लेखांक १२ : वेश धरावा बावळा

परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी मी सुमारे १८ ते २० किलोमीटर पायी चाललो होतो ! हा आकडा खरे तर आश्वासक होता परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . सकाळी थंडी जास्त असल्यामुळे तुम्ही कितीही वेगाने चालले तरी तुम्हाला फारसा घाम येत नाही . किंवा जरी घाम आला तरी थंड वातावरण असल्यामुळे तो सुखद असतो . हा संपूर्ण परिसर थंडीसाठी प्रसिद्ध होता . माझे हात अक्षरशः गोठून जात होते . माझ्या दंडाला (काठीला )दोन्ही बाजूंनी असलेले धातूंचे गठ्ठू अक्षरशः बर्फासारखे गार पडत . वेताचा दंड देखील खूप गार पडायचा . एकदा त्याला जिथे पकडले तिथेच धरून ठेवावे लागायचे . हात जरा देखील वर खाली केला की हाताला गार लागायचे . माझ्याकडे हातमोजे ,कान टोपी , मफलर ,स्वेटर वगैरे काहीच नव्हते . परंतु छाटी हे जे वस्त्र मी घालायचो त्यात छातीवरती कापडाचे दोन पदर येतात त्यामुळे छातीला थंडी कमी वाजायची . मला या छाटी वस्त्राची पूर्वीपासून सवय आहे . आपली छाती आणि कान गरम राहिले की थंडी फारशी वाजत नाही हे सूत्र लक्षात ठेवावे .
   हेळवाक घळ येथे छाटी आणि उपरणे (उपवस्त्र) घालून प्रस्तुत लेखक ( महाविद्यालयीन जीवनात )

छाटी हे पारंपारिक भारतीय वस्त्र . ना टाका ,ना शिवण , ना नाडी ,ना बटण ! फक्त एक कापड ! मुंजी मध्ये मुलाला प्रथम हे वस्त्र नेसवले जाते . तिथून पुढे माझ्या महाविद्यालयीन जीवनात देखील मी भटकंतीसाठी हेच वस्त्र बरेचदा नेसायचो . हे वस्त्र धड सांभाळण्यासाठी उत्तम आहे परंतु गुडघ्या खालचे पाय आणि खांद्यापासूनचे हात ,मान ,गळा हे मात्र चांगलेच गार पडायचे .आपले पारंपारिक धोतर असते , ते दुहेरी केले की त्याची लुंगी किंवा छाटी नेसता येते .
महाविद्यालयीन जीवनात प्रवासादरम्यान प्रस्तुत लेखकाने घातलेली छाटी

परिक्रमेसाठी हे अत्यंत सोयीचे वस्त्र आहे . कारण हेच वस्त्र तुम्ही फेटा म्हणून सुद्धा गुंडाळू शकता .उपवस्त्र म्हणून घेऊ शकता .किंवा मुख्य पेहराव म्हणून घालू शकता .रात्री झोपताना खाली अंथरू शकता किंवा थंडी वाजल्यास पांघरू देखील शकता . अंग पुसावयास देखील याचा उपयोग आहे किंवा घडी करून बसण्यासाठी आसन म्हणून देखील वापरता येते .आपला भारतीय पारंपरिक पोशाख किती विचारपूर्वक बनविलेला आहे हे परिक्रमा केल्यावर लक्षात येते .बर याच्यामध्ये आकाराचा (साईझचा ) घोळ होण्याची शक्यता नाही .परिक्रमेमध्ये जर मी विजार (पॅन्ट ) घातली असती , अशी कल्पना करा , तर मला दर पंधरा दिवसाला एक एक इंच कमी मापाची विजार विकत घ्यावी लागली असती ! सहा आठ इंच कंबर सहज कमी झाली होती माझी .
 डोक्याला मी फेटा बांधलेला असायचा त्यामुळे उन्हापासून आणि थंडीपासून संरक्षण व्हायचे . हा फेटा बांधायची आवड मला अगदी लहानपणापासून आहे ! 
       ९ वर्षाचा असताना स्वतः नेसलेला फेटा
   वय वर्षे ७. मित्रमंडळींसोबत बेंदूर / बैलपोळा सण साजरा करताना , प्रस्तुत लेखक स्वतः नेसलेल्या फेट्यात  ! 
 वेष कुठलाही असो , फेटा अत्यावश्यक ! अमरावती नजीक बांधलेल्या मंदीराचा कळस बसविताना ...

तात्पर्य परिक्रमेसाठी मी निवडलेला वेश हा अशा पद्धतीने अत्यंत पारंपारिक आणि सोयीचा होता .तसेच मला त्याची सवय असल्यामुळे काहीच त्रास झाला नाही .बऱ्याच लोकांना लुंगी मध्ये इतके चालायची सवय नसते त्यामुळे त्यांना त्रास होतो .बहुतांश परिक्रमावासी आजकाल शिवलेले कपडे घालतात .सदरे , शर्ट , कफनी , बंडी , स्वेटर्स , टोप्या ,हॅटस , बंगाली अथवा झब्बे हे सर्रास घातलेले दिसते . अर्थात देश काल परिस्थितीनुसार ते क्षम्य व योग्य देखील आहे परंतु सोयीचे मात्र निश्चित नाही ! सोयीचा वेश म्हणाल तर आपला पारंपारिक वेषच !त्यात सुद्धा कमरेला एखादी नाडी बांधली की एक मोठा कप्पा पोटापाशी तयार व्हायचा .त्यात तुम्ही चार आणे ठेवले तरी दिवसभर पडत नाहीत . त्यात तुम्ही अक्षरशः दहावीस किलोपर्यंत सामान ठेवू शकता !
अंतर्वस्त्रे देखील मी विकतची घातली नाहीत . छाटीचीच एक चार इंचाची पट्टी फाडायची . आणि अजून एक अर्धा इंची पट्टी फाडून त्याचे कटिसूत्र करायचे (नाडा ) . झाली लंगोटी तयार ! सर्व साधू संन्यासी हाच वेश धारण करतात . परिक्रमेमध्ये देखील हे अंतर्वस्त्र अत्यंत सोयीचे जाते . एक तर ते धुणे वाळविणे सोपे असते .  व जुने विरल्यास किंवा हरविल्यास नवीन बनविणे देखील फार सोपे असते . कोणावरती अवलंबून राहावे लागत नाही .तसेच व्यवस्थित लज्जा रक्षण होते .ही लंगोटी बांधण्याची साधूंची पद्धत मात्र थोडीशी वेगळी आहे .पहिलवान ज्या पद्धतीने बांधतात त्याहून थोडीशी निराळी अशी ही पद्धत आहे .आणि माझे सौभाग्य असे की ती पद्धत मला पू . सियाराम बाबा यांच्याकडून शिकायला मिळाली . कशी ते पुढे त्यांच्या प्रकरणांमध्ये सांगेन .याखेरीज थंडीचे कपडे उदाहरणार्थ थर्मल वेअर वगैरे सोबत ठेवले तर वयोवृद्ध परिक्रमावासींना सोयीचे पडते . गरजेपेक्षा जास्त कपडे सोबत ठेवू नयेत हे मात्र अगदी निश्चित . 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात 
वेश असावा बावळा | परी अंतरी नाना काळा । सगट लोकांचा जिव्हाळा ।मोडोची नये ॥
विशेषतः परिधान कसे असावे या विषयातला माझा थोडासा अभ्यास आहे . हौस म्हणून काही काळ बॉलिवूडमध्ये मी सहायक वेशभूषाकार  केशभूषाकार रंगभूषाकार अर्थात कॉस्चुम डिझायनर व हेअर मेकअप ची कामे केलेली आहेत . मुळात भारतीय वेश म्हणजे काहीतरी कमीपणाचे लक्षण आणि पाश्चात्य वेश म्हणजे काहीतरी खूप भारी असा एक गैरसमज पाश्चात्य व्यापाऱ्यांनी पसरवलेला आहे . कारण सोपे आहे भारतीय वेश अधिक खरेदी करावा लागत नाही . पाश्चिमात्य ते कपडे मात्र सारखे बदलावे लागतात .
मी डिझाईन केलेले काही परिधान खालील प्रमाणे आहेत .
 

सांगायचे तात्पर्य इतकेच की माझे भारतीय परिधानासंबंधातील विवेचन एकांगी नसून अभ्यासपूर्ण आहे याची वाचकांना कल्पना यावी .
ओघाने वस्त्रांचा विषय निघाला म्हणून थोडे सविस्तर सांगितले .असो .अत्यंत उत्साहाने आणि वेगाने चालत सकाळी दहा वाजता मी एका तिठ्यावर येऊन पोहोचलो . याला हिंदीमध्ये तिराहा असे म्हणतात .देवरी गावानंतर आणि धनपुरी गावाच्या आधी बम्हनी तिराहा लागतो . मी इथून जात असताना एक खणखणीत आवाज मला ऐकू आला बाबाजी आगे मत जाओ ।इधर अंदर आओ ।आवाजातला आत्मविश्वास लगेच जाणविण्यासारखा होता .हे डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणून आहेत ज्यांनी स्वतःच्या जागेमध्ये माँ नर्मदा अन्नक्षेत्र नावाने सेवाकार्य सुरू केलेले आहे .
 हे स्वतः मोठे जमीनदार असून जबलपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत .भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले डॉक्टर प्रल्हाद पटेल मी गेलो तेव्हा देखील गाव पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यग्र होते . स्वतः डॉक्टर असलेले पटेल आपल्या घरी तर रुग्ण तपासातच परंतु आजूबाजूच्या गावांमध्ये देखील त्यांचे दवाखाने आहेत .तसेच गेली अनेक वर्षे न चुकता ते २७ किलोमीटर प्रवास करून ग्वारी घाटावर जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतात ! मग कितीही ऊन वारा थंडी पाऊस असला तरी ते जातातच !
 डॉ . प्रल्हाद पटेल बम्हनी तिराहा जि . जबलपूर

 यांनी मला दवाखान्यामध्ये बसविले आणि चहा मागवला . मला काही वैद्यकीय त्रास होत आहे का हे त्यांनी आधी विचारून घेतले .माझा परिक्रमेचा पहिलाच दिवस असून मी केवळ अर्ध्याच दिवसांमध्ये सुमारे वीस किलोमीटर एका दमात चाललो आहे हे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा मात्र त्यांचा चेहरा गंभीर झाला . ते मला म्हणाले मेरी आपसे बिनती है की आप आज यहा मुकाम करे । मी म्हणालो नाही नाही मला आज तीस किलोमीटर तरी चालायचे आहे ! आता मात्र डॉक्टर साहेबांचा सूर बदलला .ते मला म्हणाले , "बाबाजी मेरा जनम इस गाव मे हुआ है ।मैने इस रास्ते से जाने वाले लगभग हर परिक्रमावासी का दर्शन किया है ।लाखो परिक्रमावासियोंको में व्यक्तिगत रूप से जानता हु ।मेरी सलाह मानिये । शुरू के दिनो मे इतना जादा चलोगे तो बाद मे परिक्रमा पूर्ण नही कर पाओगे । परिक्रमा के शुरुवाती दिनो मे केवल ५ से लेकर दस किलोमीटर ही चलना चाहिए । आप तो उसे चार गुना चल चुके है इसलिये अभी आपको दो तीन दिन विश्राम करना पडेगा । "त्यांचे हे बोलणे ऐकून माझा चेहराच पडला !ते त्यांच्या क्षणाक्ष नजरेच्या लक्षात आले !ते मला म्हणाले , "बाबाजी बुरा मत मानना ।नर्मदा माता की आप पर कृपा है इसलिये आप पहले ही दिन मुझे मिले ।मुझे ज्यादा तर वह परिक्रमावासी मिलते है जो ओंकारेश्वर या अमरकंटक से परिक्रमा उठाते है ।यहा पहुंचने तक उन के पैरोंकी हालत खराब हो जाती है । आपके पास अभी भी समय है । मै जैसे बताता हु वैसे करीये । यह एक डॉक्टर की आग्या मान लिजिए । "
त्यांचे म्हणणे असे होते की मी जर त्यांनी आखून दिलेल्या प्लॅन प्रमाणे चाललो तर भविष्यामध्ये दिवसाला ५० - ५५ किलोमीटर सुद्धा आरामात चालू शकेन ! माझ्यातील विद्यार्थी जागा झाला आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण पायाची रचना शरीरचना अशा बऱ्याच शंकांचे समाधान करून घेतले .डॉक्टर ज्ञानी होते .त्यांनी सांगितलेले मुद्दे मला पटत गेले . सुरुवातीचे फक्त दहा दिवस जर मी संयम बाळगला तर पुढची परिक्रमा अतिशय निर्वेधपणे आणि वेगाने पार पडेल याची मला खात्री पटली .बऱ्याच आरंभ शूर लोकांना पुढे पायाने इतका त्रास दिलेला मला आढळला की ते कधी कधी परिक्रमा अर्धवट सोडून घरी निघून गेले . डॉक्टर प्रल्हाद पटेल दुसऱ्याच दिवशी मला भेटणे ही नर्मदा मातेची माझ्यावर झालेली असीम कृपाच मी मानतो ! थंडी अजूनही खूप होती त्यामुळे मी कडक उन्हामध्ये अंथरूण टाकून पडून राहिलो . डॉक्टर साहेब नित्यनेमाप्रमाणे जबलपूरला नर्मदा मातेच्या दर्शनासाठी निघून गेले . दरम्यान करोना लसीकरण या विषयावर आमची चर्चा झाली होती .माझ्या नावावर दुसरा डोस निश्चितपणे नोंदविण्याची त्यांनी मला ग्वाही दिली . तसेच मी रोज किती किलोमीटर चालतो आहे याची पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत डायरीमध्ये नोंद ठेवण्याची सूचना त्यांनी मला केली .
डॉक्टर साहेबांनी एक सुंदर असे दत्त मंदिर बांधलेले होते .त्या मंदिराच्या दारात दोन तीन तास उन्हामध्ये चांगले अंग शेकून घेतले . दुपारी पटेल काकूंनी अतिशय सुग्रास जेवण आणून वाढले . यांना एक मुलगा व एक मुलगी होती . आल्यावर आपण नक्की गप्पा मारू असे सांगून पटेल साहेब गेले होते . त्यांची वाट पाहत दत्तप्रभूं पुढे मी करुणात्रिपदी वगैरे म्हणू लागलो .माझ्यासोबत भगवद्गीता आणि एक स्तोत्रमालेचे पुस्तक होते .वेळ मिळाला की त्यातील काहीतरी वाचायचे असा संकल्प मनात धरला होता . हा दिवस होता पौष शुद्ध तृतीया शके १९४३ , बुधवार ५ जाने २२ .


मागील लेखांक

पुढील लेखांक

लेखांक बारा समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. किती अन कसं चालावं , पुढे पुढे ४०-५० किमी चालायसाठी?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पहिला दिवस - ५ ते ६ किमी
      २ - ७ ते८ किमी.
      ३ - ८ते १०
      ४ - १० ते१२
      ५ - १२ ते १५
      ६ - १५ ते १७
      ७ - १७ ते २०
      १० - २५ ते ३०
      ३० - ४० ते ५०
      ६० - ५० ते ६०

      हटवा
  2. रामदास स्वामी ही छाटी हेच वस्त्र नेसत असत असे त्यांच्या चरित्रात येते. आता छाटी या पारंपारिक भारतीय वस्त्राचे इतके व्यवस्थित वर्णन केले आहे तर 'छाटी हे वस्त्र कसे नेसावे' यावर पण काही यायला हवे. यूट्युबवर व्हिडियो शोधायचा प्रयत्न केला पण एकही व्हिडियो नाहीये. तसेच आंतरजालावरही काही माहिती दिसून येत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. वेश धरावा बावळा | अंतरी असाव्या नाना कळा | सगट लोकांचा जिव्हाळा | मोडू नये || दासबोध दशक 15-1-31

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर