लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !

सगळे आटोपून निघेपर्यंत वेळ झाली होती ११ : ११ !  सूर्य चांगलाच तळपत होता , त्यामुळे थंडी जाणवत नव्हती .नर्मदेच्या काठाकाठाने चालत चालत निघालो . माझ्या असे लक्षात आले की वाटेत लोकच तुम्हाला रस्ता सांगतात .लोक सांगू लागले ,बाबाजी यहा से जाओ । बाबाजी वहा से जाओ । त्याप्रमाणे पुढे चालत राहिलो . वाटेमध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय लागले . मला कोणीतरी असे सांगितले होते की मध्येच पोलीस तुम्ही करोना लस घेतली आहे का नाही याची तपासणी करतात व लस घेतली नसेल तर घरी पाठवतात . मी एक डोस कागदोपत्री घेतला होता . त्यामुळे दुसरा डोस मिळतो का ते पाहण्याकरता आयुर्वेदिक कॉलेजमध्ये चौकशी केली .

 तिथले मुख्य डॉक्टर भेटले . त्यांनी सांगितले , तुम्ही कुठलीही चिंता करू नका . ही नर्मदा माता आहे .हिच्या काठावरती अन्य कोणाचेही नियम चालत नाहीत . मैय्या के किनारे करोना फिरोना कुछ नही चलता ! त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे चालत रहा . संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील नर्मदा परिक्रमा व्यवस्थित चालू होती आणि एकाही परिक्रमा वासीला करोना झालेला नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले .एका डॉक्टरचा देखील नर्मदा मातेवर किती विश्वास आहे हे पाहून आनंद वाटला . अर्थात करोना या रोगाबद्दल माझे विचार वेगळेच होते ,तो मुळात रोग नसून आपल्या देशावर किंवा एकंदरीत जगावरच चीनने केलेले ते एक आक्रमणच होते . ते शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होते . असो . या डॉक्टरांनी मला मध्ये जर काही त्रास झाला तर कुठल्या कुठल्या आयुर्वेदिक वनस्पती वापरता येतात त्याची सविस्तर माहिती दिली . अगदी फोटो वगैरे दाखवून वनस्पती ओळखायला देखील शिकविले . उदाहरणार्थ त्वचारोगासाठी टाकळा नावाची वनस्पती असते तिच्या वाळलेल्या बिया दह्यामध्ये वाटून लावल्या की आराम वाटतो , कुठली जखम झाली तर दगडी पाला वाटून लावावा किंवा रक्तस्त्राव होत असेल तर तिथे कोरफडीचे पान धरावे असे अनेक आयुर्वेदिक नुस्खे त्यांनी मला सांगितले आणि बिनधास्तपणे नर्मदा जलामध्ये स्नान करण्याचा आणि नर्मदा जलपानच करण्याचा सल्ला त्यांनी दिला . ते मला म्हणाले नर्मदेचे पाणी किती जरी खराब तुम्हाला दिसले तरी देखील ते प्या कारण ते सर्वात मोठे औषध आहे .स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर हे सांगत असल्यामुळे मला फार बरे वाटले . तिथून निघालो . पुढे (मोहन धाम ) गीता धाम नावाचा आश्रम लागला .

त्यांनी आत येण्याची विनंती केली परंतु पुढे जावे असे वाटले .त्यामुळे येताना येतो असे त्यांना सांगून पुढे निघालो . मजल दरमजल करत जबलपूरच्या बाहेर पडलो . इथली एक गंमत आहे लोक तुम्हाला खूप आग्रहाने बोलावितात परंतु जर तुम्ही नकार दिला तर तितक्याच सहजपणे तो नकार पचविला जातो . कोणाला  देखील वाईट वाटत नाही . हे लक्षात आल्यावर मात्र मी कधी कुठल्या आश्रमामध्ये कोणालाही कुठला शब्द दिला नाही जो पाळण्या करता पुढचा जन्म घ्यावा लागावा !
जबलपूरच्या बाहेर कालीधाम आश्रम लागला . त्याला बाहेरून नमस्कार केला आणि नर्मदा मातेचा काठ पकडला . 
कालीघाट जबलपूर येथून दिसणारे नर्मदेचे मोहक रूप
आता समोर एक जंगल दिसत होते . नर्मदा नदीवरून एक मोठा पूल गेला होता .याला भटौली पूल (Bhadoli bridge on google map)असे म्हणतात .नर्मदेच्या उत्तर तटावरील भटवली गाव आणि दक्षिण तटावरील मानेगांव , मंगेली  या गावांना हा पूल जोडतो.
भटोली पुलावरून दिसणारे नर्मदा मातेचे विहंगम दृश्य

 मी त्या जंगलामध्ये शिरणार इतक्यात सायकल वरून एक जण वेगाने आला .तो पुलावरून नर्मदा ओलांडून निघाला होता परंतु मला पाहून वेगाने कच्च्या रस्त्याने सायकल चालवत खाली आला होता . नर्मदे हर महाराज ! तिकडे जाऊ नका .तो जुना परिक्रमा मार्ग आहे .नवा मार्ग इकडून महामार्गने आहे .असे तो म्हणाला . त्याने पूर्वी परिक्रमा केलेली होती . नर्मदेवरील बरगी धरणामुळे जुना परिक्रमा मार्ग पाण्यामध्ये बुडाला होता आणि नवीन मार्ग म्हणजे डांबरी सडक याला पर्याय नव्हता .
 कारण पुढे एक गौर किंवा परियत नामक मोठी नदी मध्ये आडवी येणार होती .त्याने सांगितलेले ऐकावे लागले ,कारण गुरुजींनी मला सांगितले होते की वाटेत जो कोणी तुम्हाला भेटेल , नर्मदे हर म्हणेल ,त्याचे बोलणे ऐकायचे .नर्मदा माता सांगते आहे असे समजून ऐकायचे .त्यामुळे पुलावरती चढलो आणि भुकेची जाणीव झाली . पहिलाच दिवस आणि पहिली चाल असल्यामुळे झपाझप चालत इथपर्यंत आलो होतो ! तोपर्यंत पोटात भुकेची काही जाणीव नव्हती . परंतु इथवर आलो आणि मात्र अचानक कडाक्याची भूक लागली . पुलावरून चालता चालता विचार करत होतो गेल्यावेळी आपण जेव्हा मध्य प्रदेश मध्ये आलो होतो तेव्हा इंदोरच्या सराफा बाजार मध्ये जाऊन मस्तपैकी गरमागरम पोहे आणि जलेबी खालली होती !आता मात्र तसले काही मिळणे शक्य नाही . हा सुनसान रस्ता आणि डोक्यावर तळपणारा सूर्य याखेरीज आपल्या सोबत आता काहीच नाही . असे विचार करत मनाला शांत करत नर्मदेचे नामस्मरण सुरू केले आणि इतक्यात एक मिनिटही पूर्ण होण्याच्या आत एक बुलेट माझ्या शेजारी येऊन थांबली . मी गाडीची नंबर प्लेट पाहिली तर ती कोरी होती . गाडीवर दोघेजण बसले होते त्यातील एक जण उतरला . माझ्या हातामध्ये दोन कागदी पुडे ठेवून नर्मदे हर असे म्हणून निघून गेला . गाडीला क्रमांक नव्हता हे माझ्या पक्के लक्षात राहिले आहे .दोन्ही पुडे हातात घेऊन शंभर एक पावले मी विमनस्क अवस्थेमध्ये चाललो. पुडे गरम होते . हाताला चटका बसेल इतके गरम होते .एवढे गरम काय दिले आहे ?उघडून तरी पहावे असे वाटले म्हणून बाजूला थांबलो ,महामार्गाच्या कडेला लोखंडी रेलिंग असतात त्यावर टेकलो आणि पुडे उघडून पाहिले तर काय ! एका पुड्यात गरमागरम पोहे आणि दुसऱ्या पुड्यात गरमागरम साजूक तुपातली जिलेबी होती !  
( प्रातिनिधीक प्रतिमा )

क्षणात डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या ! समोर मंद गतीने स्मितहास्य करत वाहणारी नर्मदा मैया दिसत होती . बुलेट गतीने अदृश्य झाली होती . भरून पावलो . मन भरले . पोटही भरले . अगदी तीच इंदोरी पोह्यांची चव होती जी माझ्या जिभेवर सतत रेंगळायची  आणि अगदी तीच साजूक तुपातली कुरकुरीत जिलेबी , गुलाब पाकळ्या घातलेली! आणि लक्षात आले इथे यायचे तर कुठलीही इच्छा करता कामा नये .निरीच्छ व्हावे तरच परिक्रमावासी म्हणवावे . अन्यथा मैया आहेच कोड कौतुक पुरवायला ...



लेखांक नऊ समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर