माहिती करता सर्व नियम सांगून ठेवतो आहे .  (बहिर्दिशेला जाणे म्हणजे शौचाला जाणे )
०  बहिर्दिशेला जाताना कधीही कुठल्याही नदी नाला किंवा ओढ्याच्या जवळ जाऊ नये .
० उदकी सांडी गुरळी । तो एका मूर्ख ॥ असे रामदास स्वामींनी सांगितले आहे हे नेहमी लक्षात ठेवावे .गुरळी म्हणजे मानवी विष्ठेची लेंडी .
० कितीही चालावे लागले तरी चालावे परंतु मानवी वस्ती पासून अत्यंत दूर अशा ठिकाणीच जावे .
० लोकांच्या जाण्या येण्याच्या सहज वाटेमध्ये घाण करू नये .
० आड मार्गावर किंवा आडराना मध्येच आडोसा पाहून जाऊन बसावे .
० सोबत पुरेसे पाणी घ्यावे . नर्मदा मातेचे जल कधीच वापरू नये . उपजलस्त्रोतांचे पाणी वापरायला हरकत नसते . हापसा पंप टाकी यातील पाणी देखील वापरू शकतो .
० पाण्याच्या बाटलीला झाकण असेल याची खात्री बाळगावी . झाकण आणि बाटली दोन्हीही काम आटोपल्यावर पुन्हा मुक्कामी घेऊन यावे .तिथेच टाकून येऊ नये .
० मानवी विष्ठा मातीमध्ये मिसळली तर तिचे झाडांसाठी अमृत होते परंतु पाण्यामध्ये मिसळली तर मात्र तिच्यामध्ये वाढणाऱ्या विषाणूमुळे पाण्याचे विष बनते .
० सांडपाण्याला येणारा काळा रंग हा या विष्ठेतील सूक्ष्मजीवांमुळेच आलेला असतो . परंतु तीच विष्टा मातीत मिसळली तर मात्र काळेभोर सुंदर जैविक खत तयार होते .आणि त्याला अजिबात दुर्गंध येत नाही .
० बसण्यापूर्वी आजूबाजूला विंचू काटा साप काही नाही ना याची खात्री करावी .
० दगडाने लाकडाने किंवा पायाने एक पुरेसा खोल खड्डा बनवावा . त्यातील माती एका बाजूला ढीग लावून ठेवावी जिचा वापर पुन्हा लोटण्यासाठी करता आला पाहिजे .
० शक्य झाल्यास दोन पायटे तयार होतील असे दगड पहावेत . दोन समान उंचीचे मोठे दगड नैसर्गिकरित्या सापडले तर कमोड सारखा देखील त्यांचा वापर करता येतो . 
० कार्यभाग आटोपल्यावर न विसरता त्यावर माती लोटून द्यावी . किमान पालापाचोळा तरी लोटावाच लोटावा . थोडक्यात काय तर आपण कुठे गेलो होतो हे नंतर आपल्याला देखील सापडू नये इतक्या बेमालूमपणे सर्व काही सुरळीत करावे आणि मगच परत यावे .
० हिमालय किंवा अन्य क्षेत्रामध्ये ट्रेकिंग करणारे लोक नेहमी या पद्धतीचा वापर करतात . ते सोबत माती मिश्रित भुसा ठेवतात व विष्ठे वरती तो टाकून देतात कारण बर्फामुळे कुजण्याची प्रक्रिया खूप धीमी झालेली असते . 
० आपल्या चुकीच्या वागण्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास व्हावा व त्यांनी नर्मदा मातेला व परिक्रम परंपरेला बोल लावावेत असे वर्तन आपल्या हातून चुकूनही घडू नये .
० कितीही मोठा महापूर आला तरी आपल्या चुका नर्मदा मातेला पोटात घालाव्या लागतील अशा अंतरावर त्या करू नयेत . 
० हस्तपाद प्रक्षालन अन्यत्र करावे . नर्मदा मातेमध्ये मुळीच करू नये . 
० आपली वस्त्रे हातपाय वगैरे नर्मदा मातेमध्ये कधीच धुवू नयेत .
असो .रात्रभर खूप थंडी पडलेली होती .पहाटे जाग आली .बाहेर येऊन पाहतो तो काय समोर नर्मदा माता दिसत नव्हती इतके जबरदस्त धुके पडले होते . अंदाजानेच घाट गाठला आणि नर्मदा मातेमध्ये स्नान केले . हापशाचे पाणी वाहत्या पाण्यापेक्षा गरम असते परंतु एकदा थंडगार पाण्याने अंघोळ केली की थंडी कायमची पळून जाते .शिवाय नर्मदा स्नानाचे पुण्य आणि समाधान काही वेगळेच आहे .त्यामुळे मी कायम नर्मदा नदीमध्येच स्नान करायचो . नाशिकचा म्हातारा बाबा भल्या पहाटे उठून आमच्या पुढे निघून गेला होता . तसाही साधूला तो म्हातारा आवडला नव्हताच . बरे झाले पीडा पुढे निघून गेली असे साधू म्हणाला मग त्याने आणि मी बोरिया बिस्तर उचलले आणि नर्मदे हर केले . साधू माझ्या पुढे झपाझप चालत होता .आणि त्याला गाठताना मी अक्षरशः पळत होतो . धुके इतके घनदाट होते की साधू दहा पावले पुढे निघून गेला की दिसायचा बंद व्हायचा . उजव्या हाताला नर्मदा माई वाहते आहे हे फक्त तिच्या खळखळ आवाजावरून आणि पाणबगळे, पाण पक्षी यांच्या आवाजावरून कळत होते .साधूने यावेळी अतिशयच कडेचा मार्ग निवडला होता . नदी जशी उगमाजवळ लहान होत जाते ,तशी तिची वळणे देखील लहान लहान होत जातात आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्या नाल्यांची संख्या वाढत जाते . त्या चार-पाच तासांमध्ये आम्ही अक्षरशः शेकडो ओढे नाले ओलांडले . साधू चिखला मधून चालायला मला शिकवत होता . चिखल दिसला की मी थांबून जायचो .त्याने मला शिकविले की समोर चिखल जरी दिसत असला तरी आपली गती न बदलता आहे त्याच गतीने झपझपझप पावले टाकत गेलो तर चिखलामध्ये पाय रुतण्यापूर्वीच आपण पुढे निघून गेलेला असतो . आणि खरोखरच तसे होऊ लागले .पायाला चिखलाचा एक कणही न लागता आम्ही कित्येक ओढे नाले ओलांडले . साधूच्या आधी परिक्रमा झालेल्या असल्यामुळे त्याला त्या मार्गांबद्दल पक्की खात्री होती . त्यामुळे मला फक्त तो गेला त्या मार्गाने जाणे इतके सोपे काम उरले होते . मी विचार करून पाहिला की जर मी एकटा असतो तर या मार्गाने गेलो असतो का ? निश्चितपणे मी त्या मार्गाने कधीच गेलो नसतो .एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले अनुमान असते . अनुमान आपल्याला एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करते .परंतु अनुमान आणि अनुभव एकच असेल असे नाही . मला आलेला अनुभव हा अतिशय साधा सोपा आणि सुंदर होता . अनुमान मात्र अतिशय भयानक आणि कठीण होते . त्या क्षणी मी ठरवले की इथून पुढे अनुमानाला आपल्या जीवनात थारा द्यायचाच नाही .अनुमानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव श्रेष्ठ . गुरु हा अगदी हेच काम करत असतो . ज्या मार्गाची तुम्हाला कल्पना नाही असा एखादा मार्ग तो तुम्हाला दाखवीतो आणि काही काळ स्वतः सुद्धा त्या मार्गावर चालून दाखवतो . अशावेळी फक्त त्यांच्या पावलांचे अनुसरण करणे हेच शिष्याचे कार्य उरते . चालताना साधू अखंड मार्गदर्शन करत होता .खरे तर त्याला हे सर्व करायचे नव्हते परंतु मैया चा आदेश असल्यामुळे तो सर्व करत होता . त्यामुळे अतिशय पोटतिडकीने तो मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता . मला असे फार वाटून गेले की असा एक साधू प्रत्येक परिक्रमावासीला पहिल्या आठवड्यातच भेटावा ! असे झाले तर त्याची परिक्रमा किती सुफळ संपूर्ण होईल ! एके ठिकाणी कमरे एवढा चिखल असावा असे काठी रुतवल्यावर लक्षात आले . साधूने उंदरासारखी छोटी छोटी पावले टाकत पळण्याची युक्ती मला शिकवली . आश्चर्य म्हणजे तो संपूर्ण चिखल आम्ही सहज पार झालो .इथे साधू थोडासा एका दगडावर टेकून बसला आणि मला सांगू लागला . नर्मदा मैया का नाम लेके अगर तुम चलते हो तो सामने कोई भी मुश्किल आ जाये उसको मैया आसान बना देती है । अब ये वाला किचड देखो । पहिली बार जब मे आया था तो इसी किचड मे बहुत बुरी तरह से फस गया था । जो कीचड हमने मात्र एक मिनिट मे पार किया उसे पार करने मे मुझे दो घंटे लगे थे। लेकिन तब मेरी एक बहुत बडी गलती हुई थी ।मुझे लगा था कि मै यह कीचड आसानीसे पार कर सकता हु । इसीलिए फस गया । अब जब मैया का नाम लेके चलते है तो कीचड भी पत्थर बन जाता है । और पत्थर का किचड बन जाता है । तेरे रास्ते मे आगे बहुत काटे पडेंगे । मैया का नाम ले लेना , उनके फुल बन जायेंगे । मैया पे भरोसा रखना तुम्हे कोई दिक्कत नही आयेगी । मैया का स्मरण छोडना मत । हर समय उसको पुकारते रहना मैया मैया मैया मैया ! मैया ये देखो ! मैया वो देखो ! मैया मुझे ये हो रहा है । मैया मुझे वो हो रहा है । मैया तुम्हे संभाल लेगी ।  मैया का नाम लेके उंची चट्टान से भी कुदोगे तो कोई चोट नही खाओगे ।
आणि भविष्यामध्ये हा अनुभव मला खरोखरच आला .वाटेमध्ये असंख्य काटे कुटे लागले परंतु संपूर्ण परिक्रमेमध्ये माझ्या पायात एकही काटा मोडला नाही .पायात काटा मोडल्यामुळे परिक्रमा थांबविल्याची उदाहरणे मला पाहायला मिळाली . किंवा काही दिवस विश्रांती घ्यावी लागली असे लोक भेटले . हात पाय मोडलेली माणसे भेटली . मी मात्र मध्ये आलेले खोल ओढे आणि नाले अक्षरशः एका उडीमध्ये पार करायचो ! नर्मदेला येऊन मिळताना ओढे आणि नाले भरपूर माती कापत जातात आणि सुमारे सात फूट ते बारा ते पंधरा फूट खोल वाहतात . अशा खड्ड्यामध्ये उतरून पुन्हा चढता येणे केवळ अशक्य असते . नर्मदेच्या बाजूने जावे तर प्रचंड गाळ असतो . डावीकडे वरती जावे तर प्रचंड झाडी ,काटे-कुटे असतात .मग एकच मार्ग उरतो तो म्हणजे उडी मारायची . परंतु ही उडी मारताना एक गंमत होते . उडी मारण्यासाठी थोडेसे लांबून पळत यावे लागते . परंतु अगदी ऐन उडी मारण्याच्या क्षणी भीती वाटून आपण थांबतो आणि नाल्यात पडतो !नेमक्या याच क्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले कि ती तुम्हाला उचलते ! मी अक्षरशः अशा हजारो उड्या परिक्रमेमध्ये मारल्या ! खरे तर माझे वजन खूप जास्त होते .शिवाय आजपर्यंत चौदा वेळा माझा अस्थिभंग झालेला आहे .अर्थात यातील एकही अस्थिभंग अपघाती नाही ,तर सर्व मैदानात खेळताना किंवा घोड्यावरून पडून वगैरे झालेले आहेत .परंतु सांगायचे तात्पर्य हेच की मुळात इतके अस्थिभंग शरीरावर असताना त्या हाडाची ताकद थोडीशी कमी झालेली असते .त्यात आपले वजन वाढलेले .तरीदेखील नर्मदा मातेच्या कृपेने एकदा देखील पाय साधा मुरगळला देखील नाही .
अशा हजारो उड्या नर्मदा मातेच्या कृपेने संपूर्ण परिक्रमे दरम्यान मारल्या परंतु पायाला काहीही त्रास झाला नाही (ही उडी ओंकारेश्वर जवळची आहे )

 काही ठिकाणी कठीण खडक असायचे ! या खडकांवर पाय मुरगळला की पायाचे तुकडेच पडले पाहिजेत ! त्याही ठिकाणी मी खाली उतरून वर चढण्यापेक्षा वरच्या वर उड्या मारत जायचो ! या सर्वांचे श्रेय साधू बाबा ने मला दिलेल्या मूलमंत्रात आहे हे नम्रपणे नमूद करतो ! एकदा तिच्यावरती संपूर्ण भार वाहिला की ती खरोखर तुम्हाला तारते ! नव्हे नव्हे तारतेच ! ज्यांना पोहायला येत आहे त्यांनी आपले पोहणे शिकण्याचे दिवस आठवून पहावेत . पोहायला येत नसताना आपल्याला हे पाणी बुडविणार अशी खात्री असते ! त्यामुळे कितीही हातपाय मारले तरी नाका तोंडात पाणी जात असते ! या उलट एकदा का पोहायला यायला लागले की निवांत आपण त्या पाण्यावर आपला भार टाकून देतो ! आणि ते पाणी तुम्हाला सुखेनैव तारते ! आपल्या जीवनाचे ही तसेच आहे . मी करतो आहे किंवा मी जबाबदार आहे असे वाटू लागले की जीवन तुम्हाला बुडविते .परंतु ईश्वर सर्व करणारा आहे असा भाव ठेवला की तुम्ही सहज तरुन जाता !  आणि हा केवळ भाव न राहता अनुभव होऊन जातो !असे अनेक अनुभव येत गेले की त्या अनुभवाची खात्री होत जाते ! एकदा का खात्री पटली की तुमची नैया पार झाली !  असो .
साधू दगडावरून उठला आणि झप झप चालायला लागला . नर्मदा येथे छोटी छोटी वळणे घेत होती . घनदाट पसरलेले धुके , हलकीशी सुखद गुलाबी थंडी ,कधी संथ , कधी स्तब्ध ,तर कधी रम्य रुणुझुणु आवाज करत वाहणारी नर्मदा नदी ,तिच्यामध्ये विहार करणारे असंख्य जातीचे भव्य दिव्य बगळे , चक्रवाक पक्षी ,विविध रानपक्षी , त्यांचे सुमधुर आवाज आणि पायाखालून झपाझप सरकणारी चिखलाची मऊशार पायवाट ,अतिशय स्वर्गीय अनुभव होता तो . खऱ्या अर्थाने परिक्रमेची अनुभूती येत होती . कारण परिक्रमेला सुरुवात झाल्यापासून अधिकांश रस्त्यावरूनच चालावे लागले होते . आता मात्र माझी उजव्या हातातली काठी बहुतांश वेळा नर्मदेच्या पाण्यामध्येच बुडत होती . ती बुडताना आणि उचलताना येणारा नर्मदा मातेचा आवाज एखाद्या मंत्रद्रष्ट्या तपस्वी ऋषीमुनी नी उच्चारलेल्या महामंत्रासारखा भासत होता ! कमरे एवढ्या उंचीचे गवत दवाने कच्च भिजलेले होते . त्यामुळे कमरेखालचे सगळे कपडे भिजून ओले चिंब झाले होते .हे
नर्मदा मातेच्या काठाचा मार्ग
समोर खळखळ वाहणारी नर्मदा माता
 सर्व अनुभवात आम्ही मोठ्या गतीने थाडपथार घाट गाठला . याच गावाला कडा पत्थर देखील म्हणत . आपल्या मराठी भाषेमध्ये कडेपठार असा शब्द वापरतात त्यातलाच  हा नामप्रकार . या भागामध्ये गाळमाती कमी होऊन थोडासा खडक लागल्यामुळे याला पत्थर नाव पडले असावे .अजूनही सूर्य दिसत नव्हता तर धुक्यामधूनच पांढरे शुभ्र सूर्यबिंब दर्शन देत होते . इथे नर्मदेच्या अगदी काठावर एक सुंदर आश्रम होता . आश्रमाला चहूबाजूने कुंपण घातले होते . आश्रमाच्या भिंतींना गिलावा केलेला नव्हता परंतु जमीन मात्र शेणाने सारवलेली होती . मधून नर्मदे कडे जाण्यासाठी मार्गिका आणि दोन्ही बाजूला खोल्या होत्या . 
थाड पठार घाटावरील निर्मळ नर्मदा माई

डाव्या बाजूला खोल्यांमध्ये गाई आणि एका खोलीत वासरे बांधली होती . तर उजव्या बाजूला स्वयंपाक घर आणि त्याच्या आत अखंड धुनी होती . मागे एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष होता आणि तिथून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होत होते .आश्रमामध्ये काळे कपडे घातलेला एक बाबा होता .याने उजव्या हातामध्ये घुंगरू बांधले होते . या बाबांचे नाव जगन्नाथ पुरी असे होते .यांचे डोळे अतिशय बोलके होते आणि डोळ्याला काळ्या फ्रेमचा मोठा चष्मा त्यांनी लावला होता .
चित्रात डावीकडे जगन्नाथ पुरी महाराज
            जगन्नाथ पुरी बाबा
जगन्नाथ पुरी महाराज यांचा चिमटा आणि उजव्या हातातील घुंगरू
 आम्हाला बसण्यासाठी त्याने आसन दिले.त्या कोरड्या आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले की आमचे पाय चिखलाने आणि पाण्याने किती भिजले होते . संपूर्ण आश्रम गाईच्या शेणाने सरवलेला होता . चिखलाने माखलेले माझे पाय जमिनीवर उठू लागले म्हणून मी स्वच्छ हात पाय धुवून त्याने टाकलेल्या आसनावर येऊन बसलो . 
 थाडपथार आश्रमाचा व्हरांडा
या साधू सोबत त्याच्या गतीने चालल्यामुळे माझ्या पायांची पुरती वाट लागली होती .माझी खुरटी दाढी बारीक केस आणि एकंदर देहयष्टी पाहून साधूने ओळखले की हा नवीन परिक्रमा वाशी आहे . मला त्याने विचारले पाय दुखत आहेत का ? मी हो म्हणताच त्याने मला आतून एक डबी भरून लाल रंगाचे तेल आणून दिले . मला म्हणाला हे तेल पायाला चोळ आणि तू ज्या ब्लॅंकेट वर बसला आहेस त्या ब्लॅंकेट मध्ये पाय गुंडाळ . तेल तर मी लावले परंतु ब्लॅंकेट ला लाल रंग लागेल म्हणून मी ते गुंडाळत नव्हतो .साधूने चार शिव्या हासडत ते ब्लँकेट घेतले आणि माझ्या पायाला घट्ट गुंडाळले .ब्लॅंकेट पायाला गुंडाळता क्षणीच त्या तेलामधून गरम गरम वाफा निघू लागल्या आणि संपूर्ण पायाला गरमागरम शेक बसू लागला ! तो अनुभव इतका सुखद होता की असेच आयुष्यभर बसून राहावे असे वाटू लागले ! 
हेच ते ब्लँकेट जे माझ्या पायाला त्याने गुंडाळले होते आणि पहिला मुलगा बसला आहे , बरोबर त्याच जागी मी बसलो होतो.

आश्रम अतिशय सुंदर होता आणि आश्रमाच्या मधोमध एक झोपाळा होता ज्यावरून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन व्हायचे .
नर्मदेच्या बाजूने आश्रम असा दिसे
आश्रमातून नर्मदा मातेचे दर्शन
 इथे आत मध्ये एक अखंड धुनी चालू होती . साधू जीवनामध्ये या धूनीला फार महत्त्व असते . जवळपास सर्व साधू अहिताग्नी असतात . अर्थात त्यांच्या आयुष्यभर त्यांची सोबत करणारा अग्नी त्यांच्यासोबतच निघून जातो .
साधूने विचारले चाय पाओगे ? आम्ही दोघांनी नर्मदे हर म्हटले . साधू आतून दोन कप चहा घेऊन आला . त्याने पारले जी बिस्कीटचे दोन पुडे आणले एक साधूकडे फेकला एक माझ्याकडे फेकला . साधूने तो पुडा त्याच्या झोळीमध्ये टाकून दिला आणि मी मात्र तो पुडा फोडला ! पुडा फोडून पहिले बिस्कीट हातात घेतले आणि चहा मध्ये बुडविले ! इतक्यात तो साधू जोर जोरात ओरडू लागला ! कैसा परिक्रमा वासी है देखो मैया ! कुत्ते की तरह बिस्कुट खा रहा है ! त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या हातातले बिस्किटच गळून पडले ! मला एक क्षणभर कळेना की माझा असा काय अपराध झाला ? मला साधू म्हणाला शरम नाही आती बिस्कुट खा रहे हो ? विनम्रपणे म्हणालो बाबाजी क्या हुआ ? बिस्कुट खाना नही चाहिये क्या ? इतक्यात माझ्याबरोबर चा साधू मला म्हणाला अरे आज ग्यारस है। एकादशी तुम्हारे मराठी मे ! आज उपवास रखना चाहिए ।मैने तो रखा है ।  मी म्हणालो लेकिन मै एकादशी वगैरे व्रत नही रखता । काळे कपडे घातलेला साधू आता मात्र चिडला होता ! तो मला म्हणाला तुम बाकी अपनी जिंदगी मे क्या उखाडते हो उखाडते रहो । लेकिन परिक्रमा के नियमों का पालन करना आवश्यक है । परिक्रमा मे ग्यारस का बडा महत्त्व है। मी बिस्किट खाल्ले नव्हतेच ! मी चटकन ते बिस्कीट बाजूला बसलेल्या कुत्र्यासमोर फेकले . आणि अख्खा पुडाच त्याच्या समोर ठेवला .त्याने ते बिस्किट हुंगले आणि उठून ते कुत्रे निघून गेले . त्याने त्या बिस्किटाला तोंड देखील लावले नाही . साधू मला म्हणाला देखा ? कुत्ते को भी जो बात समझ मे आ रही है वो तुम्हारे जैसे हट्टे कट्टे इन्सान के दिमाग मे नही उतर रही । अरे नर्मदा परिक्रमा मे जो एकादशी व्रत रखता है उसको जिंदगीभर एकादशी व्रत रखने का पुण्य मिल जाता है ! ही गोष्ट मात्र मला आवडीची वाटली ! मी लगेच त्याला विचारलं मतलब अगर परिक्रमा मे एकादशी व्रत का पालन करता हु तो जिंदगीभर मुझे एकादशी का उपवास नही रखना पडेगा ? बिलकुल नही रखना पडेगा !साधू हसत हसत म्हणाला ! ये भोसडी का अभी पक्का उपवास रखेगा ! साला बडा स्वार्थी है ! मैया के लिए उपवास नही रख रहा लेकिन जिंदगी भर के उपवास से छुटकारा पाने के लिए उपवास रख रहा है ! खैर वैसे ही सही उपवास तो कर ! मी कमंडलू मधले पाणी हातामध्ये घेतले आणि पाणी सोडत त्याला सांगितले आज पासून मी परिक्रमा संपेपर्यंत एकादशी व्रत स्वीकारत आहे . साधू खुश झाला आणि त्याने आतून अजून एक कप चहा आणून दिला शिवाय भरपूर गुळ आणि दाणे खायला आणून दिले . जमतील तेवढे खा आणि बाकीचे सोबत घेऊन जा हे सांगायला विसरला नाही . 
आश्रमातील स्वयंपाक गृहामध्ये पुरी तळताना जगन्नाथ पुरी महाराज .उजव्या हातातील घुंगरू सतत वाजत असते .
साधूने दिलेल्या तेलामुळे पायाला खरोखरच आराम मिळाला होता . बाटली परत देऊ लागलो तर मला म्हणाला ठेव तुझ्याजवळ . आणि धुनीच्या दर्शनाकरिता मला आत घेऊन गेला . समोर मोठी धुनी  होती. धुनीला लागून एका कट्ट्यावर व्याघ्र चर्म टाकून त्यावर साधू झोपत असे , बसत असे . 
धुनी समोरील साधूचा कट्टा
त्याने एका वहीमध्ये माझा नाव पत्ता वगैरे लिहून घेतले . इकडे माझ्यासोबत चा साधू मात्र मला हा साधू कुत्रा म्हणाला म्हणून चिडलेला होता . तो त्याला सांगू लागला आपने इस परिक्रमावासी को कुत्ता बोलना नही चाहिये था । खरे तर मला त्याच्या बोलण्यामुळे फारसे काही दुःख झालेले नव्हते । त्याचा हेतू मी जाणला होता । कदाचित तो इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलला नसता तर मी बिस्किटे खाऊन पुढे चालू लागलो असतो . परंतु माझ्यावरून या दोन्ही साधूं मध्ये बाचाबाची सुरू झाली ! माझ्यासाठी हा प्रकार वेदना दायक होता . कारण दोघेही साधू श्रेष्ठ तपस्वी होते हे मला दिसत होते . मी एक अडाणी मूर्ख शहरी मुलगा त्यांच्यापुढे काहीच नव्हतो . परंतु दोघांमध्ये मोठे मोठे युक्तिवाद सुरू झाले . काळे कपडे घातलेला साधू मोहन साधूला म्हणाला दो परिक्रमा करके भी ये बाबा सुखाही रह गया । आणि माझ्याकडे पाहून तो एक वाक्य बोलला . जे वाक्य मला संपूर्ण परिक्रमामध्ये शिदोरी म्हणून पुरले . नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाने हे वाक्य आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवावे .
साधू मला म्हणाला , " देख बेटा । यह साधू तो अब बन चुका है ।इसके स्वभाव मे कोई बदलाव लाना अब असंभव है । लेकिन तू तो  नया बच्चा है । तू इसके  मुकाबले जल्दी सुधर सकता है । मेरी एक बात हमेशा ध्यान मे रखना । यह नर्मदा खंड है ।इस संपूर्ण नर्मदा खंड को तुम्हारी या तुम्हारे दिये हुए किसी भी चीज वस्तू की जरूरत नही है । यहा बडे बडे लोग आते है खुद को दानी कहलाते है । उनको लगता है वे यहाँ कुछ दे गये । 
यहा किसी को भी किसी भी चीज की कोई आवश्यकता नही है । ना ही यहाँ पर अपना ज्ञान बाटने की जरूरत है । यहां सब महा ज्ञानी है । यहां कुछ भी देकर मत जाओ ।जितना हो सके यहां से लेकर जाओ । तुम्हारे सामने कितना भी गलत कुछ हो रहा है उसे सिर्फ देखते रहो ।उसमें अपनी टांग मत अडाओ । सिर्फ साक्षी भाव से देखते जाओ ।" 


अनुक्रमणिका



लेखांक एकवीस समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर