लेखांक २० : नर्मदेने खास पाठविलेला साधू

तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वत्र तुफान चिखल झालेला होता . नर्मदे काठची काळीभोर चिकण माती अतिशय चिकट झाली होती .प्रत्येक पावलाला पाय रुतत होते , बूट पायातून सारखे निघत होते . मग मी सरळ बूट काढून हातात धरले आणि अनवाणी चालू लागलो . मागून एक बुढ्ढा बाबा डोक्यावरती भली मोठी पिशवी घेऊन येताना दिसला . हा बाबा कटनी चा होता .त्याचे वय पाहता मला असे वाटले की हा चिखलात घसरून पडेल वगैरे . तरी याला चालायला थोडीशी मदत करावी .असा विचार करून मी माझी चाल हळू केली परंतु हा बाबा माझ्यापेक्षा वेगवान चालणारा निघाला त्याने क्षणात मला ओलांडून पुढचा मार्ग धरला आणि इतक्या वेगाने चालू लागला की त्याला गाठता गाठता माझीच तारांबळ उडायला लागली . शेतकरी लोकांना चिखलातून पार जाण्याचा उत्तम अंदाज असतो .जीवनातील कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि महत्त्वांच्या शेतकऱ्याच्या ठायी उपजत असते . थंडी भरपूर होती आणि शेतामध्ये असलेली विविध पिके पायाला गुदगुल्या करत होती . पिकावर साठलेले दवबिंदू थंडगार पडले होते आणि चालता चालता माझी छाटी संपूर्णपणे भिजवून टाकत होते . तो थंडगार स्पर्श चालून गरम झालेल्या पायांना खूप आराम देत होता . गरम झालेले इंजिन वॉटर कूल केल्यावर जसे छान चालते तसे वॉटर कूलिंग मुळे माझे पाय चांगले चालत होते . चालता चालता चंदन घाटाच्या समोर असलेल्या कचरा टोला गावातील आश्रमामध्ये मी पोहोचलो . हा टेढी नावाच्या नदीचा संगम होता .

कोणीतरी मला सांगितले की तिथल्या पुजाऱ्याच्या घरातील लोक तुम्हाला भोजन प्रसाद बनवून देतील . आश्रमामध्ये एक छोटीशी झोपडी होती आणि निवासासाठी पक्की सिमेंट काँक्रीट मध्ये बांधलेली खोली होती . सिमेंटच्या खोलीमध्ये जाऊन मी माझे सामान ठेवले .
                सामान ठेवले ती खोली
पाहतो तो कालचा लंबू साधू समोर जेवत बसला होता . झोपडी मध्ये तीन महिला मिळून स्वयंपाक करत होत्या . मी नर्मदा मातेचे दर्शन घेऊन वर आलो .
     आश्रमातून होणारे नर्मदा मातेचे मनोहारी दर्शन
आणि झोपडी मध्ये जाऊन माताजींना म्हणालो माताजी मुझे भोजन प्रसादी मिल सकती है क्या ? तिघी बायका माझ्यावरती अचानक चिडल्या ! कुछ नही मिलेगा ! भागो यहा से ! और तुम्हारे साथ अंदर जो भोजन प्रसादी ले रहा है उस साधू को भी लेके जाव !  मला क्षणभर कळेना नक्की काय चालले आहे ? मी हात जोडून नम्रपणे म्हणालो , माताजी क्या हुआ ? मुझसे और साधुजी से कुछ गलती हो गयी क्या ? त्यातील एक महिला समजूतदार होती . ती म्हणाली , नही बाबाजी आपकी कोई गलती नही । लेकिन वह जो परिक्रमावासी अंदर बैठा है उसने कल रात को दस टिक्कड खाये और अभी भी दस टिक्कड खाये है। टिक्कड बना बना के हमारी हालत खराब हो चुकी है । 
आपण महाराष्ट्रामध्ये चपाती किंवा पोळी करतो .ती लाटावी लागते .इकडे मध्य प्रदेश मध्ये मात्र कणकेचा गोळा हातावर घेऊन भाकरी प्रमाणे थापून थेट चुलीवर भाजून जी पोळी केली जाते त्याला टिक्कड असे म्हणतात . याच्यामध्ये तव्यावरून उष्णता देखील दिली जाते . परंतु मुख्य भाजणे हे चुलीतील मंद आचेवर असते .
                  टिक्कड असे बनवितात
 टिक्कड भाजण्यासाठी चुलीतील काही निखारे बाहेर काढून ठेवलेले असतात . त्यामुळे आतून हे अतिशय मऊ थोडेफार केक किंवा ब्रेड सारखे फुलून येतात . ब्रेड किंवा केक बनविताना जी बेकिंगची प्रक्रिया आहे तशीच काहीशी प्रक्रिया येथे कणकीच्या बाबतीत होत असते . परंतु यासाठी आटा गूँदना अर्थात कणिक मळणे ही एक विशेष कला आहे . ती जमली नाही आणि टिक्कड नीट भाजायला जमले नाहीत तर मात्र चक्क कणकेचे गोळे खावे लागतात ! जे पचायला अतिशय जड असतात .आता मात्र माझ्या लक्षात आले की ह्या माता माझ्यावरती का चिडल्या होत्या !आतल्या साधूची मला मोठीच मौज वाटली ! इतक्यात त्याने आतून मला आवाज दिला आणि म्हणाला दो टिक्कड और लेके आओ ! आता मात्र त्या बायकांचा संयम संपला ! त्यांच्यातील एक जण धावतच आत मध्ये गेली ! तिने आत जाऊन काय सुखसंवाद साधला हे मला माहिती नाही . परंतु एका मिनिटाच्या आतच सर्व सामान घेऊन , आणि मी कालच दिलेल्या लाल सॅंडल पायामध्ये अडकवून साधू चटकन बाहेर आला आणि झपाझप चालत पुन्हा एकदा काठाकाठाने नाहीसा झाला !तिथे बसलेल्या दोघी स्त्रियांना मी विनंती केली आप अगर मुझे खिचडी बनाने का सामान देते हो तो मै खुद खिचडी बनाके खा लूंगा । कारण मला खरोखरच खूप जोराची भूक लागली होती . कालचे भोजन संध्याकाळी सहा वाजताच घेतले होते . खिचडी बनविणे तुलनेने सोपे होते आणि मला जमत होते . एक बाई घरामध्ये गेली आणि खिचडी चे सामान घेऊन आली . इतक्यात डोक्यावर सामान घेऊन चालणारा म्हातारा तिथे आला आणि म्हणाला भोजन प्रसादी मिलेगी ना ? मी त्याला म्हणालो खिचडी बना रहा हू बाबा ।आपके लिये भी बनाता हूँ । म्हातारा म्हणाला छे छे खिचडी वगैरे आम्ही काही खात नाही । मला खायला टिक्कडच पाहिजेत ! आता आली का पंचाईत !मला तर टिक्कड कसे बनवायचे काहीच माहिती नव्हते ! तसे त्या बायकांना टिक्कड बनविताना मी पाहिले होते . परंतु ती प्रक्रिया सोपी नव्हती . आता पुन्हा त्या बायकांना मी आटा मागायला गेलो तर त्या माझ्यावर चिडणार हे निश्चित होते .म्हणून मी एक हुशारी केली . त्या बाबाच्या हातामध्ये कटोरी दिली आणि सांगितले, त्या घरातून जाऊन आटा घेऊन या . तोपर्यंत मी भाजीची तयारी करतो ! माझा प्रयोग यशस्वी झाला .त्या म्हाताऱ्या बाबा वरती घरातील बाई जोरात ओरडली ! ( मी वाचलो ) बरेच काय काय बोलली आणि शेवटी नाईलाजाने तिने त्याला आटा दिला . बाबा रागातच माझ्याकडे आला आणि म्हणाला काय बायका आहेत ! मी त्याला म्हणालो तुम्ही टिक्कड बनवा .मी भाजी बनवतो . परंतु बाबा म्हणाला मला स्वयंपाक येत नाही . तुला सर्व बनवावे लागेल . आता मात्र खरंच माझा संयम संपत चालला होता . समोरच्या चुलीतून येणारा धूर , त्यामुळे डोळ्यातून येणारे पाणी ,कणिक मळताना माझी झालेली वाईट अवस्था आणि करपलेल्या बटाट्याची भाजी ! सगळेच वाईट योग एकाच क्षणी जुळून यावेत असे काही असे मला झाले ! झोपडीतून बाहेर आलो . नर्मदा मातेकडे पाहिले आणि म्हणालो माई मला शक्ती दे . परिक्रमे मध्ये स्वयंपाक करण्याची पहिलीच वेळ आलेली आहे !
       कचराटोला येथून वाहणारी नर्मदा माई
चित्रातील साधूच्या मागे निळ्या कापडात झाकलेली दिसते आहे ती स्वयंपाकाची झोपडी होय आणि त्यामागे निळे दार आहे ती मुक्कामाची खोली

 पुन्हा आत मध्ये गेलो . माझ्या आईचे स्मरण केले . ती स्वयंपाक करत असताना मी तिच्या बाजूला तासंतास उभा राहून ती काय काय करते आहे याचे निरीक्षण करत बसायचो . ते सर्व ज्ञान आज कामाला आले . पटापट कणिक मिळून मी त्याचे आठ समान उंडे करून घेतले . एकीकडे भाजी होत आली होती . तिला चुलीच्या धगीजवळ ठेवले आणि तवा तापवायला घेतला . एका फरशी वरती पटापट पोळ्या लाटून तव्यावर टाकायला सुरुवात केली . बघता बघता अर्ध्या तासात आठ पोळ्या आणि भाजी असा स्वयंपाक तयार झाला . तिन्ही बायका अधून मधून चक्कर मारून मी काय करतो आहे ते बघून जात होत्या . एरव्ही अतिशय प्रेमळ असणाऱ्या आदिवासी माताराम ठरविले तर किती क्रूर वागू शकतात याचा अनुभवच मला त्यादिवशी मैय्याने दिला ! त्यांचे म्हणणे देखील बरोबर होते . हा सर्व अतिशय दरिद्री परिसर आहे . इथे स्वतःच्या घासातील घास काढून हे लोक परिक्रमा वासींची सेवा करत आहेत . आपण अतिरिक्त जेवल्यामुळे यांच्या घरातील मुलेबाळे उपाशी राहू नयेत एवढा तरी विवेक किमान प्रत्येकाने बाळगणे अत्यंत आवश्यक आहे . मनुष्य विनाकारण चिडत नसतो .त्यांच्या चिडण्यामागे मोठी अनुभव परंपरा आणि कारण परंपरा असणार याची मला चांगली जाणीव होती . मी झालेले सर्व पदार्थ घेऊन शेजारच्या खोलीमध्ये गेलो . भुकेल्या म्हाताऱ्याने सहा पोळ्या खाल्ल्या . मला खात्री आहे की सुरुवातीला माझ्या ताटामध्ये मी दोन पोळ्या घेतल्या नसत्या तर त्या देखील त्यानेच खाल्ल्या असत्या .आणि आधी गेलेल्या साधू प्रमाणे हा बाबा देखील दहा टिक्कड आरामात खाऊ शकत होता हे देखील मला जाणवले . आपल्या भारतातील खाद्य संस्कृती मजेशीर आहे .दक्षिण भारतातील लोक पानभर भात जसा आरामात गिळंकृत करू शकतात अगदी त्याच पद्धतीने मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश , पंजाब , हरियाणा या भागातील लोक कितीही चपात्या खाऊ शकतात . मी आपले सुसंस्कृत गृहिणी प्रमाणे दोन पोळ्या आणि उरलेली भाजी खाऊन जेवण आटोपते घेतले . बाबा खुश झाला आणि तिथेच लोळू लागला . मी बाहेर जाऊन सर्व भांडीकुंडी स्वच्छ घासून ठेवली . स्वयंपाकाची खोली स्वच्छ आवरून ठेवली . आणि नर्मदेच्या काठावर बांधलेल्या गच्चीवरून तिचे नयन मनोहर रूप पाहू लागलो . 
पोटात अन्न गेल्यावर दमलेला म्हातारा रंगांमध्ये आला .आणि मला म्हणाला आता इथून पुढे तू माझ्यासोबत चालायचे . तू स्वयंपाक करून मला जेऊ घालायचे आणि आपण दोघे मिळून परिक्रमा पूर्ण करू .नर्मदा मातेने माझी चांगली सोय केली ! त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला ! माझा जन्म काही अशा भोगी माणसाची सेवा करण्याकरता झालेला नव्हता !त्या माणसाच्या बोलण्यामध्ये अखंडितपणे त्याचा संसार , त्याची मुले , त्याच्या सुना , त्याची नातवंडे , त्याची शेती ,त्याची संपत्ती हेच विषय होते . परमेश्वर प्राप्ती ,साधना ,नर्मदा माता याविषयी एक शब्दही तो बोलत नव्हता . मी हळूच माझे सामान उचलले आणि जोरात तिथून पळ काढला .म्हातारा देखील गडबड करून सामान गोळा करून माझ्या मागे येऊ लागला .परंतु त्याचा पसरलेला संसार इतका मोठा होता की तो आवरता आवरता मी पुढे सटकून गेलो . खऱ्या आयुष्यात देखील असेच होते .ज्याने अनावश्यक पसारा वाढवून ठेवला आहे त्या माणसाला सर्व सोडून पुढे जाता येणे फार अवघड होऊन जाते !म्हणून मर्यादितच पसारा उभा करावा ! प्राणी पक्षी कितीही बलवान असले तरी देखील एका मर्यादेच्या पलीकडे घरटी बांधत नाहीत ! त्यांचा पसारा कायम मर्यादितच राहतो ! हा एक गुण जरी माणसाने घेतला तरी पृथ्वीवरील सर्व जनता सुखी होईल ! असो . नदीच्या काठा काठाने लालपुर ,बसंतपुर , धुरवाटोला , कांचनपूर मार्गे शिवालय घाट आज मला गाठायचा होता . 
या परिसरामध्ये नर्मदा मैया अतिशय सुंदर व नितळ आहे . तिचे पाणी इतके स्वच्छ आहे की पाण्याचा तळ कुठूनही दिसतो . या भागातील नर्मदेचे रुपडे हृदयात साठवून ठेवावे इतके नितांत सुंदर आहे . वाचकांच्या माहिती करता नर्मदेची काही सुंदर रूपे गुगल वर या भागात जी मला सापडली त्याची चित्र खाली देत आहे .दर्शन घेऊन धन्य व्हावे !






नर्मदेचे पाणी इथे इतके नितळ आहे की अक्षरशः तळाचा दगड स्पष्टपणे दिसतो
लालपूर गावामध्ये कसला तरी उत्सव चालू होता .मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते त्यामुळे गावातील सर्व तरुण रस्त्यावर जमलेले होते . मोठ्या आवाजात स्थानिक आदिवासी गाणी लावण्यात आली होती .ही गाणी ऐकायलाच मोठी मजेशीर असतात . मुले नाच गाण्यांमध्ये दंग होती .जुन्या पिढीतील आदिवासी लोक परिक्रमावासींच्या बाबतीत थोडीशी नम्रता दाखवितात . परंतु नवीन पिढीतील मुले मात्र फार क्वचित परिक्रमावाशींशी आदराने वागताना दिसतात . शक्यतो चेष्टा करण्याचा भाव अधिक जाणवतो त्यांच्यात . पायामध्ये घातलेली तंगतुमान अथवा घट्ट जीन्स ,रंगीबेरंगी पादत्राणे , त्यावरती सैलसर आगळपघळ शर्ट , डोक्यावर केसांचा मोठा पुंजका  ठेवलेला व बाजूचे केस कापलेले , डोळ्यावर गॉगल्स , चित्रविचित्र पद्धतीने केस रंगविलेले ,आणि तोंडामध्ये गुटखा मावा खर्रा याचा तोबरा , शिडशिडीत अंगकाठी असा साधारण इथल्या आदिवासी मुलांचा अवतार असतो . 
दिंडोरी परिसरातील आदिवासी मुले साधारण अशी दिसतात .


मला असे जाणवले की चळवळीच्या नावाखाली या साध्या भोळ्या आणि अशिक्षित अथवा अल्पशिक्षित आदिवासी मुलांना भडकवून त्यांना देवाच्या , देशाच्या आणि धर्माच्या विरोधात करण्याचे षडयंत्र काही लोक या भागात राहून अविरतपणे करत आहेत . त्याचा परिणाम आज जरी फारसा जाणवत नसला तरी काही दशकांनी नर्मदा परिक्रमेमध्ये अडथळे आणण्याचे काम या समाज घटकांच्या माध्यमातून काही देश-विघातक शक्ती करू शकतात असे मला फार जाणवले. कारण स्थानिक लोकांच्या सहकार्याच्या शिवाय परिक्रमा करता येणे केवळ अशक्य आहे .सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी या आव्हानाचा विचार जरूर करावा अशी त्यांना विनम्र प्रार्थना आहे . असो.
  गाव संपले आणि थोडासा जंगलवाजा परिसर सुरू झाला . छोट्या मोठ्या टेकड्या आणि असंख्य ओढेनाले असलेला तो परिसर होता . कच्चा रस्ता होता आणि खडे देखील भरपूर होते त्यामुळे मी हळूहळू चालत होतो . इतक्यात एक साधू झप झप चालत माझ्या मागून आला आणि पाहता पाहता पुढे निघून गेला . त्याची चालण्याची ती गती पाहून मी अवाक झालो . मी तसे चालण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु त्याची गती गाठता येणे केवळ अशक्य होते . साधू ज्या गतीने चालत होता ती गती एखाद्या अॅथलीटला देखील लाजवेल अशी होती . मध्ये छोटेसे जंगल लागले . त्यात बरेच प्राणी होते असे मला जाणवले . हळूहळू उन्हाचा पारा चढत होता .थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्यदेव कृपा करतो आहे असे वाटायचे . मी सुमारे अर्धा तास चाललो असेन . हा साधू पुढे एका झाडाखाली बसलेला मला आढळला .मी मनात विचार केला , आपले बरे आहे !हळूहळू जरी चाललो तरी फारसे थांबत नसल्यामुळे आपण वेगाने चालणाऱ्या माणसांना सुद्धा गाठतो आहे !परंतु साधूचा चेहरा पाहिल्यावर मला लक्षात आले की तो वैतागलेला आहे .मला म्हणाला क्या जरुरत थी परिक्रमा मे आने की ? तो असे का म्हणतो आहे मला लक्षात आले नाही .मी त्याला म्हणालो क्या हुआ स्वामीजी ?आप इतने परेशान क्यो लग रहे है? साधू म्हणाला अगर ढंग से चल नही पाते तो परिक्रमा क्यू करते हो ?मी म्हणालो महाराज हम शहर के लोग है । इतना चलने की हमे आदत नही । ऊपर से जबसे परिक्रमा आरंभ की है जादा तर डांबर की सडक पे ही चल रहा हु । ऊस कारण मेरे पाव बहुत दर्द कर रहे है ।इसलिये धीरे धीरे चल रहा हु । साधू मला म्हणाला ,अब मुझे तुम्हारे साथ दो दिन चलना ही पडेगा । मला या वाक्याचा अर्थच कळला नाही .मी त्याला म्हणालो ,मतलब ? साधू उत्तरला ,मतलब यही है की अब मुझे तुम्हारे साथ दो दिन चलना पडेगा ।क्यूकी नर्मदा मैया का मुझे वैसा आदेश है । मला काय बोलावे कळेना .आपको नर्मदा मैया कब मिली ? मी भोळाभाबडा प्रश्न विचारला . वह सब छोडो । इतना धीरे चलने की तुम्ही क्या जरुरत थी ? मला अजूनही कळत नव्हते की नक्की काय प्रकार सुरू आहे .मी त्याला म्हणालो बाबाजी देखिये मेरी गती बहुत कम है और आपकी गती बहुत ज्यादा है । मै आपके साथ नही चल सकता । साधू लगेच उत्तरला ,वही तो मेरा कहना है ।लेकिन अब कुछ नही कर सकते क्यूकी मैया का आदेश आया है । मी लगेच त्याला म्हणालो लेकिन मैया ने मुझे ऐसा कोई सुझाव नही दिया है । साधू म्हणाला वह तुम्हारी चिंता है ।मुझे तो स्पष्ट रूप से आदेश मिला है । इसलिये दो दिन तुम्हारे साथ चलना ही पडेगा । अब जादा समय व्यर्थ मत गवाओ । हमे बहुत आगे जाना है । साधूचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजामध्ये धस्स झाले .कारण त्याची चाल खरोखरीच चित्त्या सारखी होती . आता आपली कुतरओढ होणार हे माझ्या लक्षात आले . साधू त्याची झोळी काठी कमंडलू घेऊन झपाझप चालायला देखील लागला . यांने अर्धीच लुंगी नेसली होती व वरती उघडा होता . छातीपर्यंत रुळणारी मोठी दाढी काळेभोर केस होते .वय साधारण पन्नास असावे .परंतु खरे सांगायचे तर साधूंचे वय ओळखता येत नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे . आपल्याला ४०-४५ वर्षाचा वाटणारा साधू कधीकधी ७० -८० वर्षाचा असतो . नित्य योग साधना , प्राणायाम , अखंड ब्रह्मचर्य आणि ध्यानधारणा याच्यामुळे त्यांचे वय नेहमी लपून राहते . हा साधू झपाझपा चालत पुढच्या गावातील एका चौकात जाऊन बसला . मी मागून अक्षरशः पळत पळत त्याला गाठले . इथे त्याला कोणीतरी चहा आणून दिला . तो चहा पिल्यावर मात्र साधू एकदम शांत झाला . आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला . ,देखो बेटा तुम कौन हो मुझे पता नही ।तुमने परिक्रमा क्यू उठाई है मुझे मालूम नही । तुम कहा से आये हो कहा जाओगे मुझे खबर नही । लेकिन मैयाने तुम्हारे साथ रुकने के लिए मुझे बोला है इसका मतलब तुम कोई अच्छे बच्चे जरूर हो । अब मेरी बात ध्यान से सुनो । तुम जिस परिक्रमा मार्ग से चल रहे हो वह मार्ग गलत था । गलत नही बोल सकते लेकिन सही नही था । परिक्रमा का असली मार्ग जो होता है वो नर्मदा माई के किनारे किनारे से गुजरता है ।मेरी दो परिक्रमा हो चुकी है ।यह तिसरी परिक्रमा है। मै वैसे मैया का किनारा कभी छोडता नही । लेकिन आज पता नही क्यू मैया ने मुझे किनारे से भटकाया और अंदर जंगल मे तुम मिले । मै गुस्सा उसके लिए ही हुआ था कि क्यू मैने किनारा छोडा । लेकिन मैया की शायद ऐसी इच्छा थी की तुम्ही सही मार्ग पर लाऊ । आज से दो दिन तुम मेरे साथ चलोगे । मै तुम्हे असली नर्मदा परिक्रमा कैसे करते है दिखाऊंगा और सिखाऊँगा और फिर आगे चला जाऊंगा । चलो आगे बहोत चलना है । असे म्हणून साधू आणि मी दोघे उठलो .मी रस्त्याच्या दिशेने जाऊ लागतात तो खेकसला.अरे अरे वहा नही , यहा से चलो । किनारे किनारे जायेंगे मैया के । असे म्हणत त्याने अक्षरशः पळत पळत जाऊन एक छोटासा ओढा एका उडीमध्ये ओलांडला . ओढ्याचा उतार मोठा होता . त्यावरून चालत जाता येणे देखील अशक्य . परंतु पळत गेल्यावर मात्र अशी गती यायची की ओढा एकाच उडीमध्ये पार व्हायचा ! मला मनापासून आनंद झाला ! जणू काही माझी इच्छा नर्मदा मातेने ऐकली होती आणि या साधूला माझ्या मदती करता पाठविले होते ! साधूने मला परिक्रमेचे मार्ग आणि गावातील ग्रामस्थांचे मार्ग वेगळे कसे ओळखायचे त्याचे बारकावे शिकविले . ज्या मार्गावर राजश्री/बिमल गुटख्याच्या पुड्या अधिक पडलेल्या असतात तो गावकऱ्यांचा मार्ग असतो आणि ज्या मार्गावर पार्ले जी चे रिकामे पुडे पडलेले दिसतात तो मार्ग परिक्रमेचा असतो ! त्याने सांगितलेले हे बारकावे ऐकून मला मौज वाटली. परंतु पुढे खरोखरच मला त्याने दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचा खूप फायदा झाला . हा साधू बालब्रम्हचारी होता . मोहन पाटीदार असे त्याचे नाव होते . एका छोट्याशा झोपडीमध्ये हा राहायचा . नातेवाईक आगापिछा कोणीही नसल्यामुळे मनात येईल तेव्हा उठायचा आणि नर्मदा परिक्रमा चालू करायचा . एका दिवसामध्ये ५० ते ६० किलोमीटर तो सहज चालायचा .अध्यात्म सोडून कुठल्याही लौकिक विषयावर तो एक शब्दही बोलत नसे . अगदी शेवटपर्यंत त्याने मला माझे नाव आणि गाव देखील विचारले नाही .नर्मदा मातेने मदत करायला सांगितली आहे म्हणजे हा नर्मदेचा प्रिय भक्त आहे इतकाच त्याचा शुद्ध भाव होता . हा साधू म्हणजे माझ्यासाठी नर्मदा मातेचा साक्षात आशीर्वादच ठरला !

लेखांक वीस समाप्त (क्रमश:)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर