लेखांक ५० : सिद्धक्षेत्र टिमरावन ते झिकौली शुककुटीची रावण टीम

ककरा घाट सोडल्यावर नर्मदा एक सुंदर असे उजवे वळण घेते . हे वळण खूप मोठे असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी ते टाळून सरळ रिछावर येथे पोहोचतात.
परंतु मला नर्मदेचे एकही रूप नजरे आड करायचे नव्हते त्यामुळे मी उजवीकडे वळलो . अतिशय शांत निवांत आणि निर्मनुष्य असा हा परिसर आहे . पुरेशी झाडी आहे . समोरच्या ताटावर शेती दिसते . टिमरावन गावामध्ये जाईपर्यंत नर्मदा उभा तट चिरत जाते . व गावानंतर अतिशय सुंदर आणि निर्मनुष्य असा वाळूचा किनारा आहे .
 टिमरावन येथील नर्मदेचे सुंदर वळण
सिद्धवती नर्मदा संगम असलेले हे वळण एखाद्या शिवलिंगाप्रमाणे भासते . टिमरावन गावात अनेक छोटी मंदिरे आहेत . त्यातील सिद्धेश्वर मंदिर प्रमुख आहे . 
हे एक सिद्ध क्षेत्र आहे . श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर एका उंच घाटावर होते .खडा चढ असलेल्या पायऱ्या एका दमात तोडत वरती मंदिरात पोहोचलो . छोटेसे मंदिर एका उंच चबुतऱ्यावर बांधलेले होते . मंदिरातील शिवलिंग अत्यंत सुंदर व प्रभावी होते . मंदिरामध्ये एक ऊर्जा भरून राहिलेली होती . इथून हलूच नये असे वाटत होते . मंदिराच्या बाहेरील बाजूला कट्ट्यावर मी माझे आसन लावले . इतक्यात राजकुमार पाराशर असे नाव असलेले त्या मंदिराचे पुजारी तिथे आले . त्यांनी मला इथे रात्री खूप थंडी पडते आणि वारे असते तरी कृपया उघड्यावर विश्राम न करता शेजारी असलेल्या धर्म शाळेमध्ये आसन लावावे अशी विनंती केली . जशी मैयाची इच्छा असे म्हणून सामान उचलले आणि आत मध्ये नेऊन एका कोपऱ्यात आसन लावले . परिक्रमेमध्ये जितके कमी सामान तुम्ही सोबत ठेवाल तितके चांगले असते ते याचसाठी . पुजारी बुवांनी मला एक सुंदर पपई कापून आणून दिली . थंडीमुळे थंडगार पडलेल्या तिच्या फोडी गळ्यातून पुढे सरकताना सर्व घसा कसा गारेगार करत होत्या . परंतु हे मूळ उष्ण प्रकृतीचे फळ असल्यामुळे भरपूर खाल्ले . शिवाय उद्या एकादशी आहे म्हणून मला राकेश शर्मा साधूने दिलेला फलहार देखील सोबत होता तो खाऊन , पूजा आरती करून आता झोपावे असा विचार करत होतो . बाहेर पुरेसे अंधारले होते .
 टिमरावन येथील श्री सिद्धेश्वराचे मंदिर .मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे .
गेल्या गेल्या मंदिराच्या याच कट्ट्यावर मी आसन लावले .
नंतर मागे दिसणाऱ्या लाल रंगाच्या धर्म शाळेत मला पुजाऱ्याने पाठवले . 
प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घ्या .
 । ओम सिद्धेश्वराय नमः शिवाय ।
इतक्यात तो बिहारी साधू आणि त्याचा चेला तिथे टपकले . संध्याकाळी अजून एक साधू आला आणि त्याने बाहेर मी जिथे आधी आसन लावले होते तिथेच आसन लावले . बिहारी बाबाने आणि त्याच्या चेल्याने नेमके माझ्या शेजारीच आसन लावले . पुन्हा त्याचे ब्रह्मज्ञान सुरू झाले . तो नवा नवा साधू बनला होता आणि त्याला कोणाला किती ज्ञान देऊ आणि किती नाही असे झाले होते . नवनवीन शिष्य करण्याची घाई त्याला झाली होती . परंतु तो जे बोलतो आहे ते कोरडे ज्ञान आहे हे एखाद्या लहान मुलाला देखील कळाले असते .त्यामुळे मी तिथून उठून तडक मैयामध्ये गेलो . स्नान वगैरे आटोपून मंदिरामध्ये जाऊन बसलो . आणि माझ्याजवळ असलेली स्तोत्रांची पुस्तके सोबत घेतली होती. तिथे बसून मी महादेवाची एक एक स्तवने गाऊ लागलो . शिवमानसपूजा ,शिवमहिम्नस्तोत्र ,शिव पंचाक्षर स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र ही स्तोत्रे मी प्रत्येक शिवालयामध्ये आवर्जून म्हणत असे . शिवाला ही स्तोत्रे फार प्रिय आहेत . मला या सर्व स्तोत्रांची गोडी लागली ती उमा मोहन नावाच्या एका गायिकेने तयार केलेल्या स्तोत्रमालिकेमुळे . आपणही फावल्या वेळामध्ये उमा मोहन या दक्षिण भारतीय गायिकेने गायलेली स्तोत्रे अवश्य ऐकत जावीत . आधुनिक संगीत आणि पारंपारिक चाली यांचे सुंदर मिश्रण असलेली ही अप्रतिम सांगितीक कलाकृती असते . त्यांचे उच्चारही बऱ्यापैकी स्पष्ट आहेत . असो . मी मंदिरामध्ये बसलेलो असतानाच गावातील चार तरुण मुली आल्या . आणि ज्यांनी अतिशय सुंदर अशी शिवस्तुती म्हटली . मला पिपरहा येथील मुक्कामात चंगा बाबांचे शिष्य तिवारी यांनी एक स्तोत्रांचे पुस्तक भेट दिले होते . अरे हो ! हे तुम्हाला सांगायचेच राहिले ! स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांना त्या भागामध्ये चंगाबाबा नावाने ओळखायचे . कारण त्यांची ठरलेली काही वाक्य होती . "हमारा सुनेंगे तो चंगा ! नही तो पंगा ! " किंवा " आओ तो वेलकम ! जाओ तो भीड कम !" तसेच ते सर्वांना मध्येच चार वेळा नारायण नारायण म्हणायला लावायचे . असो . तर तिवारींनी मला दिलेल्या या पुस्तकामध्ये गणपती , देवी , महादेव ,विष्णू यांची महत्त्वाची स्तोत्रं एकत्रित केलेली होती . ते पुस्तक मी त्या मुलींना भेट दिले . त्यांनी रोज या मंदिरामध्ये येऊन यातील एक एक स्तोत्र म्हणून पाठ करून टाकण्याचा शब्द मला दिला . मला त्या मुलींबद्दल खूप कौतुक वाटले .अगदी याच वयातल्या शहरातल्या मुली आजकाल काय करतात हे त्यांच्या परिचितांनी विचार करून पहावे . या मुली शिकत देखील होत्या . घरातील , शेतातली , गुराढोरांची सर्व कामे करत होत्या आणि तरी देखील दिवसातून आवर्जून वेळ काढून , या शिवमंदिरामध्ये येऊन , त्यावर नर्मदा जलाचा अभिषेक करून ,शिवस्तुती म्हणून मग घरी जात होत्या .  या मुलींचे संसार भविष्यात त्या सुखाने करणार याबाबत शंकाच नाही ! नर्मदे काठच्या स्त्रिया अतिशय समाधानी , संयमी ,गृहकर्तव्यदक्ष आणि त्यागी आहेत असे माझे स्पष्ट मत झालेले आहे .आज-काल दुःखाचे संसार जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा त्यातील सहभागी घटकांचे तारुण्यातील वर्तन कसे राहिलेले असते ,याच्याशी संगती लावून पाहिल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील . सूज्ञास अधिक सांगणे न लगे ! असो. 
आज निराहरी झोपायचे मी ठरवले . इकडे मी धर्मशाळेमध्ये परत आलो तोपर्यंत बिहारी बाबाने गावातील चार-पाच गांजाडी गोळा करून रितसर कार्यक्रम सुरू केला होता . हे गांजा पिणारे एका गोला मध्ये बसतात .प्रत्येकाकडे स्वतःचे एक छोटेसे फटकुर असते . म्हणजे सुती फडक्याचा छोटासा तुकडा .हा तुकडा अतिशय तलम मऊसूत कापडाचा असेल याची काळजी ते घेतात . हा प्रत्येकाचा वैयक्तिक फिल्टर असतो . यानंतर एक जण सुरेख पैकी गांजा निवडतो आणि मळतो . तो तंबाखू मध्ये मिसळून , मातीची किंवा धातूची चिलीम घेऊन , त्यात खाली एक कापसाचा बोळा टाकून त्यावर ठासून भरला जातो . त्यानंतर काही मंत्र म्हटले जातात . ही गावठी मंत्र अत्यंत विनोदी असतात . प्रत्येक माणसाचे स्वतःचे वेगळे मंत्र असतात .  शेवटच्या मंत्रात महादेवाला गांजा पिण्यासाठी आमंत्रण दिले जाते . आणि मग तिथला जो मुख्य मनुष्य आहे तो एक मोठा झुरका मारून गांजाची चिलीम पेटवतो . त्याला दुसरा मनुष्य काडी लावत असतो . एकदा चिलीम शीलगविली की भरपूर दम मारून ती पुढच्या माणसाकडे दिली जाते . मग तो पुन्हा दम मारून तिला पुढे पाठवतो . एकदा त्यांचा हा गांजा फुकायचा कार्यक्रम चालू झाला की मध्ये कोणी बोलत नाही . फक्त त्या नशेचा आनंद घेत राहतात . हे सर्व मी केवळ माझे निरीक्षण नोंदवतो आहे .  प्रस्तुत लेखक धूम्रपानाचा तीव्र निषेध करतो हे आपण जाणताच . गांजाचे हे गावठी मंत्र कसे असतात याचा एक व्हिडिओ मला सापडला . तो पहावा .म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या चार-पाच गांजेकस लोकांनी मिळून किती गोंधळ त्या धर्म शाळेमध्ये घातला होता .


सुंदर अशी शिवस्तुती ऐकून आणि म्हणून आल्यावर हे असले मंत्र ऐकून माझं डोकं सटकलं आणि मी रुद्र अवतार धारण करून सर्वांना बाहेर काढले ! बिहारी साधू तर थरथर कापायला लागला . मी त्या सर्वांना सांगितले की गप एका कोपऱ्यामध्ये बसून गांजा फुकायचा . दंगा घालायचा नाही . नाहीतर माझ्याकडे गांजा सोडवण्याचा मंत्र आहे तो म्हणेन ! गांजा सुटेल या भीतीपोटी सर्वजण बाहेर पळाले ! त्यांच्यासाठी जीवनातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे गांजा होती . गांजा पिणारे लोक गांजा पिण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात . बाहेर इतकी मरणाची थंडी असून देखील सर्वजण बिनधास्त बाहेर जाऊन बसले .रात्रभर त्यांचा धिंगाणा सुरू होता . साधूचा केला सतत आत बाहेर करत होता . याने त्या बिचाऱ्या चेल्या कडून त्या सर्व माणसांचा आणि स्वतःचा स्वयंपाक करून घेतला . सुदैवाने या बिहारी साधूने आपल्या तरुण चेल्याला अजून गांजा प्यायला शिकवले नव्हते . स्वतः जवळ असलेला गांजा त्याला द्यावा लागू नये असा स्वार्थी हेतू त्यात होता . मी गुपचूप खुणेने त्या शिष्याला जवळ बोलावले . बाहेर सर्वजण गांजाच्या नशेमध्ये चढलेले होते . मी त्याला विचारले तू खरोखर या महामूर्ख माणसा सोबत समाधानी आहेस का ?  अगदी खरं खरं सांग . मी कोणाला सांगणार नाही . घाबरू नकोस .तुझ्या मनातले सर्व  बोल .मुलगा रडायला लागला . त्याने रडत रडत त्याची सर्व कर्मकहाणी मला सांगितली . हा बिहारी त्याला एकांतामध्ये भरपूर मारहाण करायचा . दहशत घालून त्याला त्याने सोबत ठेवला होता . शिष्य शिष्य नावाखाली त्याचा पक्का गुलाम बनवून टाकला होता . शिवाय पाप पुण्याच्या भ्रामक कल्पना त्याच्या डोक्यात घालून गुरुद्रोहाचे भय त्याला घातले होते . बिहार मधल्या एका छोट्याशा गावातील हा अशिक्षित मुलगा होता . आपला गुरु सांगेल ते त्याच्यासाठी सर्वस्व होते . आधीच या बिहारी बाबाने याची तीन साडेतीन वर्षे वाया घालवली होती . १३ ते २३ - २४ हेच पराक्रमाचे खरे वय असते .आणि नेमकी याच वयातली त्याची साडेतीन वर्षे वाया गेली होती . परंतु त्याला आतापर्यंत मी जे सांगतो आहे ते सांगणारा कोणी भेटला नव्हता . मी त्याला सांगितले , हे पहा काल तू स्वतः पाहिले आहेस की मी थोडेफार जग पाहिलेले असल्यामुळे सर्व साधुसंत माझ्याशी आदराने बोलतात . आणि तुझ्या गुरूला हाडहुड करतात . याचा अर्थ मी तुला नक्कीच काही चुकीचा सल्ला देणार नाही हे तुला मान्य आहे का ? तो हो म्हणाल्यावर , मी त्याला ताबडतोब इथून पळून जाण्याचा सल्ला दिला . इथून गाडरवाडा गाव जवळ होते . इथून काही ना काही करून बिहार गाठता येणे त्याला शक्य होते . माझ्याकडे थोडेफार पैसे जमले होते ते मी त्याला दिले . त्याला सांगितले आता अजिबात विचार करू नकोस . एकदा का या भोंदू साधूच्या नादाला तू लागलास की संपलास .  खरा साधू असा नसतो . त्याला खरा साधू कसा ओळखायचा त्याच्या काही खुणा देखील सांगितल्या . त्याला दोन पर्याय सांगितले . एक तर थेट घरी जाऊन आई-वडिलांसोबत रहा किंवा एखादा चांगला साधू शोधून त्यांच्या आश्रमात जाऊन रहा . परंतु माझे मत विचारशील तर थेट घरी जा आणि आई-वडिलांची सेवा कर , असा सल्ला मी त्याला दिला . आई वडील मुलासाठी किती महत्त्वाचे असतात हे त्याला समजावून सांगितले . कालपर्यंत आमचा मार्ग सामायिक असल्यामुळे तिथून कसे महामार्गाला लागायचे हे मी त्याला समजावून सांगितले .  तो मुलगा विचार करत बसला .बिहारी बाबा पुन्हा बाहेरून त्याच्यावर खेकसला . " ताटे वाढ आणि आम्हाला जेवायला घाल #@£&@#* ! " बिचाऱ्या मुलाने गुपचूप सर्वांना जेवायला घातले . रात्री उशिरा ऐन थंडीमध्ये थंडगार पाण्याने तो भांडी घासत बसला . मला त्या मुलाचे फार वाईट वाटले . हळूहळू माझा डोळा लागला . पहाटेच्या सुमाराला अचानक काहीतरी गार पायाला लागले म्हणून मी डोळे उघडले . तर तो मुलगा दोन्ही हाताने माझे पाय धरून नमस्कार करत होता . कस्तुरी ? क्या हुआ ? असे विचारत मी उठणार इतक्यात तो चित्त्याच्या चपळाईने पळून गेला !  दारातून बाहेर उडी मारताना ची त्याची ती मूर्ती अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नाही ! 

संग्रहित छायाचित्र
बिहारी साधू इकडे ढाराढूर घोरत पडला होता . आणि इकडे कस्तुरी मुक्त झाला होता ! त्याचे नाव तरी किती समर्पक होते पहा ना ! कस्तुरी ! त्या कस्तुरी मृगाचे देखील असेच आहे . आयुष्यभर तो त्या कस्तुरीच्या शोधामध्ये वण वण , वन वन भटकतो .परंतु अखेरपर्यंत त्याला हेच कळत नाही की ती कस्तुरी त्याच्याच पोटात होती ! नर्मदे काठी असलेल्या कस्तुरी नावाच्या या दोन प्राण्यांना मी विसरू शकत नाही . एक होती पोटासाठी " नर्मदे हर " म्हणून दाखवणारी कस्तुरी पोपटीण . तर दुसरा हा कस्तुरी बिहारी . पहिल्या प्राण्याला जरी मी मुक्त करू नाही शकलो तरी दुसरा प्राणी मुक्त करता आला याचे समाधान आहे . सकाळी उठून माझी आन्हिके आटोपून निघणार इतक्यात पुजारी आले .त्यांनी सोबत आणलेला चहा मला इथे पाजला . आणि मला घरी चला अशी विनंती केली . 
पाराशर गुरुजींच्या शेतातूनच घराकडे जाणारा मार्ग होता .
घरी गेल्यावर त्यांनी मला पुन्हा एकदा घरच्या गाईच्या सकस दुधाचा उत्तम पैकी चहा पाजला . घर मोठे होते . पुजारी ही त्यांची वंशपरंपरागत वृत्ती होती . व्यवसाय नव्हता . आज कालच्या लोकांना वृत्ती हा शब्द माहिती नाही म्हणून मुद्दाम सांगतो . पूर्वीच्या काळामध्ये वंशपरंपरेने चालत आलेले काही हुद्दे होते . नाईक , शेटे , देशपांडे ,देशमुख ,पाटील ,कुलकर्णी ,जोशी ,उपाध्ये , कुलोपाध्ये , राजोपाध्ये , पुजारी , बडवे , पुराणिक या सर्व अशा वृत्ती आहेत . हे व्यवसाय नाहीत . असो . 
राजकुमार पाराशर पुजारी यांना मुखाचा लकवा मारलेला होता .त्यामुळे मंत्र म्हणताना त्रास व्हायचा . त्यांनी मला विचारले , की मी आयुष्यभर या सिद्धेश्वराची सेवा केली मग माझे असे कसे काय झाले ? मी त्यावर त्यांना कर्माचा सिद्धांत माझ्या परीने समजावून सांगितला . इतक्यात मला आठवले की नुकतीच मला जी पुस्तके चंगा बाबा आश्रमात मिळाली होती त्यात कर्माचा सिद्धांत हे हिराबाई ठक्कर यांचे अप्रतिम पुस्तक देखील होते . कर्म का सिद्धांत असे हिंदी भाषेतील हे पुस्तक मी लगेच गुरुजींना वाचायला देऊन टाकले . आणि अजून काही थोडेफार बोलून तिथून नर्मदे हर केले .आज एकादशी होती म्हणजे चालण्याचा दिवस होता ! मैया चा किनारा पकडून चालत राहिलो . अप्रतिम वाळूचा किनारा संपल्यावर आधी काटजुनगर आणि मग रिछावर नावाचे गाव लागते . काटजू नगर गावात दोन छोटे आश्रम आहेत . 
वाटेतील कुटी आश्रम
अजून एक वाटेतील मंदिर
चालण्याचा दिवस असल्यामुळे कुठेही न थांबता आज चालत राहिलो . चालण्याचा दिवस अशासाठी म्हणायचे की आज एकादशीचा उपवास असल्यामुळे कुठे भोजन प्रसाद घ्यायचा नसतो . त्यामुळे हलक्या पोटाने चाल देखील खूप अधिक होते . तसेच भोजनासाठी थांबण्याचा वेळ चालण्यामध्ये वापरला जातो आणि अधिक अंतर कापले जाते . या भागातील नर्मदेची रूपे खूप सुंदर आहेत . वाचकांसाठी काही निवडक रूपे .
उंच मातीचे टिले आणि खाली वाहणारी नर्मदा माई
समोरील वाळूचा किनारा
अशा दगडांवरून तोल सांभाळत चालायला फार मजा येते . या खडकावरून मी गेलेलो आहे . 
रम्या रेवा अन् तिची आपोज्योती
नर्मदेने उभे कापलेले तट आणि त्यावरील शेती . इथे खालून चालायला मार्ग नाही असे वाटू शकते .
परंतु असा एक पाऊल ठेवता येईल असा मार्ग सापडतो .आणि पुढे निश्चितपणे जाता येते .
असे अनेक टापू मी नर्मदा पातळीनेच पार गेले . पुढे मार्ग कसा आहे ते सांगणारा नेमका एखादा नावाडी भेटत असतो .
रिछावर आणि नीलकुंड यामधील नर्मदा
रिछावर च्या पुढे नीलकुंड नावाचे स्थान नर्मदेमध्ये आहे . इथे एका भव्य घाटाचे काम सुरू होते व त्या घाटावर अतिशय भव्य आणि सुंदर असे मंदिर बांधले होते . याचा कळस फारच आकर्षक होता आणि खूप दूरवरून दिसायचा .
नीलकुंड येथील भव्य घाट आणि मंदिर समोरच्या तटावरून असे दिसते
नर्मदेला येणारे मोठे पूल सहन करेल अशी ही पूर प्रतिबंधक भिंत काँक्रीट मध्ये बांधलेली आहे . तिच्यावरून चालताना आणि चढताना घसरायला होते . मध्ये मध्ये पाण्यासाठी लावलेले पाईप आहेत त्यांचा वापर पायरी सारखा करत मात्र वेगाने चढता येते . 
या छायाचित्रावरून तुम्हाला पूर प्रतिबंधक भिंत अथवा रिटेन्शन वॉल च्या आकाराची कल्पना यावी
घाट देखील चढायला खूप आहे
नर्मदे काठी असलेल्या काही मोजक्या लक्षात राहणाऱ्या मंदिरांपैकी या मंदिराचा कळस आहे .
कळस आणि मंदिर भव्य दिव्य आहे .
नीलकुंडेश्वर महादेवाचे दर्शन घ्या
मंदिराप्रमाणेच आतले शिवलिंग देखील भव्यदिव्य आहे .
अतिशय रम्य असा हा नीलकुंड परिसर आहे
याला नीलकुंड असे का म्हणतात हे मंदिरातून खाली नर्मदे कडे पाहिल्यावर कळते . सर्वत्र हिरवट रंगाची दिसणारी नर्मदा इथे आल्यावर आपोआप निळसर दिसू लागते .  अधिक उंचीमुळे समोरच्या आकाशाचे प्रतिबिंब नर्मदेमध्ये पडते . शिवाय खोल पाणी असल्यामुळे बहुतांशी स्थिर असते व आकाशाचे प्रतिबिंब त्यामुळे अधिक चांगले उमटते . ते काही असो , परंतु पाणी निळसर दिसते हे मात्र खरे . पुढे कुठे असे निळे पाणी दिसत नाही . 
शक्कर नर्मदा संगम . डावीकडून येते ती नर्मदा उजवीकडून शक्कर येत आहे .

हे मंदिर संपल्यावर लगेचच शक्कर नावाची एक नदी नर्मदेला येऊन मिळते . तीव्र उतार उतरल्यावर नदीपात्र लागते . इथे रस्ता बनवण्याचे काम एक जेसीबी करत होता . त्याने रस्ता खोल खोदून ठेवला होता . अखेरीस मी खड्ड्यातून पलीकडे जाऊ शकत नाही हे पाहून त्याने जेसीबी च्या जबड्या वर पाय ठेवून पलीकडे उडी मारायला मला सांगितले . किंवा जबड्यामध्ये बसवून पलीकडे तो मला सोडणार होता . परंतु परिक्रमेमध्ये वाहनावर चढणे वर्ज्य आहे . त्यामुळे मी खड्ड्यात उडी मारली . आणि पुन्हा वर चढलो .सर्वत्र वाळू असल्यामुळे लागत काहीच नाही . प्रचंड वाळू घेऊन येणारी ही नदी आहे . तिचे पात्र विस्तृत आहे परंतु अत्यंत उथळ आहे . पाणी अतिशय स्वच्छ आणि अक्षरशः साखरेसारखे गोड लागते ! आकंठ पिऊन घेतले !
सुदैवाने गुगल नकाशावर मला याच जेसीबीचा काम करतानाचा फोटो सापडला !मागे पांढरे मंदिर दिसते आहे . नर्मदेचे मी चाललेले वळण दिसते आहे . तीव्र उतार आणि जेसीबीने काढलेला खड्डा देखील दिसतो आहे . शक्कर नदीने साठविलेली वाळू देखील खाली दिसते आहे .
 शक्कर नदी किती उथळ आहे ते दाखवणारे संग्रहित चित्र . उन्हाळ्यामध्ये ही पूर्ण आटून जाते .
शक्कर नदी पार गेल्यावर पुन्हा पावलांना गती दिली .  सोकलपूर , अनघोरी , उसराय , तुईयापानी , पिपरपानी , सोनदहार , केलकछ , महुआखेडी , खैरुवा, पिटरास , खरैटी मार्गे झिकोली गाव गाठले . 
सोकलपूरचा किनारा . इथे प्रचंड प्रमाणात वाळू आहे . आणि ती चांगल्या दर्जाची आहे .
अनघोरी गावामध्ये एका भव्य पिंपळाच्या झाडाखाली छोटासा आश्रम होता . त्या साधून  काळा चहा पाजला .
इथे मी थोडी विश्रांती घेतली .
याच कट्ट्यावर बसून चहा घेतला .
पुन्हा किनाऱ्याचा मार्ग पकडला . 
नर्मदेच्या काठी असे हजारो वृक्ष आढळतात ज्यांची मुळे मैयाने माती वाहून नेल्यामुळे उघडी पडलेली असतात . उरलेल्या मातीची धूप थांबविण्याचे महत्त्वाचे काम ही झाडे करतात . तसेच कठीण मार्गाने चालताना या मुळांचा अतिशय खंबीर आधार परिक्रमा वासींना असतो . 
पिंपळेश्वर महादेव मंदिर ( पिपलेश्वर )
 श्री पिपलेश्वर महादेव 
गुरु गोरक्षनाथ मंदिरातील अप्रतिम मूर्ती
 पिपरपाणी येथे मैयाकाठी धुनी लावून बसलेला साधू (संग्रहित छायाचित्र )
कधी वाळूचा किनारा तर कधी उभा कापलेला कडा असे भूगोल पार करत करत पुढे चालत राहिलो . आज पायांना चांगली गती आली होती . खूप चालावे असे वाटत होते . 
दरम्यान उसराई गावामध्ये एक मोठे पंप हाऊस होते . यातून नर्मदा जलाचा उपसा जोरात सुरू होता . पाणी घेऊन जाणाऱ्या पाईप मध्ये थोडीशी फट पडल्यामुळे पाण्याची फार मोठी कारंजी उडत होती . या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह नाही हे तपासून मी तिथे मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि स्वच्छ कपडे देखील धुवून घेतले . या  फवाऱ्याला इतकी गती होती की काही सेकंदापेक्षा अधिक त्याच्यासमोर उभे राहता येत नसे .  त्यामुळे कपडे अतिशय स्वच्छ निघाले . 
हेच ते पंप हाऊस जिथे मी फवाऱ्याखाली उत्तम स्नान केले .
इथे खाली एक माताराम कपडे धुवत होती . इतक्यात एक पिसाळलेले कुत्रे तिच्या दिशेने धावू लागले . मी धावतच काठी घेऊन त्याच्या अंगावर गेलो . त्यामुळे ते घाबरून पुढे पळून गेले . कदाचित मी आंघोळीला थांबलो नसतो तर त्या पाठमोऱ्या बाईला ते नक्कीच चावले असते . दिवसातून किमान दोन वेळा व अशा पद्धतीने कधी कधी तीन किंवा चार वेळा देखील माझे स्नान सहज होत असे . नर्मदेच्या पाण्यामध्ये  न्हाऊन निघण्याचा आनंदच काही वेगळा आहे ! 
सुंदर सोनदहार घाटाची काही छायाचित्रे
असे घाट वाटेमध्ये लागले की मी शक्यतो वर जाऊन मंदिरांची दर्शने घेऊन खाली येतसे .
इथे नर्मदा माता खूप सुंदर दिसते .
नर्मदेचे पाणी देखील या भागात खूप स्वच्छ आणि सुंदर आहे .
माझा काठावरून चालत येण्याचा मार्ग . मध्ये असे घाट आडवे आले की बार वरून उड्या मारून जावे लागायचे . सोनदहार घाट असाच उडी मारून पार केला . 
खैरुआ गावामध्ये नेपाळी बाबाचा खूप सुंदर आश्रम आहे . समोर असलेल्या अंडीया गावांमध्ये त्याचा खरा आश्रम आहे . नर्मदा मढीया अशा नावाने त्याने स्वर्ग उभा केला आहे . त्याची झलक या काठावर पाहायला मिळते .
नेपाळी बाबाच्या समोरील आश्रमाची शाखा
असे समोरासमोर आश्रम फार कमी ठिकाणी आढळतात . परंतु इथे न थांबता मी पुढे चालत राहिलो . सध्या आयोध्या मध्ये राम मंदिर बांधून झाल्यावर १००८ यज्ञांसाठी जी यज्ञशाळा आणि जप शाळा बांधली आहे ती या नेपाळी बाबांनीच बांधली आहे . बाबा अतिशय हुशार आहे . आणि त्याच्या इतकादुसरा कल्पक साधू मी उभ्या परिक्रमेमध्ये पाहिला नाही . या बाबा बद्दल समोरच्या तटावर गेल्यावर एका विस्तृत लेखाद्वारे माहिती घेऊ . सध्या आपल्याला झिकोली गाठायचे आहे . झिकोली गाठण्यामागे एक कारण होते . स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांनी मला असे सांगितले होते की तू झीकोली मध्ये पोहोचेपर्यंत तुझ्यासाठी मी एक नवीन कमंडलू तिकडे पाठवण्याची व्यवस्था करतो . आता आपल्याला एक नवीन कमंडलू मिळणार आणि तोही एका चांगल्या साधूच्या हातून या आनंदापोटी मी चालत होतो . पिटरास या गावांमध्ये शिवनारायण सिंह चौहान नामक एक ग्रामस्थ मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने घरच्या दुधाचे एक लिटर अप्रतिम ताक मला पाजले व दहा रुपये दक्षिणा देखील दिली . मी उभ्या उभ्या त्याच्या प्रवेशद्वारावरती भिंतीवर जय श्रीराम व शुभ लाभ अशी अक्षरे लिहून दिली .ती त्याला फार आवडली व त्याने सर्वांना बोलवून दाखवली .
 पिटरास चा नर्मदा घाट
 पिटरास इथे एका मजेशीर शिव मंदिराचे बांधकाम सुरू आहे .
मध्ये खरेटी इथे अखंड रामनाम सुरू होते . त्याचे दर्शन घेतले व थोडेसे नामस्मरण केले .
खरेटी येथील अखंड सिताराम जप कुटी आश्रम .समोर सिद्ध घाट . वाळूमध्ये कुंपण टाकून केलेली शेती दिसते आहे . अशी शेती पुढे जागोजागी आढळते . इथे शक्यतो काकडी वर्गीय वेल वनस्पती लावतात . 
मजल दरमजल करत झिकोली गाव गाठले .
झिकोली गावामध्ये तीन आश्रम होते . एक छोटा घाट म्हणून होता . इथे पूल होता . त्या पुलाखाली हा आश्रम होता .पुलाच्या पलीकडे एक बडा घाट म्हणून होता .या दोन्ही ठिकाणी मी कोणी संन्यासी कमंडलू ठेवून गेला आहे का याची चौकशी केली . परंतु नकार मिळाला .
 झिकोली आणि बोरासदरम्यानचा पूल
महापुरामध्ये या पुलावरून नर्मदा वाहते .
 इथे गावामध्ये दद्दा आश्रम म्हणून एक आहे . तिथे चौकशी करा असे मला एकाने सांगितले . त्यामुळे मी दादाजी धुनीवाले यांचा तो आश्रम शोधत त्या आश्रमा पर्यंत गेलो . परंतु आश्रमामध्ये बसलेल्या एका म्हाताऱ्या साध्वीने मला अपमानपूर्वक बाहेर हाकलले !  परिक्रमावासींना नो एन्ट्री असलेला हा पहिलाच आश्रम मी नर्मदे काठी पाहिला . मी तिला फक्त इतकेच विचारत होतो की कोणी तुम्हाला कमंडलू आणून दिला आहे का . परंतु तिने फार वाईट शब्दात अपमान करून मला हाकलून लावले . या आश्रमाचा मार्ग एका कुटीवाटेतून जात होता . ज्याला आपण झोपडपट्टी असे देखील म्हणतो . मी बाहेर आल्याबरोबर त्या झोपड्या मधून बाहेर आलेल्या स्त्री-पुरुषांनी मला तिथे कशाला गेलात वगैरे सांगायला सुरुवात केली . त्या सर्वांना आश्रमातील म्हाताऱ्या स्त्रीच्या विक्षिप्त वागण्याचा अनुभव होता आणि ती बाई त्यासाठी बदनाम होती . किती दुर्दैव आहे पहा . आपल्या गुरूंच्या नावाने चालविलेला आश्रम स्वतःच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे असा अधोगतीला जात असेल तर त्या सारखे दुर्दैव ते दुसरे कोणते ! किमान जिथे आश्रम उभा आहे तिथल्या स्थानिकांमध्ये तरी तुम्हाला थोडाफार आदर , सहारा मिळायला नको का ! अखेरीस मी त्या कमंडलू चा नाद सोडला आणि पुढे चालू लागलो . पुढे बरीया घाट नावाची धुनीवाले दादाजी यांची तपोभूमी आहे . तिथे शिवरामदास नावाचे महंत राहतात . त्यांनी मला सांगितले की हा झिकोली मधला आश्रमच मुळात बोगस आहे . आणि त्यांचा धुनीवाले दादाजींशी काहीही संबंध नाही . असो . तो आश्रम परवडला इतकी पुढची शुक कुटी मजेशीर होती ! 
खरे तर छोटा घाट चांगला होता . तिथे मुक्कामाची सोय देखील उत्तम होती . उत्तम सोय म्हणजे काय तर जिथे मुक्कामासाठी खोली नाही व थेट नर्मदेच्या काठावरच झोपावे लागते त्याला मी उत्तम सोय मानत असे ! कारण इथे पडल्या पडल्या देखील नर्मदेचे दर्शन व्हायचे .आवाज कानावर पडायचा .
 झिकोली येथील सुंदर नर्मदा
परंतु माझ्या नशिबात नसलेल्या त्या आभासी कमंडलूच्या नादामध्ये मी पूल ओलांडला होता आणि परिक्रमे मध्ये शक्यतो परत उलटे फिरत नाहीत .त्यामुळे पुढे जो काही पर्याय मिळेल तिथे आसन लावणे मला क्रमाप्राप्त होते . त्यात ही कुटी सापडली ! एका शिष्याने आवाज दिल्यामुळे मी छोट्याशा कुटीमध्ये जिना चढून वर गेलो . खाली एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीमध्ये आसन लावले होते .
वामन रूपातील एक गांजा प्रिय पाखंडी बाबा येथे बसला होता . वेदांत मताचा जो अव्हेर करतो त्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये पाखंडी असे म्हटले जाते . त्याच अर्थाने मी हा शब्द इथे वापरला आहे याची कृपया नोंद घ्यावी . देव ,धर्म , मोदी ,भाजप , सण , उत्सव ,पूजा विधि ,यज्ञयाग ,कर्मकांड इतकेच काय साक्षात नर्मदा मैया व नर्मदा परिक्रमा यांची देखील अश्लाघ्य निंदा तो अखंड करत होता . पुढच्या आश्रमाची माहिती विचारल्यावर तो मला म्हणाला की मी नर्मदेमध्ये रोज डोलडाल ला जातो . तिथे डावीकडे एक ओढा आहे . त्याच्यापुढे मी जात नाही . तेवढीच नर्मदा मला माहिती आहे . आणि सारे शिष्य हसायला लागले . तो आणि त्याचे स्थानिक ग्रामस्थ शिष्य अखंड गांजा ओढत होते . त्याने निंदा करणारे वाक्य उच्चारावे व सर्वांनी मिळून फिदी फिदी हसावे असे सर्व चालले होते . मला राग यावा म्हणून मुद्दाम सर्व चालू आहे असे वाटत होते . साधूच्या दहा बाय दहाच्या खोलीला एक छोटीशी खिडकी होती . त्यातून तो सतत खाली थुंकत होता . आपण नर्मदा पात्रामध्ये थुंकत आहोत याची जरा देखील खंत त्याला वाटत नव्हती . नर्मदा मैया माझी परीक्षा घेत आहे असा भाव ठेवून मी शांतपणे सर्व पाहत होतो . साधू मला म्हणाला , "तुझे भोजन प्रसादी तो लगेगी ! लेकिन मेरे यहा भोजन भी नही मिलेगा और सदावरत भी नही मिलेगा । रहना है तो रहले ।" त्याच्या या वाक्यावर सर्व शिष्य मिळून फिदी फिदी हसू लागले . "और एक बात समझ लेना बेटा ।तुम जहां रुके हो वहां नीचे बड़े घाट पर ठेला लगाने वाले लोगों का सामान पड़ा है ।उसमें से नारीयल मुरमुरा बताशा चुराके खा मत लेना । " पुन्हा सर्व गांजाडे हसू लागले .
मी देखील त्यांच्या हसण्यामध्ये सामील झालो आणि म्हणालो , "अच्छा हुआ । आज ही मै शुक कुटी मे आया ।आज मेरा ग्यारस का उपवास है । ग्यारस के दिन मै भूखा ही सोता हू । " मग साधूला काय वाटले कोणास ठाऊक त्याने मला चहा करून पाजायची आज्ञा शिष्याला दिली . चहा घेऊन मी खाली स्नानाला गेलो . वाळूचा घाट होता . इकडे फारशी वर्दळ नव्हती पण समोर असलेल्या बोरास नावाच्या गावामध्ये मात्र मोठा मेळा कायम लागलेला असतो . इकडे काही किरकोळ दुकाने होती . 
 झिकोली बडा घाट येथील दुकाने
ते दुकानदार दुकान बंद केले की सामान या साधूच्या एका खोलीमध्ये कोंबून ठेवत . त्या दहा बाय दहा च्या अत्यंत अस्वच्छ , घाणेऱड्या , वासाड्या , अंधाऱ्या , कुबट खोलीमध्ये मी रात्र कशीबशी काढली . कधी एकदा उजाडते असे मला झाले होते . सकाळ होताच तिथून मी धूम ठोकली . नशिबाने एकादशीचा उपवास होता म्हणून मी वाचलो . या कुटीबाबत अजून बरेच काही सांगता येण्यासारखे होते परंतु ते न सांगितलेलेच बरे . सुदैवाने ही कुटी दरवर्षी चार महिने पाण्याखाली जाते . त्यामुळे साधूला नर्मदा माहिती नसली तरी नर्मदेला कुटी चांगली माहिती आहे . 
पुढे गेल्यावर मला लक्षात आले की जय सेवा अशी घोषणा देणाऱ्या , सर्वसामान्य आदिवासी लोकांना भडकवणाऱ्या ब्रिगेडी संघटनेचा प्रभाव या ठिकाणी आढळत होता . ही मोजपट्टी लावल्यावर शुक कुटी ची सर्व मापे कळाली . असो .
एक राष्ट्र म्हणून आपल्या भारत वर्षाला एकसंध करताना अशा देखील लोकांचा सामना आणि समावेश आपल्याला आपल्या राष्ट्र कार्यामध्ये करून घ्यायचा आहे हे नेहमी प्रत्येक कार्यकर्त्याला डोक्यात ठेवावेच लागेल . इतकाच धडा नर्मदेने इथे मला दिला . 



लेखांक पन्नास समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर